निकालपत्र
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही वडझरी खुर्द, ता.संगमनेर जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार हिचे मयत पती नानासाहेब धोंडीराम सुपेकर हे शेतकरी होते व त्याच्या नावे गट क्र.६/१, १८४/१ अशी शेतजमीन वडझरी ता.संगमनेर जि.अहमदनगर येथे आहे. तक्रारदार हिच्या मयत पतीवर सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा उतरविला होता. सदरील विम्याचा कालावधी ०१-१२-२०१५ ते ३०-११-२०१६ असा होता. शासनाच्या नियमानुसार रूपये २,००,०००/- एवढया रकमेचा हा अपघात विमा होता. त्यानंतर दिनांक ०४-१०-२०१६ रोजी तक्रारदाराचे पती श्रीरामपुर बाभळेश्वर रोडने जात असतांना एका गाडी क्रमांक एम.एच.१७-बी.डी.-२५९२ या वाहनाने तक्रारदार हिच्या पतीच्या मोटरसायकला जोरात धडक दिली. त्यामध्ये तक्रारदार हिचे मयत पती गंभीर जखमी झाले व त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. सदरहु घटनेची खबर श्रीरामपुर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली व त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तक्रारदार हिच्या मयत पतीचे शवविच्छेदन करण्यात आले. तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रांसह सदरचा विमा दावा सामनेवाले यांच्याकडे सादर केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदाराला दिनांक १३-१०-२०१७ रोजी पत्र देऊन तक्रारदाराने सदरचा विमा दावा ९० दिवसाच्या आत सादर केला नाही, या कारणास्तव नामंजुर केल्यामुळे तक्रारदार हिला मंचात तक्रार दाखल करावी लावली. त्यानुसार तक्रार दाखल करुन परिच्छेद क्रमांक १० प्रमाणे मागणी केलेली आहे.
सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी १४ नुसार दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार हिच्या मयत पतीचा विमा कालावधी मान्य केलेला आहे. परंतु पुढे असे कथन केले की, तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रांसह विमा दावा ९० दिवसात सादर केला नाही. त्यांनी विमा दावा दिनांक ०६-०४-२०१७ पर्यंत दाखल करणे आवश्यक होते परंतु त्यांनी विमा दावा दिनांक १२-१०-२०१७ रोजी सादर केला. अशाप्रकारे तक्रारदार यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. विमा दावा वेळेत सादर करणे गरजेचे होते. परंतु विमा दावा सादर करण्यास ९० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले. सामनेवाले यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा नाकारला आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या सेवेत कोणतीही चुक केली नाही. तसेच तक्रारदाराने दाखल केलेले पोलीस पेपर्स यावरून हे स्पष्ट होते की, तक्रारदार हिचे पती मोटारसायकल चालवित असतांना वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे त्यांनी विमा पॉलिसीचा भंग केला. या दोन कारणांनी सामनेवाले यांनी विमा दावा नाकारला. अशाप्रकारे सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चाहस रदद करण्यात यावी, अशी मंचाला विनंती केली.
३. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यात दाखल केलेली कागदपत्रे, वकील श्री.एन.जी. काळे यांनी केलेला युक्तिवाद सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे, वकील श्री. देवीदास गाली यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार ही वडझरी ता.संगमनेर जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तिच्या मयत पतीचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा उतरविला होता. त्याचा कालावधी ०१-१२-२०१५ ते ३०-११-२०१६ असा होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. यावरुन स्पष्ट होते की तक्रारदार ही मयत नानासाहेब सुपेकर यांची पत्नी आहे व तिच्या मयत पतीचा सामनेवाले यांनी विमा उतरिवीला होता. त्यामुळे ती निश्चीतच सामनेवाले यांची ग्राहक आहे. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार तिच्या मयत पतीचा सामनेवाले यांच्याकडे शेतकरी अपघात विमा उतरविला होता. तक्रारदार हिचे मयत पती शेतकरी असल्याबाबतचा सातबारा उतार प्रकरणात दाखल केला आहे. त्यावर तक्रादार हिच्या पतीचे नाव आहे. तसेच कागदपत्रांमध्ये ८-अ चा उतारा, वारसा प्रमाणपत्र, फेर-फार ची नोंदवही दाखल केली आहे. त्यावर तक्रारदार हिचे नाव नमुद आहे. यावरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार ही मयत नानासाहेब सुपेकर यांची पत्नी आहे व मृत्युपुर्वी तक्रारदार यांचे पती शेतकरी होते. दिनांक ०४-१०-२०१६ रोजी रात्री १० वाजता श्रीरामपुर बाभळेश्वर रोडने जात असतांना एका गाडी क्रमांक एम.एच.१७-बी.डी.-२५९२ या वाहनाने तक्रारदार हिच्या पतीच्या मोटरसायकला जोरात धडक दिली. त्यामध्ये तक्रारदार हिचे मयत पती गंभीर जखमी झाले व त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. सदरहु घटनेची खबर श्रीरामपुर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली व त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. यावरून तक्रारदार हिच्या पतीचा मृत्यु झाला ही बाब कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. त्यानंतर तक्रारदार हिच्या मयत पतीचे शवविच्छेदन करण्यात आले. तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रासह सदरचा विमा दावा सामनेवाले यांच्याकडे सादर केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदाराला दिनांक १३-१०-२०१७ रोजी पत्र देऊन तक्रारदाराने सदरचा विमा दावा ९० दिवसाच्या आत सादर केला नाही, उशीरा सादर केला आहे, या कारणास्तव विमा दावा नामंजुर केला, असे कथन तक्रारदाराने केले आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये मान्य केली की तक्रारदार यांनी ९० दिवसानंतर विमा दावा सादर केला तसेच ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मोटारसायकल चालवितांना त्यांच्याकडे मोटारसायकल चालविण्याचा वैध परवाना नव्हता, असे कथन केले आहे. परंतु प्रकरणाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदाराकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना होता व त्याची वैधता दिनांक ३०-११-२०२४ पर्यंत होती. तो वाहन चालविण्याचा परवाना तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी दिलेले कारण संयुक्तिक वाटत नाही व ते ग्राह्य धरता येणा नाही. तसेच ९० दिवसाच्या आत विमा दावा सादर केला नाही, ही बाब Directory आहे Mandetory नाही. त्यामुळे केवळ या कारणावरून विमा दावा नाकारणे चुकीचे आहे, असे मंचाचे मत आहे. सबब हे मंच संपुर्ण कागदपत्रांचे अवलोकन करून तक्रार अंशतः मंजुर करण्याच्या निष्कर्षाप्रत येत आहे. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीच्या कारणने विमा दावा नाकारला म्हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
६ मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक १३-१०-२०१७ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४ वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |