निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/03/2013
क्रार नोदणी दिनांकः- 10/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 15/02/2014
कालावधी 10 महिने. 05 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मिराबाई भ्र.तुळशीराम बनगर, अर्जदार
वय 28 वर्षे. धंदा.घरकाम. रा.फुलकळस.ता.पुर्णा जि.परभणी. अॅड.मा.तु.पारवे.
विरुध्द
1 व्यवस्थापक, गैरअर्जदार.
रिलायन्स जनरल ईन्सुरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
4 था मजला चिंतामणी अव्हेन्यू कार्यालय,
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नेक्स्ट टू विरवाणी इंडस्ट्रीयल इस्टेट,
गोरेगाव पूर्व मुंबई 400063.
2 व्यवस्थापक,कबाल इन्सुरन्स ब्रोकींग सर्विसेस प्रा.लि. स्वतः राज अपार्टमेंट,प्लॉट नं. 19 जी सेक्टर,
रिलायन्स फ्री वेहीच्या मागे, औरंगाबाद.
3 कृषी अधिकारी साहेब,पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत पतीचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे पती नामे तुळशीराम बनगर हे दिनाक 01/11/2008 रोजी पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाले.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती हयात असतांना मौजे देऊळगाव शिवारातील गट नं. 512 मधील त्यांच्या मालकीची 45 गुंठे जमीन कसुन खात होते.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत पतीचा विमादावा दिनांक 03/01/2009 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केला होता. त्यानंतर अर्जदारानी आपल्या विमादाव्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना अनेक वेळा चौकशी केली, परंतु योग्य ते उत्तर मिळाले नाही, शेवटी अर्जदाराने तिच्या वकीला मार्फत दिनांक 08/02/2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पाठवली व विमादाव्या बाबत चौकशी केली व सदरची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 ला दिनांक 12/02/2013 रोजी प्राप्त झाली, त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक 3 ने दिनांक 16/02/2013 रोजी पत्र पाठवुन अर्जदारास कळविले की, अर्जदाराचा प्रस्ताव विमा कंपनीने 30/06/2011 रोजीच्या पत्राने आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्यांनी विमा प्रस्तावा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली होती व गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही व केंव्हाही त्रुटीच्या कागदपत्राची मागणी केली नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, प्रस्ताव नामंजूर झाल्याचे 16/02/2013 च्या पत्राने त्यांना कळाले व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराना आदेश करावा की, त्याने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी 1 लाख रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व सदरच्या रक्कमेवर 27/01/2009 पासून 15 टक्के व्याजाने रक्कम द्यावयाचा आदेश करावा. व तसेच सेवात्रुटी व दावा खर्च 21,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 25 कागदपत्रे झेरॉक्स दाखल केली आहेत. ज्यामध्ये भाग क्रमांक 4, अर्ज, क्लेमफॉर्म भाग-1, क्लेमफॉर्म भाग-2, खबर, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पि.एम.रिपोर्ट, रहिवाशी व ओळखपत्र, 7/12, होल्डींग, वारसा प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी फॉर्म, ओळखपत्र, नमुना – नं 8 अ, नमुना 6 क, पासबुक, अकस्मात मृत्यू तलाठी प्रमाणपत्र, पंचनामा, अकस्मात मृत्यू प्रमाणपत्र, विनंती अर्ज, नोटीस, पोस्ट पावती, गैरअर्जदार क्रमांक 3 चे पत्र, शासन परिपत्रक इ. कागदपत्राच्या प्रती दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 6 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदार वा त्यांचे पती हे आमच्या विमा कंपनीचे ग्राहक नाहीत व त्याने विमा हप्त्यापोटी रक्कम देखील भरलेली नाही व आम्ही त्यांना कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार मंचास नाही व ती खारीज होणे योग्य आहे व तसेच त्रिपक्षीय करारा प्रमाणे शेतकरी विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करु शकत नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने तिच्या मयत पतीचा विमादावा केव्हाही विमा कंपनीकडे दाखल केला नाही, त्यामुळे अर्जदाराचा विमादावा नाकारण्याचा प्रश्नच येत नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराच्या पतीचा अपघात हा दिनांक 01/11/2008 रोजी झालेला आहे व अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार ही इ.स. 2013 मध्ये दाखल केली आहे. जवळ - जवळ साडेचार वर्षांनी ही तक्रार दाखल केली आहे व ती मुदतबाहय आहे व याच कारणास्तव सदरची तक्रार फेटाळणे योग्य आहे. अर्जदाराने केवळ लाभ मिळावा म्हणून चुकीच्या आधारे कोणताही कागदोपत्री पुरावा नसताना ही सदरची तक्रार दाखल केली आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 3 यास मुदत संपल्यानंतर कागदपत्रे स्विकारण्याचा कोणताही अधिकार नाही. अर्जदाराने चुकीचे कागदपत्रे तयार करुन खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 7 वर विमा कंपनीने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार आमचे ग्राहक नाहीत, परंतु ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमीयम गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने स्विकारुन ही जोखीम स्विकारली आहे, त्यांचेच ते ग्राहक होवु शकतात. आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोंत. व शासनास विना मोबदला सहाय्य करतो.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, मयत तुळशीराम हरीभाऊ बनगर मु.फुलकळस ता.पूर्णा जि परभणी यांचा अपघात दिनांक 03/11/2008 रोजी झाला. सदरील विमा प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी मार्फत आमच्या कार्यालयात 09/04/2009 रोजी प्राप्त झाला तो प्रस्ताव आमच्या मार्फत विमा कंपनीला पाठवला असता सदरचा अर्जदाराचा विमादावा विमा कंपनीने नामंजूर केला आहे व ते मयताच्या वारसास 24/11/2010 च्या पत्राने कळविण्यात आले.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, कारण नसताना तक्रारीस समोर जाने भाग पडले, म्हणून 5,000/- रु. खर्च आकारुन आम्हांस देण्याचा आदेश व्हावा. व तक्रारीतून आमची पूर्णपणे मुक्तता करण्यात यावी. असे म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यास मंचाची नोटीस तामिल होवुनही गैरहजर त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने शेतकरी जनता अपघात
विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा मंजूर
करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती नामे तुळशीराम हरीभाऊ बनगर यांचा दिनाक 02/11/2008 रोजी विहीरीतील पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला होता, ही बाब नि.क्रमांक 4/5 वर दाखल खबर अहवालावरुन सिध्द होते, व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/6 वर दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनारम्याच्या प्रतीवरुन व पोलीस स्टेशन ताडकळसच्या घटनारस्थळ पंचनामा व नि.क्रमांक 4/8 वर दाखल केलेल्या पी.एम. रिपोर्ट वरुन सिध्द होते. मयत तुळशीराम बनगर यांची पत्नी वारसदार ही अर्जदार आहे. ही बाब नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या तलाठ्याच्या प्रमाणपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे मयत पतीस मौजे देऊळगाव शिवारात (पूर्णा) गट नं. 512 मध्ये 45 गुंठे जमीन होती, ही बाब नि.क्रमांक 4/11 वर दाखल केलेल्या 7/12 उतारा व नि.क्रमांक 4/12 वर दाखल केलेल्या गाव नमुना नं. 8 अ व तसेच नि.क्रमांक 4/17 वरील गाव नमुना नं. 6 क च्या प्रमाणपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून संपूर्ण कागदपत्रासह मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील क्लेमफॉर्म भाग-1, नि.क्रमांक 4/4 वरील क्लेमफॉर्म भाग-2 या कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 च्या वरिष्ठ कार्यालयातून गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवला व तो विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पाठवला होता, ही बाब गैरअर्जदार क्रमांक 2 च्या लेखी जबाबातून दिसून येते.
