द्वाराः मा.अध्यक्ष श्री. विजय चंद्रलाल प्रेमचंदानी
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्वये सदर तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने स्वतःचे उपजिविका साठी २०१० मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची पिकप व्हॅन खरेदी केलेली होती. तक्रारदाराने सामनेवाला कंपनीकडून, वरील नमूद वाहनाची विमा पॉलिसी काढली होती. विमा पॉलिसीची कालावधी दिनांक ३१.०१.२०१२ ते ३०.०१.२०१३ पर्यंत होती. सामनेवालेंची व्हॅनची किंमत रुपये २,२०,५०० अशी दर्शविली होती. तक्रारदारकडून सामनेवालाने रुपये १३,३४७/- इतकी प्रिमियमची रक्कम घेतली होती. दिनांक २९.१२.२०१२ रोजी सदर पिकप व्हॅनवरून जात असताना सदर वाहनाचा अपघात झाला, तक्रारदाराने सामनेवाला यांना सदर अपघाताबाबत कळविले व सामनेवाला यांचे सर्वेअरच्या सांगण्यावरून सदरचे वाहन दुरुस्तीकरीता टाकले. तक्रारदाराने सामनेवालाकडून विमा रक्कम मिळण्यासाठी त्यांच्या सांगण्याप्रमाणे अर्जात नमूद केलेल्याप्रमाणे व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु सामनेवाला यांनी नमूद केल्याप्रमाणे तक्रारीत वाहनाचे क्लेमबाबत तसेच वाहनाच्या दुरुस्तीची रक्कम देणेबाबत कोणतीही कारवाई केली नाही, सामनेवाला यांनी दिनांक १४.०३.२०१३ रोजी तक्रारकर्त्याला पत्राद्वारे असे कळविले की, तक्रारदाराच्या वादातील वाहनाचा विमा दावा नामंजूर करण्यात आलेला आहे. सामनेवाला कंपनी यांनी चुकीचे कारण दाखवून तक्रारदाराचे विमा दावा नामंजूर केले असल्याने,तक्रारदाराने सदर तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आले. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यावर प्रकरणात हजर झाले व निशाणी क्रमांक १२ वर कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी कैफियतमध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाला यांच्याबद्दल लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला कंपनी यांना असे मान्य केले आहे की, तक्रारदाराने त्याची पिकअप व्हॅन करिता विमा पॉलिसी सामनेवाला कंपनीकडून काढली होती. तक्रारदाराचे वाहनाचे अपघात झाल्यानंतर सामनेवाला कंपनी यांना जशी माहिती मिळाली तसेच सामनेवाला कंपनी यांनी त्याच्या निरीक्षण करीता श्री संदीप नवले यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले. तक्रारदाराने दिलेली माहिती व दस्तावेज वरून दिनांक २१.०२.२०१३ रोजी निरीक्षकांनी अहवाल सादर केला. त्यात असे नमूद करण्यात आले होते की, तक्रारदाराच्या एकूण नुकसान रुपये ५०,५००/- असा झालेला आहे, सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराचे वाहन माल वाहक असून, त्याचे वापर तक्रारदार पॅसेंजर घेऊन जाण्यासाठी करत होता. मोटर कायदाचे तक्रारदाराने नियम पाळले नाहीत. तक्रारदाराने वादातील वाहनाचा गैर वापर करीत होते. म्हणून तक्रारदाराचे वाहनाकरीता विमा दावा सामने वाला कंपनीने पॉनिसीचे शर्त व अटीप्रमाणे नाकारून कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. जर मा.मंचानी असे निर्णय घेतले की, तक्रारदाराला वाहनाचा झालेल्या नुकसानाबाबत विमा दावा मिळाला पहिजे, तर सामनेवाला कंपनीची जबाबदारी सर्वे अहवालाप्रमाणे फक्त रुपये ५०,५००/- राहील. तक्रारदाराची तक्रार खोटी स्वरूपाची असल्याने दंडासह खारीज करण्यात यावे अशी विनंती करण्यात आलेली आहे.
४. तक्रारदाराने दाखल तक्रार, दस्तावेज, सामनेवाले यांनी दाखल जवाब, दस्तावेज, उभय पक्षांचे युक्तिवादावरून खालील मुद्दे विचारात घेण्यात येते.
मुद्दा क्रमांक -१ | तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे का? | होय |
मुद्दा क्रमांक -२ | सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रति सेवेत त्रुटी दिलेली आहे का? | होय |
मुद्दा क्रमांक -३
| आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्रमांक-१:
५. तक्रारदाराने सामनेवालाकडून तिच्या मालकीचे पिकअप वाहनाकरीता विमा पॉलिसी काढली होती, सदर पॉलिसी क्रमांक २१५०३७/३७/१२/००३८४४ असा आहे, वाहतुकीचा कालावधी दिनांक ३१.०१.२०१२ ते ३०.०१.२०१३ पर्यंत होती, ही बाब तक्रारदाराला व सामनेवाला यांना मान्य असून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे सिद्ध होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक- २
६. सामनेवाला यांनी त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे जवाब दाखल केलेले आहे, असे जबाबात नमुद केलेले आहे, परंतु सामनेवाला कंपनीने त्यांच्या प्रतिनिधीला अधिकार पत्र दिलेले होते किंवा नाही यासंदर्भात कोणताही पुरावा दाखल केलेले नाही. सामनेवाला कंपनीने वादातील अपघाती वाहनाचे निरीक्षण करण्याकरीता निरीक्षक नियुक्त केलेले होते या संदर्भातही कोणताही पत्रव्यवहार किंवा दस्तावेज पुरावा प्रकरणात दाखल केलेले नाही, तसेच निरीक्षक नी अपघाती वाहनाच्या नुकसानीबाबत निरीक्षण केल्याबाबत निरीक्षकाचे कोणतेही शपथपत्र पुरावा तक्रारीत दाखल केलेले नाही. म्हणून सामनेवाला कंपनीने बचाव पक्षात मांडलेले कथन ग्राह्य धरता येत नाही. तक्रारदार यांनी वादातील वाहनाचा अपघातावेळी पॅसेंजर, वाहनात बसवले होते व वादातील वाहनाचा तक्रारदाराने गैरवापर करीत होते तसेच तक्रारदाराने विमा पॉलिसीची शर्त व अटी भंग केल्याबाबत सामनेवाला यांनी कोणतेही दस्तावेज पुरावा तक्रारीत दाखल केले नसल्याने व योग्य कारण नसतानाही तक्रारदाराचे वादातील अपघाती वाहनाचे विमा दावा नामंजूर करून सामनेवालाने तक्रारदारास प्रति न्यूनतम सेवा दिलेली आहे असे सिद्ध होते, सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
७. मुद्दा क्रमांक १ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे.
अंतिम आदेश
१) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
२) सामनेवाला ने तक्रारदाराला तिच्या अपघात वाहनाचे विमा दावाची रक्कम रुपये ५०,५००/- द्यावे.
३) तक्रारदाराला झालेले शारीरिक-मानसिक त्रासापोटी रुपये १०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- सामनेवालाने तक्रारदाराला द्यावे.
४) सामनेवाला कंपनीने वरील नमूद आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी.
५) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामूल्य देण्यात यावी.
६) “क” आणि “ब” फाईल तक्रारदाराला परत करावी.