-आदेश-
(पारित दिनांक - 09 मे, 2012)
1 तक्रारकर्ते हजर, त्यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 ला उत्तर दाखल करण्याकरीता संधी देऊनही उत्तर दाखल केले नाही, म्हणून विना लेखी जवाब कारवाईचा आदेश करण्यात आला. गैरअर्जदार क्र. 2 व 3 नोटीस प्राप्त होऊनही मंचामध्ये उपस्थित न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
2. सदर तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी दिल्ली ते नागपूर घरसामान आणण्याकरीता गैरअर्जदारांची सेवा रु.75,000/- मोबदल्यात घेतली होती. सदर मोबदल्यात गैरअर्जदार कारसह सर्व सामान स्थानांतरीत करणे, सामान चढविणे व उतरविणे समाविष्ट होते. गैरअर्जदाराने सामान चांगल्या स्थितीत दि. 26 मे 2011 पर्यंत पोहोचविल्या जाईल असे सांगितले होते. तसेच गैरअर्जदाराने सामानाचे जोखिमेचा करारनामा दर्शविला. तक्रारकर्त्याने रु.52,500/- गैरअर्जदारास दिली व उर्वरित रक्कम दि.22,500/- नागपूर येथे सामान उतरविल्यानंतर द्यावयाचे असे ठरले होते. सामान हे नागपूर येथे 28 मे 2011 ला पोहोचले. नागपूर येथे सामान पोहोचविल्यानंतर गैरअर्जदारांनी सामान काढण्यापूर्वीच रकमेची मागणी केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सामान नागपूर येथे पोहोचविल्यानंतर रक्कम मिळाल्यावरच ते सामान उतरवतील. याबाबत गैरअर्जदारांनी एका पावतीचा आधार घेतला, ज्यावर हाताने वरच्या बाजूस ’डिलिव्हरीच्या वेळेस रक्कम दिल्या जाईल’ असे लिहिले होते. ही पावती रात्री 12-00 वा. सामान भरल्यावर देण्यात आली होती. तक्रारकर्त्याचे निदर्शनास त्यावेळेस ही बाब आली नाही किंवा गैरअर्जदारांनी आधी बोलतांना असे सांगितले नव्हते. जेव्हा सामान गैरअर्जदारांनी सामान तक्रारकर्त्याला दिले नाही, तेव्हा तक्रारकर्त्यांनी ही रक्कम दिली, त्यानंतरच सामान उतरविले त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला.
3. तक्रारकर्त्याला जेव्हा सामान हस्तांतरीत करण्यात आले, तेव्हा गॅस स्टोव्ह नव्हता, फ्रीज डॅमेज झालेहोते, बेड तुटला होता, मंदिराचा काच, पेंटीस, साईड टेबल्स, डायनिंग टॉप, प्लास्टीक चेअर, दोन डेकोरेशन पीस स्टँड फुटलेले होते, लाकडी सामानाचे पॉलीश निघाले होते. अशी सामानाची तोडफोड व नुकसान झाले होते. तक्रारकर्त्यांनी याबाबत गैरअर्जदारांना कळविले असता व नूकसानाची मागणी केली असता गैरअर्जदारांनी त्यांना सदर रक्कम विमा कंपनी देईल व नंतर त्यांचा व्यक्ती घरी येईल असे सांगितले. परंतू असे काहीही झाले नाही व तक्रारकर्त्याच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल करुन, मालाच्या नुकसानाबाबत रु.28,200/- विमा दाव्याबाबत मिळावे, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केल्या.
4. गैरअर्जदार गैरहजर असल्याने व उत्तर दाखल केले नसल्याने, तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज व प्रतिज्ञालेख खोडून काढण्यास ते असमर्थ ठरले. तक्रारकर्त्यांनी आपली तक्रार दस्तऐवजाव्दारे व प्रतिज्ञालेखाव्दारे सिध्द केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रुरु.25,000/- माला संबंधीचे नुकसान भरपाईदाखल द्यावी.
3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासादाखल क्षतिपूर्तीबाबत रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्यथा गैरअर्जदार तक्रारकर्त्याला रु.50/- प्रतिदिनाप्रमाणे नुकसान देणे लागतील.