(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :09/08/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 15.11.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. यातील तक्रारकर्ते सुधीरकुमार जैन यांची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडूनकार घेण्याकरता कर्जाऊ रक्कम घेतली होती आणि ती दि.01.10.2009 रोजी पुर्णतः फेडली असुन त्याबाबत गैरअर्जदारांनी याबाबत प्रमाणपत्र दिलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने मुदती आधीच रकमेची परतफेड केल्याबद्दल प्रशंशा करणारे पत्रही दिलेले आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने आपल्या व्यवहारासंबंधी कर्जाची मागणी राष्ट्रीयकृत बँकेकडे केली, बँकेने तत्वतः कर्ज मंजूर केले. परंतु त्यांनी प्रतिवादी क्र.3 कडे चौकशी केली असता त्यांनी तक्रारकर्ते हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चे कर्जदार असल्याचे कळविले. त्यामुळे बँकेने कर्ज दिले नाही, त्यामुळे त्यांचे मानहानी व नुकसान झाले, याकरीता त्यांनी संबंधीतांना नोटीस पाठविली. गैरअर्जदार क्र.1 उत्तर दिले नाही, गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी कलुषीत भावनेने उत्तर दिले. शेवटी तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन गैरअर्जदारांनी आपले रेकॉर्डमधे सुधारणा करावी व तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रास व व्यापारात झालेल्या आर्थीक हानीचे पुर्ततेकरीता रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत. 3. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मंचात हजर होऊन आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. तक्रारकर्त्याने कर्जाची परतफेड केल्याची बाब मान्य केली व या संबंधीची सुचना इलेक्ट्रॉनीक पध्दतीने गैरअर्जदार क्र.3 कडे पाठविली होती, त्यामुळे त्यांना दोषी धरण्यांत येऊ नये असा उजर घेतला आहे. 4. गैरअर्जदार क्र.3 ने आपला जबाब दाखल करुन सर्व विपरीत विधाने नाकबुल केली, तक्रारकर्ते हे त्यांचे ‘ग्राहक’ नाहीत आणि जी माहीती बँकेतर्फे त्यांना मिळते त्याचा ते नोंद घेतात, यासाठी ते जबाबदार नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करावी असा उजर त्यांनी घेतलेला आहे. 5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 7 नोंदणी प्रमाणपत्र, आर.टी.ओ. चे प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, गैरअर्जदारांचे द. 05.10.2009 रोजीचे पत्र, गैरअर्जदारांना पाठविलेली नोटीस, नोटीसचे उत्तर इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.26.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 व 2 चे वकील हजर, मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदार क्र.3 गैरहजर त्यांचेतर्फे कोणीही युक्तिवाद केलेला नाही. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने कर्जाची परतफेड दि.01.12009 रोजी केल्याची बाब गैरअर्जदार क्र.1 व 2 ने मान्य केलेली आहे व ही बाब तक्रारकर्त्याने केलेल्या दस्तावेज क्र.3 व 4 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 ची जबाबदारी होती की, त्याने या संबंधीची सुचना गैरअर्जदार क्र.3 ला द्यावी. गैरअर्जदार क्र.1 व 2 चे असेही म्हणणे आहे की, त्यांनी इलेक्ट्रानिक सिस्टीमव्दारे गैरअर्जदार क्र.3 ला माहिती दिली. मात्र याबाबतचा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही व सदर बाब योग्य पुराव्याव्दारा सिध्द केलेली नाही. कारण अशी सुचना दिली असती तर गैरअर्जदार क्र.3 च्या रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असती, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपल्या सेवेत त्रुटी ठेवली ही बाब अत्यंत स्पष्ट आहे. 8. तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे आणि गैरअर्जदार क्र.3 हे त्यांच्याशी संलग्न आहे. या व्यवहारात गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांचेमधील जो काही आर्थीक व्यवहार मोबदल्यासंबंधी होता तो तक्रारकर्त्यासारख्या असंख्य ग्राहकांकडून घेतलेल्या मोबदल्याचे आधारावरच होता. त्यामुळे तक्रारकर्ता सुध्दा गैरअर्जदार क्र.3 चा ‘ग्राहक’ ठरतो, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.3 ला तक्रार दाखल करण्यापूर्वी दि.23.01.2010 रोजी नोटीस पाठविली होती ती गैरअर्जदार क्र.3 ला मिळाली व त्यांनी त्याचे उत्तर दि.08.03.2010 रोजी देण्यांत आले. गैरअर्जदार क्र.3 ने त्यानंतर या नोटीसच्या आधारे कोणती कारवाई केली याबाबतची कोणतीही माहिती मंचास कळविलेली नाही. अथवा त्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 शी काय संपर्क केला व तक्रारकर्त्याचे नाव कर्जदारांचे यादीतुन केव्हा वगळले यासंबंधीची कोणतीही सुचना वा माहिती मंचास दिलेली नाही. आणि यामध्ये हीच गैअर्जदारांचे सेवेतील त्रुटी आहे. कारण कर्जदारांचे यादीत त्वरीत दुरुस्ती होणे व कर्जफेड करणा-यांची नावे त्यातुन वगळल्या जाणे याबाबतची संपूर्ण कारवाई काळजीपूर्वक हाताळणे ही जबाबदारी गैरअर्जदार क्र.3 ची असुन ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. 9. तक्रारकर्त्याने मानसिक, शारीरिक, आर्थीक व व्यावसायीक नुकसानीसाठी रु.5,00,000/- चे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. सदर मागणी ग्राहक संरक्षण कायद्यात करता येणे शक्य नाही, त्यामुळे ती विचारात घेण्यांत येत नाही. 10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. सर्व गैरअर्जदारांनी मिळून एकत्रीतरित्या किंवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला रु.10,000/- एवढी नुकसान भरपाई मानसिक, शारीरिक त्रासापोटी द्यावी. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावी. 3. सर्व गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 1 महीन्याचे आंत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |