निकाल
दिनांक- 05.10.2013
(द्वारा- श्री विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार काद्री झुल्फीकार इस्लाम यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेस दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे जुना बाजार बीड येथील रहिवासी असून नौकरीच्या निमीत्ताने प्रशिक्षणाकरिता लातूर येथे गेले. प्रशिक्षण कालावधी मध्ये तक्रारदार यांनी दि.09.04.2011 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी निर्मित केलेला मायक्रोमॅक्स मोबाईल मॉडेल नं. X 505 imet no. 910526602557020 B-x505b09100005146 C-C08100045842 हा लातून येथील दूकानातून खरेदी केला. सदरील दुकानदाराने मोबाईलची एक वर्षाची वॉरंटी दिली.
तक्रारदार यांचे पूढे कथन की, तक्रारदार यांनी सदर मोबाईल 2ते 3 महिने वापरला.परंतु तदनंतर तो मोबाईल अचानक बंद पडू लागला. सदरील बाब तक्रारदार यांनी डिलर यांचे निदर्शनास आणून दिली. डिलर यांनी तक्रारदाराला सांगितले की, प्रत्येक जिल्हयामध्ये कंपनी तर्फे दूरुस्ती केंद्र आहे. त्याप्रमाणे आपण बीडमध्ये सामनेवाले क्र.2 यांचेकडे मोबाईल दाखवा व ते दूरुस्त करुन देतील.तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे मोबाईल दाखवला. सामनेवाले क्र.2 यांनी मोबाईल खरेदीची झेरॉक्स प्रत घेतली व आठ दिवसात दूरुस्त करुन देतो असे कळविले.तक्रारदार यांनी आठ दिवसानंतर दूरुस्त करुन मोबाईल मिळाला. तो मोबाईल पूढे 2 ते 3 महिने चांगला चालला. जानेवारी 2012 मध्ये अचानक मोबाईल बंद पडू लागला. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांना मोबाईल दाखविला. सामनेवाले क्र.2 यांनी मोबाईल व पावती घेतली. मोबाईल हा दूरुस्तीसाठी पुणे येथे पाठवावा लागेल असे सांगितले. तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 यांचेकडे फेब्रूवारी 2012 मध्ये गेले असता सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना सांगितले की, मोबाईच्या संचामध्ये मोठा बिघाड आहे तो मोबाईल येथे दुरुस्त होऊ शकत नाही. आपण थेट कंपनीशी संपर्क करा असे सांगून तक्रारदाराचा मोबाईल तक्रारदारास परत केला. तक्रारदार यांनी सदरील मोबाईल खरेदी केल्यानंतर वॉरंटी कालावधीमध्ये मोबाईल बंद पडला व तो दूरुस्त होत नसल्यामुळे तक्रारदार यांनी दि.29.03.2012 रोजी सामनेवाले क्र.1 यांना नोटीस पाठविली. मोबाईल दूरुस्त करुन दयावा असे कळविले. सदरील नोटीस सामनेवाले क्र.1 यांना मिळाली. त्यांनी मोबाईल दूरुस्त करुन दिला नाही. सामनेवाले क्र.1 यांनी सदरील मोबाईलची निर्मीती करुन विक्री केलेला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सेवा देण्यास त्रूटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी आपले दैनदिन कामकाजाकरिता नातेवाईकाशी संपर्क ठेवला आला नाही. तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला. याबाबत तक्रारदार यांनी मोबाईलची मुळ किंमत रु.3800/- मिळावी व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रककम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी विनंती कली आहे.
सामनेवाले क्र.1 यांना नोटीस रजिस्ट्रर पोस्टाने पाठविण्यात आली. सामनेवाले क्र.1 यांना नोटीस मिळाली, नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, तक्रार सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचा आदेश झाला.
सामनेवाले क्र.2 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन स्पष्टपणे नाकारलेले आहे. सामनेवाले क्र.2 यांचे म्हणणे की,तक्रारदार हे कधीही त्यांचे दुकानात मोबाईल दुरस्ती कामी आले नाही व त्यांनी मोबाईल दूरुस्त केला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून मोबाईल खरेदीची पावती घेतली नाही. सामनेवाले यांचे म्हणणे की,तक्रारदार यांना या मंचात तक्रार दाखल करता येणार नाही. तक्रारदार यांनी मोबाईल मारुती बाजार हाऊस ऑफ मोबाईल्स सराफा लाईन लातूर येथून घेतलेला आहे. वास्तविक खरेदीचा करार लातूर येथे झाला आहे. सदरील तक्रार या मंचात चालविण्याचा अधिकार नाही. सामनेवाले क्र.2 यांचा तक्रार यांचेशी कसल्याही प्रकारचा संबंध येत नाही.त्यामुळे तक्रारदार यांना सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द कोणताही दाद मागण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेले कथन, शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे दिले, त्यांचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात. .
