श्री. विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 29/12/2011)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीचे कथनानुसार, तिचे आईचे नावावर असलेला भुखंड, मालक म्हणून तिचे नावावर नोंदवावा अशी मागणी गैरअर्जदारांकडे केली असता, त्यांनी रु.21,928/- जमा करण्यास सांगितले. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, हे शुल्क अनावश्यक आहे आणि ती वारसा हक्काने भुखंडाची मालक आहे, म्हणून त्यांनी ही तक्रार दाखल करुन कोणतीही रक्कम न घेता तक्रारकर्तीचे नाव मालक म्हणून वादातील भुखंडावर नोंदवावे व झालेल्या मानसिक त्रासाकरीता रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. गैरअर्जदारांना सदर तक्रारीची नोटीस पाठविली. त्यांनी हजर होऊन तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्तीने भुखंड त्यांच्या नावाने करावा ही मागणी केली. मात्र तक्रारकर्ती ही भुखंडाची एकमेव मालक नाही, त्यांचे व्यतिरिक्त त्यांचे भाऊ रामकुमार महादेवराव भालसागर हेसुध्दा मालक आहेत व त्यांचे हमीपत्र तक्रारकर्तीने दिलेले नाही, म्हणून तक्रारकर्तीची तक्रार चुकीची आहे व ती खारीज व्हावी असा उजर घेतला आहे.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर, मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद त्यांचे वकील प्रतिनीधीद्वारे ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. या प्रकरणातील गैरअर्जदारांचे नियमाप्रमाणे वारसा हक्काने होणा-या हस्तांतरणाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे भुखंडाचे हस्तांतरण होईल, त्यावेळी अशा भुखंडा धारकांनी प्रति रु.16/- चौरस फुटाप्रमाणे, समान अतिरिक्त राशी वसुल करण्यात यावी असा निर्णय झालेला आहे आणि यासंबंधीचे दस्तऐवज दाखल केले आहे.
5. वरील स्थिती जरीही बरोबर असली तरीही तक्रारकर्ती या भुखंडाची निम्मे हिश्याची मालक आहे, कारण ते भुखंड त्यांच्या आईच्या नावावर होता व वारसा हक्काने निम्मा हिस्सा त्यांच्या भावाकडे येतो. त्यामुळे तक्रारकर्तीकडून भावाने हक्क सोडून दिल्याबाबत जर रकमेची मागणी करावयाची असली तर केवळ निम्मे हिश्याची मागणी करता येईल. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीकडून केवळ भुखंडाचे निम्मे हिश्याचेवर नियमाप्रमाणे शुल्काची मागणी करावी.
3) तक्रारकर्तीला गैरअर्जदारांनी झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. सदरची रक्कम तक्रारकर्तीकडून घेणे असलेल्या रकमेत गैरअर्जदार समायोजित करु शकतील.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.