(आदेश पारीत व्दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्य )
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणे ः-
तक्रारदार हे मौजे उक्कडगांव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील रहिवासी असुन त्यांचा चरितार्थ करीता ट्रान्सपोर्ट व शेतीचा व्यवसाय आहे. सदरील तक्रारदार यांचेकडे त्यांचे मालकीचा टाटा आयशर टेम्पो एल.पी.टी.909 मॉडेलचा टेम्पो आहे. सदरील टेम्पोंचा नंबर एम.एच.16.एई.1964 असा आहे व चेसीज नं.382333 एक्युझेड 700173 असा आहे. सदरील टेम्पोचा संपुर्ण इन्शुरन्स हा सामनेवाला कंपनीकडून तक्रारदार यांनी काढलेला आहे. सदर इन्शुरन्स पॉलीसीचा नं.1715722334000632 असा आहे. तक्रारदार हे त्यांच्या मालकीचा असणा-या टेम्पोंचा इन्शुरन्स सामनेवाले रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांचा काढलेला असल्याकारणाने तक्रारदार हे सदर सामनेवाले इन्शुरन्स कंपनीचे ग्राहक म्हणुन संबंध प्रस्थापित होतो.
3. तक्रारदार हे स्वतःच्या मालकीचा कांदा घेऊन स्वमालकीच्या टेम्पो मध्ये घेऊन चालले होते व भाऊसाहेब गलांडे यांचा कांदा घेऊन वाशी-मुंबई मार्केटला विक्री करणेस दिनांक 20.12.2013 रोजी चालले होते. सदरील रात्री 12.15 वाजेच्या सुमारास सदरील टेम्पो पुण्यावरुन मुंबईकडे जात असतांना वरसोली गावच्या हद्दीत सदरील हायवे रोडवरती टेम्पोचे पुढील दोन टायर फुटले व सदरील अपघात घडला. सदरील अपघात घडल्या संदर्भात तक्रार पोलीसांनी नोंदविलेली आहे. सदरील टेम्पोचा सामनेवाले कंपनीकडे इन्शुरन्स असल्याने तक्रारदार यांनी टाटा शो-रुम मार्फत सदरील टेम्पोचा खर्चाच्या रकमेचा क्लेम रक्कम रुपये 2,24,000/- चा सामनेवाले कंपनीकडे केला होता. परंतु सामनेवाले कंपनीने सदरील क्लेम हा ब्रीच ऑफ पॉलीसी असे कारण देवुन दिनांक 31.01.2014 चे पत्रान्वये नाकारलेला आहे.
4. वास्तविक पाहाता सदरील पत्रामधील कारण असे सांगितले आहे की, सदरील टेम्पोमध्ये कांदा घेऊन जात असतांना चार लोक प्रवास करीत होते. त्यामुळे सदरचा क्लेम सामनेवाले कंपनीने नाकारलेला आहे. वास्तविक पाहाता सदरील चार व्यक्ती हे पॅसेजर नसुन ड्रायव्हर व क्लिनर यांचे व्यतिरिक्त स्वतः कांदा मालक हे बसलेले होते. त्यामुळे त्यांना प्रवासी संबोधण्यात येऊन सामनेवाले कंपनीने नाकारलेला इन्शुरन्स हा योग्य व बरोबर नाही. सदरील टेम्पोमध्ये कोणीही पॅसेंजर पैसे देऊन चालला नव्हता तर स्वतः कांदयाचे मालक कांदा घेऊन वाशिम मुंबई मार्केटला चाललेले होते या गोष्टीचा विचार न करता सदरचा विमा हा सामनेवाले कंपनीने योग्य व संयुक्तीक कारण नसतांना नाकारलेला आहे. तसेच सदरील टेम्पोच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारचा पॉलीसी ब्रीच झालेली नाही. त्यामुळे सदरील पॉलीसीचे कुठल्याही पध्दतीने उल्लंघन होत नाही.
5. सदरील तक्रारदार यास टेम्पो दुरुस्तीस रुपये 2,40,000/- एवढा खर्च आलेला आहे. तसेच पॉलीसी नाकारल्यामुळे टेम्पो दुरुस्तीस तक्रारदार यास एक महिन्याचा विलंब झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार याचे एक महिन्याचे भाडयाचे 1,00,000/- नुकसान झालेले आहे. सदरील विम्याची रक्कम विनाकारण नाकारल्यामुळे तक्रारदाराचे एकुण 3,24,000/- रुपये एवढे नुकसान झालेले आहे. तसेच तक्रारदार यास मानसिक त्रास झालेला आहे. त्यापोटी रक्कम रुपये 10,000/- सदरील नुकसान भरपाई व्यतिरिक्त देणे आवश्यक आहे. सदरील रकमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस पाठवुन दिनांक 23.06.2014 रोजी केलेली आहे. परंतु सामनेवाले यांनी सदरील रकमेची मागणी करुनही सदरची रक्कम दिलेली नाही. तरी तक्रारदार याचे सामनेवाले याचेशी ग्राहक संबंध प्रस्थापित होत असुन सामनेवाले यांनी विनाकारण विमा पॉलीसीची रक्कम नाकारलेली आहे. तरी तक्रारदार यास सामनेवाले यांचेकडून एकुण रक्कम रुपये 3,34,000/- मिळणे आवश्यक आहे. सदरील रक्कम तक्रारदार यास न मिळाल्यास तक्रारदार यांचे कधीही व कशानेही न भरुन येणारे असे अपरिमित नुकसान होईल व तक्रारदार हे न्यायापासून वंचित राहतील. त्यामुळे सदरची रक्कम मिळणे आवश्यक आहे.
6. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सदरचा तक्रारदार याचा तक्रारी अर्ज खर्चासह मंजुर करण्यात यावा. तक्रारदार यास सामनेवाले यांचेकडून विम्याची रक्कम व खर्च व नुकसान व मानसिक त्रासपोटी एकुण रक्कम रुपये 3,34,000/-, 12 टक्के व्याजासह देण्याचा हुकूम वहावा अशी मागणी केली आहे.
7. तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी 6 सोबत दिनांक 20.12.2013 ची खबरी जबाबाची झेरॉक्स प्रत, इन्शुरन्स कव्हर नोटची प्रत, आर.सी.टी.सी बुकची प्रत, शुभयान मोटर्स ने इन्शुरन्स कंपनीचे दिनांक 24.12.2013 चे पत्र, शुभयान मोटार्सचे बिल, विश्वकर्मा बॉडी वर्कसचे बिल पावती दिनांक 21.2.2014 चे पत्र, हिंदुस्थान क्रेनचे बिल दिनांक 20.12.2013 चे बिल, मुंजोबा ट्रान्सपोर्टची पावती दिनांक 20.12.2013 ची पावती, रिलायन्स इन्शुरन्सचे क्लेम नाकारल्याबाबतचे पत्र दिनांक 31.01.2014, लिगल नोटीसची झेरॉक्स प्रत, आर.पी.ए.डी.चे पत्राचे पत्र/ पोहोच इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
8. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करण्यात येऊन सामनेवाला यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार सामनेवाला यांनी हजर होऊन निशाणी 13 ला कैफियत दाखल केली आहे. सामनेवाला यांनी त्यांचे कैफियतीत असे नमुद केले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत नमुद वाहनाचे इन्शुरन्स उतरविलेला होता हे मान्य केले असून विमा पॉलीसीची रिस्क कव्हर, ड्रायव्हर व क्लिनर, विमा धारक वाहन या 3 लोकांसाठी होता असे नमुद केले आहे. विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार असे नमुद केले असून तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहनास 2,25,000/- खर्च आला त्यात सक्तपणे पुराव्यानिशी शाबीत करावे. तक्रारदाराने तक्रारीतील कथन नाकारले आहे. अपघातग्रस्त वाहनात 4 प्रवासी प्रवास करीत होते. विमा पॉलीसीनुसार वाहनात जास्त प्रवासी नेणे हे सर्व विमा पॉलीसी धोरणाच्या अटी व शर्तीचे विरोधात आहे. तक्रारदाराने कांदयाचे गोण्या बाबतची पावती तसेच पावती मान्य नाही. तक्रारदार हा शेतकरी असल्याबद्दल त्यांचे स्वतःचा शेतीचा 7/12 उतारा जोडलेली नाही. तक्रारदाराने तक्रारीत नमुद अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीसंदर्भात दाखल केलेले सर्व बिले अमान्य असल्याचे म्हंटले आहे. आणि शेवटी सामनेवालाने असे नमुद केलले आहे की, शुभयान मोटार्स यांनी दाखल केलेले जॉब कार्डनुसार स्पेअरपार्ट रुपये 45,000/- कामगारानी इतर मजुरीसाठी 16854/- असे एकुण 61,854/- रुपयाचा खर्च आलेला आहे. त्या खर्चाचे 50 टक्के घसारा रक्कमेपेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नाही असे नमुद केलेले आहे. सामनेवालाने तक्रारदाराचा विमा दावा योग्यरित्या नाकारला आहे. या सामनेवालाने तक्रारदारप्रति सेवेत त्रुटी दिलेली नसून सदर तक्रार नामंजुर करण्यात यावी असे कैफियतीत नमुद केलेले आहे.
9. सामनेवालाने कैफियतीसोबत विमा पॉलीसीची प्रत, ड्रायव्हरचे स्टेटमेंट पोलीसांपुढील दिनांक 20.12.2013 चे, तक्रारदार यांचे रिपोर्टींगचे जॉब कार्ड दिनांक 23.12.2013, क्लेम नाकारल्याचे दिनांक 31.01.2014 चे पत्र, निशाणी 15 सोबत जोडलेले आहेत. सामनेवाला तर्फे दिनांक 16.08.2016 रोजी निशाणी 17 ला तक्रारदाराने कंपनीच्या इन्व्हेस्टीगेटर समोर दिनांक 01.01.2014 रोजी दिलेला जबाब, क्लेम फॉर्म, ड्रायव्हर व इन्व्हेस्टीगेटर पुढील जबाब इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवालाने निशाणी 19 ला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तक्रारदाराने निशाणी 21 ला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
10. या सर्व बाबींचे मंचाने बारकाईने अवलोकन केले, त्यानुसार न्याय निर्णयाचा विचार केला, वर नमुद केलेला तक्रारदाराचा युक्तीवाद लक्षात घेतला. सामनेवाला यांनी केलेला युक्तीवाद उभय पक्षकारांनी सादर केलेली कागदपत्रे यांचे बारकाईने अवलोकन केले. सामनेवाला यांचे लेखी जबाब, कागदपत्राचे वाचन केले. यावरुन असा निष्कर्ष निघतो की, तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहनाचे ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये कांदयाच्या गोण्या भरलेल्या असल्यामुळे अपघातग्रस्त वाहन चालकाकडे वैध ड्रायव्हर लायसन नसल्यामुळे या कारणाने तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नामंजूर केलेला आहे. या सदर बाबींचा मंचाने बारकाईने अवलोकेन केले व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे हे तक्रारदार यांनी शाबीत केले आहे काय.? | ... होय. |
2. | तक्रारदार हे सामनेवालाकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय.? | ... होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
11. मुद्दा क्र.1 व 2 – तक्रारदार यांचे वकील श्री. गावडे यांनी लेखी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार यांच्या टेम्पोची विमा पॉलीसीची रक्कम सामनेवाले कंपनीने नाकारल्याचे कारण चुकीचे आहे. वास्तविक पाहाता सदरील टेम्पोचा ड्रायव्हर, क्लिनर व मालक व कांदा घेऊन चाललेल्या टेम्पो सोबत भाऊसाहे गलांडे शेतकरी कांदा घेऊन वाशी-मुंबई मार्केटला चालले होते. वास्तविक पाहाता सदरील चार व्यक्ती हे पॅसेंजर नसून ड्रायव्हर व क्लिनर यांचे व्यतिरिक्त स्वतः कांदा मालक बसलेले होते. त्यामुळे त्यांना प्रवासी संबोधून सामनेवाले कंपनीने नाकारलेला इन्शुरन्स हा चुकीचा आहे. त्यामुळे कुठलेही योग्य व संयुक्तीक कारण घडलेले नसताना सदरील सामनेवाले कंपनीने सदरचा क्लेम नाकारलेला आहे. सदरील टेम्पोच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारची ब्रीच ऑफ पॉलीसी झालेली नाही. सदरील तक्रारदार यास टेम्पो दुरुस्तीस रक्कम रुपये 2,40,000/- एवढा खर्च आलेला आहे. तसेच पॉलीसी नाकारल्यामुळे टेम्पो दुरुस्तीस तक्रारदार यास एक महिन्याचा विलंब झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार याचे महिन्याचे नुकसान रक्कम रु.1,00,000/- एवढयाचे झालेले आहे. सदरील विम्याची रक्कम विनाकारण नाकारल्यामुळे तक्रारदाराचे एकुण 3,24,000/- रुपये एवढे नुकसान झालेले आहे. तसेच तक्रारदार यास मानसिक त्रास झालेला आहे. त्यापोटी रक्कम रुपये 10,000/- देण्यात यावेत. सदरील रकमेची मागणी तक्रारदार यांस कायदेशीर नोटीस पाठवुन दिनांक 23.06.2014 रोजी केलेली आहे. परंतु सामनेवाले यांनी सदरील रकमेची मागणी करुनही सदरची रक्कम दिलेली नाही.
12. सामनेवाला यांनी त्यांचे वर्णन यादीसोबत अर्जदाराने कंपनीचे इन्व्हेस्टीगेटर समोर दिलेला जबाब दाखल केलेला आहे, तसेच क्लेम फॉर्म व ड्रायव्हरचा इन्व्हेस्टीगेटर समोरचा जबाब दाखल केलेला आहे. सदरील जबाबामध्ये अर्जदाराने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की, टेम्पोमध्ये ड्रायव्हर, क्लिनर, स्वतः मालक अर्जदार व शेतकरी भाऊसाहेब गलांडे असे चार व्यक्ती बसले होते. सदरील अर्जदार यांचा इन्व्हेस्टीगेटर समोरील जबाब सामनेवाले कंपनीने दाखल केलेला आहे तो अर्जदार यास मान्य आहे. त्यामुळे सदरील तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र व पुराव्यावरुन सदरील तक्रार मान्य करण्यात यावी. तसेच सदरील तक्रारी अर्ज खर्चासह मंजूर करण्यात यावा व तक्रारदार यास सामनेवालेकडून विम्याची रक्कम व खर्च व नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी एकुण रक्कम रुपये 3,34,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा हुकूम व्हावा ही युक्तीवादात विनंती केली.
13. सामनेवाला यांनी निशाणी 19 ला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. त्याततक्रारदाराने तक्रारीत नमुद वाहनाचे इन्शुरन्स उतरविलेला होता हे मान्य केले असून विमा पॉलीसीची रिस्क कव्हर, ड्रायव्हर व क्लिनर, विमा धारक वाहन या 3 लोकांसाठी होता असे नमुद केले आहे. विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार असे नमुद केले असून तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहनास 2,25,000/- खर्च आला त्यात सक्तपणे पुराव्यानिशी शाबीत करावे. तक्रारदाराने तक्रारीतील कथन नाकारले आहे. अपघातग्रस्त वाहनात 4 प्रवासी प्रवास करीत होते. विमा पॉलीसीनुसार वाहनात जास्त प्रवासी नेणे हे सर्व विमा पॉलीसी धोरणाच्या अटी व शर्तीचे विरोधात आहे. तक्रारदाराने कांदयाचे गोण्या बाबतची पावती तसेच पावती मान्य नाही. तक्रारदार हा शेतकरी असल्याबद्दल त्यांचे स्वतःचा शेतीचा 7/12 उतारा जोडलेला नाही. तक्रारदाराने तक्रारीत नमुद अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीसंदर्भात दाखल केलेले सर्व बिले अमान्य असल्याचे म्हंटले आहे. आणि शेवटी सामनेवालाने असे नमुद केलले आहे की, शुभयान मोटार्स यांनी दाखल केलेले जॉब कार्डनुसार स्पेअरपार्ट रुपये 45,000/- कामगारानी इतर मजुरीसाठी 16854/- असे एकुण 61,854/- रुपयाचा खर्च आलेला आहे. त्या खर्चाचे 50 टक्के घसारा रक्कमेपेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नाही असे नमुद केलेले आहे. सामनेवालाने तक्रारदाराचा विमा दावा योग्यरित्या नाकारला आहे. या सामनेवालाने तक्रारदारप्रति सेवेत त्रुटी दिलेली नसून सदर तक्रार नामंजुर करण्यात यावी असे युक्तीवादात नमुद केले आहे. दायित्वानुसार असलेल्या अपघातग्रस्त वाहनाची तपासणी अहवालाचे शिवाय जास्त रक्कम सामनेवाला तक्रारदारास देऊ शकत नाही. शुभयान मोटर्स प्रा.लि. अहमदनगर यांनी त्यांची दुरुस्तीचे बिलानुसार दुरुस्तीचा खर्च रुपये फक्त 15,000/- नमुद केलेला आहे. सामनेवाला यांचे लेखी युक्तीवादात असे नमुद केलेले असल्याने तक्रारदारास कुठल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. सामनेवालाने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारण देऊन नाकारला आहे. म्हणून सदरची तक्रार सर्व बाबींचा विचार करता नामंजुर करण्यात यावी असे नमुद केलेले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचा युक्तीवाद ऐकला, उभय पक्षकारांनी सादर केलेली कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले बिलाचे पृष्ठयर्थ शुभयान मोटार्स, मुंजोबा ट्रान्सपोर्ट, विश्वकर्मा बॉडी वर्क्स, हिंदुस्थाने क्रेन सर्व्हीस, यांचे मालक व प्रोप्रायटर यांचे तक्रारीसोबत अॅफिडेव्हीट दाखल केलेले नाही. त्यामुळे सदरची बिले शाबीत झालेली नाहीत. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, निशाणी 17 सोबतची कागदपत्रे, तक्रारदाराने इन्व्हेस्टीगेटर समोर दिलेला जबाब, तसेच ड्रायव्हर यांनी दिलेले जबाब यांचे अवलोकन केले. सामनेवालाने दाखल केलेले जॉब कार्डचे अवलोकन केले. उभय पक्षांचा युक्तीवाद लक्षात घेता सामनेवाला यांनी तक्रारीत नमुद अपघातग्रस्त वाहन दुरुस्तीचे खर्चापोटी रक्कम दिली नाही, म्हणून सामनेवालाने तक्रारदाराप्रति द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
14. विमा पॉलीसीच्या मुळ विमा पॉलीसीचे अवलोकन केले असता या सर्व बाबीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने तक्रारदार हा त्यांचे वाहनात 4 प्रवासी लोक प्रवास करीत होते हे सिध्द होते. तक्रारदाराने तक्रारीत नमुद वाहन दुरस्त्ी खर्चापोटी रक्कम रुपये 2,25,000/- रुपये खर्च आला असे नमुद केले आहे. परंतु तक्रारदाराने त्याबाबत बिले दाखल केली. परंतू त्यासाठी पुरक कागदोपत्री पुरावा, शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वाहन दुरुस्तीचे खर्चापोटी नमुद केलेली रक्कम देता येत नाही. सामनेवाला यांचा जबाब, विमा पॉलीसीच्या अपघातग्रस्त वाहनास जॉब कार्डनुसार रक्कम रुपये 61,854/- देणे तक्रारदारास उचीत होणार नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे 50 टक्के घसारा रक्कम रु.30,927/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
15. सामनेवालाने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन द्यावयाचे सेवेत त्रुटी दिलेली आहे त्यामुळे सामनेवालाने तक्रारदारास नुकसान भरपाई व मानसिक व शारीरीक त्रासापोटी 10,000/- रुपये व या तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 3,000/- सामनेवालाने तक्रारदारास द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
16. मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 30,927/- (रक्कम रुपये तीस हजार नऊशे सत्तावीस फक्त) वाहनाचा दुरुस्ती खर्चापोटी तक्रारदारास द्यावी.
3. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च 3,000/- (रक्कम रु.तीन हजार फक्त ) तक्रारदाराला द्यावा.
4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.