(मंचाचा निर्णय : श्रीमती. जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :02/05/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.06.06.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदारांकडून 8 हवाई तिकीटे श्रीनगर ते दिल्ली डी-457 या विमानाकरता दि.13.06.2010 ला एका व्यक्तिसाठी रु.4,971/- याप्रमाणे विमानाचे प्रवास भाडे दिले. श्रीनगर ते दिल्ली प्रवास केला त्यावेळेस तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला श्रीनगर ते एअरपोर्टला 8 बॅग्ज् दिल्या, परंतु दिल्ली एअर पोर्टला 8 पैकी 7 च बॅग्ज् तक्रारकर्त्याला परत मिळाल्या म्हणजेच एक बॅग श्रीनगर ते दिल्ली या प्रवासा दरम्यान चोरीला गेली.
3. तक्रारकर्त्याने लेखी तक्रार गैरअर्जदाराला दिल्लीला दिली, तक्रारकर्त्याच्या मते या चोरी गेलेल्या बॅगमधे साहीत्य व रोख रक्कम होती, त्याचे एकंदरीत मुल्य रु.1,21,500/- इतके होते. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीकडे दुर्लक्ष केले व सामान परत केले नाही किंवा नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई व मानसिक त्रासाकरीता सदरची तक्रार या मंचापुढे दाखल केलेली आहे.
4. तक्रारकर्त्यानी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 6 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
5. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे आक्षेप फेटाळून लावलेत, गैरअर्जदारांच्या मते सदरची तक्रार या ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही, कारण तक्रारकर्त्याचे तक्रारीचे कारण हे दिल्लीमधे घडले. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास बॅगमधील वस्तुंबाबत माहिती दिलेली नव्हती. The carriage by Air Act,1972 (69 of 1972) नुसार एक किलोसाठी रु.200/- प्रमाणे जास्तीत जास्त रु.4,000/- एवढी नुकसान भरपाईची जबाबदारी आहे. तक्रारकर्त्याचे बॅगेचे वजन 6 किलो असल्यामुळे रु.200/- प्रमाणे रु.1,200/- तक्रारकर्त्यास देय होतात. दि.08.07.2010 रोजीचे मेलव्दारे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास ही रक्कम कशाप्रकारे पाठवायची या संदर्भात विचारणा केली होती. परंतु त्याला तक्रारकर्त्याने प्रतिसाद दिला नाही, तसेच महत्वाच्या व किमती वस्तु या केबीन बॅगेत ठेवाव्यात अश्या स्पष्ट सुचना असतांनाही तक्रारकर्त्याने त्या checked bag मधे ठेवल्यात व ठेवल्यानंतर त्याला गैरअर्जदार जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी कुठलीही सेवेतील कमतरता दिली नाही व तक्रार खारिज करण्याची विनंती केलेली आहे.
6. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, संबंधीत सेवेची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.1 ची आहे व गैरअर्जदार क्र.2 हे फक्त गैरअर्जदार क्र.1 चे एजंट आहे. त्यामुळे त्याचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी विनंती केलेली आहे.
7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.09.05.2012 रोजी आली असता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला, तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
8. प्रस्तुत प्रकरणातील सादर केलेले पुरावे व कागदपत्रे यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांचे कंपनीची श्रीनगर ते दिल्ली अशी 8 प्रवाशांची विमानाची तिकीटे प्रत्येकी रु.4,970/- प्रमाणे खरेदी केली होती. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा ‘ग्राहक’, आहे, गैरअर्जदार क्र.1 ने प्राथमिक आक्षेप घेतला होता की, तक्रारीचे कारण हे दिल्ली येथे उद्भवल्यामुळे सदर तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु गैरअर्जदार क्र.1 चा व्यवसाय व कार्यालय नागपूर येथेही असल्यामुळे हा प्राथमीक आक्षेप फेटाळण्यांत येत आहे.
9. तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञापत्र व गैरअर्जदार क्र.1 चा जबाब यावरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याची बॅग ही श्रीनगर ते दिल्ली या प्रवासात हरविली. तशी तक्रार तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दिल्ली येथे दिली. तक्रारकर्त्याचे कथनानुसार हरविलेल्या बॅगमधे हँन्डी कॅमेरा (सोनी), फास्ट ट्रक्ट 4 गॉगल्स, मुलांचे कपडे, शॉल व नगद रक्कम मिळूण एकूण किंमत रु.1.21.500/- आहे.
10. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्यापृष्ठयर्थ दस्तावेज... व सदरच्या वस्तु खरेदी केल्याच्या पावत्या सादर केलेल्या आहेत. यामधे बॅगमधे कोणत्या वस्तु होत्या याची कुठलीही पुर्वसुचना तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 ला आधी दिली नव्हती. त्यामुळे जरी तक्रारकर्त्याने खरेदीच्या पावत्या सादर केलेल्या आहेत, तरी त्या वस्तु हरवलेल्या बॅगेत होत्या असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ही रक्कम या मंचाला मान्य करता येणार नाही. गैरअर्जदारांच्या मते The carriage by Air Act,1972 चे Rule 22 (2) नुसार तक्रारकर्ता हा 6 किलो वजनाला रु.200/- प्रमाणे रु.1,200/- रकमेचा हकदार आहे.
11. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीवरुन न्यायमंच या निष्कर्षाप्रत येते की, निर्वीवादपणे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून तक्रारकर्त्याची बॅग विमान प्रवासात हरवली, ही निश्चितच सेवेतील कमतरता आहे. तेव्हा The carriage Act नुसार रु.1,200/- व नुकसान भरपाई याकरीता गैरअर्जदार क्र.1 जबाबदार राहील.
12. गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 चे एजंट आहेत त्यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नाही, त्यामुळे त्यांना तक्रारकर्त्याच्या नुकसान भरपाईस जबाबदार धरता येणार नाही. वरील निष्कर्षांवरुन सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास रु.1,200/- (The carriage by Air Act,1972 ) द्यावे.
3. गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसान भरपाईपोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द कुठलाही आदेश नाही.
5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.