१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदार हा रा. नेटकेवाडी, ता.कर्जत जि.अहमदनगर येथील रहिवासी असुन, तक्रारदार हे स्वतःची शेती करतात. त्यासाठी तक्रारदार याने युनियन क्वॉलिटी प्लास्टीक कंपनी यांच्याकडुन शेत तलावाचा प्लास्टीक पेपर खरेदी केला. सामनेवाले क्र.१ कंपनीने उत्पादीत केलेला व सामनेवाले क्र.२ यांनी पुरवीलेला तलावाच्या अस्तीकरणासाठी व फिल्म पुरविण्यासाठी सामनेवाले क्र.२ यांची कंपनीच्या माहितीगार इसम सामनेवाले क्र.३ श्री.सचिन गोमटे राहणार अहमदनगर यांनी तक्रारदाराला सांगितले की, सदरचा कागद हा आय.एस.ओ. याप्रमाणे नामांकीत असुन सदर कंपनीचा रिझर्ल्ट अत्यंत चांगला आहे. तसेच सदर प्लॉस्टीकच्या कागदाची कंपनीकडुन पाच वर्षांची वॉरंटी दिली जाते, अशी माहिती व खात्री मिळाल्यानंतर तक्रारदाराने दिनांक ०४-१२-२०१४ रोजी रक्कम रूपये २,३८,७००/- व रूपये ५५,८००/- देऊन सदरचा प्लॅस्टीक कागद शेतासाठी घेतला व शेत तळ्यात लावण्यात आले परंतु सदर प्लॉस्टीकचा कागद हा जॉईंटवरून खराब झाल्याने तक्रारदार यांनी साठवलेले पाणी हे पुर्णपणे वाया गेले व त्यानंतर तक्रारदाराने सामनेवालेकडे तक्रार केली. परंतु त्या तक्रारीवर कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याने तक्रारदाराने त्याबाबत सामनेवाले यांच्याकडे तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कर्जत यांच्याकडे दिनांक २७-०१-२०१५ रोजी तक्रार केली व माननीय कृषी जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे दिनांक ०२-०२-२०१६ रोजी त्याबाबत पत्रव्यवहार केला. तद्नंतर संबंधीत विभागांचे अधिकारी यांनी घटनस्थळावर येऊन त्याबाबत पंचनामा केला. सामनेवालेकडे वारंवार तक्रार करून त्यावर कोणतीही दखल घेतली नसल्याने तसेच खराब प्लॅस्टीकचा कागद पुरविला असल्याने तक्रारदारला पिकाचे नुकसान झाले. त्याकरीता तक्रारदाराने सामनेवालेला नुकसान भरपाई देण्यास कंपनीस दिनांक ०६-०२-२०१६ रोजी नोटीसद्वारे कळविले आहे. सदर नोटीस सामनेवालेला प्राप्त होऊन कोणतीही दखल घेतली नसल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आलेली आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराचे शेत तळ्यावर खराब प्लॅस्टीक पेपर लावण्यात आल्यामुळे तक्रारदाराची जमीनीतुन पेरण्यात आलेले पीकाचे झालेले नुकसान भरपाई सामनेवालेकडुन मिळविण्याचा आदेश व तक्रारीचा खर्च सामनेवालेकडुन मिळण्याचा आदेश व्हावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्र.१ व २ यांना नोटीस प्राप्त झाल्यावर प्रकरणात हजर झाले व निशाणी क्र.२५ वर त्यांचे म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांच्या कैफीयतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार यांनी तक्रारीत सामनेवाले क्र.१ व २ यांच्याविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.१ व २ ने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्र.३ हे सामनेवाले क्र.१ व २ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.१ व २ कंपनीकडुन प्लॅस्टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शेत तळ्यामध्ये बसवुन देण्याचा व्यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेत तळ्यात जर बारीक दगड असल्यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्यावतीने तसेच डिलर याच्यावतीने शेतकरी यांना तश्याच प्रकारची सुचना देण्यात येतात. इतक्यात नव्हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्याने व शेतामध्ये बारीक दगड असल्याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्यात उत्पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्लॅस्टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्ये झाले असले तरी त्यात कोणताही उत्पादीत दोष नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी या कंपनीचे उत्पादीत केलेला कागद हा आय.