निकालपत्र :- (दि.15-09-2015) (द्वारा - श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
(2) प्रस्तुतचे मुळ तक्रार अर्ज या मंचाने दि. 16-07-2010 रोजी निर्णित केले होते. त्यावर यातील वि.प.नं. 1 कृषीधन सीडस लि, जालनायांनी नाराज होवून मे. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडे फर्स्ट अपिल नं. A/877/10 दाखल केले होते. सदर अपिलाचा निर्णय दि. 23-08-2011 रोजी झाला असून प्रस्तुत तक्रार अर्ज पुन्हा मंचाकडे फेरसुनावणीसाठी पाठविणेत आला. दोन्ही बाजूंना संधी देण्यात आली. उभय पक्षकारांचे युक्तीवाद ऐकणेत आले.
(3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
तक्रारदार हे शेतकरी असून कोल्हापूर जिल्हयातील रहिवाशी आहेत. वि.प. क्र.1 ही बियाणे उत्पादक कंपनी आहे. वि.प. क्र.2 हे वि.प. क्र.1 चे विक्रेते आहेत. वि.प. कंपनीने उत्पादित केलेले सुदामा (लॉट दु DRF 200507) या जातीचे 9 किलो ज्वारी बियाणे दि.16-12-2008 रोजी वि.प. क्र.2 यांचेकडून खरेदी केले. सदर ज्वारी बियाणे दोन एकर शेतात दि.20.12.2008 रोजी पेरणी केल्यानंतर सदर बियाणांची उगवण न झाल्याने दि.15-01-2009 रोजी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार केली; सदर समितीने दि.06-02-2009 रोजी तक्रारदारांच्या बोरबटे गावातील गट नं.366 येथून पाहणी केली. त्यावेळेस वि.प. क्र.1 चे मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह श्री. देशमुख उपस्थित होते, वि.प. क्र.2 यांना कळवूनही ते उपस्थित राहिले नाहीत. सदर ज्वारी बियाणे सुदामा 333 लॉट दु DRF 200507 या निष्कृष्ट बियाणामुळे उगवण समाधानकारक नसल्याचा निष्कर्ष जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती काढला आहे. निकृष्ट प्रतीच्या बियाणांमुळे 2 एकर शेतीच्या औताकरीता रक्कम रुपये 2,000/-, लागवडीकरीता रुपये 2,500/-, मशागत व टोकण करणेकरिता रुपये 700/-, खत व औषधे इतकी रक्कम खर्च करावी लागली, तसेच, शेत जमिनीतून मिळणारे उत्पादन अंदाजे रक्कम रुपये 52,500/- इतके आर्थिक नुकसान झाले आहे. त्याकरिता तक्रारदारांनी वकिलांमार्फत नुकसान भरपाईची मागणी केली. सदर मागणीला वि.प. यांनी उत्तर दिले. सबब, तक्रारदार यांना वि.प. कडून नुकसान भरपाई रुपये 52,500/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेचे आदेश व्हावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(4) तक्रारदारांनी तक्रारीसोबत बियाणे खरेदी पावती, बियाणे निकृष्ट असलेबाबतची तक्रार, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल, वि.प. यांना वकिलांमार्फत पाठविलेली नोटीस इत्यादीच्या छायाप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) वि.प. क्र.1 कंपनीने तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि.प. नं. 1 म्हणण्यात पुढे कथन करतात, तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद हा सुदामा ज्वारी बियाणे लॉट क्र. DRF 200507 या संदर्भातील आहे. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने प्रस्तुत वि.प. यांना संधी दिलेली नाही. वि.प. क्र.1 उत्पादकांनी निर्मित केलेली व वि.प. क्र. 2 यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेले सुदामा ज्वारी बियाणांचा लॉट क्र.DFR 200507 असा आहे. बीज परिक्षण प्रयोगशाळेतील अहवालानुसार उगवणशक्तीचे प्रमाण 81 % इतकी आहे. लॉटबाबत जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने कोणत्याही प्रकारे चौकशी केलेली नाही. या कामी कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी दि.23-01-2009 रोजी शेतक-यांच्या शेताची पाहणी केली असता 30 % उगवणीबाबतचा अहवाल दिलेला आहे. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल हा मा. कृषि संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार व परिपत्रकातील नमूद केलेल्या सुचनेप्रमाणे केलेले नाही. तसेच, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 (1)(सी) नुसार बियाणांचा नमुना प्रयोगशाळेत पाठविणे तक्रारदार यांचेवर बंधनकारक होते. तसेच, बियाणांची उगवण क्षमता ही बियाणांच्या इतर घटकांमुळेही असू शकते. त्यामध्ये पाणी, हवा, रासायनिक खते इत्यादी. या घटकांचा व कारणांचा विचार करुन तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व वि. प. यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 5,000/- देणेचा आदेश व्हावेत अशी विनंती वि.प. नं. 1 यांनी केली आहे.
(6) वि.प. यांनी त्यांचे म्हणणेसोबत उगवणशक्ती अहवाल, बियाणे प्रक्रिया अहवालाच्या रजिस्टर, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेले प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याच्या कृषि विभागाने जारी केलेले परिपत्रक इत्यादीच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
(7) तक्रारदारांची तक्रार, वि.प. यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे, शपथपत्र व दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद इत्यादीचे अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे मुद्दे निष्कर्षाकरिता येतात :-
मुद्दे उत्तरे
1. वि.प. कंपनीने उत्पादित केलेले बियाणे
सदोष आहेत काय ? तक्रारदारांना द्यावयाचे
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे वि.प. कडून नुकसान भरपाई
मिळणेस पात्र आहेत काय? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्र.1 :-
तक्रारदाराने वि.प. क्र.1 कंपनीने उत्पादित केलेले सुदामा या जातीचे 9 किलो ज्वारी बियाणे दि.16-12-2008 रोजी वि.प. क्र.2 यांचेकडून खरेदी केले. प्रस्तुत कामी तक्रारदाराने अ.क्र. 1 कडे सुदामा ज्वारी 333 या जातीचे बियाणे खरेदी केलेचे बील दाखल केले आहे. तक्रारदाराने सदर सुदामा ज्वारी 333 या बियाणाची दोन एकर शेतात दि.20-12-2008 रोजी पेरणी केली. सदरचे बियाणाची पेरणी केलेनंतर बियाणांची उगवण न झाल्यामुळे दि.15-01-2009 रोजी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केली. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती यांनी दि. 06-02-2009 रोजी तक्रारदारांच्या शेताची पाहणी करुन प्रस्तुत कामी अहवाल सादर केलेला आहे. सदर पाहणीच्या वेळेस वि.प. क्र.1 चे मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह श्री. देशमुख हे उपस्थित होते, वि.प. क्र.2 यांना कळवून देखील त्यांचेतर्फे कोणीही उपस्थित राहिले नाहीत. प्रस्तुत कामी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेल्या अहवालाची प्रत प्रस्तुत कामी अ. क्र. 3 कडे दाखल केलेली आहे. सदर समितीने दाखल केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता सदर समिती यांनी निष्कर्ष काढले आहेत. सदरचे निष्कर्ष ‘कृषिधन सिडस् प्रा.लि. उत्पादित ज्वारी बियाणे सुदामा-333 (लॉट क्र. DRF 200507) या निकृष्ट प्रतीच्या बियाणांमुळेच उगवण समाधानकारक नसलेचे निदर्शनास आले’ असे निष्कर्ष समितीव्दारे काढणेत आलेले आहेत. सदरचे अहवालाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराने सुदामा ज्वारी या बियाणाची लागवड केले होते ते समाधानकारक बियाणाची उगवण झालेली नव्हती असे समितीचे अहवाल आहे. प्रस्तुत कामी वि.प. कंपनीने उत्पादनावर उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे विविध घटकांवर उगवण अवलंबून असते असे नमूद केले आहे, वि.प. यांनी कथनाशिवाय दुसरा कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. वि.प. यांना संधी असूनही त्यांनी पुरावा दाखल केलेला नाही. प्रस्तुत कामी सदरचा अहवाल निर्णायक पुरावा असून वाचणेत यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेला अहवालाचा विचार करता व वरील सर्व बाबीचा विचार करता वि.प. कंपनीने उत्पादित केलेली सुदामा ज्वारीचे बियाणे सदोष आहेत असे या मंचाचे मत आहे. वि.प. कंपनी यांनी तक्रारदारांना सुदामा ज्वारीचे बियाणे सदोष देऊन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 :-
वर नमूद मुद्दा क्र. 1 मधील विवेचनाचा विचार करता वि.प. कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला तसेच निकृष्ट प्रतीच्या बियाणांमुळे 2 एकर शेतीच्या औताकरीता रक्कम रुपये 2,000/-, लागवडीकरीता रुपये 2,500/-, मशागत व टोकण करणेकरिता रुपये 700/-, खत व औषधे इतक्या रक्कमा खर्च कराव्या लागलेल्या आहेत. व सदोष निकृष्ट प्रतीचे बियाणांमुळे कमी उगवण झालेमुळे तक्रारदारांना शेत जमिनीतून मिळणारे उत्पादन अंदाजे रक्कम रुपये 52,500/- इतके आर्थिक नुकसान झाले आहे अशी तक्रारदारांनी तक्रारीत नुकसानीची मागणी केलेली आहे. वरील तक्रारदारांनी केलेला खर्च व शेती जमिनीतून मिळणारे उत्पन्न याचा विचार करता तक्रारदार हे नुकसानभरपाईपोटी रक्कम रु. 45,000/- व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दिनांक 18-08-2009 पासून द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याजासह द्यावेत तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 2,000/- मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र. 3 :- वरील सर्व मुद्दांचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. कंपनीने तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 45,000/-(अक्षरी रुपये पंचेचाळीस हजार फक्त) द्यावी. व सदर रक्कमेवर दि. 18-08-2009 रोजीपासून द.सा.द.शे. 9% प्रमाणे व्याजासह अदा करावेत.
3. वि.प. कंपनीने तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) द्यावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून आदेशाची पुर्तता 30 दिवसांत करावी.
5. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविणेत याव्यात.