(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार यांच्या मालकीचा टेंम्पो नं.एम.एच.04/सी.पी.3166 हा असून त्याचा मालवाहतुकीसाठी वापर करीत होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दिनांक 18.02.2014 ते 17.02.2015 या कालावधीमध्ये सदर वाहनाचा विमा उतरविला होता. त्याप्रमाणे विमा पॉलीसी रक्कम रुपये 19,181/- सामनेवालाकडे तक्रारदाराने भरलेली आहे. सदरचे पॉलीसीचा नंबर ओजी-14-1905-1803-00004878 असा आहे. सदर वाहनामध्ये खाद्य तेलाचे डबे नागपूर येथे भरुन औरंगाबाद येथे पोहच करण्याचे होते. त्यामुळे तक्रारदाराचे ड्रायव्हरने सदर टेंम्पो दिनांक 18.08.2014 रोजी औरंगाबाद जालना रोडने घेऊन जात असतांना टेंम्पो लाडगांव ता.जि.औरंगाबाद शिवारात रस्त्यावरील पुलाला धडकुन अपघात होऊन पलटी झाला. त्या अपघातामध्ये टेंम्पोचे नुकसान झाले व ड्रायव्हरला मार लागला. सदर नुकसानीमध्ये टेंम्पोची धडी तुटली, समोरील काच फुटली तसेच इंजिन फुटले, समोरचे दोन्ही दरवाजाची मोडतोड झाली, स्टेअरिंग तुटली, चेसी पुर्णपणे बेंड झाली. तसेच दोन्ही हेडलाईट तुटल्या, टुल्स तुटले, बॉडीची पुर्णपणे मोडतोड होऊन टेंम्पो टोटल लॉस झाला. टेंम्पोचे एकुण रक्कम रुपये 5,00,000/- चे नुकसान झाले. तसेच टेंम्पोमधसील माल खाद्य तेलाचे व तुपाचे डबे यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. तक्रारदार यांनी त्यानंतर शुभम मोटर्स प्रा.लि.अहमदनगर यांचेकडे सदर टेंम्पोबाबतच्या स्टेअरपार्टची व इतर सामानाची झालेल्या नुकसानीबाबत सांगितले. शुभम मोटर्स प्रा.लि. यांचेकडे त्या टेंम्पोची तपासणी करुन झालेल्या नुकसानीबाबतच्या स्पेअरपार्टच्या किंमतीचे कोटेशन घेतले. तसेच टेंम्पोच्या रिपेअरींगबाबत लेबर चार्जेस बाबत आढावा घेऊन इस्टीमेट घेतले. सदर टेंम्पो अपघात ठिकाणापासून टेंम्पो साईबाबा क्रेन सर्व्हीस यांचेकडील क्रेनचे सहायाने अपघातातील टेंम्पो करमाड ता.जि.औरंगाबाद येथून टेंम्पो अहमदनगर येथे रिपेअरींगसाठी आणला. त्यासाठी क्रेन भाडे 17,000/- तसेच अपघात ठिकाणी तक्रारदाराला व त्याच्या साथीदाराला जाण्यासाठी भाडोत्री वाहन करावे लागले, त्यासाठी रुपये 5,000/- खर्च आला. सदर अपघाताबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या औरंगाबाद कार्यालयामध्ये माहिती दिली. त्यानंतर सामनेवाला इन्शुरन्स कंपनीचे सर्व्हेअर अहमदनगर येथे शुभम मोटर्स येथे आले व त्यांनी टेंम्पोचे झालेल्या नुकसानीची पाहाणी करुन तसा अहवाल सामनेवाला विमा कंपनीला अहवाल सादर केला. त्यानंतर तक्रारदाराने सदरचे टेंम्पोच्या नुकसानीबाबतची सर्व कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे देऊन पुर्तता केली. व विमा दावा मिळावा म्हणून विनंती केली. असे असतांना सामनेवाला यांनी दिनांक 18.12.2014 रोजी पत्र पाठवून अपघातातील टेंम्पो तक्रारदार यांनी अपघातानंतर रावसाहेब जगन्नाथ आव्हाड यांना विक्री केला आहे. म्हणून विमा दावा देता येणार नाही. त्यामुळे त्या कारणाने तक्रारदाराचा विमा दाव्याची विनंती सामेनवाला यांनी नाकारली. त्यामुळे तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परच्छिेद क्र.8 प्रमाणे मागणी केली केली आहे.
3. सामनेवाला विमा कंपनी यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.11 वर दाखल केली आहे. त्यामध्ये सामनेवाला यांनी असे कथन केले की, त्यांनी सदरहू वाहनाचा विमा दिनांक 18.02.2014 ते 17.02.2015 या कालावधीमध्ये विमा उतरविला होता ही बाब मान्य केली आहे. व त्यामध्ये विमा पॉलीसीचे इन्शुरन्स डिक्लेअर्ड रक्कम रुपये 4,10,000/- अशी आहे. सदरहू टेंम्पोचा अपघात झाला ही बाब तक्रारदाराने सामनेवाला यांना कळविली व त्याप्रमाणे सामनेवाला यांचे सर्व्हेअरने घटनास्थळी जाऊन सदर अपघातग्रस्त टेंम्पोची पाहाणी केली. व त्याप्रमाणे सर्व्हेअर श्री.अर्जुन नाईक रा.औरंगाबाद यांनी वाहनाचे नुकसानीचा तपासणी अहवाल सामनेवाला इन्शुरन्स कंपनीकडे सादर केला. व सर्व्हेअरच्या अहवालानुसार त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम रुपये 3,50,029/- अशी काढलेली आहे. त्यानंतर विमा कंपनीने संपुर्ण कागदपत्रांची पाहाणी केली, त्यानुसार त्यांना लक्षात आले की, टेंम्पोचे रजिस्ट्रेशन हे आर.टी.ओ. ठाणे मध्ये झालेले आहे. आणि सदरहू वाहनाचा तक्रारदार हा मुळ मालक आहे. परंतु अपघातापुर्वी म्हणजेच दिनांक 01.07.2014 रोजी सदरहू वाहन हे त्यांनी रावसाहेब जगन्नाथ आव्हाड यांना विकलेले आहे. ही बाब त्यांना आर.टी.ओ.च्या कागदपत्रावरुन लक्षात आली. सदरचे दस्तावेज दिनांक 21.08.2014 रोजी आर.टी.ओ. ठाणे मध्ये केलेले आहे. त्यामुळे सदरचे वाहनाचे तक्रारदार हा मालक नसुन रावसाहेब जगन्नाथ आव्हाड हे सदर टेंम्पोचे मालक असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाही. अशा प्रकारे विमा कंपनीने दिनांक 18.12.2014 रोजी तक्रारदाराला पत्र देऊन तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. त्यामध्ये सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. योग्य कारणास्तव विमा दावा नाकारला आहे. पुढे असे कथन केले की, जर मंचाचे मत सदरची तक्रार मंजूर करण्याचे निष्कर्षाप्रत आले तर सामनेवालाचे सर्व्हेअरनी जो नुकसान भरपाईचा अहवाल दिला आहे त्यामध्ये 3,50,029/- रुपयाची नुकसान भरपाई योग्य आहे असे कथन केले आहे. सबब तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.जाधव यांनी केलेला युक्तीवाद तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.बंग यांनी केलेल्या युक्तीवादावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | सामनेवाला यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी केली आहे काय.? | ... नाही. |
2. | तक्रारदार हा विमा दाव्याची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय.? | ... नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे त्यांचे मालकीचा टेंम्पो नं.एम.एच.04/सी.पी.3166 या वाहनाचा ते मालवाहतुकीसाठी वापर करीत होते. सदरहू टेंम्पोचा सामनेवाला यांचेकडे दिनांक 18.02.2014 ते 17.02.2015 या कालावधीमध्ये विमा उतरविला होता. त्याप्रमाणे विमा पॉलीसीची रक्कम रुपये 19,181/- सामनेवाला यांचेकडे तक्रारदाराने भरलेली आहे. सदरहू टेंम्पोचा विमा पॉलीसीचा नंबर ओजी-14-1905-1803-00004878 असा आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. दिनांक 18.08.2014 रोजी सदर टेंम्पो हा अशोक दगडू वारे हा खुद्द चालवित होता. सदर वाहनामध्ये खाद्य तेलाचे डबे नागपूर येथे भरुन औरंगाबाद येथे पोहच करण्याचे होते. त्यामुळे तक्रारदाराचा ड्रायव्हरने सदर टेंम्पो दिनांक 18.08.2014 रोजी औरंगाबाद जालना रोडने घेऊन जात असतांना टेंम्पो लाडगांव ता.जि.औरंगाबाद शिवारात रस्त्यावरील पुलाला धडकुन अपघात होऊन पलटी झाला. ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराने पोलीस पेपर्स दाखल केलेले आहेत. त्यासाठी सदरहू अहवालात अपघात झाला आहे ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने विमा पॉलीसी प्रकरणात दाखल केलेली आहे. अपघात झाल्यानंतर तक्रारदाराने विमा दावा संपुर्ण कागदपत्रासह सामनेवाला विमा कंपनीकडे सादर केला व सामनेवाला विमा कंपनी यांनी सदरहू वाहनाचा विमा उतरविला होता ही बाब मान्य केली आहे. व अपघात मान्य केला. मात्र संपुर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांचे निदर्शनास आले की, सदरचे टेंम्पो वाहन हे अपघातापुर्वीच तक्रारदाराने रावसाहेब आव्हाड या व्यक्तीला विकलेले आहे. त्याबाबतचा आर.टी.ओ. ठाणे यांचेकडील दस्त प्रकरणात जोडला आहे. सदरचे वाहन हे दिनांक 01.07.2014 रोजी विकले आहे व अपघात हा दिनांक 18.08.2014 रोजी झालेला आहे. त्यामुळे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी सदरचे वाहन हे दुस-या व्यक्तीला विकलेले होते. त्यामुळे तक्रारदार हा सदर वाहनाचा अपघातावेळी मालक नव्हता ही बाब दाखल दस्तावरुन स्पष्ट होते असे सामनेवाला यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये बचाव घेतला आहे. त्याबाबतचे दस्त प्रकरणात दाखल केले आहेत. सदरहू दस्ताचे अवलोकन केले ते दस्त आर.टी.ओ.ठाणे यांचे असून त्यावर रावसाहेब जगन्नाथ आव्हाड या व्यक्तीला सदरचे वाहन विकल्याची नोंद आहे. त्यासोबत फॉर्म नंबर 28 त्यावर सुध्दा रावसाहेब जगन्नाथ आव्हाड या व्यक्तीचे नावाची नोंद आहे. सदरचा दस्त हा दिनांक 03.07.2014 रोजीचा आहे. त्यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी सदरचे वाहन हे अपघातापुर्वीच दुस-या व्यक्तीला विकलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवालाकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. व सामनेवालाने योग्य कारणास्तव तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे.
6. तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे किती नुकसान झाले व त्यासाठी शुभम मोटर्सकडे ते वाहन दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले असे कथन केले. सामनेवाला यांना कळविल्यानंतर सामनेवाला यांनी त्यांचे नियुक्त सर्व्हेअर यांना शुभम मोटर्स यांचेकडे पाठवून सदरहू वाहनाची तपासणी केली व सर्व्हेअर यांनी वाहनाची तपासणी करुन त्यांचा अहवाल सामनेवाला विमा कंपनीला सादर केला. यावरुन वाहनाचे नुकसान झाले आहे हे स्पष्ट होते. व सर्व्हेअर यांनी तशी नुकसानीची रक्कम तपासणी अहवालामध्ये नमुद केलेली आहे. मात्र संपुर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता, ज्यावेळी वाहनाचा अपघात झाला त्यावेळी मुळ मालक यांनी सदरहू टेंम्पो वाहन रावसाहेब जगन्नाथ आव्हाड या व्यक्तीला विकलेले आहे. तसा आर.टी.ओ.ठाणे यांचा दस्त प्रकरणात सामनेवाला यांनी दाखल केलेला आहे. व त्यावरील नमुद तारखेनुसार नमुद टेंम्पो वाहन हे अपघातापुर्वीच सदरचे व्यक्तीला विकलेले आहे. त्यामुळे वाहनाचा मालक हा तक्रारदार नसून रावसाहेब जगन्नाथ आव्हाड हा आहे हे दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराने विमा दाव्याची व नुकसान भरपाईची जी मागणी केलेली आहे ती तक्रारदाराला देता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
4. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.