सदरचा विमा प्रस्ताव दाखल केल्यानंतर अर्जदाराच्या विमादाव्याचे काय झाले, याबाबत अर्जदाराने गैरअर्जदारास चौकशी करुनही उपयोग झाला नाही, म्हणून तिने तिच्या वकिला मार्फत दिनांक 08/02/2013 रोजी नोटीस पाठवली व नोटीसीत त्याने 27/01/2009 पासून ते आजतागायत पर्यंत तिला शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळाली नाही वा विमा कंपनीने कोणतेही पत्र दिले नाही, म्हणून विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर द्या, म्हणून लिहिले होते.सदरची नोटीस अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना पाठविली, ही बाब नि.क्रमांक 4/24 वर दाखल केलेल्या प्रतीवरुन सिध्द होते. तेव्हा गैरअर्जदार क्रमांक 3 ने 16/02/2013 रोजी अर्जदाराच्या नोटीसीस उत्तर दिले व त्यात त्याने म्हंटले आहे की, अर्जदाराने सादर केलेला प्रस्ताव हा त्रुटीत होता, त्याबाबत आपणास वारंवार सुचना देवुनही त्रुटीची पुर्तता न केलेमुळे मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे पत्र क्रमांक 302 दिनांक 30/06/2011 अन्वये अर्जदाराचा विमादावा कंपनीने रद्द केला. त्याबाबत आपणास 11/07/2011 रोजी कळविण्यात आले, असे उत्तर दिले. यावरुन हे दिसून येते की, अर्जदारास तिच्या विम्यादाव्या बाबत कोणीही अर्जदारास लेखी माहिती विमादाव्या बाबत देवुन कळविले नव्हते. वरील कारणास्तव अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे. असे मंचाचे मत आहे.
याबाबत मा. राज्य आयोग मुंबर्इ सर्कीट बेंच औरंगाबाद यांनी F.A. No. 188/12 सुकूमारबाई विरुध्द ओरिएंटल इंन्शुरन्स कं लि. मधील दिलेला निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबात म्हंटले की, अर्जदाराचा विमा प्रस्ताव त्यांच्याकडे आलाच नाही, हे म्हणणे एकदम धादांत खोटे व बेजबाबदारपणाचे वाटते, कारण गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात म्हंटले की, अर्जदाराचा विमादावा विमा कंपनीने दिनांक 24/11/2010 रोजीच्या पत्राव्दारे
अपु-या कागदपत्रामुळे फेटाळला, ही बाब नि.क्रमांक 11/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन दिसून येते. व नि.क्रमांक 4/25 वर दाखल केलेल्या कागदपत्रा मध्ये गैरअर्जदार क्रमांक 3 म्हणते की, अर्जदाराचा विमादावा फेटाळल्याचे दिनांक 11/07/2011 च्या पत्रा अन्वये अर्जदारास कळविण्यात आले. नि.क्रमांक 11/1 वर दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटरचे अवलोकन केले असता विमा कंपनीने अर्जदाराने प्रस्तावा सोबत क्लेमफॉर्म, तालुका कृषी अधिका-याचे पत्र, 20 रु. चा स्टँप, मृत्यू प्रमाणपत्र, 6 क, फेरफार, पी.एम.रिपोर्ट, व All police report इ. कागदपत्रे दाखल केले नाही, म्हणून अर्जदाराचा विमादावा नामंजूर केल्याचे दिसून येते. विमा कंपनीचे सदरचे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने संपूर्ण कागदपत्रासह तिच्या मयत पतीचा विमा गैरअर्जदाराकडे दाखल केला होता, याबाबत अर्जदाराने नि.क्रमांक 12 तहसिल कार्यालय, पूर्णा यांनी जारी केलेले कागदपत्र दाखल केले आहे. सदर कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने प्रस्तावा सोबत संपूर्ण कागदपत्रे दाखल केली होती. व अर्जदाराने मंचासमोर देखील सदरचे कागदपत्र दाखल केले आहेत.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने अयोग्य कारण दाखवून अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास निश्चितच अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत मयत पतीच्या विमादाव्यापोटी
अर्जदारास रु.1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त) द्यावेत.
3 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी अर्जदारास रु. 1,000/- फक्त ( अक्षरी रु.
एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.