(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/11/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.24.01.2011 रोजी दाखल करुन विमा पॉलिसीची रक्कम रु.5,00,000/- मृत्यू दिनांक 18.09.2008 पासुन मासिक 18% व्याजासह मिळावी, शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळण्याबाबत मंचास मागणी केलेली आहे.
तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालिल प्रमाणे...
2. तक्रारकर्तीचे पती श्री. गौरीशंकर जमधारीलाल राय हे वणी येथील वेस्टर्न कोल फिल्ड अंतर्गत कोलार पिंपरी माईन्स येथे मिटल स्मिथ या पदावर कार्यरत होते. ते कार्यरत असतांना सन 1999 साली तक्रारकर्तीचे पतीने विरुध्द पक्ष कंपनीचा समुह व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी काढली होती. त्या पॉलिसीचा क्रमांक 47/160202/0356 असुन तीचा अवधी दि.15.09.1999 ते 14.03.2009 पर्यंत होता व सदर पॉलिसी अन्वये तक्रारकर्ती व तिचे पती या दोघांची सुरक्षीतता प्राप्त केली होती.
3. तक्रारकर्तीने पृष्ठ क्र.6 वर दाखल केलेले विरुध्द पक्ष क्र.1 च्या पत्रामध्ये खालिल प्रमाणे नमुद आहे..
“The cause of accident is not ascertained due to not conducting PM report and also this incidence was not reported to police authorities”.
या एकमेव कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
4. प्रस्तुत तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षांना बजावण्यांत आली असता ते हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे...
5. विरुध्द पक्षाने आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्तीने एफ.आय.आर. दाखल केला नाही व प्रेताचे इन्क्वेस्ट पंचनामा व पोस्टमार्टम झालेले नाही. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू घरी झाला असल्यामुळे व पोस्टमार्टम न केल्यामुळे निधनाचे खरे कारण कळू शकले नाही. तसेच पॉलिसीच्या अटी व शर्तीं क्र.2 नुसार एफ.आय.आर. व पोस्ट मार्टम रिपोर्ट असल्याशिवाय क्लेम देता येत नाही. विरुध्द पक्षाने पुन्हा नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने डब्ल्यू.सी.एल. ला तक्रारीत प्रतिवादी केले नसुन प्रस्तुत तक्रार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केली आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.17.11.2011 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्तीने यापूर्वीच लेखी म्हणणे दाखल केले, गैरअर्जदारांना युक्तिवादाकरीता अंतिम संधी देऊनही ते गैरहजर. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. तक्ररकर्तीचे पतीचा दि.26.12.2007 रोजी मोटार सायकलने भालर ते कोलार पिंपरी मार्गाने जात असतांना मोटर अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाले होते व त्यांचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना डब्ल्यू.सी.एल. हॉस्पीटल, भालर येथे नेण्यांत आले, तेथून मांजरी येथील हॉस्पीटलमध्ये नेण्यांत आले, तेथील डॉक्टरांनी रेफर केल्यानंतर केअर हॉस्पीटल, नागपूर व हॅदराबाद येथे नेऊन उपचार करण्यांत आला. त्यानंतर मिल्ट्री हॉस्पीटल, सिकंदराबाद येथे सुध्दा उपचार करण्यांत आला व दि.09.02.2008 रोजी कामावस्थेतच सुटी देण्यांत आली, परंतु त्याला शेवटपर्यंत आराम मिळाला नाही व कोमावस्थेतच दि.18.09.2008 रोजी घरीच मरण पावले.
8. केअर हॉस्पीटलमधून मिळालेल्या डिस्चार्ज समरीवरुन तक्रारकर्तीच्या पतीचे फायनल डायग्नोसिस हे सिवीअर हेड इन्जुरी असे नमुद केलेले आहे. केअर हॉस्पीटल हे सिताबर्डी पोलिस स्टेशन, नागपूर अंतर्गत येत असल्यामुळे उपचारादरम्यान कळविल्यावरुन अपघाताची नोंद घेण्यांत आली. परंतु अपघाताचे घटनास्थळ हे वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याची माहिती कागदपत्रासह वणी पोलिस स्टेशनला पाठविण्यांत आली. त्यानंतर वणी पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद घेण्यांत येऊन घटनास्थळ पंचनामा करण्यांत आला हे दस्तावेज क्र.7 वरुन स्पष्ट होते. त्याच पत्रात अपघाताचा नोंदणी क्र.13/2008 नमुद करण्यांत आलेला आहे, त्यामुळे एफ.आय.आर. नोंदविण्यांत आला नाही हे विरुध्द पक्षाचे म्हणणे पूर्णतः निरर्थक ठरते.
