मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 17/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचा प्लॉट क्र. 12, ईश्वर नगर, नंदनवन, नागपूर येथील ‘सोना अपार्टमेंट्स’ या योजनेतील सदनिका मोबदला देऊन खरेदी केला. गैरअर्जदार यांनी कराराप्रमाणे दिलेल्या तारखेस सदर सदनिकेचा ताबा दिला नाही. सदनिकेचा ताबा मिळाल्यावर सदर इमारतीमध्ये राहणे सुरु केल्यावर तक्रारकर्त्यांना सदर इमारतीच्या बांधकामामध्ये त्रुटी आढळून आल्या. तसेच सदर बांधकामाचा दर्जा योग्य नसून करारानुसार आणि माहिती पुस्तिकेमध्ये कबूल केल्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी सोयी व सुविधा पुरविल्या नाहीत असे आढळून आले. इमारतीच्या प्रवेशद्वारावर इलेक्ट्रीक खांब असून तो दूर करुन अंडरग्राउंड फिटींगद्वारे बदलण्यात यावा, न बसविलेले मुख्य द्वार बसविण्यात यावे, पार्किंगचे फ्लोरींग करावे, विद्युत मिटर्स व विद्युत पाईंट्स योग्यरीत्या झाकण्यात यावे, जीन, पार्किंक, प्रवेशद्वारावर विद्युतीकरण करावे, म.न.पा.च्या पाण्याची जोडणी करावी, पाण्याच्या टाकीची स्वच्छता करावी, वाटरपंप बसविण्यात यावे, पाण्याच्या टाक्या झाकाव्या व त्याकरीता पाय-या पुरविण्यात याव्या, गॅलरीचे पाणी निस्सारणाची व्यवस्था करावी, फ्लॅटच्या स्नानगृह व स्वच्छतागृहाचे पाझरणारे पाण्याची समस्या निवारणार्थ काम करावे, उद्वाहन बसविण्यात आलेले नाही, टेरेसवर दारे लावावी, आवारभिंत उंच करावी, सर्वसामान्य विद्युत मिटर घरगुती मिटरमध्ये बदलण्याबाबत कारवाई व्हावी, इमारतीसभोवताली असणारे पाईप् स घट्ट बसविण्यात यावे, विविध क्लॅम्प्स व अँगल्स उघडे आहेत ते व्यवस्थीत करावे, रंगरंगोटीचे काम पूर्ण करावे, सुरक्षारक्षकांची खाली बांधावी, काही फ्लॅटमध्ये स्वतंत्र विद्युत मिटर पुरविण्यात यावे, अपार्टमेंट ओनर्सची संस्था नोदणीकृत करण्यात आलेली नाही या सर्व उणिवा पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांना केली. परंतू तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार यांचेशी वारंवार संपर्क साधूनही, त्यांनी सदर तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्यांनी सदर इमारतीचे अपूर्ण कार्याच्या खर्चाचा अंदा होण्यासाठी व वास्तुविशारद श्री. डी. डब्ल्यू. हटवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर अपूर्ण त्रुटी दूर करण्याकरीता जवळपास रु.13,00,000/- एवढया अपेक्षीत खर्चाचे अंदाजपत्रक दिले. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यांच्या सदर तक्रारीची दखल न घेऊन सदर तक्रारकर्त्यांना सेवेतील कमतरता दिली, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल करुन अपूर्ण बांधकाम हे 3 महिन्याचे आत पूर्ण करुन द्यावे किंवा त्याकरीता लागणार रु.13,00,000/- खर्च हा व्याजासह परत करावा, शारिरीक व मानसिक त्रासाकरीता भरपाई आणि तक्रारीचा खर्च द्यावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना मिळाल्यावर गैरअर्जदारांनी लेखी उत्तर दाखल करुन नमूद केले की, तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदाराच्या योजनेत सदनिका खरेदी केल्या होत्या. परंतू तक्रारकर्त्यांनी तक्रारीत कथन केलेले इतर सर्व आरोप अमान्य केले आहेत. गैरअर्जदाराचे कथनानुसार सदर इमारतीचे बांधकाम हे करारानुसार आणि माहिती पुस्तिकेमध्ये दिलेल्या तपशिलाप्रमाणेच झाले असून काही काम आर्थिक मंदीमुळे व अडचणीमुळे पूर्ण झालेले नाही. परंतू सदर माहिती पुस्तिकेमध्ये कामे पूर्ण करण्याचे आश्वासन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यांना दिले होते. तक्रारकर्त्यांनी तक्रारीमध्ये केलेल्या मागणीतील बरीचशी कामे पूर्ण केलेली आहेत. त्यातील सदनिकेच्या प्रवेशद्वाराच्यामध्ये उजव्या बाजूस असलेल्या विद्युत खांब दुरुस्त करुन तो इलेक्ट्रीक पॅनल किंवा अंडरग्राऊंड फिटींगद्वारे बदलविण्यात यावा हे कार्य गैरअर्जदाराचे नसून ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारक्षेत्रात आहे. याशिवाय जलनिस्सारण हे वाहनतळ (पार्किंग) मध्ये उघडे ठेवण्यात आलेले नाही. पार्किंग कव्हर्ड असल्यामुळे पाईपद्वारे होणारे पाणी वाहनतळावर पडत नसून सदर पाणी साईड मार्जिनमध्ये सोडण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांनी सुरक्षा रक्षकाची खोली बांधण्याचे कुठलेही आश्वासन दिलेले नाही, त्याची माहितीपुस्तीकेमध्ये सुध्दा नोंद नाही, त्यामुळे गैरअर्जदार सदरची सुरक्षारक्षाची खोली बांधण्यास जबाबदार नाही. याशिवाय गैरअर्जदार यांनी घोषणापत्र (Deed of declaration under Maharashtra Apartment Ownership Act, 1970) प्रमाणे रजिस्टर करुन दिले आहे व त्याची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे.
