(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 14/09/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 15.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 जे गैरअर्जदार क्र.2 चे विक्रेते आहेत, त्यांचेकडून महिंद्रा जी.आय.ओ., हिरवा रंगाचे ज्याचा बियरींग चेचिस क्र.एमए1एलटी2एफटीटी 95जी 25935 व इंजिन क्र.09एच 9067496 हे वाहन रु.1,74,378/- मध्ये विकत घेतले व सदर वाहनाचा त्याला दि.28.02.2010 रोजी ताबा मिळाला. मात्र गैरअर्जदार क्र.1 ने सदरचे वाहन सुस्थितीत आहे त्यात कोणत्याच उणिवा नाहीत व सदर वाहनात वस्तु उच्च प्रतिच्या वापरल्या आहेत, असे सांगितल्यामुळे ताबा घेतला. त्याला तांत्रीक व यांत्रीकी ज्ञान नव्हते व वाहनाची तपासणी केली नव्हती. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे पूर्ण समाधान झाल्यानंतर डी.एम. वर सही घेण्यांत येईल, असे सांगितले व दि.02.03.2010 रोजी सही घेतली. तसेच वाहनात काही त्रुटया असतील तर त्या लक्षात आणून द्याव्या व त्या केव्हाही दुरुस्त करुन देण्यांत येतील, असे सांगितले. सदरचे वाहन घेतल्यानंतर ते चांगल्या स्थितीत नव्हते त्यात निम्न दर्जाचे सुटे भाग वापरले होते असे लक्षात आले, त्यामुळे वेळोवेळी गैरअर्जदारांकडे वाहन दुरुस्तीकरता नेले, मात्र गैरअर्जदारांनी वाहनातील त्रुटया दुरुस्त्या करुन दिल्या नाही. वाहनातील मोठमोठया समस्या दुरुस्त करणे शक्य नाही व नादुरुस्त वाहन काही दिवस चालविण्यास सांगितले होते. तसेच पुन्हा तपासणी करु असे सांगितले म्हणून तक्रारकर्त्याने ते वाहन वापरणे सुरु केले. काही दिवसानंतर तक्रारकर्त्याने सदर वाहन गैरअर्जदार क्र.1 कडे नेले असता ते दुरुस्तीसाठी ठेऊन परत केले तेव्हा दुरुस्तीचा खर्च व सुटया भागांची रक्कम सुध्दा घेतली. गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहनातील त्रुटी दुरुस्त करुन करुन न देता प्रत्येक वेळी वाहन जसेच्या तसे परत केले व यात गंभीर स्वरुपाची त्रुटी असल्यामुळे वाहन दुरुस्त होत नाही असे सांगितले, अशा प्रकारे सदर वाहन निकामी आहे. शिवाय गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहनातील उणीवा दूर करुन दिल्या नाही, तक्रारकर्त्याने वाहनाचे टायर दोनदा बदलविले व त्याने दि.18.09.2010 रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठवली. परीणामी वाहन अयोग्य असल्यामुळे तक्रारकर्त्याला नुकसान सहन करावे लागत आहे, तसेच त्याने चोला मंडलम् इनव्हेंस्टमेंट ऍन्ड फायनान्स कंपनी मिमीटेड यांचेकडून कर्ज घेतले होते ते वाहनाच्या अयोग्य स्थीतीमुळे तो कर्जाची परतफेड करु शकला नाही. त्याला वाहना पासुन कोणतेही उत्पन्न मिळाले नाही, जे की रु.60,000/- अपेक्षीत होते, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली व ती व्दारे गैरअर्जदारांनी जुने निकृष्ठ दर्जाचे वाहन बदलवुन नवीन वाहन द्यावे, आर्थीक नुकसानीचे रु.60,000/- मिळावे, नोटीसचा खर्च रु.5,000/- मिळावा, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. यात गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता त्यांचे पैकी गैरअर्जदार क्र.1 हजर झाले असुन त्यांनी आपला जबाब सादर केला, गैरअर्जदार क्र.2 हे नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला.
4. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारीतील सर्व विपरीत विधाने ना कबुल केली, तक्रारकर्त्याने त्याचे वाहनात नेमका कोणता दोष आहे हे स्पष्ट केले नाही व त्या संबंधाने कोणत्याही स्वरुपाचा तांत्रीक पुरावा दाखल केला नाही, तसेच त्यांनी दुरुस्तीचा खर्च इत्यादी जो कराराचे बाहेरचा होता तेवढाच घेतला आणि या खर्चाच्या रकमेबाबत तक्रारकर्त्यास कल्पना असल्यामुळे कोणताही विरोध न करता जमा केली. तक्रारकर्त्याने केलेले आरोप हे अनिश्चित आणि संदिग्ध असुन त्यांनी सदर वाहन निष्काळजीपणे वापरल्याचे दिसुन येते. थोडक्यात तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची व गैरकायदेशिर आहे म्हणून ती खारिज व्हावी असा उजर गैरअर्जदार क्र.1 ने घेतला आहे.
5. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविली असता ती त्यांना मिळाल्याची पोष्टाची पोच प्राप्त झाली, परंतु गैरअर्जदार क्र.2 हे मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.24.02.2011 रोजी पारित केला.
6. तक्रारकर्तीनी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 21 वर इनव्हाइस, डी.एम. टॅक्स इनव्हाईस, चोला मंडलम् कंपनीचे पत्र, वर्कशॉप इनव्हेंटरी इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.25.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता गैरहजर, गैरअर्जदार क्र.1 चे वकीलांचा पुढील तारखेबाबतचा अर्ज नामंजूर. प्रकरण दि.09.09.2011 रोजी निकालाकरीता ठेवण्यांत आले होते, परंतु कोरम अभावी सदर प्रकरणातील निकाल दि.14.09.2011 रोजी ठेवण्यांत आला. तसेच तक्रार व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
8. यातील तक्रारकर्त्याचे वाहन निकृष्ठ दर्जाचे आहे व त्यातील सुटे भागही निकृष्ठ दर्जाचे आहेत हे दर्शविण्याचे दृष्टीने कोणत्याही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. आणि असा कोणताही अभिप्राय जो तांत्रीक स्वरुपाचा असु शकतो तो संबंधीत तज्ञ व्यक्तिकडून येणे गरजेचे आहे तो या प्रकरणात समोर आलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची वाहन बदलवुन मिळण्या बाबतची मागणी ही विचारात घेण्याजोगी नाही. असे जरी असले तरी यातील संबंधीत वाहनामध्ये वेळोवेळी दोष निर्माण झाला आणि तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे अद्दापही सदर वाहन दोषपूर्ण आहे व ते त्यास दुरुस्त करुन मिळणे गरजेचे आहे ही बाब वस्तुस्थीतीवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्यास गैरअर्जदार क्र.1 ने वाहनाची पूर्ण दुरुस्ती योग्यरित्या करुन दिलेली नाही, त्यामुळे वाहन वारंवार खराब होत गेले ही बाब गैरअर्जदार क्र.1 व 2 चे सेवेतील त्रुटी आहे.
9. वरील परिस्थिचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत स्वखर्चाने तक्रारकर्त्याचे वाहन पूर्ण दुरुस्त करुन देऊन ते रस्त्यावर चालण्यायोग्य आहे याबाबतचे शासकीय तंत्र निकेतन संस्था, नागपूर किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांचे महाविद्यालयात ऑटोमोबाईल विभागाचे जे तज्ञ असतील त्यांचेकडून वाहनाची तपासणी करुन घेऊन ते पूर्णतः दुरुस्त झालेले आहे, याबाबत प्रमाणपत्र घेऊन ते तक्रारकर्त्यास सुस्थितीत परत करावे.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.