(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 19/04/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.16.11.2010 रोजी दाखल करुन मागणी केली आहे की, तक्रारकर्त्याचे जुने निकृष्ठ दर्जाचे वाहन बदलवुन नवीन वाहन द्यावे व तक्रारकर्तीस झालेल्या आर्थीक नुकसानीपोटी रु.2,00,000/- वाहन चालकाचा खर्च रु.15,000/- व इतर खर्च असे एकूण रु.2,20,000/- शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाची मागणी रु.10,000/- ची केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. विरुध्द पक्ष क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र.2 चे अधिकृत विक्रेते असुन विक्री, दुरुस्ती आणि सुटया भागांचे विक्रेते आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडून महिंद्रा जी.आय.ओ. ज्याचा चेसिस क्र. एमए-1 एलटी-2 एफटी-टी95जी25954 व इंजिन क्र.09जी9065891 असा आहे. त्याकरीता तक्रारकर्तीने सुरवातीस रु.62,944/- एकूण विक्री किंमत रु.1,69,500/- पैकी दिले. तक्रारकर्त्याने महिंद्र ऍन्ड महिंद्र फायनान्शीयल सर्व्हीसेस कडून कर्ज घेऊन उरलेले पैसे विरुध्द पक्षांना दिले, त्यामुळे दि.01.01.2010 ला वाहनाची पूर्ण रक्कम दिल्यानंतर ताबा दिला व विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्यास सांगितले की, उपरोक्त वाहन अगदी सुस्थितीत आहे व त्यात मेकॅनिकल, इंजिनिअरींग किंवा अन्य कोणत्याच प्रकारचा बिघाड नाही. व त्यातील सुटे व टायर टयूबमधेही उणिवा नाही, तसेच विरुध्द पक्षाने आश्वस्त केले की, काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करुन देण्यांत येईल व कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही.
3. तक्रारकर्त्याने म्हटले की, ताबा घेतल्यानंतर टायर व टयुब हे खुपच निम्नप्रतिचे वापरल्याचे लक्षात आले व दि.28.08.2010 रोजी एक टायर, टयूब बदलविण्यांस विरुध्द पक्षाकडे गेले असता त्यांनी बदलवुन दिले नाही. दि.24.09.2010 रोजी 2 टायर व 2 टयूब बदलविण्याकरता नेले असता त्यावेळी सुध्दा त्यांनी बदलवुन दिले नाही. तक्रारकर्तीने म्हटले की, 9 महिन्यांचे कालावधीत सदरील वाहनाचे चारही टायर टयूब स्वखर्चाने बदलवावे लागले व 9-10 वेळा निरनिराळे कारणास्तव दुरुस्ती तर काही वस्तुंची अदलाबदली करुन घ्यावी लागली. परंतु वाहन दुरुस्तीचे आश्वासन देऊन सुध्दा अर्जदारास योग्य दुरुस्ती न करता वाहन परत करण्यांत आले. अजूनही वाहन योग्य स्थितीत नसुन काही दिवस चालवा नंतर बघता येईल असे म्हटले. तक्रारकर्त्याने दि.04.10.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविला तक्रारकर्त्याने म्हटले की, सर्दहू वाहन हे तिच्या उदरनिर्वाहाकरता उत्पन्नाचे साधन मिळत राहील या एकमेव हेतूने खरेदी केले होते. परंतु उद्देश सफल झाला नाही व तिने सदर वाहन दि.04.10.2010 ला विरुध्द पक्षाकडे कायमचे निकामी झाल्यामुळे जमा केलेले आहे. तक्रारकर्तीने म्हटले की, तिने महिंद्र ऍन्ड महिंद्रा फायनान्सचे कर्जाची पूर्ण परतफेड केलेली आहे. व मागणी नुसार सदर वाहन बदलवुन द्यावे व नुकसान भरपाईची मागणी केली.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशाणी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात एकूण 28 दस्तावेज दाखल केली ती अनुक्रमे पृ.क्र.14 ते 43 वर आहेत.