एस.ओ. प्रमाणीत असुन उच्च दर्जाचा आहे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार-पाच वर्ष सतत दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीमुळे तक्रारदार यांनी कागद टाकलेल्या शेत तलावात पाणी न भरल्याने उन्हाळ्यामुळे तसेच शेततलाव कोरडा असल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचा वापर होऊन त्यामुळे तक्रारदार याचे शेत तलावातील कागदाचे नुकसान होऊ शकते. सदरची बाब ही नैसर्गिक असल्याने त्यास सामनेवाला यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही. सदरचा कागद बसवतांना कागद बसविण्याचा खर्च हा संपुर्णपणे डिलरला दिलेला असतो. त्यामुळे तो सामनेवाला यांच्याकडुन वसुल करण्याचा कोणताही अधिकार तक्रारदार यांना नाही. शेतात अनेक दिवस पाणी साठी नसल्याने नैसर्गिक कारणाने सदर कागद खराब झाला असल्याचे सामनेवाले यांच्याविरूध्द खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीत शेतकरी यांनी सदर शेत तलावासाठी लागणारे कागदाची शासनाकडुन मिळणारी संपुर्ण सवलत मिळल्यानंतर सदरची खोटी बनावट तक्रार सामनेवाले यांच्याविरूध्द दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी महाराष्ट्रा बाहेर राज्यात शेततलावासाठी सदर कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
४. सामनेवाले क्र.३ यांनी प्रकरणात नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर झाले व नि.क्र.१९ वर कैफीयत दाखल केली. सामनेवाले क्र.३ यांनी कैफीयतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार याने सामनेवाले क्र.३ यांचेविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. वास्तविक सामनेवाले क्र.१ हे प्लॅस्टीक कागदाचे निर्माता असुन सामनेवाले क्र.२ हे महाराष्ट्रकरीताचे अधिकारी आहेत. सामनेवाले क्र.१ ने उत्पादीत करीत असलेले कागद हा उच्च दर्जाचा व चांगला प्रतिचा असल्याने त्या कागदाची निवड व मागणी तक्रारदाराने स्वतःहुन केली होती. त्याबाबत सामनेवाले क्र.३ यांच्याकडुन कोणतीही जाहीरात तक्रारदाराकडे केलेली नव्हती. सदर कागद तक्रारदाराने तयार केलेल्या शेत तळ्यात अंथरूण देण्याचे काम सामनेवाले कंपनीचे माहितगार कामगारांनी तक्रारदार यांच्या शेतात येऊन व रितसर सर्व बाबींची पुर्तता करून दिलेली होते व आहे. सदर काम झाल्यानंतर त्यांचा पुरेपुर उपयोग तक्रारदाराने घेतलेला होता. केवळ शासनाकडुन मिळणारी सबसिडी रक्कम लाटण्यासाठी तक्रारदाराने सदर खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सदर कागदाच्या निष्कृटतेबाबत/ जोडाबाबत तक्रारदार या सामनेवाले क्र.३ यांच्याशी प्रत्यक्ष काही संपर्क केलेला नसल्याने सदर तक्रार खर्चासह सामनेवाले क्र.३ यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदाराने दाखल तक्रार, दस्तऐवज सामनेवाले क्र.१ ते ३ ने दाखल केलेली जबाब, तक्रारदाराचे शपथपत्र व उभयपक्षांची लेखी व तोंडी युक्तिवाद मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार क्र.१ ते ३ हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ व २ कडुन स्वतःची शेतवर व भाडे तत्ववर घेतलेल्या शेतीच्या व्यवसायाकरीता सामनेवाले क्र.३ मार्फत शेत तलावकरीता प्लॅस्टीक कागद घेतले होते, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.६ दस्त क्र.२ व ३ वर दाखल देयकावरून सिध्द होते. तक्रारदाराने त्याकरीता सामनेवालेकडे रकमांची भरणा केली ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. सबब तक्रारकर्ता हे सामनेवाले क्र.१ ते ३ यांचे ग्राहक आहेत, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ -
७. तक्रारदाराने नि.क्र.६ वर दाखल दस्त क्रमांक २ व ३ याचे पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराला शेत तलावाकरीता प्लॅस्टीकचे कागद विकलेले होते तसेच ते बसविण्याकरीता ५५,८००/- रक्कम स्विकारली होती. सदर प्लॅस्टीक कागद सामनेवाले क्र.३ कडुन तक्रारदाराकडे लावण्यात आलेला होता. सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांच्या कैफीयतीत हे मान्य केलेले आहे की, सदर प्लॅस्टीक कागद जोड ठिकाणी (जॉईंन्टवर) खराब झाला असल्याने शेत तलावात साचलेले पाणी हे पुर्णपणे वाया गेले असतील. सामनेवाले क्र.१ व २ यांनी प्लॅस्टीक कागद बसविण्याकरीता रक्कम स्विकारली म्हणुन त्यांची ही जबाबदारी ठरते की, सदर प्लॅस्टीक कागद बसविणेवेळी योग्य काळजी घेण्यात आली होती किंवा नाही. तसेच सामनेवाले क्र.३ यांचीही जबाबदारी आहे की सदर प्लॅस्टीक कागद शेत तळ्यात योग्य पध्दतीने बसविण्यात यावे व त्याच्या जोड ठिकाणी प्लॅस्टीक कागदाचे कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे. तक्रारदाराला सामनेवाले क्र.१ व २ यांनी पुरविलेला प्लॅस्टीक कागद ५०० मायक्रोन चा होता किंवा नाही तसेच सदर प्लॅस्टीक कागद निम्न दर्जाचा होता ही बाब तक्रारदाराने तज्ञ विशेषज्ञानाच्या अहवालाअभावी सिध्द करू शकले नाही. तसेच तक्रारदाराचे शेत तलावावर पशुपक्षी किंवा जंगली जनावरेमुळे सदर प्लॅस्टीक कागद खराब झाला किंवा दगडांमुळे झाला ही बाबही सामनेवाले यांनी तज्ञ विशेषज्ञानाच अहवलाअभावी सिध्द करू शकले नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी सदर प्लॅस्टीकचा कागद जोड ठिकाणी खराब झाला आहे, ही बाब कैफीयतीत मान्य केलेली असुन सदर प्लॅस्टीकचा कागद खराब झाला होता, ही बाब सिध्द झाली आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी सदर प्लॅस्टीकचा कागद बसविण्याकरीता रक्कम स्विकारली होती व सामनेवाले क्र.३ ने ती योग्यप्रमाणे शेत तलावामध्ये बसविलेले नव्हते व त्यानंतर त्याची दुरूस्ती किंवा त्याची पडताळणी करीता सामनेवाले क्र.१ ते ३ यांना तक्रार प्राप्त होऊनसुध्दा दुर्लक्ष केले, ही बाब सामनेवाले क्र.१ ते ३ यांची तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. सामनेवालेने दाखल केलेल्या न्यायनिवाड्याची प्रत, त्यातील असलेले तथ्य सदर प्रकरणात लागु पडत नाही. तक्रारदाराने शेत तलावात पाणी गळुन गेले असल्याने त्याचे आर्थिक नुकसान रूपये १०,००,०००/- पर्यंत झाले याबाबत तक्रारदाराने कोणताही दस्तऐवज पुरावा प्रकरणात सादर केललेा नाही, ही बाब ग्राह्य धरून तसेच मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरुन खालीलप्रामणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ ला प्लॅस्टीक कागद बसविणेकरीता दिलेली रक्कम रूपये ५५,८००/- सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराला परत करावी. ३. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/-, तसेच तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी व्यक्तिगत व संयुक्तरितीने द्यावे. ४. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ ते३ यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाच्या आत करावी. ५. तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी. ६. आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. |