(घोषित दि. 24.11.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने त्याचे वाहन पिक-अप व्हॅन क्रमांक एम.एच.21 डी. 8185 चा दिनांक 07.06.2010 ते 06.07.2011 या कालावधीसाठी गैरअर्जदार न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडे रक्कम रुपये 2,47,400/- चा विमा उतरविलेला होता. सदर विमा कालावधीमध्येच दिनांक 29.11.2010 रोजी त्याचे वाहन त्याच्या नाईवाईकाचे सामान घेवून येत असतांना रात्रीच्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर धडकले. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाने त्याचा ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यातच उभा केला आणि रात्रीच्यावेळी टेललॅम्प लावणे जरुरी असुनही तो लावला नाही, त्यामुळे अपघात झाला. अपघातामध्ये त्याच्या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. अपघातानंतर पोलीसांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाविरुध्द व तक्रारदाराच्या वाहनाच्या चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला. त्यानंतर त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतू दिनांक 15.07.2011 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने अपघाताच्यावेळी त्याच्या वाहनामध्ये परवानगी नसतांना 13 प्रवासी बसवून त्याने पॉलीसीतील अटीचे उल्लघंन केले असे कारण दर्शवून त्याचा विमा दावा फेटाळला. विमा कंपनीने दिलेले सदर कारण चुकीचे असून विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास वाहनाच्या नुकसानी बद्दल गैरअर्जदार विमा कंपनीकडून रक्कम रुपये 2,00,000/- व्याजासह देण्यात यावे.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, अपघाताच्यावेळी तक्रारदाराच्या वाहनाच्या चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तक्रारदाराचे वाहन हे केवळ माल वाहतूकीसाठी असुन अपघात झाला त्यावेळी त्याच्या वाहनामध्ये 13 प्रवासी प्रवास करीत होते आणि त्यापैकी पाच प्रवासी मरण पावले व इतर प्रवासी जखमी झाले. तक्रारदाराने त्याच्या वाहनामधून प्रवाशाची ने-आण करण्याची परवानगी नसतांना प्रवासी बसविले ही बाब पॉलीसीतील अटीचे उल्लघंन आहे. म्हणून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला व तो योग्य कारणांवरुन फेटाळण्यात आलेला असुन तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही व त्यास त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.व्ही.बी.इंगळे आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड. संदिप देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराचे वाहन पिक-अप व्हॅन क्रमांक एम.एच.21 डी-8185 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 07.06.2010 ते 06.07.2011 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता आणि विमा कालावधीमध्येच त्याच्या वाहनाचा अपघात झाला व अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाल्यामुळे त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा दावा दाखल केला होता आणि तो विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीने फेटाळला, या विषयी वाद नाही.
विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे वाहन केवळ माल वाहतूक करण्यासाठी असुन त्याच्या त्या वाहनामधून प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी नाही. परंतू अपघाताच्यावेळी तक्रारदाराच्या वाहनामध्ये 13 प्रवाशी होते ही बाब पॉलीसीतील अटीचे उल्लघंन असल्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला.
गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराच्या वाहनाचा अपघात झाला त्यावेळी त्याच्या वाहनामध्ये 13 प्रवाशी होते हे सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने मंचासमोर दाखल केलेला अपघाता बाबतचा एफ.आय.आर. नि. 3/1 मध्ये तक्रारदाराच्या वाहनामध्ये 12 व्यक्ती प्रवास करीत असल्याचा उल्लेख आहे. परंतू केवळ एफ.आय.आर. मध्ये असलेल्या सदर उल्लेखामुळे तक्रारदाराच्या वाहनामध्ये अपघाताच्यावेळी 12 प्रवाशी असल्याचे सिध्द झाले असे म्हणता येणार नाही. कारण अपघात झाला त्यावेळी तक्रारदाराच्या वाहनात बसलेले प्रवाशी कोण होते याचा काहीही उल्लेख एफ.आय.आर. मध्ये नाही. तसेच विमा कंपनीने तक्रारदाराच्या वाहनामधून अपघाताच्यावेळी प्रवास करणा-या एकाही व्यक्तीची साक्ष मंचासमोर नोंदविलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या वाहनामध्ये 13 प्रवाशी प्रवास करीत होते हे विमा कंपनीचे म्हणणे आधारहीन व चुकीचे असल्याचे सिध्द् होते. आमच्या मतानुसार गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत गंभीरपणे चौकशी न करता अर्धवट माहितीच्या आधारे त्याचा विमा दावा चुकीचे कारण देवून फेटाळला आहे. सदर बाब गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीच आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
तक्रारदाराने त्याच्या वाहनाच्या नुकसानीपोटी गैरअर्जदार विमा कंपनीकडून रुपये 2,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदाराच्या वाहनाचे रुपये 2,00,000/- चे नुकसान झाल्याबाबत तक्रारदाराने कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच विमा कंपनीने देखील सर्वेअर व लॉस असेसरचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार नेमकी किती रक्कम मिळण्यास पात्र आहे हे ठरविणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत विमा कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या सर्वेअर व लॉस असेसरच्या अहवाला प्रमाणे नुकसान भरपाई देणे योग्य राहील.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- गैरअर्जदार न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीने तक्रारदारास त्याच्या वाहनाच्या नुकसानीपोटी सर्वेअर व लॉस असेसरने निश्चित केलेले नुकसानीचे मुल्य नुकसान भरपाई म्हणून निकाल कळाल्या पासून एक महिन्याचे आत द्यावे. जर विमा कंपनीने नेमलेल्या सर्वेअर व लॉस असेसरने याबाबत तक्रारदाराच्या वाहनाच्या नुकसानीचे मुल्य निश्चित केलेले नसेल तर गैरअर्जदार विमा कंपनीने एक महिन्याच्या आत लॉस असेसरकडून तक्रारदाराच्या वाहनाच्या नुकसानीच्या मुल्या बाबत अहवाल घेवून त्या अहवालामध्ये नमूद केल्या प्रमाणे तक्रारदारास नुकसान भरपाई द्यावी.
- गैरअर्जदार न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 2,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.