5. मंचाने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना नोटीस बजावला परंतु विरुध्द पक्ष क्र.2 ला मंचाची नोटीस प्राप्त होऊन सुध्दा गैरहजर राहील्यामुळे दि.19.07.2011 ला विरुध्द पक्ष क्र.2 विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. विरुध्द पक्ष क्र.1 चे म्हणणे खालिल प्रमाणे...
6. विरुध्द पक्ष क्र.1 ने त्यांचे सेवेत त्रुटी व दिरंगाई नसल्यामुळे तक्रार खारिज करण्यांची विनंती केली. तसेच उपरोक्त वाहन व्यवसायाकरीता घेतल्याने त्यातील व्यवहार हा व्यावसायीक स्वरुपाचा आहे त्यामुळे तक्रारकर्ती ग्राहक ठरत नसुन तक्रार खारिज करण्यांची मागणी केली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारीच्या परिच्छेद क्र. 1 मान्य केला व कर्ज पुरवठा घेतल्याबाबतची बाब नाकारली. विरुध्द पक्षाने नाकारले की, त्याने तक्रारकर्तीस कोणतेही प्रलोबन दिलेले नव्हते, विरुध्द पक्ष म्हणाले की तक्रारकर्तीने सुचना व माहितीचा चुकीचा अर्थ लावुन वाहनामधे वारंटी कालावधी दरम्यान होणारा बिघाड जर अटी व शर्तीमधे असेल तर तो बिघाड दुरुस्त केल्या जाईल. प्रोप्रायटरी कंपोनन्टचे वारंटी संबंधीत उत्पादकाव्दारे वारंटी पॉलिसी अनुसार दिल्या जाईल. विरुध्द पक्षाने म्हटले की, तक्रारकर्त्याने वाहन तसेच त्याचे टायर टयूब बाबत म्हणणे नाकारले. कारण वाहनात उत्तम प्रतिचे व दर्जेदार वस्तुंचा वापर करण्यांत आलेला आहे. उलटपक्षी तक्रारकर्त्याने आर्नर्स मॅन्यूअलनुसार वाहन वापरले नाही म्हणून वाहनाचे टायर, टयूब खराब होण्याचे एकमेव कारण आहे. विरुध्द पक्षाने म्हटले की, खरेदीनंतर 7 महिन्यांचे अवधीत वाहनाचे चाकामधे/ टायरमधे प्ले (डग) येऊन टायर घासण्याची व खराब होण्याची शक्यता होती व त्याच कारणाने टायर टयूब खराब झालेले आहेत व त्यामुळे ते बदलवुन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा की, निकामी झालेले बॉल जॉईंट्स बदलवुन दिले होते.
7. विरुध्द पक्षाने म्हटले की, सदर वाहनात एक्सटरर्नल डॅमेज निर्माण झाला होता जो वाहनाचे ओनर्स मॅन्यूअलचे अटींनुसार विनामुल्य दुरुस्तीस पात्र नव्हता तरीसुध्दा तक्रारकर्तीचे वाहन व्यवस्थीतपणे दुरुस्त करुन दिलेले आहे व तिचे पतीस त्याबाबत फोनव्दारे सुचित करण्यांत आले परंतु आजपर्यंत वाहनाची डिलेव्हरी घेण्यांस आलेले नाही. विरुध्द पक्षाने म्हटले की, तक्रारकर्तीने दि.04.10.2010 रोजी पाठविलेल्या नोटीसच्या आधीच वाहनाचे सर्व टायर व टयूब बदलवीलेले आहे, हे दाखल बिलांवरुन स्पष्ट होते. व तिने स्वतःच पुरावा नष्ट केलेला आहे. तक्रारकर्तीची मागणी नाकारुन सदर तक्रार खारिज करण्यांची मागणी केली.
