मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 31/12/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याचे वडील श्री. चंदनदास कांताराम सतनामी हे वेस्टर्न कोल फिल्डसमध्ये वलनी खदान येथे कार्यरत असतांना त्यांनी त्यांचा व त्यांच्या पत्नीची ‘जनता वैयक्तीक अपघात पॉलिसी’ काढलेली होती. दिव्यामध्ये तेल भरतांना आग लागून झालेल्या अपघातामध्ये तक्रारकर्त्याचे आईवडील जबर जखमी झाले. दि.25.01.2000 रोजी आईचा, तसेच दि.30.01.2000 रोजी तक्रारकर्त्याचे वडीलांचा उपचारादरम्यान निधन झाले. सदर घटना पोलिस स्टेशन खापरखेडा येथे मर्ग क्र. 3/2000 आणि 4/2000 म्हणून नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांद्वारे घटना पंचनामा तयार करण्यात आला. शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येऊन शव विच्छेदन अहवाल मागविण्यात आला. तसेच सदर घटनेची माहिती गैरअर्जदार यांना देऊन रीतसर कागदपत्रे सादर करण्यात आली. पॅलिसी रकमेची मागणी करण्यात आली. तक्रारकर्ता 18 वर्षांचा पूर्ण झाल्यावर त्याने सदर पॉलिसी संदर्भात गैरअर्जदार यांना वारंवार विचारणा करुनही गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा आजतागायत निकाली काढला नाही. वास्तविक तक्रारकर्त्याला उच्च शिक्षणासाठी विमा रकमेची गरज होती. गैरअर्जदार यांची सदर कृती सेवेतील कमतरता असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे, म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विमा पॉलिसीची रक्कम व्याजासह मिळावी, तक्रारीचा खर्च व मानसिक आणि शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 16 दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर, मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला असता, गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त झाल्यावर त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 यांचा नोटीस 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊनही परत न आल्याने त्यांना नोटीस मिळाल्याचे घोषीत करुन, त्याउपरही ते मंचासमोर हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.05.10.2011 रोजी पारित करण्यात आला.
3. गैरअर्जदार यांच्या कथनानुसार सदर तक्रारीस कालमर्यादेची बाधा येते. तक्रारकर्ता यांनी 18 वर्षाचा झाल्यानंतर दाव्या संदर्भात वारंवार चौकशी केल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य केले. परंतू तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांचे मते तक्रारकर्त्याने कधीही कागदपत्रासह दावा गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सादर केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याचे वडील चंदनदास हे डब्ल्यु.सी.एल.मध्ये नौकरीस होते व ते जनता वैयक्तीक अपघात पॉलिसी अंतर्गत विमाकृत होते हे तक्रारकर्त्याने कागदपत्रासह सिध्द करावे. सदर तक्रार दाव्यास कुठलेही कारण घडलेले नसल्यामुळे, अपरिपक्व असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी. अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 यांनी केलेली आहे.
4. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
5. सदरचे प्रकरण पाहता, दिव्यात तेल भरत असतांना भडका उडून त्यात तक्रारकर्त्याचे आई वडिल जळाले. दि.25.01.2000 रोजी तक्रारकर्त्याची आई व 30.01.2000 रोजी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, यावेळी तक्रारकर्ता 11 वर्षाचा होता. नंतर 18 वर्षाचा झाल्यानंतर (बालिग) तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 8 वर दाखल पॉलिसी अंतर्गत केलेल्या दाव्या संदर्भात तक्रार या मंचात केलेले आहे. एकंदर परिस्थितीचा विचार, तसेच न्यायाचा विचार करता सदर तक्रार कालमर्यादेत आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याच्या मते त्याने गैरअर्जदार क्र. 2 यांना रीतसर कागदपत्रे देऊन मृत्यूची माहिती देण्यात येऊन पॉलिसी रकमेची मागणी करण्यात आली होती. परंतू दाखल दस्तऐवजावरुन विमा पॉलिसीचा दावा आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे दाखल केला व केव्हा केला याबाबत तक्रारकर्त्याने कुठलाही सुस्पष्ट पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारीस कारण उद्भवले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सदर तक्रार अपरिपक्व आहे, तेव्हा तक्रारकर्त्याने आवश्यक कागदपत्रासह विमा दावा गैरअर्जदार यांचेकडे सादर करावा. गैरअर्जदार यांनी 45 दिवसाच्या आत तक्रारकर्त्याचा दावा निकाली काढावा. त्यानंतर तक्रारकर्त्यास काही वाद असेल तर तक्रारकर्ता या मंचात दाद मागू शकतो. उपरोक्त विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) उपरोक्त निरीक्षणासह सदर तक्रार निकाली काढण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.