निकाल
दिनांक- 06.08.2014
(द्वारा- श्री.रविंद्र शेषेराव राठोडकर, सदस्य )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी विमा कंपनीची पॉलिसी अंतर्गत मिळणा-या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन सेवेत कसूर केला आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार हा बीड येथील रहिवासी असून स्वतःच्या मालकीचा अॅपे अॅंटो रिक्षा क्र.एम.एच.12-र्इएफ-7063हा मालवाहू म्हणून चालवितो. दि.24.4.2011 रोजी सदरील अॅपे रिक्षात ढोकी येथून भंगार घेऊन एडसी मार्गे बीड येत असताना तडवळा गावाजवळ पाठीमागून एक ट्रक ज्यांचा नं.एमएच.04-सी-6584 हा जोरात आला व तक्रारदाराच्या रिक्षाला धडक दिली. त्यामुळे अॅपे रिक्षा पलटी झाला असून यांचे बरेच नुकसान झाले. सदरील अॅपे रिक्षामध्ये भंगार आणत असताना त्यासोबत शेख बाबर, शेख बाबू व रमजान हे भंगार सामनासोबत येत होते. कारण सदरील भंगार हे त्यांच्या मालकीचे होते.
सदरील घटनेची माहीती दि.24.4.2011 रोजी फोनद्वारे सामनेवाले यांचे कार्यालयास दिली.कारण तक्रारदाराने सदरील अँपे अँटो रिक्षाचा विमा सामनेवाले यांचेकडे काढलेला आहे. तसेच सामनेवाले यांनी दि.23.6.2011 रोजी तक्रारदारास क्लेम फॉर्म दिला आणि तो भरुन लागलीच संपूर्ण कागदपत्रासह तक्रारदाराने सामनेवाले यांच्या कार्यालयाकडे दिला. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे त्यांचा संबंधीत प्रतिनिधी पाठविला. त्यावेळेस तक्रारदाराने त्यांना संपूर्ण माहीती दिली, आलेला खर्चाच्या संपूर्ण पावत्या दिल्या. परंतु सामनेवाला यांनी आजतागायत तक्रारदारास कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली नाही. अथवा सदरील प्रकरणात काय निर्णय घेतला यांची माहीती पण दिली आहे. म्हणून तक्रारदाराने माहीतीच्या अधिकाराखाली सामनेवाले यांच्याकडे अर्ज देऊन सदरील क्लेमची विचारणा केली असता सामनेवाला यांनी उलट तक्रारदारास कोणती माहीती पाहिजे व आपल्या पॉलिसीचा क्रमांक काय आहे ? अशी विचारणा केली. म्हणून तक्रारदाराने पॉलिसीची प्रत सामनेवाले यांच्या कार्यालयात नेऊन दिली. परंतु सामनेवाला यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. सदरील घटनेमुळे तक्रारदाराच्या अँपे रिक्षाचे रु.50,000/- चे नुकसान झाले आहे. म्हणून तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाईची रक्कम रु.50,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याचा आदेश करावा म्हणून सदरील तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाला यांना या मंचाची नोटीस मिळाली असून नि.10 नुसार लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले यांचे कथन असे की, तक्रारदाराने दि.24.4.2011 रोजी सामनेवाला यांना अपघाताबददल माहीती दिली नाही. तर तक्रारदार हा दि.23.6.2011 रोजी सामनेवाला यांच्याकडे अपघतात अॅपे रिक्षाला नुकसान झाल्यामुळे ते मिळावे म्हणून अर्ज करण्यासाठी पहिल्यादाच आला होता. त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारास क्लेम फॉर्म देऊन तो आवश्यक त्या कागदपत्रासह आणि योग्य प्रक्रियेसह विमा कंपनीकडे दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर कंपनीचा सर्व्हेअर येईल आणि आपल्या वाहनाची पाहणी, चौकशी करुन किती नुकसान झाले हे निश्चित करुन तसा अहवाल कंपनीकडे पाठवेल आणि विमा कंपनी त्यानुसार तुमचा क्लेम निकाली काढेल. परंतु तक्रारदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह क्लेम फॉर्म दाखल केला नाही. याउलट तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे माहीतीच्या अधिकारानुसार अर्ज करुन विचारणा केली. त्याहीवेळी सुध्दा सामनेवाल्याने तक्रारदारास पॉलिसी प्रत, दुरुस्ती बिले, माहीती दिलेली तारीख आणि इतर आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले. परंतु तक्रारदाराने ते आतापर्यत दाखल केलेले नाहीत. सामनेवाला यांनी असे कथन केले की, पॉलिसीच्या प्रतिवर असे दर्शविले आहे की, जर नुकसान भरपाई/दावा असेल तर तो दावा हब, शांता कमर्शियल कॉम्प्लेक्स 572/575, सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड, पुणे 411 030, दुरध्वनी क्र.24030997 फॅक्स क्र.24465939 मो.नं.9421107446 याच्याकडेच दाखल करावा. जो तक्रारदाराने केला नाही. तसेच तक्रारदाराने आपल्या तक्रारीत आपल्या दाव्याचे कारणाचा व तारखेचा उल्लेख केला नाही. सदरील तक्रार मुदतीत दाखल केली नाही. सामनेवाला यांनी सांगूनही आवश्यक त्या कागदपत्रासह तक्रारदाराने क्लेम अर्ज दाखल केला नाही. म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसूर केला असे म्हणता येणार नाही. कारण तक्रारदाराची तक्रार ही खोटी व बेकायदेशीर असल्यामुळे तक्रारदारास सामनेवाल्याकडून नुकसान भरपाई मागण्याचा हक्क नाही म्हणून सदरील तक्रार खर्चासह रदद करावी.
तक्रारदाराचे विधीज्ञ श्री.ए.पी.गंडले व सामनेवाला यांचे विधीज्ञ श्री. एस.एम.साळवे यांचा युक्तीवाद ऐकला. त्याच बरोबर तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्रे व शपथपत्र यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसी अंतर्गत
नुकसान भरपाईची रक्कम देण्यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली
आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? नाही.
2. तक्रारदार हा तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहेत काय ? नाही.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे विधीज्ञ श्री. ए.पी.गंडले यांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्त नि.4 आणि शपथपत्र नि.12 याकडे वेधले. तक्रारदाराच्या विधीज्ञाने असा युक्तीवाद केला की, अॅपे रिक्षा क्र.एम.एच.12-ईएफ-7093 असा असून तो तक्रारदाराच्या मालकीचा आहे. त्या रिक्षा मार्फत माल वाहतूकीचा व्यवसाय तक्रारदार करतात. त्या अॅपे रिक्षाचा विमा तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे काढलेला असून त्यांचा पॉलिसी क्र.15360031100100002242 असा आहे. सदरील पॉलिसी ही दि.14.5.2010 पासून दि.13.5.2011 पर्यत वैध आहे. तक्रारदाराचे विधीज्ञ यांनी असा युक्तीवाद केला की, दि.24.4.2011 रोजी सदरील अॅपे रिक्षाचा अपघात वडवळा गावाजवळ शेख बाबर, शेख बाबू व रमजान यांच्या मालकीचे भंगार घेऊन ढोकी येथून एडसी मार्गे बीडला येत असताना झाला. तो अपघात पाठीमागून येणारा ट्रक क्र.एम.एच.04-सी-6584 या वाहनाने जोरात धडक दिली आणि तक्रारदाराचा अॅपे रिक्षा पलटी झाला असून त्यांचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदाराने दि.24.4.2011 रोजी तात्काळ सामनेवाला यांना फोनद्वारे माहीती दिली. तसेच सामनेवाला यांनी दि.23.6.2011 रोजी दिलेला क्लेम फॉर्म भरुन संपूर्ण कागदपत्रासह सामनेवाला यांच्या कार्यालयाकडे दिला. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे त्यांचा संबंधीत सर्व्हेअर पाठविला म्हणून तकारदाराने त्यांना संपूर्ण माहीती दिली आणि वाहनास दुरुस्त करण्यात झालेल्या खर्चाच्या पावत्या पण दिल्या. परंतु सामनेवाला यांनी कसल्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिली नाही आणि सदरील प्रकरणात काय निर्णय घेतला ते पण तक्रारदारास सांगितले नाही. त्यानंतर तक्रारदाराने माहीतीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन विचारणा केली असता उलट तक्रारदारास आपणास कोणती माहीती पाहिजे. आपला पॉलिसी क्रमांक काय आहे अशी विचारणा केली. म्हणून तक्रारदाराने पॉलिसीची प्रत सामनेवाला यांना दिली. शेवटी दि.20.2.2014 रोजी विनंती अर्ज करुन नुकसान भरपाईची मागणी केली. पण आजतागायत कसल्याही प्रकारचा प्रतिसाद सामनेवाला यांनी तक्रारदारास दिला नाही किंवा क्लेम का मंजूर केला नाही हे पण् सांगितले नाही. तक्रारदाराचे विधीज्ञ असा युक्तीवाद करतात की, संबंधीत क्लेमच्या अनुषंगाने दस्तऐवज तक्रारदाराने या तक्रारीसोबत नि.4 नुसार दाखल केले आहेत. म्हणजेच गुन्हाची पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, विमा पॉलिसी अर्ज, क्लेम फॉर्म, वाहन चालविण्याचा परवाना इ. म्हणजेच तक्रारदाराने वेळोवेळी विमा पॉलिसी अंतर्गत मिळणा-या नुकसान भरपाईची मागणी सामनेवाला यांच्याकडे केली असता सामनेवाला यांनी ती दिली नाही म्हणून सामनेवाला यांनी अपघात विमा पॉलिसी अंतर्गत मिळणा-या नुकसान भरपाईची रक्कम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. त्या कारणास्तव तक्रारदाराने नुकसान भ्रपाई म्हणून रु.50,000/-, मानसिक त्रास म्हणून रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांनी दयावेत म्हणून सदरील तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाला यांचे विधीज्ञ श्री. एस.एम.साळवे यांनी या मंचाचे लक्ष सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे नि.10 वर आणि शपथपत्र नि.11 वर वेधले. सामनेवाला यांचे विधीज्ञ यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराच्या अॅपे रिक्षाचे नोंदणी पुणे येथील आर.टी.ओ. कार्यालयात झालेली आहे. म्हणून तक्रारदाराने सदरील अॅपे रिक्षाचा विमा पुणे येथील दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. येथे काढलेला आहे. जी पॉलिसी तक्रारदाराने कागदपत्रासोबत मा. मंचासमोर दाखल केली आहे. त्यांचे लक्षपूर्वक अवलोकन केले असता त्यावर काही सुचना दिल्या आहेत असा युक्तीवाद सामनेवाला यांच्या विधीज्ञाने केला. त्यानुसार त्यांनी या मंचाचे लक्ष सदरील सूचनेकडे केंद्रीत करुन असा युक्तीवाद केला की, जर या पॉलिसी नुसार वाहनाचा अपघात किंवा दावा असेल तर तो दावा हब शांता कमर्शियल कॉम्प्लेक्स, 572/575, सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड, पुणे 411 030 असे सांगून संबंधीत कार्यालयाचा फोन, फॅक्स आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत. म्हणून ही अट विमा पत्रानुसार सक्तीचे आहे. परंतु तक्रारदाराने त्यांना सदरील अपघाताचे सुचना/दावा त्यांच्याकडे दाखल न करता सामनेवाले यांच्याकडे दाखल केला आहे. तसेच त्यांना या तक्रारीत पक्षकार केलेले नाही. तसेच तक्रारदाराने कसल्याही प्रकारची अपघाताची माहीती दि.24.04.2011 रोजी सामनेवाला यांना दिली नाही. याउलट तक्रारदार हे दि.23.6.2011 रोजी प्रथमच सामनेवाला यांच्याकडे हजर होऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दिला. त्यावेळेस सामनेवाला यांने तक्रारदारास माहीती व सूचना देऊन क्लेम फॉर्म दिला आणि आवश्यक कागदपत्राच्या अनुषंगाने काही सूचना त्यांच अर्जावर केल्या आहेत. म्हणजेच क्लेम फॉर्म, इस्टीमेंट आणि मूळ कागदपत्र दाखल करा असे सांगून तशा प्रकारचे दि.23.6.2011 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारास स्वंतत्र पत्र दिले. त्यानंतर तक्रारदाराने कसल्याही प्रकारचे वर सांगितल्यानुसार कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. पंरतु तक्रारदाराने या मंचात कागदपत्राच्या यादी बरोबर क्लेम फॉर्म सामनेवाला यांच्याकडे दाखल केला आहे असे सांगितले. पण तो क्लेम फॉर्म सामनेवाला यांना प्राप्त झाल्याबाबत कसलाही पुरावा नाही. त्यानंतर सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या माहीतीच्या अधिकाराखाली मिळालेल्या अर्जाचे उत्तर दि.29.8.2013 ला देऊन असे सूचित केले की,पॉलिसीची प्रत, बिलाच्या पावत्या व इतर आवश्यक कागदपत्र सामनेवाल्याकडे दाखल करावेत. त्यानंतरच पूढील कार्यवाही करता येईल असे सांगितले. तरी पण तक्रारदाराने ते दाखल केले नाहीत. यापूढे असा युक्तीवाद केला की, कोणत्याच सर्व्हेअरची चौकशीसाठी नेमणूक केली नाही. त्यामुळे चौकशी केली आहे आणि त्यांच्याकडे बिलाच्या पावत्या दिल्या आहेत हे खोटे आहे. कारण तशा प्रकारचा सर्व्हेअरचा अहवाल तक्रारदाराने मा.कोर्टात दाखल केला नाही. त्याच बरोबर तक्रारदाराने अँपे अँटो रिक्षाचे निश्चीत किती नुकसान झाले आहे हे सांगितले नाही. कारण तक्रारीनुसार रु.50,000/-, घटनास्थळ पंचनाम्यानुसार रु.20,000/- ते रु.25,000/- आणि शपथपत्रानुसार रु.40,000/- असे सांगितले आहे. त्याचबरोबर अपघातातील अँटो कोणाकडे दूरुस्त केला, नेमका किती खर्च केला याबाबतचे कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. म्हणून अॅपे अँटोचे नेमके किती नुकसान झाले हे सिध्द केले नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील तक्रार खोटी व मुदतीत नसून, या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. म्हणून सदरील तक्रारदाराची तक्रार खर्चासह रदद करण्याची विनंती केली आहे.
वरील सर्व कारणमिमासे वरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने अॅपे अँटो रिक्षाच्या पॉलिसीनुसार सदरील तक्रार पुणे येथे दाखल करावयास पाहिजे. तसेच सदरील अँटोस नेमके किती रुपयाचे नुकसान झाले यांचा कसलाही पुरावा या मंचासमोर दाखल केला नाही. याउलट सामनेवाले यांनी तक्रारदारास आवश्यक ते सर्व कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळोवेळी सूचविले असता तक्रारदारांनी ती सर्व कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच सामनेवाले यांचेकडे क्लेम फॉर्म दाखल केला याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. म्हणून सामनेवाले यांनी विमा पॉलिसी अंतर्गत मिळणा-या नुकसान भरपाईची रक्कम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करु शकले नाहीत. तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र नाही.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक