निकाल
दिनांक- 02.01.2014
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार मंगल बारीकराव पिंपळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदाराचे पती नामे बारीकराव रामभाऊ पिंपळे हे मौजे पालसिंगन ता.बीड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे गट नं.333 मध्ये 0.55 आर शेतजमिन असून ते शेतीचा व्यवसाय करत होते. तक्रारदाराचे पती दि.04.08.2012 रोजी अँपे रिक्षा मध्ये बसून जात असताना 11.30 ते 12.00 वाजेच्या सुमारास बीड कडून जाणारा ट्रक नं.एम.एच.-12-डीजी-8706 चे चालकाने ट्रक हायगईने व निष्काळजीपणे चालवून अँपे रिक्षाला समोरुन धक दिली व तक्रारदाराचे पती बारीकराव यांचे डोक्यास जबर मार लागून ते मयत झाले.. त्याबाबत दि.04.08.2012 रोजी कलम 279,331,338,304 (अ) भा.दं.वि नुसार आप्पासाहेब पिंपळे यांनी पोलिस स्टेशन येरमाळा जि.उस्मानाबाद येथे फिर्याद दिली. ज्यांचा गुन्हा रंजि.नं.109 आहे. त्याबाबत घटनास्थळ पंचनामा,मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन अहवाल तक्रारीसोबत दाखल केले आहे.
तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर समानेवाला क.1 कडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी दि.09.10.2012 रोजी सर्व कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावाबाबत सामनेवाला क्र.2 ते 4 यांना माहीती कळविली नसल्याने तक्रारदाराने दि.1.1.02.2013 रोजी वकिलामार्फत रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठविली असता सामनेवाले क्र.2 यांनी दि.27.02.2013 रोजीचे पत्रानुसार कळविले की, मुदती नंतर प्रस्ताव दाखल म्हणून प्रस्ताव सामनेवाले क्र.1 कडे परत केला आहे. प्रस्तावाची सर्व कागदपत्रे सामनेवाले क्र.1 ते 3 च्या ताब्यात आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजूर केला नाही म्हणून सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची विनंती की, तक्रारदारास व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सव्याज, अर्जाचा खर्च, मानसिक व शारीरिक त्रास इत्यादीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र.1 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सदर प्रस्तावामध्ये कागदपत्राची पुनश्च प्रस्ताव सादर करा असे कळविले होते. त्यानुसार त्यांनी दि.03.10.2013 रोजी हमी पत्र सादर केले. मुळ प्रतीच्या छायांकित प्रतीवर सत्यप्रति करुन सादर करणेस नंतरचे आठ ते दहा दिवस घातले. तक्रारदार यांनी सदरचा प्रस्ताव मुदतीनंतर दाखल केला आहे. तक्रारदाराच्या चुकीमुळे या कार्यालयास दोषी धरण्यात येऊ नये. त्यांचे सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची त्रूटी नाही.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. मयताचा प्रस्ताव दि.4.8.2012 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचेकडे दि.27..12.2012 रोजी सादर केला. सदर प्रस्ताव हा दाखल करण्याची अंतीम दि.14.11.2012 अशी होती. मुदतीनंतर प्रस्ताव कंपनी स्विकारत नसल्याने हा प्रस्ताव परत करण्यात येत आहे असे त्यांना कळविले आहे.त्यानुसार त्यांनी दि.31.12.2012 रोजी मंडळ कृषी अधिकारी चौसाळा यांना प्रस्ताव परत केला आहे. विलंबासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.शेतकरी जनता अपघात विमा योजना सन 2011-12 मध्ये लागू करण्यात आली आहे. मयताचा प्रस्ताव या कार्यालयास तालुका कृषी अधिकारी बीड यांचेकडून दि.27..12.2012 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्ताव हा सन 2011-12 या वर्षातील असल्याने सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतीम दि.14.11.2012 हा असल्याने तसेच या तारखेनंतर आलेले प्रस्ताव विमा कंपनी स्विकारत नसल्याने सदर प्रस्ताव या कार्यालयाने तालुका कृषी अधिकारी बीड यांना दि.28..12.2012 रोजी परत करण्यात आलेला आहे. या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही.शासनाने शेतक-याच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला अदा केली आहे. त्यामुळे तक्रारदार शासनाचे ग्राहक नाहीत.
सामनेवाला क्र.4 मंचासमोर स्वतः हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या कथनेनुसार त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले आहे त्याबददलचे कार्यालयाचे पत्र दाखल केले आहे.
सामनेवाला क्र.5 डेक्कन इन्शुरन्स यांनी मंचासमोर आपले लेखी म्हणणे पोस्टाद्वारे पाठविलेले आहे. त्यांच्या कथनेनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या कागदपत्राची शहानिशा करुन सदर प्रस्ताव हा विमा कंपनीस सादर करणे कामी संबंधित संस्था आहे.
सामनेवाले क्र.6 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे कथन की, सामनेवाले क्र.6 यांना तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मिळाला नाही. सबब, तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण नाही. तक्रारदार कोणतीही सेवा देण्यास कसूर केला नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 द्वारे कागदपत्र दाखल केलें आहेत. त्यात विमा प्रस्ताव, गांवचा नमुना 8-ब, 7/12 चा उतारा, फेरफार चा उतारा, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, तालुका कृषी अधिकारी बीड यांचे पत्र, वकिलाची नोटीस इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत. सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांचे विद्वान वकीलांचा युक्तीवाद व सामनेवाले क्र.6 यांचे वकिलांचा यूक्तीवाद ऐकला.सामनेवाला क्र.1 ते 5 यांचे जबाबाचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार यांना सामनेवाला यानी सेवा देण्यामध्ये
त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी
सिध्द केली आहे काय? होय.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकील यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती हे दि.4.8.2012 रोजी अँपे रिक्षामध्ये बसून जात असताना ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे चालवून अँपे रिक्षाला समोरुन धडक दिली. त्या अपघातात मयत यांच्या डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाले. त्यामुळे तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू झाला. तक्रारदार यांच्या पतीच्या नांवे पालसिंगन जि.बीड येथे गावी शेतजमिन होती व शेती करीत होते. तक्रारदार यांचे पती शेतकरी होते. महाराष्ट्र सरकारने शेतकरी हयाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वारसदाराने लाभ मिळावा या उददेशाने शेतकरी व्यक्तीगत विमा योजना राबविली आहे. तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर दि.09.10.2012 रोजी शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सामनेवाले क्र.1 मंडळ कृषी अधिकारी यांचेकडे सादर केला. सदर प्रस्ताव हा विहीत मुदतीत सामनेवाले क्र.1 कडे सादर केला आहे. सबब, तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास व विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले क्र.1 ते 5 यांनी दाखल केलेल्या जवाबाचे अवलोकन केले तसेच सामनेवाले क्र.6 यांच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद यांचे अवलोकन केले त्यावरुन सामनेवाले क्र.1 यांना तक्रारदाराचा संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव हा दि.09.10.2012 रोजी प्राप्त झाला ही बाब सिध्द होते. सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीसाठी सामनेवाले क्र.2 यांच्याकडे मुदतीत पाठवला नाही. सामनेवाले क्र.2 चे जवाब वाचले असता यावरुन असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडून तक्रारदाराचा प्रस्ताव दि.21.12.2012 रोजीला प्राप्त झाला. सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.3 कडे सादर केला. सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव हा सादर करण्याची अंतिम दि.14.11.2012 होती. मुदतीनंतर प्रस्ताव स्विकारत नसल्याने सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडे दि.31.12.2012 रोजी परत केला आहे.
सामनेवाले क्र.6 यांच्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराचा प्रसताव विमा कंपनीस प्राप्त झालेला नाही.त्यामुळे तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला असे म्हणता येणार नाही.
वर नमुद केलेला युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले, तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला जवाब यांचे अवलोकन केले.
तक्रारदार यांचे मयत पती यांच्या नांवे पालसिंगन जि.बीड येथे शेत जमिन आहे. त्यामुळे तो शेतकरी आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी दाखल केलेलया कागदपत्रावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारदार यांचे पती बारीकराव पिंगळे हे अँपे रिक्षामध्ये बसून जात असताना ट्रकने धडक दिली. त्या अपघातात गंभीर जखमी होऊन मयत झाले. सदर बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलिस पेपर, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी सामनेवाले क्र.1 कडे दि.09.10.2012 रोजी संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्ताव हा तक्रारदाराने विहीत मुदतीत दाखल केला आहे. सामनेवाले क्र.1 हे शासकीय कार्यालय आहे. सामनेवाले क्र.1 यांनी कायदेशीर कार्य करणे हे बंधनकारक आहे.सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीसाठी योग्य वेळेत पाठविला नाही. सामनेवाले क्र.1 यांचे कर्तव्य आहे जनतेची सेवा करणे व योग्य ते मार्गदर्शन करणे आहे. परंतु सामनेवाले क्र.1 यांनी स्वतःच्या कार्याबाबत निष्काळजीपणा दाखवला आहे. तक्रारदाराच्या प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यास हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे लाभ मिळण्यापासून वंचीत राहिले आहेत. सामनेवाले क्र.1 याच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास सेवा देण्यास त्रूटी ठेवली आहे ही बाब सिध्द होते. त्यासाठी सामनेवाले क्र.1 हे सर्वस्वी जबाबदार आहेत. सामनेवाले यांना सदर प्रस्ताव हा परत पाठविण्याचा अधिकार नाही. सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव विहीत मुदतीत न पाठवून अक्षम्य अशी चुक केली आहे. यावरुन सामनेवाले क्र.1 यांना निर्देश देण्यात येते की, तक्रारदाराचा प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीसाठी 30 दिवसांच्या आंत सामनेवाले क्र.6 म्हणजे विमा कंपनीकडे पाठवावा. अन्यथा सामनेवाले क्र.1 हे सर्वस्वी जबाबदार राहणार आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाले क्र.6 विमा कंपनीने योग्य कार्यवाही करुन सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आंत निकाली काढावा. तक्रारदार यांना सदर निकालाविरुध्द मंचात दाद मागण्याचा अधिकार राहील.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.1 यांना निर्देश देण्यात येतो की, त्यांना तक्रारदारांचा
शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गतचा प्रस्ताव पुढील
कार्यवाहीसाठी सामनेवाले क्र.6 यांच्याकडे निकाल कळाल्यापासून
30 दिवसांचे आंत पाठवावा.
3) सामनेवाले क्र.6 यांनी सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 30
दिवसांच्या आंत सदर प्रस्तावावर योग्य कार्यवाही करावी. 4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड