(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार हे शेती करतात. तक्रारदार हे राहणार पानसवाडी पो.सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी गाईचा सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. तक्रारदार यांनी गाईचा विमा उतरविल्यानंतर सामनेवाला यांना टॅग दिलेला आहे. सदरहू टॅग नं.32376 व 32377 असा आहे व त्याचा विमा रुपये 45,000/- प्रत्येकी उतरविला आहे. 32377 या टॅग नंबरची काळी पांढरी / काळी बॉडी 1 शिंग छोटे आणि शेपटी पांढरी असलेली गाय अचानक दिनांक 10.05.2016 रोजी आजारी पडली. म्हणून तिचेवर वैद्यकिय उपचार दिनांक 10.05.2016 ते 13.05.2016 पर्यंत चालले होते. परंतु ती गाय आजारामध्ये बरी न होता दिनांक 15.05.2016 रोजी निमोनिया झाला असल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी तिचे शव विच्छेदन केले, त्याचा रिपोर्ट प्रकरणात दाखल आहे. सदर गाईचे शव विच्छेदन दिनांक 16.05.2016 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात आले. सदरची गाय खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांनी सोनई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचेकडून कर्ज घेतले होते. सदरचे गाईचे कर्ज रक्कम थकीत आहे. तसेच गाय मृत झाल्याबरोबर तक्रारदार यांनी सामनेवालाला फोन करुन कळविले. व त्यानंतर संपुर्ण कागदपत्रासह विमा दावा सामनेवाला यांचेकडे सादर केला व विमा रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर केला. त्यामुळे तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद क्र.15 प्रमाणे मागणी केली आहे.
3. सामनेवाला यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.14 वर प्रकरणात दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे कथन केले की, टॅग नं.32377 ही गाय निमोनिया या आजाराने मृत झाली ही बाब सोनई विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 19.05.2016 रोजी सामनेवाला यांना कळविण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्रासह सामनेवाला यांचेकडे विमा दावा सादर केला. परंतु कागदपत्राचे अवलोकन करता सदरची गाय ही दिनांक 15.05.2016 रोजी मरण पावली. त्यानंतर 4 दिवसांनी सामनेवाला यांना कळविण्यात आले. तसेच विमा दाव्यासोबत दाखल केलेले शव विच्छेदन अहवालामध्ये मृत गाईच्या कानाला टॅग नव्हता. त्यामुळे ज्यावेळी गाय मरण पावली, त्यावेळी तिचे कानात टॅग नव्हता. सामनेवाला विमा कंपनीचे पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार कानाला टॅग असणे गरजेचे होते. तक्रारदाराने 24 तासाचे आत सामनेवाला विमा कंपनीला कळविणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही व गाईच्या कानाला टॅग नव्हता. त्यामुळे मृत झालेली गाय हीच विमा उतरविलेली गाय होती ही बाब सामनेवालाचा निर्णय खोटा म्हणता येणार नाही. अशा प्रकारे तक्रारदार यांनी पॉलीसीचे अटी व शर्तीचा भंग केला, त्यामुळे सामनेवाला यांनी दिनांक 19.05.2016 रोजी तक्रारदार यांना पत्र देऊन त्यांचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. सबब सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी मंचाला केली आहे.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र, गाईचे मृत छायाचित्र तसेच त्यांचे वकील श्रीमती चौधरी यांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.गाली यांनी केलेला युक्तीवाद यावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार यांना सामनेवाला विमा कंपनी सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे काय.? | ... होय. |
2. | तक्रारदार हे सामनेवालाकडून तक्रारीतील नमुद मागणी मिळणेस पात्र आहेत काय.? | ... होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे 32377 या गाईचा विमा उतरविलेला आहे. त्या गाईचे वर्णन काळी पांढरी / काळी बॉडी 1 शिंग छोटे आणि शेपटी पांढरी असलेली गाय असा आहे. सदरहू गाईचा विमा उतरविला होता ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. सदरची गाय ही दिनांक 10.05.2016 ते 13.05.2016 पर्यंत न्युमोनिया या आजाराने आजारी होती व तिचेवर वैद्यकिय उपचार चालू असतांना ती दिनांक 15.05.2016 रोजी मृत्यू पावली. त्यानंतर त्या गाईचे शव विच्छेदन करण्यात आले, ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराने शव विच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता, सदरची गाय ही न्युमोनिया या आजाराने मृत झाल्याबाबत नमुद आहे. तसेच सामनेवाला यांचेकडे तक्रारदार यांनी विमा दावा सादर केल्यानंतर दिनांक 