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.1 व 2 सेवेत त्रूटी ठेवली ही तक्रारदार
सिध्द करतात काय ? नाही.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना सदोष मोबाईल
विक्री करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार
यांनी सिध्द केली आहे काय नाही.
3. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली दाद मागण्यास
पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.काळे यांनी असा युक्तीवाद केला की,तक्रारदार यांनी लातूर येथील दूकानातून तक्रारीत नमूद केलेला मोबाईल खरेदी केला. सदरील मोबाईल हा सामनेवाले क्र.1 कंपनीने निर्माण केलेला आहे. सदरील मोबाईल तक्रारदार वापरीत असताना वेळोवेळी बंद पडू लागला. त्या बाबत तक्रारदार यांनी दूकानदारास कळविले. दुकानदार यांनी तो मोबाईल सामनेवाले क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी देण्यास सांगितले. मोबाईल दुरुस्त करुनही त्यात दोष राहिला. सामनेवाले क्र.1 यांनी दोषयूक्त मोबाईल निर्मीत करुन तो तक्रारदार यांना विकला. त्यामुळे तक्रारदार हे मागणी केलेली नूकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री.सयद इस्माईल यांनी यूक्तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 यांचे दूकानात मोबाईल दूरुतीसाठी कधीही आले नाही. त्यासंबंधी त्यांनी कधीही पुरावा दाखल केलेला नाही.तक्रारदार यांनी मोबाईल हा मारुती बाजार हाऊस ऑफ मोबाईल्स सराफा लाईन लातूर या दूकानातून खरेदी केलेला आहे. त्या दूकानदाराला तक्रारीत पक्षकार केलेले नाही. अगर तक्रारदार हे दूकानदाराकडे मोबाईल नादूरुस्त झाला आहे या बाबत तक्रार दिलेली नाही. तसेच सदरील मोबाईल हा या मंचापुढेही हजर केलेला नाही. खरोखरच मोबाईलमध्ये दोष ओ किंवा नाही हे पाहण्यासाठी योग्य त्या सक्षम तज्ञ व्यक्तीकडून तपासणी होऊन अहवाल मिळणेची गरज आहे. तसा अहवाही मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
तक्रारदार यांचे शपथपत्र दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी मारुती बाजार हाऊस ऑफ मोबाईल्स सराफा लाईन लातूर येथून मोबाईल विकत घेतल्याचे दिसते. त्या पावतीचे अवलोकन केले असता तक्रारीत नमूद केलेला मोबाईल विकत घेतल्याचे दिसते. त्यांची वॉरंटी एक वर्षाची असल्या बाबत पावतीमध्ये नमूद आहे. तक्रारदार हे मोबाईल वापरत असताना तो नादूरुस्त झाला या बाबत तक्रारदार यांनी सदरील दूकानामध्ये कधीही तक्रार केल्या बाबत पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी मुळ पावतीची झेरॉक्स दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये Automatic on off and Restart problem. असे लिहीलेले आहे. यावरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे मोबाईल दूरुस्तीसाठी दिले होते. परंतु सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 या कंपनीचे सर्व्हीस सेंटर आहेत ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. तसेच तक्रारदार यांनी ज्या दुकानातून मोबाईल विकत घेतला. त्या दुकानदारास अगर त्यांचे मालकास पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. तक्रारदार यांनी सदरील मोबाईल हा मंचापूढे हजर केला नाही.त्यामुळे सदरील मोबाईल हा योग्य त्या सक्षम व्यक्तीकडून तपासणीसाठी पाठवता आला नाही. खरोखरच मोबाईल मध्ये दोष असता तर सदरील मोबाईल मंचापूढे दाखल करुन तो तपासणीसाठी अर्ज दिला असता परंतु तसे तक्रारदार यांनी केले नाही. सदरील मोबाईल तक्रारदार यांनी लातूर येथून विकत घेतला. केवळ तक्रारदार बीड मध्ये राहतात या कारणास्तव बीड मंचात तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तक्रारदार यांनी असे कथन केले की,सामनेवाले क्र.1 कंपनीला नोटीस पाठविली. त्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. परंतु ती नोटीस सामनेवाले क्र.1 यांनी प्राप्त झाली आहे या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. केवळ नोटीसची प्रत दाखल केली. यावरुन सामनेवाले क्र.1 यांना नोटीस मिळाली असे गृहीत धरता येणार नाही. सबब, तक्रारदार यांनी दाखल केलेला संपूर्ण पुरावा यांची छाननी करता असे निदर्शनास येते की, तक्रारदार हे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब सिध्द करु शकलेले नाहीत. तसेच या मंचाला सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.सदरील दूकानदार यांना दाव्यात पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.