(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार क्र.1 व 2 यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार क्र.1 व 2 यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार क्र.1 व 2 हे दोघे राहणारे अकोला ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांचे वडील कै.श्री.रमेश रामराव गर्जे यांना सामनेवाले हॉस्पीटलमध्ये दिनांक 30.04.2013 रोजी दुपारी 3.30 वाजेचे सुमारास औषधोपचाराकरीता अॅडमिट करण्यात आले होते. तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांच्या आजाराचे पुर्व इतिहासाबाबत डॉ.दिपक यांचे दिपक हॉस्पीटल, अहमदनगर ची सर्व कागदपत्रे दाखवली. त्याप्रमाणे डॉक्टरांनी कागदपत्रे पाहून व माहिती घेऊन तक्रारदार यांचे वडीलांना सामनेवाले हॉस्पीटलमध्ये अॅडमीट करुन घेतले होते. तक्रारदार यांचे वडीलांना सामनेवाले हॉस्पीटमध्ये अॅडमीट करुन घेतल्यानंतर पेशंटची रक्त लघवी ची टेस्ट केल्यानंतर, सदर रिपोर्टप्रमाणे पेशंटचे डायलिसीस करणे अत्यंत आवश्यक असताना देखील पेशंटचे डायलिसीस केले नाही. तक्रारदार यांचे वडीलांची नाजुक स्थिती असतांना देखील, अतिदक्षता विभागातील दक्षतेसाठी सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वडीलांना अतिदक्षता विभागामध्ये अॅडमीट करुन घेतले नाही. तक्रारदार यांचे वडीलांना सामनेवाले हॉस्पीटलमध्ये अॅडमीट करुन घेऊन त्यांचे आवश्यक असणा-या सर्व टेस्ट घेऊन, पेशंटला कृत्रिमरित्या ऑक्सीजन पुरवणे अत्यावश्यक असतानादेखील सामनेवाले हॉस्पीटलमध्ये तक्रारदार यांचे वडीलांना ऑक्सीजन पुरवला नाही. तसेच पेशंटला युरिनची बॅग लावणे अत्यंत आवश्यक असताना देखील अशा प्रकारची सेवा दिली नाही. तक्रारदार यांचे वडील यांचा सामनेवाले हॉस्पीटलमध्ये अत्यावश्यक औषधोपचार करत असताना ई.सी.जी. केला नाही. व आमचे वडील मयत झाल्यानंतर त्यांचा ई.सी.जी. केला. तक्रारदार यांचे मयत वडीलांना दिनांक 01.05.2013 रोजी रात्री 1.30 वाजता त्यांची स्थिती नाजुक असताना पुअर (Poor) असा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यानंतर पेशंटला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सर्व परिस्थिती आटोक्याचे बाहेर गेल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करुन घेण्यात आले. व त्यांचेवर उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. सामनेवाला यांचे हॉस्पीटलमधील संबंधीत डॉक्टरांनी औषधोपचारादरम्यान युरिन बॅग न लावलेमुळे मुत्राशयावर ताण पडला. तसेच त्यामुळे हृदयावर ताण येवून पेशंटची प्रकृती अधिकाधिक ढासळत गेली, त्याबाबत योग्य ती काळजी दक्षता न घेता योग्य सेवा न पुरवल्यामुळेच, निष्काळजीपणाने औषधोपचार केल्यामुळे तक्रारदार यांचे वडीलांचा मृत्यू झाला. यासाठी संपुर्णतः सामनेवाला हे जबाबदार आहेत. तसेच तक्रारदार यांचे वडीलाची डेथ बॉडी हॉस्पीटलमधून पोष्ट मॉर्टमसाठी पाठविलेले नाही. तक्रारदार यांचे वडील हे घरातील कर्ता पुरुष होते व त्यांचे कुंटूबाचा सर्व कारभार पाहात होते. त्यांचेवरच सर्व कुंटूबाची जबाबदारी होती. सामनेवाला हॉस्पीटलमध्ये योग्य ती ट्रीटमेंट केली नसल्यामुळे व सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे वडीलांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांना आता भविष्यात त्यांचा कोणत्याही प्रकारचा आधार राहिलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी निष्काळजीपणा करुन तक्रारदार यांचे वडीलांचा मृत्यू झाला. त्यामुळे तक्रारदारानी मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद 10 प्रमाणे मागणी केली आहे.
3. सामनेवाला यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.13 वर दाखल केली आहे. त्यामध्ये यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचे वडीलांना सामनेवाला यांचे हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करुन घेतले. तक्रारदार यांचे वडीलांना पोटदुखी, उलटी वगैरे तक्रारीबाबत सामनेवाले यांचे हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केले होते. सामनेवाले यांचे स्टाफने ताबडतोब पेशंटचे रक्त व लघवीच्या टेस्ट घेतल्या
सोनोग्राफी पोटाचा एक्सरे सदर टेस्टमध्ये तत्काळ डायलीसीस करण्यासारखे कोणतेही घटक आढळून आले नाही. तसेच त्यांचे रक्तात ऑक्सीजनचे प्रमाण 98 टक्के असे होते. त्यांचा रक्तदाब हा सुध्दा अतिदक्षता विभागात दाखल करण्याइतका वाढलेला नव्हता. कृत्रिम ऑक्सीजन देण्याची किंवा अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता नव्हती. तसेच पेशंटला युरीन बॅग लावणे हा मुद्दा पेशंटचे शारीरीक परिस्थितीवर अवलंबून असतो. पेशंट स्वतःहून लघवीस जाणेचे स्थितीत असताना तसेच मुत्र मार्गात कोणताही अडथळा नसताना पेशंटला युरीन बॅग लावण्याची आवश्यकता नाही. तक्रारदाराचे वडीलांना व त्यांचे नातेवाईकांनी पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल करताना हृदया संबंधी कोणतीही तक्रार केलेली नव्हती. तसेच पेशंटच्या छातीचे एक्सरे मध्येही कोणतीही अनियमीतता आढळलेली नाही. तसेच डॉ.दिपक यांचे इ.सी.जी. मध्येही कोणतीही काळजी करण्यासारखी नव्हती. तक्रारदार यांनी खोटी तक्रार केलेली आहे. पेशंटचे रिपोर्टमध्ये पुवर हा जो शब्द वापरलेला आहे, त्याचा अर्थ पेशंटचे परिस्थितीत अपेक्षे इतक्या वेगाने सुधार न झाल्याबाबत वापरलेला आहे. पेशंटची प्रकती अतिशय नाजुक झालेली असल्यामुळे पेशंटला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. पेशंटला युरीन बॅग न लावल्यामुळे मुत्राशयावर ताण पडून व हृदयावर ताण येऊन पेशंटचा मृत्यू झाला ही बाब चुकीची आहे. तसेच पेशंटची डेथ बॉडी पोस्ट मॉर्टेमकरीता कोणतीही मागणी केलेली नव्हती. पेशंटचा मृत्यू Sepsis मुळे व माहित असलेल्या कारणामुळे झालेला असल्यामुळे अशा केसची डेड बॉडी पोस्ट मार्टमकरीता पाठविली जात नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी केलेली सर्व तक्रार ही खोटया व बनावट स्वरुपाची आहे. त्यांची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी अशी सामनेवाला यांनी मंचाला विनंती केली आहे.
4. सामनेवाला नं.2 विमा कंपनी यांना तक्रारदारानी तक्रारीमध्ये दाखल केल्यानंतर सामील केले आहे व त्यांना मंचाची नोटीस पाठविली. सदरहू नोटीस सामनेवाला नं.2 यांना प्राप्त झाली, परंतू ते प्रकरणात हजर झाले नाही. त्यामुळे सामनेवाला नं.2 यांचे विरुध्द निशाणी 1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.वाळके यांनी केलेला तोंडी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.आसावा यांनी केलेला तोंडी युक्तवादाचे अवलोकन केले. व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | सामनेवाला यांचेकडून निष्काळजीपणा झाला हे तक्रारदाराने सिध्द केले आहे? | ... नाही. |
2. | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास पात्र आहेत काय.? | ... नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
6. मुद्दा क्र.1 व 2 ः- तक्रारदार क्र.1 व 2 यांचे वडील कै.श्री.रमेश रामराव गर्जे यांना दिनांक 30.04.2013 रोजी दुपारी 3.30 वाजेचे सुमारास सामनेवाला यांचे हॉस्पिटलमध्ये औषधोपचाराकरीता अॅडमिट करण्यात आले. ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांचे वडीलांना अॅडमिट केल्यानंतर रक्त लघवी ची टेस्ट केली, आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. याबाबतचे दस्त प्रकरणात दाखल आहेत. तक्रारदार यांचे वडीलांना डायलिसीस करणे आणि अतिदक्षता विभागात अॅडमिट केले नाही. तसेच पेशंटला कृत्रिमरित्या ऑक्सीजन पुरवणे अत्यावश्यक असतानासुध्दा सामनेवाले यांनी कोणतीही काळजी केलेली नाही. तसेच त्यांना युरिनची बॅग लावणे अत्यंत आवश्यक असताना ती लावली नाही. तक्रारदार यांचे वडील यांचा सामनेवाले हॉस्पीटलमध्ये अत्यावश्यक औषधोपचार करत असताना ई.सी.जी. केला नाही असे कथन केले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे तक्रारीवर त्यांचे लेखी कैफियतीमध्ये असा बचाव घेतला आहे की, तक्रारदार यांचे वडीलांची प्रकृती ही अतिदक्षता विभागात ठेवण्यासारखी नव्हती. तसेच पेशंटला डायलीसीसची गरज नसतांना त्यांना डायलीसीस देणे आवश्यक नव्हते. तक्रारदार यांचे टेस्टमध्ये तात्काळ डायलीसीस करण्यासारखे कोणतेही घटक आढळून आले नव्हते. तसेच त्यांचे रक्तात ऑक्सीजनचे प्रमाण 98 टक्के असल्यामुळे कृत्रिम ऑक्सीजन देण्याची गरज नव्हती. मुत्र मार्गात कोणतीही अडचण नसल्याने पेशंटला युरीन बॅग लावण्याची आवश्यकता नाही असे कथन केले आहे. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे औषधोपचाराचे कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली आहेत. मंचाने सदरहू कागदपत्राचे अवलोकन केले. त्यामध्ये असा कोणताही दस्त दाखल नाही की, सामनेवाला यांनी सदरहु उपचारासाठी तक्रारदाराने नमुद केलेल्या बाबी करणे गरजेचे आहे. तसेच तक्रारदाराचे वडीलांनी व त्यांचे नातेवाईकांनी पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल करताना हृदया संबंधी कोणतीही तक्रार केलेली नव्हती. तसेच पेशंटच्या छातीचे एक्सरे मध्येही कोणतीही अनियमीतता आढळलेली नाही. तक्रारदार यांचे वडीलांना युरीन बॅग न लावल्यामुळे मुत्राशयावर ताण आला व हृदय विकाराचा झटका आला ही बाब स्पष्ट करण्यासाठी विशेष तज्ञ डॉक्टरांचा अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतु प्रकरणात तक्रारदार यांनी तसा अहवाल दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराचे वडीलांना डायलिसीस केलेले नाही व अति दक्षता विभागात ठेवले नाही. व युरीन बॅग लावली नाही, त्यामुळे तक्रारदाराचे वडीलांचा मृत्यू झाला या संदर्भात कोणतीही कागदपत्रे तक्रारदार यांनी दाखल केलेली नाही. सदरची बाब सामनेवाला यांनी काळजीपुर्वक न केल्यामुळे तक्रारदार यांचे वडीलांचा मृत्यू झाला हे दर्शविण्यासाठी एकही विशेष तज्ञ डॉक्टरांचा अहवाल किंवा त्यासंबंधी कागदपत्रे प्रकरणात दाखल केली नाहीत. दाखल केलेल्या कागदपत्रावरुन तक्रारदार यांचे वडीलांचा मृत्यूचे कारण हे Cardio respiratory असल्याचे नमुद केलेले आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार यांचे वडीलांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. सदरची बाब ही सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे झाली असे म्हणता येणार नाही. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होणे ही बाब अचानक होणारी आहे. तक्रारदाराच्या वडीलांचा मृत्यू पेशंटच्या निष्काळजीपणामुळे हे तक्रारदाराचे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. डॉक्टरांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केला ही बाब स्पष्ट करण्यासाठी विशेष तज्ञ डॉक्टराचे यंत्रणेचा अहवालाची आवश्यकता होती. तसा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल करणे गरजेचे होते व ते त्यांनी प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे डॉक्टराकडून निष्काळजीपणा करण्यात आला असे म्हणता येणार नाही. सामनेवाला यांनी त्यांचे बचावाचे पृष्ठयर्थ मा.राष्ट्रीय आयोग यांचे काही न्याय निवाडे दाखल केलेले आहेत ते खालील प्रमाणे.
1) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI. Naseem Mohammed Bashir Ansari V/s. Dhange Hospital and Others.
“ No medical expert’s opinion or any medical literature has been shown to prove that this haemorrhage was caused by any act of medical negligence on the part of the respondent. ”
5. In this case post-mortem of the deceased was conducted and death was found to be due to cardio-respiratory failure, due to haemorrhage and shok due to post-partem haemorrhage due to Disseminated Intra vascular Coagulopathy (D.I.C.). No medical expert’s opinion or any medical literature has been shown by the appellant-complainant to prove that this haemorrhage was caused by any act of medical negligence on the part of the respondents, especially Dr.Jaya. Law on the subject is well settled by the Hon’ble Supreme Court in the case of Dr.Jacob Mathew v/s. State of Punjab, 2005 (6) SLT 1. In this case it was held that the onus of proof of medical negligence lies with the complainant.
2) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI.
K.Venkateshwarlu V/s. Managing Director, Nagarjuna Hospital.
“ Expert evidence showing that surgery was requited- Complainant has not lead any adequate evidence with supportive medical text and not examined any expert doctor to support his case- It cannot be expected that every physician or surgeon is gifted with extra ordinary skills or they can perform miracles- What is expected of a doctor is whether the procedure adopted by the doctor acceptable to medical profession- Case of medical negligence not made out. ”
वरील दाखल केलेल्या मा.राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचे न्याय निवाडयाचे मे.मंचाने अवलोकन केले. सदरचे न्याय निवाडयातील निर्णीत बाबीमध्ये डॉक्टराकडून निष्काळजीपणा सिध्द करण्यासाठी तज्ञांचा अहवाल घेणे आवश्यक आहे ही बाब दर्शविण्यात येते. व ते न्याय निर्णय सदरचे प्रकरणामध्ये सामनेवाला यांचे बचावाचे प्रित्यर्थ तंतोतंत जुळतात.
7. तक्रारदार यांनी दाखल केलेली उपचाराची कागदपत्रे व सामनेवाला यांनी घेतलेला बचाव तसेच मा.राष्ट्रीय आयोगाचे न्याय निर्णय यावरुन सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांचे वडीलावर उपचार देण्यात कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही हे सिध्द झालेले आहे. सबब तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
8. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श -
1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क दयावी.
4) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तास परत करावी.