द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिपत स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयशर ट्रक रजिस्ट्रेशन नं.एम्एच्-04-ए-4196 साठी सामनेवाला यांचेकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती व त्या पॉलिसीचे वेळोवेळी नुतनीकरण करुन घेतले. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत दि.26/07/2006 ते 25/07/2007 या कालावधीसाठी नॅशनल इन्शुरन्स कं.लि., वाशी शाखा, यांनी दिलेल्या विम्याच्या प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जोडली आहे.
2) तक्रारदारांचा वरील आयशर ट्रक दि.28/09/2006 रोजी अहमदाबादवरुन भिवंडीकडे येत असताना त्या ट्रकपुढे चाललेल्या कंन्टेनरच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्यामुळे तक्रारदारांचे वाहन सदर कंन्टेरवर धडकले व त्यामुळे तक्रारदारांच्या वाहनाचे खुप मोठे नुकसान झाले. तक्रारदारांनी वरील अपघाताची माहिती ताबडतोब सामनेवाला विमा कंपनीला दिली. विमा कंपनीने त्याच दिवशी सर्व्हेअर म्हणून श्री.घोष यांची नेमणूक केली. सामनेवाला यांच्या स्पॉट सर्व्हेअरने लगेचच तक्रारदारांच्या वाहनाची पाहणी केली व सदर अपघातात कोणताही इसम जखमी न झाल्याने स्पॉट सर्व्हेअरच्या सुचनेप्रमाणे तक्रारदारांच्या संबंधीत अपघाताची वर्दी दिली नाही. सामनेवाला यांच्या वापी शाखेच्या स्पॉट सर्व्हेअरने पाहणी करुन याबाबतचा अहवाल सामनेवाला यांना दिला होता. परंतु त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई दिली नाही. तक्रारदारांना त्यांच्या वरील वाहनाची दुरुस्ती करणेसाठी एकूण रक्कम रु.89,000/- खर्च करावे लागले. विरल ऑटो, वापी यांनी वाहन दुरुस्तीच्या खर्चासंबंधी दिलेल्या बिलांच्या छायांकीत प्रती तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत दाखल केल्या आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांचा क्लेम आवश्यक त्या कागदपत्रासहीत सामनेवाला यांना सादर केला असता सामनेवाला यांनी दि.22/01/2009 चे पत्राने तक्रारदारांचा रास्त क्लेम चुकीच्या कारणावरुन नाकारला. ज्या कारणांवरुन क्लेम नाकारला ती कारणे तक्रारदारांनी तक्रारअर्जाच्या परिच्छेद क्र.5 मध्ये नमूद केली आहेत. अशा त-हेने क्लेम नाकारने ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता असल्याने तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दि.22/02/2010 रोजी दाखल केला आहे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.89,000/- त्यावर 18 टक्के व्याजासहित तक्रारदारांना द्यावा अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1 लाख व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत व तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ श्री.राजबीर बोरा, ग्लोबस रोडवेजचे मॅनेजर यांचे शपथपत्र दाखल केले.
4) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारअर्ज खोटा व चुकीचा असून तो खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे असे म्हटले आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत खोटी व बनावट कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांच्या वाहनास अपघात झाल्यासंबंधी पोलिस स्टेशनला दाखल केलेले एफ.आय.आर. व पंचनामा इत्यादी आवश्यक ती कागदपत्रे दाखल न केल्यामुळे तक्रारदारांचा क्लेम रद्द होणेत पात्र आहे. तक्रारदारांनी केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी नाकारले असून त्यांच्या सर्व्हेअरने पोलिस स्टेशनला वर्दी देवू नका असा सल्ला तक्रारदारांना दिला नव्हता असे म्हटले आहे. तक्रारदारांच्या वाहनाचे फार मोठे नुकसान झाले असते तर ज्या वाहनाशी टक्कर झाली त्या वाहनाचे सुध्दा खुप मोठे नुकसान झाले असते व त्या वाहनास घटनास्थळावरुन घेवून जाता आले नसते. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य व कायदेशीर असून तो पॉलिसीच्या अटी व शर्तींप्रमाणे घेण्यात आलेला आहे. सबब तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
5) तक्रारदारांनी प्रतिनिवेदन दाखल करुन सामनेवाला यांनी केलेले आरोप नाकारलेले आहेत. सामनेवाला यांनी दि.02/02/2011 रोजी कैफीयतमध्ये दुरुस्तीचा अर्ज दिलेला होता, परंतु सदरचा अर्ज सामनेवाला यांनी नॉट प्रेस केला त्यामुळे तो निकाली करण्यात आला. तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला, तसेच सामनेवाला यांनीही लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचे वतीने वकील श्री.तरसेम सिंग तसेच सामनेवाला यांचे वतीने वकील एस.एस.सिंग यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सामनेवाला यांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे या तक्रारअर्जास घडलेले तथाकथीत कारण या मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रामध्ये घडलेले नाही त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. तसेच तक्रारअर्ज मुदतीत दाखल केलेला नसल्यामुळे सुध्दा तो रद्द होण्यास पात्र आहे.
6) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयशर ट्रकसाठी सामनेवाला यांचेकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. त्या पॉलिसीची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत दाखल केली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेली इन्शुरन्स पॉलिसी क्र.253501/31/06/ 634001116 ही दि.26/07/06 ते 25/07/07 या कालावधीसाठी असून सदरची पॉलिसी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या वाशी शाखेने सामनेवाला यांना दिलेली आहे. सदरची बाब तक्रारदार व सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.28/09/06 रोजी त्यांचा आयशर ट्रक अहमदाबादकडून भिवंडीला येत असताना त्या ट्रकसमोर चाललेल्या कंन्टेनरच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्यामुळे तक्रारदारांचा ट्रक सदर कंन्टेनरवर धडकला व ट्रकचे मोठे नुकसान झाले. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांच्या आयशर ट्रकला अहमदाबाद-भिवंडी महामार्गावर गुजरातमध्ये वापीच्या आसपास अपघात झाल्याचे दिसते. अपघात झाल्यानंतर तक्रारदारांनी त्याची माहिती सामनेवाला यांच्या वापी शाखेस कळविली व वापी शाखेने स्पॉट सर्व्हेअरची नेमणूक केली होती असे दिसते. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांच्या स्पॉट सर्व्हेअरने घटनास्थळीच तक्रारदारांच्या अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली व सदरच्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही म्हणून अपघातासंबधी वर्दी जवळच्या पोलीस स्टेशनला देण्यात आली नाही. स्पॉट सर्व्हेअरने त्यांचा अहवाल सामनेवाला यांना दिला. तक्रारदारांनी त्यांचे वाहन दुरुस्त करुन घेतले व त्यासाठी त्यांना एकूण रक्कम रु.89,000/- खर्च आला. तक्रारदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ विरल ऑटोच्या बिलांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदारांनी इन्शुरन्स पॉलिसीखाली केलेली नुकसानभरपाईची मागणी सामनेवाला यांनी चुकीच्या कारणावरुन नाकारली असे तक्रारदार वकीलांचे म्हणणे आहे. म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे.
7) सामनेवाला यांचे वकील श्री.एस.एस.सिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे या दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविण्याचा अधिकार नाही. या तक्रारअर्जास घडलेले तथाकथीत कारण या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात घडलेले नाही. तक्रारदारांनी त्यांच्या आयशर वाहनासाठी घेतलेली विमा पॉलिसी ही नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या वाशी शाखेकडून घेतली आहे. तक्रारदार स्वतः वाशी येथे राहतात. तक्रारदारांच्या वाहनाला अपघात गुजरात राज्यामध्ये वापीच्या जवळपास घडले. अपघाताची खबर वापी शाखेस देण्यात आली होती. वापी शाखेच्या स्पॉट सर्व्हेअरने अपघातस्थळी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करुन अपघात घडल्यानंतर तक्रारदारांनी नुकसानभरपाईचा क्लेम नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या वाशी शाखेकडे केला होता. सदर क्लेमसंबंधी पत्रव्यवहार तक्रारदार व वाशी शाखेत झाला होता. दि.22/01/09 चे पत्राने शाखा प्रबंधक, वाशी शाखा यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे व क्लेम नाकारल्याचे कारण सदर पत्रात नमूद केले आहे. वरील परिस्थितीत या तक्रारअर्जास तक्रारअर्ज दाखल करण्यासाठी घडलेले कारण या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात घडलेले नाही त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज चालविण्याचा अधिकार या मंचास नाही.
8) तक्रारदारांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय वीर नरिमन रोड, मुंबई, येथे असल्याने या मंचाला सदर तक्रारअर्ज चालविण्याचा अधिकार आहे. सामनेवाला यांच्या वकीलांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या Sonic Surgical V/s. National Insurance Co. Ltd. 2009(6) ALL MR 1014, या खटल्यातील निकाला आधार घेतला. वरील प्रकरणामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की, “Learned counsel for the appellant submitted that the respondent - insurance company has a branch office at Chandigarh and hence under the amended Section 17(2) the complaint could have been filed in Chandigarh. We regret, we cannot agree with the learned counsel for the appellant. In our opinion, an interpretation has to be given to the amended Section 17(2)(b) of the Act, which does not lead to an absurd consequence. If the contention of the learned counsel for the appellant is accepted, it will mean that even if a cause of action has arisen in Ambala, then too the complainant can filed a claim petition even in Tamil Nadu or Gauhati or anywhere in India where a branch office of the insurance company is situated. We cannot agrtee with this contention. It will lead to absurd consequences and lead to bench hunting. In our opinion, the expression ‘branch office’ in the amended Section 17(2) would mean the branch office wherein the cause of action has arisen. No doubt this would be departing from the plain and literal words of Section 17(2)(b) of the Act but such departure is sometimes necessary (as it is in this case) to avoid absurdity.”
9) या प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेता या तक्रारअर्जास कारण या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात घडलेले नाही. सबब वर नमूद केलेल्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे या मंचास सदर तक्रारअर्ज चालविण्याचा अधिकार नाही. सबब तक्रारअर्ज रद्द होण्यास पात्र आहे.
10) वर नमूद केलेल्या कारणास्तव खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रारअर्ज क्रमांक 42/2010 रद्द करणेत येतो.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.