द्वारा - श्री.शा.गं.चाबुकस्वार : मा.सदस्य
1) प्रस्तुत तक्रार ही सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन पूर्ण सेवा देण्यास कसूर केलेली असून त्याच्याकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गतचा विमा रक्कम रु.50,000/-, मानसिक त्रास दिल्याबद्दल नुकसानभरपाई रु.20,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- या मागणीसाठी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2(1)(ग)(ओ) व 12(1)(अ) नुसार दाखल केलेली आहे.
2) थोडक्यात तक्रारदाराचे कथन येणेप्रमाणे -
तक्रारदार हा वरंडोली, ता.महाड, जिल्हा – रायगड येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतो. मौजे वरडोली, ता.महाड, जिल्हा – रायगड या शिवारातील शेतजमीन तक्रारदाराचे नांवे आहे. दि.10/09/2007 रोजी तो त्याच्या शेतात भाताचे पिक कापत असताना त्याच्या उजव्या डोळयाला भाताचे पिकाचे पान लागून तो डोळा कायमचा निकामी झाला आहे. तक्रारदार याने दवाखान्यात उपचार घेवूनही त्याची डोळयाची दृष्टी परत आली नाही. त्याबद्दलचे प्रमाणपत्र वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय माणगांव, जिल्हा – रायगड यांनी दिलेले आहे.
3) यापूढे तक्रारदार याचे असे कथन आहे की, त्याला त्याच्या हितचिंतकाकडून शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती मिळाली त्यानंतर त्याने कागदपत्राची जमवाजमव केली. त्याने सर्व कागदपत्रासह त्याचा विमा दावा तलाठी सजा कोंझर, ता.महाड यांच्याकडे दिला. सदर तलाठयानी तो विमा दावा तहसिलदार यांच्याकडे जमा केला. तहसिलदार महाड यांनी सदर कागदपत्राची छाननी करुन तो विमा दावा सामनेवाला यांच्याकडे मदुतीत मंजूरीसाठी पाठविला परंतु सामनेवाला यांनी आजपर्यंत तक्रारदार यास विमा रक्कम रु.50,000/- मंजूर केलेली नाही.
4) यापूढे तक्रारदाराचे कथन असे आहे की, तक्रारदार याने सामनेवाला यांना अनेकदा फोन केले आणि प्रत्यक्ष भेटला परंतु सामनेवाला यांनी प्रत्येक वेळेस तुमचा विमा अर्ज लवकरात लवकर मंजूर करतो अशी पोकळ आश्वासने दिली. कृषी आयुक्त यांनीसुध्दा सामनेवाला यांना सांगितले की, शासन निर्णय 5 जानेवारी, 2009 या प्रमाणे विमा दावे लवकरात लवकर मंजूर करावेत परंतु त्याप्रमाणे सामनेवाला यांनी कार्यवाही केलेली नाही. शेवटी सामनेवाला यांनी दि.06/06/2009 रोजीच्या पत्राने तक्रादारास कळविले की, तक्रारदाराचा विमा दावा अर्ज 40 टक्के अपंगत्वाचा असल्यामुळे नामंजूर करण्यात आलेला आहे. तक्रारदारास वरील पत्र दि.22/06/2009 रोजी मिळाले. सामनेवाला यांनी विमा दावा नामंजूर करण्याचे जे कारण नमूद केलेले आहे ते न्यायास धरुन नाही. तक्रारदार हा अपघाती अंधत्वामुळे निराधार बनला आहे. तक्रारदार हा विमा रक्कम रु.50,000/- मिळण्यास पात्र असूनसुध्दा सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा वापर करुन सेवा देण्यास कसूर केली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला. करीता ही तक्रार परिच्छेद क्र.1 मध्ये नमूद केलेल्या मागण्या/दादीसाठी.
5) दि.04/07/2013 रोजी सामनेवाला यांनी लेखी कैफीयत दाखल करुन तक्रारीस व त्यातील मागणीस विरोध केला आहे. सामेनवाला यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराने विमा हप्ता भरलेला नाही म्हणून तो ग्राहक या व्याख्येत येत नाही. दि.07/10/2007 रोजी तक्रारदार भाताचे पिक कापत असताना त्याच्या उजव्या डोळयाला भाताचे पिकाचे पान लागल्यामुळे त्या डोळयास जखम झाली व तो डोळा निकामी झाला. तक्रार दाखल करण्यास कारण दि.07/10/2007 रोजी घेडलेले आहे. सदर तारखेपसासून तक्रार दोन वर्षाच्या आत दाखल करणे आवश्यक होते. तक्रार दोन वर्षानंतर दाखल केल्यामुळे ती मुदतबाहय आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रानुसार तक्रारदारास 40 टक्के अपंगत्व/अंधत्व आलेले आहे. विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार कोणत्याही व्यक्तीचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला असेल तरच तो सदर विमा योजनेचा लाभ घेवू शकतो. तक्रारदाराचा एक डोळा कायम निकामी झाला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी अपघात विमा योजनेच्या शर्ती व अटीनुसार तक्रारदार विमा रक्कमेस पात्र ठरत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी दि.06/06/2009 रोजीच्या पत्राने तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर केलेला आहे.
6) यापूढे सामनेवाला यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यानी त्याच्या डोळयास झालेल्या जखमेसाठी डॉ.आर.के.सचदेव यांच्याकडून दि.17/09/2007, 18/09/2007, 21/09/2007 व दि.26/09/2007 रोजी उपचार घेतलेले आहे. उजव्या डोळयास जखम दि.07/10/2007 रोजी झाली असे नमूद केले. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यासाठी अर्ज दिला होता. सदरचा अर्ज मंजूर झाल्यावर तक्रारदाराने त्याच्या डोळयास जखम झाल्याची तारीख दि.07/10/2007 ऐवजी 07/09/2007 अशी दुरुस्ती केली आहे. तक्रारदार ग्राहक मंचासमोर शुध्द हेतूने आलेला नाही व सामनेवाला याच्याकडून पैसे उकळविण्याच्या उद्देशाने शासनाने गरीब शेतक-यासाठी काढलेल्या विमा योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयास करीत आहे. तक्रारदार हा शेतकरी नाही म्हणून सदर विमा योजनेस पात्र नाही. सामनेवाला यानी तक्रारदाराची सर्व विरोधी कथने नाकबुल करुन तक्रार खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
7) दोन्ही पक्षकारांच्या परस्पर विरोधी कथनावरुन तक्रारीच्या निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित झालेले आहेत व त्यावरील आमचे निष्कर्ष ज्या त्या मुदयासमोर कारणमिमांसेवरुन नमूद केलेले आहेत -
मुद्दे निष्कर्ष
1) सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब होकारार्थी.
करुन सेवा देण्यात कसूर केली आहे हे तक्रारदार
सिध्द करीत आहे काय ?
2) तक्रारदार हा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत होकारार्थी.
रु.50,000/- विमा रक्कम मिळण्याचा हक्कदार आहे काय ?
3) तक्रारदार सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई नुकसानभरपाई
रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्याचा रु.3,000/- सहा टक्के
हक्कदार आहे काय ? व्याजदरासह, तक्रारीचा
खर्च रु.2,000/-.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसाः-
8) तक्रारदार याने स्वतःच्या पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी श्री.प्रभाकर ए. शेट्टी, अधिकृत अधिकारी यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी आपआपला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. आम्ही अभिलेखावर असलेल्या दस्ताचे अवलोकन केले आहे. श्री.अभयकुमार जाधव, तक्रारदाराचे वकील व श्री.घनश्याम पाटील, सामनेवालाचे वकील यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
9) मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराने महाराष्ट्र शासन कृषि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांकः पी.आयएस 1207/प्र.क्र.266/11 अ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दिनांक 24/08/2007 रोजीचा शासन निर्णय तक्रारीच्या पान क्र.40 ते 56 वर दाखल केला आहे. सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना कार्यान्वीत केलेली आहे. सदर योजनेनुसार शेती व्यवसाय करताना होणारे रस्त्यावरील अपघात तसेच विज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश व वाहन अपघात तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अथवा कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यु ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या सदर अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्याने अश्या अपघातग्रस्त शेतक-यास/त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ्ा देण्याकरीता स्वतंत्र विमा योजना नसल्याने प्रस्तुतची योजना वरील शासन निर्णयान्वये कार्यान्वीत केलेली आहे.
10) महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील नोंदीप्रमाणे 12 ते 75 वयोगटातील खातेदार शेतकरी सुमारे 1 कोटी 6 लाख याच्या वतीने महाराष्ट्र शासनाने व्यक्तीगत अपघात व अपंगत्व यासाठी विमा पॉलिसी उतरवलेली आहे. सन् 2007-08 मध्ये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनोसंबंधी शासनाचे वतीने आयुक्त कृषी, विमा कंपन्या आणि कबाल इन्शुरन्स प्रा.लि. कंपनी यांच्यामध्ये या शासननिर्णयातील अटी, शर्ती व मान्यतेनुसार त्रिपक्षीय पॉलिसी करार करुन त्यानुसार योजना अमलात आणली आहे. शेतक-याचे/त्याच्या कुटुंबियाचे विमा दावे शासन व विमा कंपनीमध्ये झालेल्या पॉलिसी करारातील तरतुदी, अटी व शर्ती व शासन निर्णयातील सुचनेनुसार मंजूर करण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याची एकत्रीत रक्कम प्रति शेतकरी रुपये 8/- प्रमाणे एक वर्षासाठी शेतक-यांच्या वतीने संबंधीत विमा कंपनीस शासन निर्णयान्वये सेवाकरासह शासनाने अदा केलेली आहे. त्यामुळे विमा कंपनीस शेतक-याने किंवा कोणत्याही संस्थेने त्याच्या वतीने या योजनेअंतर्गत स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने नॅशनल इन्शुरन्स कंपनी/सामनेवाला यांच्याकडे कोकण विभागातील 11,00,000/- शेतक-यांचा विमा हप्ता रु.88,00,000/-, सेवाकर 12.36 टक्के, रु.10,87,680/- एकूण रु.98,87,680/- सन् 2007-2008 या एका वर्षासाठी भरणा केलेली आहे.
11) सदर शासन निर्णयानुसार व शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार अपघातामुळे शेतक-याची दोन डोळे निकामी झाल्यास रु.1,00,000/- आणि एक डोळा निकामी झाल्यास रु.50,000/- नुकसानभरपाई अपघातग्रस्तास मिळते. सदर शासन निर्णयाच्या प्रपत्र ब नुसार लाभार्थी हा राज्यातील 12 ते 75 वयोगटातील महसुल नोंदीनुसार नोंद असलेला खातेदार शेतकरी असावा लागतो. तसेच शेतकरी म्हणून त्याचे नावांचा समावेश असलेला 7/12 किंवा 8-अ नमुन्यातील उतारा, शेतक-याचे वारस म्हणून गांवकामगार तलाठी यांच्याकडील गांव नमुना नं.6 नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतक-याच्या वयाच्या पडताळणीचा दाखला इत्यादी कागदपत्र दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदाराच्या डोळयाचा अपघात हा शासन निर्णयाच्या प्रपत्र ‘ ड‘ मधील परिच्छेद क्रमांक 13 मध्ये येतो. परिच्छेद 13 व 14 मध्ये नमूद केलेली कागदपत्रे पोलिस पाटील यांचा अहवाल व वैदयकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मानगांव यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र ही अवाश्यक कागदपत्र दाखल केलेली आहेत.
12) तक्रारदार यांने मौजे वरंडोली, ता.महाड, जि.रायगड येथील गांव नमुना न 6 (हक्काचे पत्रक) च्या उता’-याची प्रत तक्रारीच्या पान क्र.21 वर दाखल केली आहे. सदर प्रतीवरुन असे दिसते की, गंगाराम चंद्रु पारधी/सावंत यांच्या नांवावर वरील शिवारातील गट नंञ242, 212, 209 व 244 हया शेतजमीनी होत्या. सदर खातेदार तारीख 27/10/1987 पूर्वी 3 वर्षे अगोदर मयत असून त्याचे वारस 4 मुलगे नामे प्रकाश, दिनेश, रमेश, राजेंद्र, आई पार्वतीबाई, मुलगी कुसुम असे आहेत. सदरची वारसाची नोंद फेरफार क्र.41 नुसार महसुल अभिलेखात घेण्यात आली आहेत. तक्रारदाराने वरंडोली शिवारातील गट नं.242 व 244 चे 7/12 उतारे पान क्र.18 व 19 वर दाखल केले आहेत. सदर 7/12 उता-यातील नोंदी प्रमाणे गट नं.242 क्षेत्र 40.08 आर गट 244 क्षेत्र 29.6 आर असून भोगवटदाराच्या रकान्यात तक्रारदार व त्यांच्या भावाची, आईची व बहीणीच्या नांवाची नोंद असून वहीतीच्या रकान्यात ‘खूद्द’ असे नमूद केलेले आहे. तक्रारदार वरील दोन्ही शेतजमीनीचा मालक व कब्जेदार आहे. या सर्व दस्तावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार हा कोकण विभागातील शेतकरी आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या शासन निर्णयावरुन हे स्पष्ट झालेले आहे की, महाराष्ट्र शासनाने सामनेवाला यांच्याकडे शेतक-याचा/तक्रारदाचा विमा हप्ता 2007-2008 या वर्षाचा भरणा केलेला आहे. वरील पुराव्यावरुन तक्रारदार शेतकरी नाही व त्याने स्वतः विमा हप्ता भरला नाही हे सामनेवालचे कथन पोकळ स्वरुपाचे आहे हे स्पष्ट झालेले आहे.
