श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे व गैरअर्जदाराकडून मागणी केली आहे की, विवादास्पद वाहन बदलवून द्यावे, रु.11,50,000/- ही रक्कम 12 टक्के व्याजासह द्यावी, कार्यवाहीचा खर्च, बाहेर गावी जाण्याकरीता लागलेला वाहन खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा.
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, “SCODA” Super Elegance 2.0 TDI Model of Candy White Colour गैरअर्जदार क्र. 2 निर्मित हे वाहन दि.12.10.2009 रोजी रु.23,65,685/- मध्ये गैरअर्जदार क्र. 1 कडून खरेदी केले, ज्याचा नोंदणी क्र. MH 40 A 9801 होता व या वाहनाचा टाटा एआयजी इंशूरंस कंपनीकडून पॉलिसी क्र. 010045516400 अन्वये विमा काढला होता. सदर वाहनाला दि.16 जानेवारी 2010 रोजी अपघात झाला. अपघाताबाबत एफ.आय.आर. नोंदविण्यात आला. अपघातामध्ये वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वाहन दुरुस्तीकरीता गैरअर्जदार क्र. 1 कडे दुरुस्तीस पाठविण्यात आले. विमा कंपनीने त्यांचा निरीक्षक नियुक्त केला व त्यांनी पडताळणी करुन दुरुस्ती अहवाल तयार केला व वाहनाला रु.8,50,000/- दुरुस्ती खर्च लागेल असे विवरण तयार केले. अपघातग्रस्त वाहन हे झिरो डिस्क्रीप्शन स्कीममध्ये विमाकृत असल्याने दुरुस्तीचा संपूर्ण खर्च परस्पर विमा कंपनीला गैरअर्जदार क्र. 1 ला द्यावयाचा होता. तरीही गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्याला रु.2,00,000/- ची मागणी केली. अग्रीम रक्कम म्हणून तक्रारकर्त्याने ती त्यांना अदा केली. 20 दिवसाचे आत वाहन दुरुस्त करण्याचे आश्वासन देऊनही गैरअर्जदार क्र. 1 ने वाहन त्या कालावधीत दुरुस्त करुन दिले नाही व वाहनाचे सुटे भाग गैरअर्जदार क्र. 2 कडून पुरविण्यात आले नाही असे सांगितले. जेव्हा की, सदर सुटे भाग केव्हाच गैरअर्जदार क्र. 1 कडे पाठविण्यात आले होते. मार्चच्या दुस-या आठवडयात वाहन सुपूर्द करण्याची गैरअर्जदार क्र. 1 ने आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात तक्रारकर्त्याने वाहन जाऊन पाहिले असता, अपघातामध्ये जेवढे नुकसान वाहनाचे झाले नव्हते, तेवढे नुकसान गैरअर्जदार क्र. 1 च्या अप्रशिक्षित कर्मचा-यांनी केल्याचे निदर्शनास आले. वाहनाची विंड स्क्रीन फुटलेली होती व महागडे सीटकव्हर्स फाटलेल्या स्थितीत होते. वाहन विकत घेत असतांना, गैरअर्जदार क्र. 1 ने सुटे भाग नेहमी उपलब्ध राहतील असे सांगितले होते, परंतू प्रत्यक्षात वेळोवेळी ते गैरअर्जदार क्र. 2 कडून मागवित होते. ही अनुचित व्यापार प्रणाली आहे. तक्रारकर्त्याचे मते त्याचे वाहनात मुळ सुटे भाग न टाकता बनावटी भाग टाकण्यात आलेले आहे. दि.16.01.2010 पासून वाहन हे गैरअर्जदाराचे वर्कशॉपमध्ये पडून आहे, तक्रारकर्त्याचे नुकसान होत आहे. तक्रारीसोबत एकूण 8 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता, त्यांनी