द्वारा - श्री.स.म.रत्नाकर : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हिने सामनेवाला 1 कडून दि.23/03/2012 ला रु.610/- देवून निर्लेप कंपनीचा नवीन कोटींगवाला झाकणासह फ्रायपॅन सेट खरेदी केला. सामनेवाला 1 यांनी त्याची पावती तक्रारदार यांना दिली तसेच 18 महिन्याचे गॅरंटी कार्ड तक्रारदार यांना दिले. पावती व गॅरंटी कार्डची प्रत निशाणी 1 व 2 ला दाखल आहे. तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, सामनेवाला 1 जो सामनेवाला 2 व 3 चा डिलर आहे व त्याच्याकडून विकत घेतलेला फ्रायपॅन 6 महिन्यातच खराब झाला व फ्रायपॅनमधील कोटींग पूर्णपणे खराब झाली. तक्रारदार यांनी सामनेवाला 1 यांच्याकडे सदर डिफेक्टीव्ह फ्रायपॅन झाकणासह बदली करण्यासाठी व त्याऐवजी नवीन मिळण्यासाठी दिनांक 24/09/2012 रोजी सामनेवाला 1 यांच्याकडे कागदपत्रांच्या प्रतींसहीत जमा केले व त्याबाबतची पोहोच निशाणी क्र.3 ला सामनेवाला 1 यांचेकडून घेतली. तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला 1 यांच्याकडे अनेक चकरा मारुन सुध्दा नवीन फ्रायपॅनसेट दि.03/11/2012 पर्यंत दिला नाही व तक्रारदार यांना अपमानास्पद वागणूक दिली व तक्रारदार यांना हाकलून दिले. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दि.03/11/2012 रोजी सामनेवाला 2 यांच्याकडे दूरध्वनीवरुन तक्रार केली तसेच सामनेवाला 3 यांच्याकडे सुध्दा तक्रार केली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार दूर करण्यामध्ये निष्काळजीपणा दर्शविला व कंपनीकडून दयावयाच्या सेवेत कसूर केली. तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार यांनी दि.13/12/2012 रोजी सामनेवाला 3 यांचेकडे दि.14/12/2012 रोजी सामनेवाला 1 व 2 यांना अनुक्रमे कुरिअर व रजिस्टर पत्राद्वारे तक्रार केली. त्याच्या प्रती निशाणी 4 ते 6 दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, दि.14/12/2012 रोजी सामनेवाला 2 यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर सामनेवाला 3 यांनी दि.25/12/2012 व 05/01/2013 रोजी दिले. त्याच्या प्रती निशाणी 7 व 8 ला दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीचा त्यांनी पाठविलेल्या उत्तरात खुलासा न देता खोटी विगती पूर्तता करुन उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रादार यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, सामनेवाला 2 व 3 यांनी दि.26/12/2012 रोजी त्यांचा प्रतिनिधी तक्रारदाराच्या घरी पाठविला व त्याने को-या कागदावर सही मागितली व नवीन भांडे न देता तक्रारदाराचा छळ केला. तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, सामनेवाला 1 यांनी तक्रार दाखल केल्यानंतर डिफेक्टीव्ह फ्रायपॅन त्यांच्याकडे ठेवून घेतला व त्याबदल्यात नवीन फ्रायपॅन दिला नाही. तक्रारदार यांनी त्यानंतर अनेकवेळा पत्रव्यवहार करुन सुध्दा सामनेवाला 1 ते 3 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत कसूर केला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून कोटींगवाला निर्लेप कंपनीचा नवीन फ्रायपॅन बदलून देण्याची व त्या तारखेपासून 18 महिन्याची गॅरंटी देण्याची विनंती केली. तक्रारदार यांनी फ्रायपॅनच्या रकमेवर 12.50 टक्क्याप्रमाणे व्याज व नुकसानभरपाईपोटी रु.30,000/- व तक्रारअर्ज दाखल करण्याच्या खर्चापोटी रु.10,000/- देण्याची विनंती केली आहे.
2) सामनेवाला 1 यांनी कैफीतय दाखल केली व त्यामध्ये तक्रारदार यांनी त्यांच्या दुकानातून निर्लेप कंपनीचा फ्रायपॅन विकत घेतला व त्याचे कोटींग निघाल्याचे मान्य केले आहे. परंतु तो फ्रायपॅन गॅरंटी पिरिएडमध्ये असल्यामुळे तक्रारदार यांना फ्रायपॅन बदली करुन देवू असे सांगितल्याचे त्यांच्या कैफीयतीत नमूद केले आहे. सामनेवाला 1 यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, तक्रारदार यांचा फ्रायपॅन बदली करुन मिळाल्यानंतर सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांना फोन करुन त्याबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले होते. सामनेवाला 1 यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, तक्रारदार यांचा फ्रायपॅन बदली करुन आल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना फोन करुन कळविले त्यावेळी तक्रारदार यांनी गॅरंटी कार्ड घेवून न येता फ्रायपॅनची मागणी केली. सामनेवाला 1 यांनी सदर कार्ड आणा व नवीन फ्रायपॅन घेवून जा असे सांगितले असता तक्रारदार हया सामनेवाला 1 यांना उलटसुलट बोलल्या. सामनेवाला 1 यांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदाराचे घर सामनेवाला 1 यांच्या दुकानापासून 7 मिनिटांच्या अंतरावर आहे. सामनेवाला 1 यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार यांनी रु.30,000/- ची केलेली मागणी त्यांना मान्य नाही. सामनेवाला 1 चे म्हणणे असे आहे की, सामनेवाला 2 व 3 चे स्थानिक सेल्समन तक्रारदार यांच्याकडे फ्रायपॅन घेवून गेले असता त्यांनी दरवाजाच उघडला नाही. सबब सामनेवाला 2 व 3 चे सेल्समन यांनी सदरचा फ्रायपॅन परत सामनेवाला 1 च्या दुकानात आणून दिला. सामनेवाला 1 चे म्हणणे असे आहे की, तक्रारदार यांना दिलेल्या सेवेत त्यांचा कोणताही दोष नाही.
3) सामनेवाला 2 व 3 यांनी त्यांची स्वतंत्र कैफीयत दाखल करुन तक्रारदार यांनी केलेला दावा त्यांना अमान्य असल्याचे नमूद केले आहे. सामनेवाला 2 व 3 यांनी तक्रारदार यांनी पाठविलेल्या पत्रांना वेळोवेळी उत्तर दिल्याचे नमूद केले आहे त्याच्या प्रती कैफीयतीसोबत दाखल केल्याचे म्हटले आहे. सामनेवाला 2 व 3 यांनी त्यांच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार यांना सदरील भांडे बदलून देण्याची तयारी दाखविली होती व तक्रारदारास नियमीत सेवा देण्याचा प्रयत्न केला व त्यास त्रास होईल असे वर्तन केले नाही असे म्हटले आहे. सामनेवाला चे प्रतिनिधी हनुमंत यादव व कमल बक्षी हे तक्रारदार यांच्या घरी दि.26/12/2012 रोजी भांडे बदलून देण्याकरीता व नवीन 18 महिन्यांची गॅरंटी देण्यास कंपनी तयार असल्याचे सांगणेसाठी गेले असता, तक्रारदार यांनी सदर प्रतिनिधी यांच्याकडून नवीन बदलून दिलेले भांडे घेण्यास नकार दिला व सामनेवालाचे प्रतिनिधी यांच्याशी बोलण्यासही त्या तयार नव्हत्या असे त्यांच्या कैफीयतीमध्ये नमूद केले आहे. सामनेवाला 2 व 3 यांनी तक्रारदार यांनी मागितलेली नुकसानभरपाईची रक्कम रु.30,000/- त्यांना अमान्य असल्याचे म्हटले आहे. सामनेवाला 2 व 3 यांनी तक्रारदार यांना ते आजही नवीन भांडे बदली करुन देण्यास तयार असल्याचे त्यांच्या कैफीयतीत नमूद केले आहे व तक्रारदार यांना सदर भांडे घेण्यास या मंचाने सांगावे असे म्हटले आहे.
4) तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाला 1 ते 3 यांनी त्यांना कैफीयतीशिवाय व दाखल केलेल्या कागदपत्रांशिवाय वेगळा पुरावा दाखल करावयाचा नाही व लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही अशी लेखी पुरशीस दाखल केली. तक्रारदार यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदार, सामनेवाला 1 चे प्रतिनिधी श्री.नयन हारिया व सामनेवाला 2 व 3 चे प्रतिनिधी श्री.किरण जोशी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या प्रतींचे अवलोकन केले.