13) तक्रारीच्या पान क्र.22, 23, 35 व 36 वरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने शासन निर्णयातील प्रपत्र इ प्रमाणे भाग 1 या नमून्यामध्ये 7/12 व इतर उता-यासह विमा मागणी प्रस्ताव (पान क्र.35)संबंधीत तलाठयाकडे दि.07/01/2008 रोजी दाखल केला होता. सजा मौजे वरंडोली येथील तलाठयाने भाग क्र.2 नुसार तक्रारदार हा विमा योजनेअंतर्गत समाविष्ठ असून रु.50,000/- रकमेच्या दाव्यास पात्र आहे असे प्रमाणित करुन तक्रारदाराचा जबाब घेवून व पंचनामा करुन सदर प्रस्ताव दि.09/01/2008 रोजी तहसिलदार महाड यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेला आहे. तहसिलदार महाड यांनी भाग क्र.3 नुसार दि.31/01/008 रोजी तक्रारदाराच्या हक्कात प्रमाणपत्र देवून तक्रारदार रु.50,000/- विमा रकमेस पात्र आहे असे प्रमाणित केले आहे.
14) तक्रारदार याने पान क्र.37 वर वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय मानगांव, जिल्हा रायगड यांनी अपंगत्वाचे दिलेले प्रमाणपत्र दाखल केले आहे. दि.06/06/2009 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा अर्ज नामंजूर केल्याबाबतचे पत्र पान क्र.39 वर आहे. तक्रारदार यांना 40 टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्रात नमूद असल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा अर्ज नामंजूर केलेला आहे. वैदयकीय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय मानगांव यांनी अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामध्ये व्यंग (Deformity) या रकान्यात
1) RE) Evisceeated empty Socket – NOPL
2) LE) Ampluopiar egg dull __________ 6/12 R) व अपंगत्वाच्या (Disability) रकान्यात 40 टक्के अंधत्व (40% blindness – pertail) असे नमूद केलेले आहे. सदरच्या प्रमाणपत्रामध्ये डाव्या डोळयाची दृष्टी 6/12 अशी नमूद केली आहे परंतु उजव्या डोळयाची दृष्टी नमूद केलेली नाही. सदर प्रमाणपत्रातील अपंगत्वाच्या रकान्यात जे 40 टक्के अंधत्व दाखवलेले आहे ते दोन्ही डोळयांचे एकत्रित दाखवलेले आहे किंवा फक्त उजव्या डोळयाचे दाखविलेले आहे हे प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले नाही. संबंधीत शासन निर्णयामध्ये अपघातग्रस्ताचे अपघातात दोन डोळे निकामी झाल्यास रु.100,000/- व एक डोळा निकामी झाल्यास रु.50,000/- नुकसानभरपाई दयावी असे नमूद केलेले आहे. तक्रारदाराचा उजवा डोळा फक्त 40 टक्के निकामी झाला आहे असे पान नं.37 वरील अपंगत्वाच्या प्रमाणपत्रात स्पष्टपणे नमूद नाही. त्यामुळे तक्रारदाराचा उजवा डोळा पूर्ण निकामी झालेला नाही असे म्हणता येणार नाही. सदर प्रमाणपत्रावरुन तक्रारदाराचा उजवा डोळा दृष्टीहीन दिसतो. सामनेवाला यांनी वैदयकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, मानगांव यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन तक्रारदार याचा उजवा डोळा फक्त 40 टक्के निकामी झाला आहे हे सिध्द केलेले नाही.
15) तक्रारदार यांनी डॉ.आर.के.सचदेव, सुरत यांच्याकडे उपचार घेतला असल्याबाबतचे दस्त पान क्र.25 ते 30 वर दाखल केलेले आहे. डॉ.आर.के.सचदेव यांनी तयार केलेल्या केस समरी वरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदाराच्या उजव्या डोळयाचा अपघात दि.07/09/2007 रोजी घडून आलेला आहे आणि त्या वेळी त्याचे वय 40 वर्ष होते. सदरच्या समरीमध्ये तक्रारदाराची उजव्या डोळयाची दृष्टी NOPL आणि डाव्या डोळयाची 6/6 p अशी नमूद आहे. वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मानगांव यांनी सुध्दा पान क्र.37 वरील अपंगत्वाच्या प्रमाणपत्रात उजव्या डोळयाची दृष्टी NOPL अशीच दाखवलेली आहे. डॉ.आर.के.सचदेव यांच्या अहवालानुसार दि.18/09/2007 रोजी तक्रारदाराच्या उजव्या डोळयाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. दि.19/09/2007 व 21/09/2007 रोजी तक्रारदाराच्या उजव्या डोळयाच्या कवठीच्या पोकळ भागात रक्ताचा संचय होता. वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मानगांव यांनी सुध्दा पान नं.37 वरील प्रमाणपत्रात तक्रारदाराच्या उजव्या डोळयाची परिस्थिती वरील प्रमाणे दाखवली आहे. तक्रारदाराने स्वतःचा रंगीत फोटो पान क्र.38 वर दाखल केलेला आहे. सदर फोटोमध्ये तक्रारदाराच्या डाव्या डोळयाचे बुबळ पांढरे व काळे रंगाचे स्पष्टपणे दिसत आहे. परंतु उजव्या डोळयास पांढरे व काळया रंगाचे बुबळ दिसून येत नाही त्याठीकाणी लहान आकाराची लाल रंगाची गाठ दिसून येते. वरील सर्व पुराव्यावरुन तक्रारदाराचा उजवा डोळा पूर्ण निकामी झाल्याचे दिसून येते. उपलब्ध पुरावा असे दर्शवितो की, सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराचा विमा मागणीअर्ज उचित कारणाशिवाय नामंजूर केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केलेली आहे. संबंधीत शासन निर्णयानुसार तक्रारदाराचा उजवा डोळा निकामी झाला असल्यामुळे तक्रारदार रु.50,000/- नुकसानभरपाई मिळण्याचा हक्कदार आहे दि.06/06/2009 रोजी सामनेवाला यानी तक्रारदाराचा विमा दावा हा अयोग्य कारणावरुन नामंजूर केलेला आहे म्हणून तक्रारदारास त्या तारखेपासून रु.50,000/- या रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणे योग्य ठरेल करीता मुद्दा क्र.1 व 2 चे निष्कर्ष होकारार्थी दिले आहेत.
16) मद्दा क्र.3:– श्री.घनश्याम पाटील सामनेवाला यांचे वकील यांनी त्यांच्या युक्तीवादाच्या पृष्टयर्थ खालील न्यायनिर्णयाचा आधार घेतलेला आहे
1) 2009(6) महाराष्ट्र लॉ जरनल स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द बी.एस.ऍग्रीकल्चर इंडस्ट्री, पान नं.369 सर्वोच्च न्यायालय.
2) 2009 (6) महाराष्ट्र लॉ जरनल, कडींमला राघवजा आणि कंपनी विरुद नॅशनल इन्शुरन्स कं.लि., पान नं.925 सर्वोच्च न्यायालय.
3) 3 (2000) सी.पी.जे, वसंत बी.सोनवणे विरुध्द रत्ना बिल्डर्स व इतर, पान नं.363.
वरील न्याय निर्णयापैकी पहिली दोन न्यायनिर्णये हे तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबतच्या मुद्दयावर आहेत. प्रस्तुत तक्रारीत तक्रारदाराने विलंब माफीचा वेगळा अर्ज दिला होता आणि तो अर्ज यापूर्वीच मंजूर करण्यात आलेला आहे. शेवटचा (तिसरा) न्यायनिर्णय हा खोटी व तापदायक तक्रार दाखल केल्यामुळे नुकसानभरपाई देण्याबाबतच्या मुद्दयावर आहे. प्रस्तुत तक्रारदाराने त्याची तक्रार सिध्द केली आहे म्हणून वरील तिन्ही न्यायनिर्णय सामनेवाला यास मदतकारक नाहीत. मुद्दा क्र.1 च्या निष्कर्षाप्रमाणे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केली आहे त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला व त्यास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली म्हणून तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रु.3,000/-नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च रु.2000/- सामनेवाला यांनी तक्रारदारास देणे उचीत होईल. करीता मुद्दा क्र.3 चा निष्कर्ष वरील प्रमाणे दिला आहे.
तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करण्यास पात्र आहे. करीता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 259/2011 खालील प्रमाणे मंजूर करण्यात आली आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम रु. 50,000/-(रु.पंन्नास हजार मात्र) दि.06/06/2009 पासून
पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज दराने दयावी.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रास दिल्याबाबत नुकसानभरपाई रु.3,000/-(रु.तीन हजार मात्र) तक्रारदारास दयावेत.
4. सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रु.दोन हजार मात्र) दयावेत.
5. सामनेवाला यांनी वरील परिच्छेद क्र.2, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या रकमा तक्रारदारास या आदेशापासून 1 महिन्याच्या आत दयाव्यात.
6. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.