मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/08/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याचे दि.20.05.2010 ते 08.06.2010 या कालावधीसाठी सुमारे 50 लोकांसाठी नेपाळ पर्यटन (Tour) साठी गैरअर्जदारांकडे एक पर्यटन बस क्र. एम एच 31 एम 6202 एकूण 20 दिवसांसाठी 4150 किलोमिटर जाणे येणे धरुन एकूण रु.1,28,800/- एवढया मोबदल्यामध्ये आरक्षीत केली होती. तसा करारनामा उभय पक्षांमध्ये झाला. ऍडव्हांसपोटी तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना रु.500/- अदा केले व त्यानंतर सदर प्रवासासाठी माहिती पत्रके छापून ग्राहक गोळा करणे सुरु केले. लोकांनी टूर बसचे बुकींग पाहून तक्रारकर्त्यास अग्रीमापोटी रक्कम दिली. तक्रारकर्त्याने प्रत्येक आसनाकरीता रु.6,500/- आकारले होते व प्रत्येक आसनाचा प्रत्यक्ष खर्च रु.4,500/- वजा जाता तक्रारकर्त्यास एकूण 49 आसनापोटी रु.98,000/- एवढा फायदा होणार होता.
एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवडयात तक्रारकर्त्याने ग्राहकांना टूरबद्दल आवश्यक सुचना देण्यासाठी बोलाविले असता पोस्टमन एक लिफाफा घेऊन आला. सदर लिफाफा तक्रारकर्त्याने समोर असलेल्या लोकांसमोर फोडला असता त्याता गैरअर्जदाराने दिलेली नोटीस होती, ती वाचली असता त्यात गैरअर्जदाराने सदर टूरकरीता गाडी देण्यास नकार देऊन अग्रीमापोटी दिलेली रक्कम रु.500/- परत पाठविले होते.
तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास सदर बस रद्द न करण्याची विनंती करुनही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकले नाही किंवा सदर बस रद्द करण्याचे कुठलेही कारण दिले नाही. एप्रिल व मे महिन्यात लग्नाचे कार्यक्रम असल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रयत्न करुनही दुस-या बसची व्यवस्था होऊ शकली नाही. तक्रारकर्त्यास सदर टूरचे पैसे परत करुन टूर रद्द करावा लागला. तक्रारकर्त्याचे मते गैरअर्जदारांची ही सेवेतील त्रुटी आहे. म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन नुकसान भरपाईदाखल रु.98,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला असता गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्तरही तक्रारीस दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.31.03.2011 रोजी पारित केला.
3. सदर तक्रार युक्तीवादाकरीता आली असता दोन्ही पक्ष गैरहजर. मंचाने सदर प्रकरण दाखल दस्तऐवजावर गुणवत्तेवर निकाली काढण्याकरीता ठेवले. सदर प्रकरणात तकारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. तक्रारकर्त्याचे शपथेवरील बयान, दाखल दस्तऐवज, तसेच दस्तऐवज क्र. 4 वरील नोटीसचे अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास आले की, निर्विवादपणे तक्रारकर्त्याने आयोजित केलेल्या नेपाळ (Tour) टूरकरीता, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडे दि.10.02.2010 रोजी एक 50 सीटर बस रजि.क्र. एम एच 31 एम 6202 दि.20.05.2010 ते 08.06.2010 या कालावधीकरीता (4150 कि.मी.) एकूण रक्कम रु.1,28,800/- करीता बुक केलेली होती व अग्रीमापोटी तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास रु.500/- दिले होते.
5. दस्तऐवज क्र. 4 वरील गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या नोटीसवरुन असेही निदर्शनास येते की, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास नेपाळ टूरकरीता आरक्षीत केलेली बस रद्द करुन तक्रारकर्त्याने दिलेली बुकींगपोटीची रक्कम रु.500/- पे ऑर्डर/डी.डी.द्वारे तक्रारकर्त्यास परत केले होते. तक्रारकर्त्याच्या मते कुठलेही कारण न देता गैरअर्जदार यांनी सदर बुकींग रद्द केली. त्यामुळे तक्रारकर्त्यास प्रवासासाठी नोंदणी केलेल्या लोकांची रक्कम संबंधितांना परत करावी लागली व त्यामुळे होणा-या लाभापासून तक्रारकर्ता वंचित राहिला. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ श्री. गोविंद रामचंद्र पाटील व श्री. राजेश भागवत वाघमारे यांचे शपथपत्र सादर केले आहे. ते व तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथन यावरुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीस पुष्टी मिळते. तक्रारकर्त्याचे सदर म्हणणे नाकारण्यासाठी गैरअर्जदार यांनी मंचात उपस्थित होऊन आपले म्हणणे सादर केले नाही अथवा सबळ पुराव्यासह ते खोडून काढलेले नाही.
6. वरील वस्तुस्थिती पाहता गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार अग्रीमापोटी रु.500/- स्विकारुन टुरसाठी बस देण्याचे कबुल करुन सदर बस आरक्षीत करुन नंतर कुठलेही कारण न देता ती रद्द करुन तक्रारकर्त्यास सेवेतील कमतरता दिली व गैरअर्जदारांच्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्यास निश्चितच शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास झाला, त्यासाठी गैरअर्जदार जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येते. परंतू तक्रारकर्त्याने मागितलेली नुकसान भरपाई ही मंचाचे मते अवास्तव असून सबळ पुराव्याअभावी मंचाला ती मान्य करता येत नाही. तक्रारकर्त्यास वास्तविक पाहता रु.25,000/- इतकी नुकसान भरपाई देणे न्यायोचित राहील असे मंचाचे मत आहे. करीता मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.25,000/- द्यावी.
3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना रु.2,000/- तक्रारीच्या खर्चाबाबत द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.