8. विरुध्द पक्षाने आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ वारंटी व अटी शर्ती संबंधी दस्तावेज दाखल केले ते 64 व 65 वर आहे.
9. मंचाने तकारकर्ती व विरुध्द पक्ष क्र.1 चे वकीलांचा युक्तिवाद ऐकला तसेच विरुध्द पक्ष क्र.2 ने वकीलामार्फत उत्तर दाखल करण्यांस वेळ मागितला, मंचाने सदर अर्ज नामंजूर केला. अगोदरच गैरअर्जदार क्र.2 विरुध्द एकतर्फीचा आदेश पारित झालेला आहे. दोन्ही पक्षांनी तक्रारीसोबत दाखल केलेला कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
10. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.2 व्दारे निर्मीत वाहन विरुध्द पक्ष क्र.1 कडून खरेदी केल्यामुळे तो विरुध्द पक्षांचा ग्राहक ठरते, कारण की, तक्रारकर्तीने घेतलेले वाहन हे उदर निर्वाहचे व उत्पन्नाचे एकमेव साधन असल्यामुळे घेतेलेले आहे व विरुध्द पक्षाचे व्यवसायासंबंधीत कथन तथ्यहीन असल्यामुळे नाकारले. तक्रारीचे संपूर्ण अवलोकन केले असता मंचाचे असे लक्षात आले की, तक्रारकर्तीचा वाद हा वाहन खरेदीनंतर वाहनाचे चारही टायर व टयूब हे निम्नस्तराचे असल्यामुळे खराब झाले व ते गॅरंटी वारंटीमधे येऊन सुध्दा बदलवुन दिलेले नाहीत. विरुध्द पक्षाने म्हटले की, टायर व टयूब हे प्रोप्रायटरी कंपोनंन्टस् असल्यामुळे त्याचे वारंटी संबंधीत उत्पादकाव्दारे त्याची पौलिसी नुसार भरपाई करण्यांत येते. पृ क्र. 64 वरील वारंटी लागू न होण्याबाबतच्या बाबी नमुद केल्या आहेत व टायर व टयूब हे प्रोप्रायटरी ऍटम असल्यामुळे ते बदलवुन देण्यांस विरुध्द पक्ष जबाबदार नाही असे म्हटले आहे.
11. सदर तक्रारीतील वाद हा टायर टयूब निम्नदर्जाचे असल्यामुळे लवकर खराब झाले व ते त्यांनी दि.28.08.2010, 24.09.2010 व 02.10.2010 रोजी खरेदी करुन बदलविल्याचे पृ.क्रृ30 व 32 वरील दस्तावेजावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास दि.04.10.2010 ला म्हणजे नवीन टायर व टयूबची खरेदी करुन व जुने टायर बदलवल्यानंतर नोटीस पाठविली आहे. सदर वादग्रस्त टायर व टयूब तसेच त्याबाबतचा अहवाल व तक्रारकर्त्याने वाहनाबाबत इतर केलेल्या आरोपाबाबत मंचासमोर तज्ञांचा अहवाल/ त्रुटी दर्शविणारा दस्तावेज नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावेजावरुन टायर, टयूबमधील व वाहनातील मेकॅनिकल व इंजिनिअरींग बिघाडाची शहानिशा होत नाही. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13 (1) (क) नुसार सदर वाहनाबाबत तज्ञ अहवाल मागविण्याकरता तक्रारकर्त्याने कुठलेही पाऊल उचलले नाही त्यामुळे सदर वाहनातील दोष सिध्द करण्यांस तक्रारकर्ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत, जे योग्य न्याय निवाडयाकरीता आवश्यक होते, असा मंचाचे मत आहे.
12. तक्रारकर्ता वाहनातील दोष वस्तुनिष्ठ पुराव्याव्दारे/ तज्ञअहवालाव्दारे सिध्द करण्यांस अपयशी ठरल्यामुळे सदर तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करीता खालिल प्रमाणे आदेश देण्यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.