श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 23/02/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने सन 2005 मध्ये टाटा कंपनीचा ट्रक – 1613 हा ज्याचा नोंदणी क्र. MP 22 G 1502 होता, गैरअर्जदाराकडून कर्ज घेऊन स्वतःच्या उपजिविकेकरीता घेतला व गैरअर्जदाराने सदर वाहनाचा विमा 2008-09 कालावधीकरीता बजाज एलायंस इंशूरंस कंपनीकडे विमाकृत केला होता. कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यावर 2009-10 या कालावधीकरीता सदर वाहन तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे रु.13,344/- प्रीमीयम देऊन विमाकृत केले व गैरअर्जदाराने सदर वाहनाबाबत तक्रारकर्त्याला रु.1,953/- ‘नो क्लेम बोनस’ सवलत देऊन विमापत्र दिले. दि.15.07.2010 रोजी सदर वाहन पोलिस स्टेशन बारगी, जि. जबलपूर याठिकाणी अपघातग्रस्त झाले. याबाबत पोलिस स्टेशनला माहिती देऊन भा.दं.वि.चे 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गैरअर्जदाराने त्यांचा सर्व्हेयर नेमून अपघात स्थळाचे निरीक्षण केले आणि वाहन दुरुस्तीकरीता पाठवून नंतर गैरअर्जदाराचे दुसरे सर्व्हेयर यांनी वाहनाची संपूर्ण पाहणी करुन आपला अहवाल गैरअर्जदाराकडे सादर केला व वाहनाकरीता येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक रु.78,000/- तयार करण्यात आले. तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्तीकरीता रु.1,50,000/- खर्च आला व नुकसान भरपाई आणि खर्चाबाबत मागणी दावा गैरअर्जदार कंपनीकडे तक्रारकर्त्याने दाखल केला. गैरअर्जदाराने त्याचा विमा दावा ‘नो क्लेम बोनस’ अंतर्गत विमापत्र देतांना दिलेला असतांना, पूर्वीच्या कंपनीकडून ओ.डी.क्लेम नोंदणीकृत झाल्याची माहिती मिळाल्याने, तक्रारकर्त्याने अटी व शर्तीचा भंग केला असा निर्णय घेऊन तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला. तक्रारकर्त्याचे मते गैरअर्जदाराने कुठल्याही विमा कंपनीला विचारणा न करता स्वेच्छेने ‘नो क्लेम बोनस’ दिला व अपघात होईपर्यंत गैरअर्जदाराने कधीही तक्रारकर्त्याला अटी व शर्तीचा भंग केलेला आहे अशी सूचना केलेली नाही. तक्रारकर्त्याचे मते गैरअर्जदाराने खोटे व गैरकायदेशीर कारण काढून नाकारलेला असल्याने त्याच्या सेवेत त्रुटी असून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ते करीत आहे, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रारीद्वारे संपूर्ण विमा रक्कम रु.1,50,000/- व्याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व न्यायालयीन खर्चा म्हणून रु.10,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारास पाठविण्यात आली असता त्यांनी तक्रारीवर प्रारंभिक आक्षेप घेऊन, तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने प्राथमिक आक्षेपात, तक्रारकर्त्याने ओ.डी.क्लेम घेतला होता ही बाब लपवून, ‘नो क्लेम बोनस’ चा फायदा करुन घेतला. त्यामुळे अटी व शर्तीचा भंग झाल्याने तक्रारकर्ता मागणीस पात्र नाही, म्हणून सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
पुढे परिच्छेदनिहाय उत्तरात, गैरअर्जदारांनी रु.1,953/- ची सवलत ‘नो क्लेम बोनस’ म्हणून दिली होती. कारण तक्रारकर्त्याने त्यांच्यापासून बजाज एलायंझ कडून ओ.डी.क्लेम घेतला नाही ही बाब लपवून ठेवली होती. तसेच दुसरे सर्व्हेयर यांनी रु.78,000/- खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते. तक्रारकर्त्याने नमूद केलेली दुरुस्तीची रक्कम नाकारुन गैरअर्जदाराने 07.08.2010 रोजीच्या पत्रांन्वये दावा नाकारला. तक्रारकर्त्याच्या इतर तक्रारीतील बाबी नाकारुन सदर तक्रार दंडासह खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
4. सदर तक्रार युक्तीवादाकरीता आल्यानंतर, मंचाने गैरअर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्ते गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
5. सदर तक्रार ही उपरोक्त वाहनाचे 09.09.2009 ते 08.09.2010 या कालावधीकरीता तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून विमा काढला होता व त्याकरीता विमा हप्त्याची रक्कम दिली होती, याबाबत उभय पक्षात वाद नाही व तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो. 15.07.2010 ला उपरोक्त वाहनाचा अपघात झाला होता व त्या अनूषंगाने गैरअर्जदाराने आपले सर्व्हेयर श्री. रविकुमार महाजन आणि श्री. विजय लिमजे यांनी दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक रु.78,000/- दिले, याबाबतही दोन्ही पक्षात वाद नाही. परंतू तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्यास रु.1,50,000/- खर्च आला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे वस्तूनिष्ठ पूराव्या अभावी तसेच खर्चाचे पावत्या मंचासमोर नसल्यामुळे मागणी संयुक्तीक वाटत नाही. दावा मंजूर झाल्यास तक्रारकर्ता सर्व्हेयरने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार रु.78,000/- मिळण्यास पात्र राहील असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
6. गैरअर्जदाराचा विमा दावा नाकारतांना एकमेव आक्षेप आहे की, तक्रारकर्त्याने 2008-09 या अवधीकरीता ट्रक बजाज एलायंझ विमा कंपनीकडे विमाकृत केले व त्यानंतर 2009-10 या कालावधीकरीता गैरअर्जदाराकडून विमाकृत केले. तक्रारकर्त्याने 2008-09 या कालावधीत काही अपघात झाल्याचे कळविले नाही व ते न कळवून कराराचा व अटींचा भंग केला आणि विमापत्र प्राप्त केले. या एकमेव कारणासाठी विमा दावा नाकारला आहे. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदाराने 09.09.2009 ते 08.09.2010 विमापत्र काढतेवेळी जुन्या विमा पॉलिसीच्या आधारे त्या विमा कंपनीकडून शहानिशा करणे आवश्यक होते. परंतू गैरअर्जदाराने आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली नाही व खोटे व खोडसाळपणाने तक्रारकर्त्यावर आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने 2008-09 या वर्षीच्या विमा पत्रांतर्गत झालेल्या घटनेची माहिती न दिल्यामुळे व माहिती लपवून ठेवल्यामुळे हेतूपूरस्सर रु.1953/- ची सवलत प्राप्त केली. हे गैरअर्जदाराचे म्हणणे मंचास पूर्णतः असंयुक्तीक व गैरकायदेशीर वाटते, म्हणून मंचाने नाकारले. गैरअर्जदाराने म्हटले की, तक्रारकर्त्याने विमा कराराचे अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. परंतू गैरअर्जदाराने विमा पत्राच्या अटी व शर्ती मंचासमोर दाखल न केल्यामुळे आता गैरअर्जदार त्याबाबत लाभ घेऊ शकत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने प्रमाणित केलेले आहे. तसेच गैरअर्जदाराने मंचासमोर कुठलेही दस्तऐवज दाखल करुन सिध्द केलेले नाही की, बजाज एलायंझ कंपनीतर्फे किंवा ओ.डी.क्लेमबाबत सूचना मिळालेली होती, त्यामुळे सुध्दा गैरअर्जदाराचे म्हणणे असंयुक्तीक ठरते.
7. तसेच गैरअर्जदाराने त्यांच्या ताब्यातील दोन्ही सर्व्हेयरचे अहवाल मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार मंचासमोर वस्तूस्थिती लपवित आहे असे मंचाचे मत आहे व गैरअर्जदाराची ही कृती पूर्णतः गैरकायदेशीर आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट झाले आहे की, तक्रारकर्त्याचा नाकारलेला दावा योग्य होता हे सिध्द करण्यास गैरअर्जदार अपयशी ठरला व विमा दावा येनकेनप्रकारे नाकारण्याकरीता अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला.
8. सर्व्हेयरच्या अहवालानुसार गैरअर्जदार तक्रारकर्त्यास रु.75,000/- विमा दावा खारीज केल्याचे दि.07.08.2010 पासून द.सा.द.शे. 12% व्याजाने मिळण्यास पात्र आहे व तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने सर्व्हेयरच्या अहवालानुसार तक्रारकर्त्याला रु.75,000/- ही विमा दाव्याची रक्कम दि.07.08.2010 पासून प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजाने द्यावे.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला मानसिक त्रासाकरीता भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.