19.05.2016 रोजी तक्रारदार यांचे विमा दावा गाईचे मृत्यूचे वेळी गाईचे कानाला टॅग (बिल्ला) नव्हता. तसेच तक्रारदार यांनी गाईचा मृत्यू झाल्यानंतर 4 दिवसांनी सामनेवाला यांना कळविले. टॅग इनटॅग नसल्यामुळे सामनेवाला यांनी विमा उतरविलेली गाय ही मृत झालेलीच गाय होती ही बाब स्पष्ट झालेली नाही. पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार मृत झालेल्या गायीचे कानाला टॅग नव्हता. तो टॅग नसल्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा सामनेवाला यांनी नामंजुर केला. परंतु प्रकरणात दाखल असलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन पंचनामा, ग्रामपंचायत दाखला, तसेच पॉलीसी, शपथपत्र या संपुर्ण कागदपत्रावर बिल्ला नंबर नमुद आहे. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले छायाचित्रामध्ये गाईच्या कानात बिल्ला होता ही बाब स्पष्ट दिसून येते. मृत झालेल्या गाईचा पंचनामा केला, त्यावेळी तिचे कानातील टॅग नंबर नमुद केलेला होता. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, जी गाय मृत झाली ती गाय 32377 हा टॅग नंबर असलेली आहे. त्यामुळे सामनेवालाने घेतलेला बचाव ग्राहय धरता येत नाही. पॉलीसी उतरवितांना तक्रारदाराला सामनेवाला यांनी अटी व शर्ती दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या अटी व शर्ती विषयी तक्रारदार यांना कोणतीही कल्पना नव्हती. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार यांची मृत झालेली गाय ही 32377 हा टॅग नंबर असलेली आहे व सदर गाईचा सामनेवाला यांचेकडे विमा उतरविला होता. सामनेवाला यांनी विमा उतरविलेची बाब नाकारली नाही.
6. सामनेवाला यांनी मा.वरीष्ठ न्यायालयाचे न्याय निर्णय दाखल केले आहेत.
I) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI. [2013] 2 CPR (NC) 413 Rajinder Kumar Vs.United India Insurance Co.Ltd
सदरचे न्याय निवाडयामध्ये असे नमुद करण्यात आलेले आहे की, म्हैस मृत झालेनंतर लगेच सामनेवाला यांना कळविणे गरजेचे होते. सदरचे तक्रारीमध्ये तसे केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे रिव्हीजन खारीज करण्यात आले आहे. परंतु प्रस्तूतचे प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी कथन केले आहे की, गाय मृत्यू झाल्यानंतर लगेच फोन करुन सामनेवाला यांना कळविण्यात आले. त्यामुळे सदरचा न्याय निवाडा हा प्रकरणामध्ये लागू पडत नाही.
II) Uttar Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Lucknow [2009] 2 CPR 25 Oriental Insurance Company Ltd Vs. Ram Surat
सामनेवाला यांनी वरील न्याय निवाडयाचा आधार घेतला आहे. यामध्ये कथन केले आहे की, No Tag No Claim या कारणामुळे तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात आली. व विमा कंपनी यांचे अपील मंजुर करण्यात आले. परंतु प्रस्तुतचे प्रकरणामध्ये दाखल केलेले दस्तावेज, मृत गाईचे पंचनामा, शव विच्छेदन अहवाल त्यावर टॅग नंबर नमुद केलेला आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, सदरचे मृत झालेल्या गाईला टॅग नंबर होता. टॅग होता यासाठी तक्रारदाराने मृत गाईचे फोटो प्रकरणात दाखल केलेले आहेत. त्यामध्ये गाईचे कानाला इनटॅग असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे वरील न्याय निवाडा या प्रकरणात लागू पडत नाही. सामनेवाला यांनी घेतलेल्या बचावासाठी सामनेवाला यांनी कोणतीही कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केलेली नाहीत. गाईचे कानात टॅग नव्हता असे लेखी कैफियतीमध्ये व नामंजुर केल्याचे पत्रामध्ये कथन करुन तक्रारदार यांचा विमा दावा नामंजुर केला आहे. यामध्ये निश्चीतच सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी केली आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श -
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना गाईचे विमा दाव्याची रक्कम रु.45,000/- [रक्कम रुपये पंच्चेचाळीस हजार फक्त] या निकालाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी. न दिल्यास विमा दावा नाकारले तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्के दराने संपुर्ण रक्कम फिटेपावेतो व्याज द्यावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- [रक्कम रुपये पाच हजार फक्त] व या तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- [रक्कम रुपये तीन हजार फक्त] तक्रारदारास द्यावा.
4) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क दयावी.
5) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदारास परत द्यावी.