::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20/07/2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे. . .
विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी दि. 01/10/2012 रोजी तक्रारकर्त्याकडे येवून त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांच्या कार्याबद्दल कल्पना दिली. त्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांनी मागीतल्याप्रमाणे रु. 7430/- नगदी स्वरुपात देवून करर केला. सदर करारान्वये विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याकडे असलेले आर.ओ.बेस वॉटर प्युरिफायर याला दोन वर्षाची सेवा देणे होते. तसेच विरुध्दपक्ष यांनी सदर कालावधीमध्ये तक्रारकर्त्याकडे बिनचुक येवून कराराप्रमाणे काही वस्तु बदल करुन द्यावयाचे होते. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यामध्ये झालेल्या कराराचा कालावधी हा दि. 01/10/2012 ते 30/09/2014 पर्यंत होता. सदर कराराप्रमाणे विरुध्दपक्ष यांच्याकडील कुठलाही प्रतिनिधी सदर कालावधीमध्ये तक्रारकर्त्याकडे कधीही आला नाही. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारे सेवा सुध्दा दिली नाही. तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्षाच्या कार्यालयामध्ये फोन लावून संपर्क साधला असता विरुध्दपक्ष यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे तक्रारकर्त्याकडे असलेले वॉटर प्युरिफायर ज्याची किंमत रु. 20,000/- असून आज रोजी सदर वॉटर प्युरिफायर हे खराब झालेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला सदर करार संपण्याच्या 15 दिवस आधी फोन केला असता, विरुध्दपक्ष यांनी त्यांचा प्रतिनिधी एक महिन्यानंतर तक्रारकर्त्याकडे पाठविला व सदर प्रतिनिधीने तक्रारकर्त्याचा करार हा संपुष्टात आलेला असल्यामुळे सदर प्रतिनिधीची फी द्यावी लागेल, असे सांगितले. तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व आर्थीक त्रासाबद्दल विरुध्दपक्षाला फोनवरुन सांगितले असता, त्यावर विरुध्दपक्षाने कुठलेही उत्तर दिले नाही. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना कराराप्रमाणे रक्कम परत मागीतली, त्यावर सुध्दा विरुध्दपक्षाने कुठल्याही प्रकारे संतोषजनक उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 07/11/2014 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु विरुध्दपक्ष यांनी नोटीसची पुर्तता केली नाही. विरुध्दपक्ष यांनी कराराप्रमाणे तक्रारकर्त्याला सेवा दिलेली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याच्या वॉटर प्युरिफायरचे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना करारान्वये दिलेली रक्कम रु. 7430/- तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 10,000/- नोटीसचा खर्च रु. 1000/- तसेच तक्रारकर्त्याचा आर.ओ. प्युरिफायर संच विरुध्दपक्ष यांच्यामुळे खराब झाला, त्याची किंमत रु. 20,000/- व तक्रार खर्च रु. 5000/- विरुध्दपक्षाकडून देण्यात यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 04 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांना सदर प्रकरणाची नोटीस मिळून सुध्दा ते प्रकरणात हजर नसल्यामुळे विरुध्दपक्षाविरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
3. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
3. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दि. 15/5/2015 रोजी दाखल केलेल्या पोच पावतीच्या इंटरनेट प्रतीवरुन सदर प्रकरणाची नोटीस विरुध्दपक्षाला दि. 9/4/2015 रोजी प्राप्त झाल्याचे दिसून येते. तरीही विरुध्दपक्ष मंचापुढे हजर न झाल्याने सदर प्रकरण विरुध्दपक्षाविरुध्द एकतर्फी चालविण्याचे आदेश दि. 5/6/2015 रोजी पारीत झाले.