याशिवाय तक्रारीतील मागणीपत्रात जी कामे पूर्ण नाहीत, ती पूर्ण करुन देण्याचे आश्वासन गैरअर्जदार यांनी दिलेले आहे. गैरअर्जदार यांच्या सदर अपूर्ण कार्याकरीता रु.13,00,000/- एवढा खर्च अपेक्षीत असल्याचे तक्रारकर्त्याचे कथन गैरअर्जदाराने अमान्य केले आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिल प्रतिनीधीमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. तक्रारीतील एकंदर वस्तूस्थिती पाहता, तसेच दोन्ही पक्षांचे म्हणणे पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार यांच्या सोना अपार्टमेंट या योजनेतील सदनिका नोंदविल्या व खरेदी केल्या होत्या. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार यांनी करारानुसार आणि माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या तपशिलाप्रमाणे खालील कामे पूर्ण केली नाही.
इमारतीच्या प्रवेशद्वारावर इलेक्ट्रीक खांब असून तो दूर करुन अंडरग्राउंड फिटींगद्वारे बदलण्यात यावा, न बसविलेले मुख्य द्वार बसविण्यात यावे, पार्किंगचे फ्लोरींग करावे, विद्युत मिटर्स व विद्युत पाईंट्स योग्यरीत्या झाकण्यात यावे, जीन, पार्किंक, प्रवेशद्वारावर विद्युतीकरण करावे, म.न.पा.च्या पाण्याची जोडणी करावी, पाण्याच्या टाकीची स्वच्छता करावी, वाटरपंप बसविण्यात यावे, पाण्याच्या टाक्या झाकाव्या व त्याकरीता पाय-या पुरविण्यात याव्या, गॅलरीचे पाणी निस्सारणाची व्यवस्था करावी, फ्लॅटच्या स्नानगृह व स्वच्छतागृहाचे पाझरणारे पाण्याची समस्या निवारणार्थ काम करावे, उद्वाहन बसविण्यात आलेले नाही, टेरेसवर दारे लावावी, आवारभिंत उंच करावी, सर्वसामान्य विद्युत मिटर घरगुती मिटरमध्ये बदलण्याबाबत कारवाई व्हावी, इमारतीसभोवताली असणारे पाईप्स घट्ट बसविण्यात यावे, विविध क्लॅम्प्स व अँगल्स उघडे आहेत ते व्यवस्थीत करावे, रंगरंगोटीचे काम पूर्ण करावे, सुरक्षारक्षकांची खाली बांधावी, काही फ्लॅटमध्ये स्वतंत्र विद्युत मिटर पुरविण्यात यावे, अपार्टमेंट ओनर्सची संस्था नोदणीकृत करण्यात आलेली नाही.
5. गैरअर्जदार यांनी आपल्या शपथेवरील जवाबात आर्थिक अडचणीमुळे कार्य पूर्ण करण्यास उशिर झालेला आहे ही बाब मान्य केलेली आहे व कराराप्रमाणे व माहितीपुस्तीकेमध्ये दिल्याप्रमाणे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यास तयार असल्याचे गैरअर्जदारांनी मान्य केलेले आहे. म्हणजेच गैरअर्जदार यांनी कबूल केल्याप्रमाणे काही कामे केलेली नाहीत, त्यात उणिवा ठेवल्या आहे असे दिसून येते व हीच गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे. गैरअर्जदार यांनी वर नमूद केल्याप्रमाणे बांधकामातील उणिवा दूर करण्यास जबाबदार आहे. गैरअर्जदार यांनी राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यास तयार असल्याचे शपथेवरील बयानात मान्य केलेले आहे. त्यामुळे अपू-या बांधकामापोटी रु.13,00,000/- ची तक्रारकर्त्यांची मागणी मान्य करणे संयुक्तीक होणार नाही.
6. वरील तक्रारकर्त्याच्या मागण्यांपैकी सुरक्षारक्षकांची खोली बांधून देण्याचे आश्वासन गैरअर्जदार यांनी दिल्याचे दाखल पूराव्यावरुन दिसून येत नाही. त्यामुळे सदरची मागणी मान्य करणे योग्य होणार नाही. त्याचप्रमाणे इमारतीच्या प्रवेशद्वारावर इलेक्ट्रीक खांब असून तो दूर करुन अंडरग्राउंड फिटींगद्वारे बदलण्यात यावा, हे काम विद्युत मंडळाच्या अधिकार क्षेत्रातील आहे. परंतू गैरअर्जदार यांनी सदनिका विकल्यामुळे सदनिकावासीयांच्या सुरक्षीततेची जबाबदारी ही तितकीच गैरअर्जदाराची असल्यामुळे गैरअर्जदार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे सदरचा खांब हटविण्याबाबत विनंती करावी व त्याचा पाठपुरावा करावा. अपार्टमेंट ओनर्सची संस्था नोंदणीकृत करण्यास त्यांना सहाय्य करावे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून, गैरअर्जदार यांनी तीन महिन्याच्या आत माहिती पुस्तीका आणि कराराप्रमाणे सदर निष्कर्षामध्ये नमूद कामे पूर्ण करावीत.
2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
3) आदेश क्र. 2 ची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत करावे.