5) तक्रारदार यांनी तक्रारअर्जात केलेल्या दाव्याबाबत व मागितलेल्या दादीबाबत विचार करता तक्रारअर्जातील दाखल कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांना त्यांच्याकडून कोटींग खराब झालेला निर्लेप तवा दि.24/09/2012 रोजी प्राप्त झाला त्यावेळी त्यांना निर्लेप तवा बदलून मिळाल्यानंतर तक्रारदार यांना फोन करण्याबाबत मान्य केले होते असे दिसते व त्याप्रमाणे सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांना फोन केल्याचे दिसते. तक्रारदार यांनी त्यावेळी सामनेवाला 1 यांचेकडे गॅरंटी कार्ड घेवून न जाता फ्रायपॅनची मागणी केली व त्यावेळी सामनेवाला 1 यांनी सदर कार्ड घेवून या नवीन फ्रायपॅन घेवून जा असे सांगितले सामनेवाला 1 च्या कैफीयतीवरुन दिसते. तक्रारदार यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसते की, त्यांनी सामनेवाला 1 ते 3 यांच्याकडे त्यानंतर लेखी तक्रार दि.14/12/2012 रोजी पोस्टाद्वारे व कुरिअरद्वारे केली. सामनेवाला 3 यांनी सदर तक्रारीला दि.25/12/2012 रोजी उत्तर पाठविले व सदर उत्तराद्वारे सामनेवाला 3 चे प्रतिनिधी कमल बक्षी यांच्याकडे नवीन फ्रायपॅन घेवून येतील असे कळविले. सदरचे पत्र तक्रारदार यांनी नि.7 ला दाखल केले आहे. तसेच सामनेवाला 3 यांनी त्यानंतर दि.05/01/2013 रोजी तक्रारदार यांना त्यांचे प्रतिनिधी कमल बक्षी दि.26/12/2012 रोजी सदर नवीन फ्रायपॅन देण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता तक्रारदार यांनी त्यांच्याशी बोलण्याचे नाकारले व अपशब्द वापरल्याचे तक्रारदार यांना लेखी पत्राने कळविले आहे. तसेच तक्रारदार यांना पुन्हा नवीन फ्रायपॅन माटूंगा, मुंबई येथील त्यांच्या दुकानातून घेवून जाण्याची विनंती केल्याचेही त्या पत्रात नमूद केले आहे. तक्रारदार यांनी त्यानंतर रु.30,000/- नुकसानभरपाई मागणी दिनांक 11/01/2013 च्या पत्राद्वारे सामनेवाला 1 ते 3 यांना केल्याचे दिसते. तसेच सदरची मागणी मुंबई ग्राहक पंचायत, गिरगांव यांच्यामार्फतही केल्याचे दिसते. त्या पत्रांना सामनेवाला 2 व 3 यांनी दि.16/01/2013 रोजी व दि.23/01/2013 रोजी उत्तर पाठविल्याचे दिसते. त्या पत्रांच्या प्रती तक्रारदार यांनी दाखल केल्या आहेत. सामनेवाला 2 व 3 यांनी तक्रारदार यांचेशी केलेल्या वरील पत्रव्यवहारावरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांच्या तक्रारीची सामनेवाला 2 व 3 यांनी ताबडतोड दखल घेतली व तक्रारदार यांना खराब झालेला निर्लेप फ्रायपॅन सेट ताबडतोब बदलून देण्यासाठी प्रयत्न केले. सामनेवाला 1 च्या म्हणण्यानुसार त्यांनी सुध्दा तक्रारदार यांना ताबडतोब निर्लेप फ्रायपॅन बदलून आल्यानंतर फोनवरुन कळविले होते व गॅरंटी कार्ड आणण्यास सांगितले होते व नवीन भांडे घेवून जाण्यास विनंती केली होती. सदर पत्रव्यवहारावरुन असे दिसते की, सामनेवाला 1 ते 3 यांनी सामनेवाला 1 यांच्याकडून घेतेलेल्या निर्लेप फ्रायपॅनबद्दल तक्रारदार यांनी लेखी तक्रार केल्याबरोबर त्वरित दखल घेतली व नवीन फ्रायपॅन बदलून देण्याची तयारी दर्शविली व तक्रार मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत सामनेवाला 2 व 3 चे प्रतिनिधी कमल बक्षी यांना तक्रारदार यांच्या घरी पाठवून नवीन फ्रायपॅन व गॅरंटी कार्ड स्विकारण्याची विनंती केली. सामनेवाला 2 व 3 यांनी त्यानंतर पाठविलेल्या पत्रांमध्ये ग्राहक पंचायत गिरगांव व तक्रारदार यांना सुध्दा सदर गोष्टीचा खुलासा केलेला आहे व तक्रारदार यांनी केलेली रु.30,000/- ची मागणी अवास्वत व चुकीचे असल्याचे कळविले आहे. सामनेवाला 2 व 3 यांनी दि.16/01/2013 रोजी व दि.21/01/2013 रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये तक्रादार यांना नवीन भांडे देण्याची तयारी दर्शवून प्रयत्न केल्याचे दिसते त्यामुळे सामनेवाला 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना त्यांनी घेतलेल्या फ्रायपॅनबाबत सेवा देण्यामध्ये कोणत्याही प्रकारे कसूर केली नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला 1 ते 3 यांनी तक्रारदार यांची तक्रार योग्य प्रकारे दूर करण्याचा जो प्रयत्न केला तो तक्रारदार यांनी स्वतःच धूडकावून लावला व सामनेवाला यांना विनाकारण या तक्रारीमध्ये गोवल्याचे दिसून येत आहे. तक्रारदार यांना कायदयाचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी सामनेवाला यांच्याविरुध्द विनाकारण तक्रार दाखल केल्याबद्दल ग्राहक तक्रार निवारण कायदा कलम 26 अनुसार सामनेवाला 1 ते 3 यांना खर्च देण्याचा आदेश करणे ऐवजी उभयपक्षकारांनी आपापला खर्च सोसावा व तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रारअर्ज विनाखर्च नामंजूर करावा असे या मंचाचे मत आहे. सबब खालील आदेश पारित करण्यात येत आहे –
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 34/2014 विनाखर्च नामंजूर करणेत येतो.
2. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.