त्यामुळे सदर प्रकरणात केवळ तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याचा युक्तीवाद व तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त यांचे आधारेच आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार विरुध्दपक्षाचे प्रतिनिधींनी तक्रारकर्त्याकडे जावून तक्रारकर्त्यासोबत दि. 01/10/2012 रोजी करार केला. त्या करारापोटी तक्रारकर्त्याने रु. 7430/- विरुध्दपक्षाला दिले ( दस्त क्र. 11) व या करारानुसार विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याकडील आर.ओ. बेस वॉटर प्युरिफायर याला दोन वर्षाची सेवा देणे होते. सदर कराराचा कालावधी हा दि. 01/10/2012 ते दि. 30/9/2014 पर्यंतचा होता. परंतु विरुध्दपक्ष या कालावधीत तक्रारकर्त्याकडे फिरकलाही नाही व त्याच्या वॉटर प्युरिफासरला सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा रु. 20,000/- चा प्युरिफायर खराब झाला. करार संपण्याच्या 15 दिवस अगोदर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला फोन केल्यानंतर विरुध्दपक्ष हा कराराची मुदत संपल्यानंतर तक्रारकर्त्याकडे गेला व कराराची मुदत संपल्यामुळे सदर प्रतिनिधीने तक्रारकर्त्याकडे फी मागीतली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी संपर्क साधुन सदर परिस्थितीची जाणीव करुन दिल्यावरही विरुध्दपक्षाने समाधानकारक तोडगा काढला नाही. तक्रारकर्त्याने दि. 07/11/2014 रोजी नोटीस पाठवली असता, त्याचेही उत्तर विरुध्दपक्षाने दिले नाही व सदर मंचाची नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष या प्रकरणात हजर झाला नाही व विरुध्दपक्षाने त्याची बाजू मंचासमोर स्पष्ट केली नाही.
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची संपुर्ण भिस्त तोंडी तक्रारीवर आहे. सदर दोन वर्षाच्या कालावधीत तक्रारकर्त्याचा वॉटर प्युरिफायर बिघडला, परंतु त्याला विरुध्दपक्षाने कराराप्रमाणे योग्य सेवा दिली नाही, हे सिध्द करणारे कुठलेच दस्त तक्रारकर्त्याने मंचासमोर दाखल केले नाही. त्याच प्रमाणे करार संपण्याच्या 15 दिवस आधी तक्रारकर्त्याने तक्रार केली व विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी करार संपल्यावर आले व फी ची मागणी केली, हे ही तक्रारकर्त्याने मंचासमक्ष सिध्द केले नाही. तसेच सदर घटने नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी संपर्क साधल्याचे जे तकारीत म्हटले आहे, त्याचाही कुठलाच कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नसल्याने, केवळ तक्रारकर्त्याच्या तोंडी म्हणण्यावर मंचाला भिस्त ठेवता येणार नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची कराराच्या रकमेची ( रु. 7430/- ) मागणी मंच मान्य करु शकत नाही.
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तातील दस्त क्र. 11 वरुन तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात करार झाल्याचे स्पष्ट होते. परंतु तक्रारकर्त्याचे रु. 20,000/- चे वॉटर प्युरिफायर विरुध्दपक्षामुळे खराब झाल्याचे तक्रारकर्त्याने कुठेही सिध्द केले नाही. तसेच सदर दोन वर्षात विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी तक्रारकर्त्याकडे फिरकलाच नाही, हे सुध्दा तक्रारकर्त्याने कागदोपत्री सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची वॉटर प्युरिफायरच्या किंमतीची ( रुपये 20,000/- ) मागणी सदर मंच मान्य करु शकत नाही. परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या व मंचाच्या नोटीसला कुठलाच प्रतिसाद न दिल्याने तक्रारकर्त्याला शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- विरुध्दपक्षाने द्यावेत, असे आदेश सदर मंच देत आहे.
सबब वरील सर्व मुद्दयांचा विचार करुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात आला.
::: अं ति म आ दे श :::
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईचे रु. 3000/-( रुपये तिन हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे,
4) सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना विनामुल्य देण्यात याव्या.