संयुक्तपणे लेखी उत्तर दस्तऐवजासह दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी उत्तरामध्ये, तक्रारकर्त्याने विमा कंपनीला प्रतिवादी केले नाही, म्हणून तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 निर्माता व गैरअर्जदार क्र. 1 हे डिलर असल्याची बाब मान्य केली आहे. तसेच पुढे वाहनाची विमा पॉलिसी, त्याचा अपघात, पोलिस स्टेशन सिताबर्डीला केलेली तक्रार, विमा कंपनीचे निरीक्षकाने केलेली वाहनाची पडताळणी, रु.8,50,000/- आकारलेला दुरुस्ती खर्च, रकमेची केलेली मागणी या बाबी मान्य केल्या आहे व त्यांचा विमा कंपनीशी कोणत्याही पध्दतीचा समझोता नसल्याने त्यांनी दुरुस्तीकरीता रु.2,00,000/- ची मागणी केली. तसेच वाहनाच्या दुरुस्तीबाबत व झालेल्या क्षतिबाबत प्रत्येक वेळेस गैरअर्जदाराचे प्रशिक्षित कर्मचारी तक्रारकर्त्याला माहिती देत होते. गैरअर्जदाराच्या मेकॅनिकच्या हाताने विंड स्क्रीन निसटल्याने फुटली होती, ती गैरअर्जदाराने निःशुल्क बदलवून दिली आहे. वाहनाचे सीट कव्हर हे दुर्घटनेमुळे खराब झाले होते, ते वाहनाचे दुरुस्तीच्या वेळेस बदलवून देण्यात आले. वाहनाचे सुटे भाग मिळाल्यावर, तक्रारकर्त्याचे वाहन 24.05.2010 रोजी तयार झाले होते व त्याबाबत तक्रारकर्त्याला कळविण्यात आले होते. तक्रारकर्त्याने सदर वाहन 14.06.2010 रोजी विमा कंपनीने रक्कम दिल्यावर नेले. गैरअर्जदारांकडे नेहमी लागणारे सुटे भाग उपलब्ध होते व ते त्यांनी वापरले. परंतू वाहनाच्या दुरुस्तीच्या वेळेस जास्तीत जास्त सुटे भाग बिघडल्यामुळे, उपलब्ध नसलेले सुटे भाग झेक रीपब्लीक (Czech Republic) येथून मागवावे लागले. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ची टाटा एआयजी सोबत कोणत्याही प्रकारची अपूर्ण नीधीची सुविधा उपलब्ध नाही. वाहनात उच्च दर्जाचे व अस्सल सुटे भाग लावण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रशिक्षीत कर्मचा-यांनी ते दुरुस्त केले आहे. तक्रारकर्त्याचे वाहन तयार असल्याने त्याला नोटीस परत घेण्याबाबत सांगितले. परंतू त्याने नकार दिला व वाहन सुपूर्द करतांना ना हरकत नोटवर सही दिली. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या नाकारुन वाहनाबाबतचे संपूर्ण म्हणणे नाकारले आहे व तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
5. तक्रारकर्त्याने प्रतिउत्तरामध्ये गैरअर्जदाराचे संपूर्ण म्हणणे नाकारले आहे. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांमार्फत ऐकला. तसेच प्रकरणात दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 निर्मित चार चाकी वाहन गैरअर्जदार क्र. 1 (वितरक) मार्फत खरेदी केल्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक ठरतो.
7. वाहनाची खरेदी, विमा पॉलिसी, रजिस्ट्रेशन इ. बाबत उभय पक्षात वाद नाही.
8. तक्रारकर्त्याचा मुळ आक्षेप हा आहे की, त्याने खरेदी केलेल्या वाहनाचा अपघात 16.01.2010 झाला व सदर वाहन टाटा एआयजी-झीरो डेप्रीसीएशन वर विमाकृत झालेले असतांना, विमा कंपनी गैरअर्जदार क्र. 1 यांनी परस्पर दुरुस्तीची रक्कम देणार होते. तरीहीसुध्दा गैरअर्जदार क्र. 1 ने रु.2,00,000/- आकारलेली रक्कम जमा करण्याची मागणी केली. ती अग्रीम रक्कम तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे जमा केली. त्यानंतर तक्रारकर्त्याचा मुळ आक्षेप वाहन दुरुस्ती होऊन त्यास वाहन मिळण्यास झालेला विलंब, तसेच गैरअर्जदाराचे अप्रशिक्षीत कर्मचा-याने वाहनाची दुरुस्ती केली व मुळ सुटे भाग काढून टाकण्यात आले. त्यामुळे वाहनाला मुळ स्वरुप प्राप्त होऊ शकत नाही असे म्हटले. तक्रारकर्त्याकडून गैरअर्जदाराला रु.2,00,000/- प्राप्त झाल्याबाबत पृष्ठ क्र. 59 वरील पावतीवरुन स्पष्टपणे दिसून येते, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, सदर रक्कम ही विमा कंपनीतर्फे तक्रारकर्त्याच्या नावाने प्राप्त झालेली आहे. सदर वाहनाचे सुटे भागापैकी काही सुटे भाग त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत व वाहन महागडे असल्यामुळे महागडे सुटे भाग हे गैरअर्जदार क्र. 2 व तसेच झेक रीपब्लीक येथून मागवावे लागले, या गैरअर्जदारांच्या म्हणण्यात, तक्रारकर्त्याने वस्तूनीष्ट दस्तऐवज दाखल न केल्यामुळे मंचास तथ्य वाटते व गैरअर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन ते स्पष्ट होते. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या छायाचित्रावरुन हे स्पष्ट होते की, वाहन अतिशय क्षतिग्रस्त झाले होते व अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करण्यास सुट्या भागांची जुळवा-जुळव करणे, तसेच दुरुस्तीकरीता भरपूर वेळ लागतो, या गैरअर्जदारांच्या म्हणण्यात मंचास तथ्य वाटते. तक्रारकर्त्याने निरनिराळे आक्षेप गैरअर्जदारांविरुध्द घेतले, ज्यामध्ये वाहनाचे मुळ सुटे भाग काढून घेतले आहे, परंतू तक्रारकर्त्याने त्याबाबत कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तसेच ग्रा.सं.का.चे तरतूदीनुसार वाहनाचे निरीक्षण करुन घेण्याबाबत कुठलीही पावले न उचलल्याने तक्रारकर्त्याचे म्हणणे निव्वळ तथ्यहीन ठरते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याने दुरुस्तीनंतर सदर वाहनाचा ताबा हा विमा कंपनीतर्फे दुरुस्तीस आलेल्या खर्चाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर 14.06.2010 ला घेतल्याचे दिसते. पृष्ठ क्र. 72 वरील गैरअर्जदाराचे दस्तऐवजाचे खालील बाजूस असलेल्या नोंदीनुसार तक्रारकर्त्याचे वाहनाचे दुरुस्तीबाबत समाधान झाल्यावर चांगल्या स्थितीत वाहन प्राप्त झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचा गैरअर्जदारावरील आक्षेप निरर्थक ठरतो म्हणून मंच नाकारीत आहे.
9. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराचे 26.05.2010 चे पत्रातील नमूद नियमित बाब (I) Copy of the withdrawl letter of your sides या गैरअर्जदाराचे पत्रातील नोंदीस आक्षेप घेतला आहे. गैरअर्जदाराचे सदर पत्रातून, तक्रारकर्त्याशी वापरलेली दोषणाची कृती व त्याने पाठविलेली नोटीस परत घेण्याबाबतची गैरअर्जदाराची कृती निश्चितच असंयुक्तीक स्वरुपाची असून गैरअर्जदारास समज देण्यात येतो की, यापुढे अशा प्रकारच्या ग्राहकांनी पाठविलेल्या पत्रात नोंदी करण्यात येऊ नये. तक्रारकर्त्याने तसे पत्र न देता वाहनाचा ताबा घेतल्यामुळे ती बाब निष्प्रभ ठरते.
10. तक्रारकर्त्याने प्रार्थनेमध्ये केलेली (ए) क्रमांकाची मागणी ही पूर्णतः गैरकायदेशीर आहे, कारण सदर वाहन अपघातामध्ये क्षतिग्रस्त झालेले आहे व त्यात उत्पादित दोष नाही. तसेच तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या या वस्तूनिष्ठ पूराव्या अभावी, तसेच वाहन दुरुस्तीस होणारा विलंब नेहमी अपेक्षीत असतो, त्यामुळे झालेला मानसिक इ. त्रासाची मागणीसुध्दा निरर्थक ठरते. म्हणून सदर तक्रार वस्तूनिष्ठ पूराव्या अभावी खारीज करणे संयुक्तीक ठरते असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.