9. तक्रारकर्तीने अनुक्रमे दस्तावेज क्र.8,9,10,12,13,15 व 16 वरुन तिचे पतीचा मृत्यू हा उपचार दरम्यान झालेला आहे हे वस्तुनिष्ठ पुराव्यासह सिध्द झालेले आहे. तसेच उपचार करणा-या हॉस्पीटलच्या नोंदीवरुन सिध्द झाले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीला हेड इन्ज्युरी झाल्यामुळे उपचार करण्यांत आले मात्र सदर रुग्ण हा कामावस्थेत असल्यामुळे व त्याचे प्रकृतित सुधारणा होण्याची शक्यता डॉक्टरांना न दिसल्यामुळे त्यांनी सुटी देऊन घरीच त्यांचे सल्ल्यानुसार औषधोपचार करण्यांस सांगितले. त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट न केल्यामुळे रोगाचे निदान करता आले नाही हे विरुध्द पक्षांचे म्हणणे पूर्णतः तथ्यहीन असुन त्यांनी आपल्या सद्सद्विवेक बुध्दीचा वापर न करता या तांत्रीक बाबी पुढे करुन विमा दावा नाकारला हे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरात पॉलिसीच्या अटी व शर्ती क्र.2 कडे मंचाचे लक्ष आकर्षीत केले, मात्र याबाबत कुठलाही दस्तावेज मंचासमक्ष दाखल केलला नाही. तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या Certificate of Insurance (पृ.क्र.7) अटी व शर्तींची नोंद नाही, त्यामुळे सुध्दा विरुध्द पक्ष अटी व शर्तींच्या कारणास्तव दावा नाकारल्याचे विरुध्द पक्षांचे कथन मंचाने नाकारले.
11. तक्रारकर्तीने U.P.S.C.D.R.C., Lucknow,2000 Vol.I, CPJ-113, “Branch Manager, Life Insurance Corp. of India –v/s- Rajkumar Mishra”, या निकालपत्रात खालिल प्रमाणे प्रमाणीत करण्यांत आलेले आहे...
Consumer Protection Act, 1986 – section 2(1)(g)- Insurance- Accident Policy Deficiency in Service-Claim repudiated, FIR and post mortem report not produced Deceased died due to ‘Saree’ being caught in wheel of motor cycle, head injuries trained – Death merely by accident – a- furnishing of FIR and post mortem report would not mean that no accident took Place-Event covered by the word accident Repudiation baseless- Opposite party ….to make the payment alongwith rest.
12. सदर तक्रारीतील वस्तुस्थिती व वरील आदेशाती वस्तुस्थिती यात साम्य असल्यामुळे सदर निकालपत्र या तक्रारीत निष्कर्ष काढता पुन्हा विचारात घेणे संयुक्तिक आहे. तयानुसार विरुध्द पक्षाने एफ.आय.आर. व पोस्टमार्टम रिपोर्टबाबतचा वाद पूर्णतः निरर्थक स्वरुपाचे असुन मंचाने ते नाकारले.
13. S.C. 2009 CTJ 1187 (SC)(CP) , “Oriental Insurance Co. Ltd –v/s- OZma Sheeping Co. Ltd.” या निकालपत्रात खालिल प्रमाणे प्रमाणीत केलेले आहे.
Insurance Company should not adopt and attitude of avoiding payment of the genuine and bonafide claim of the insured on one pretext or the other. This attitudes put a serious question mark on their credibility and trustworthiness. By adopting honest approach, they can save inormous litigation coast and interest liabilities”.
मंचाचे असे मत आहे की, सवोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असुन सुध्दा विरुध्द पक्ष सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करुन विमा दावा निकाली न काढता तक्रारकर्तीस त्रास देण्याचे एकमेव हेतुने कृति करतात व ही विरुध्द पक्षांचे ग्राहक सेवेतील तुटी आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
13. वरील विवेचनावरुन तक्रारकर्तीने सदर तक्रार दस्तावेजांसह व निकालपत्रांचे आधारे सिध्द केलेली असुन विरुध्द पक्ष तक्रारकर्तीस पतीचा मृत्यू दि.18.09.2008 पासुन ते रक्कम अदा होईपर्यंत विम्याची रक्कम रु.5,00,000/- द.सा.द.शे.9% व्याजासह देण्यांस बाध्य आहे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- तक्रार दाखल दि.18.09.2008 पासुन ते रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह अदा करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे अन्यथा वरील रकमेवर द.सा.द.शे. 9% ऐवजी 12% व्याज देय राहील.