निकालपत्र
निकाल दिनांक – १८/०६/२०२०
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदार हे मौजे निंबाडी ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी व खातेदार आहेत व त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे. त्यांचे मालकीची मौजे निंबोडी ता.जि. अहमदनगर येथे शेतजमीन मिळकत गट नंबर ११७ क्षेत्र २ हेक्टर ६५ आर आहे. सदरील मिळकतीपैकी २ हेक्टर क्षेत्रामध्ये तक्रारदार यानी संत्राची बाग ही सन २००६ साली लावलेली होती. तक्रारदार यांनी सदरील बागेची चांगल्या प्रकारे मेहनत मशागत करून बाग चांगल्या प्रकारे आणलेली होती. तक्रारदार यांनी सन २०१५-२०१६ या वर्षासाठी सामनेवालेकडे हवामानावर आधारीत पिक विमा योजनेमध्ये तक्रारदार यांचे मिळकतीमध्ये असणारे संत्रा पिकाचा विमा सामनेवाले विमा कंपनीचे नियमाप्रमाणे असणा-या प्रिमीयमची रक्कम अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. अहमदनगर शाखा – भिंगार ता.जि. अहमदनगर या बॅंकेत दिनांक १४-१२-२०१५ रोजी रक्कम रूपये ६,९१६/- इतकी जमा करून सामनेवालेकडे संत्रा फळबागेचा विमा उतरविलेला होता. दिनांक ०१-०३-२०१६ रोजी वादळी पाऊस तसेच गारपिट होऊन त्या गारपिट व वादळामध्ये तक्रारदार यांच्या संत्रा बागेस आलेल्या संपुर्ण फळाची तसेच झाडांचे प्रचंड असे नुकसान झाले होते. त्या संदर्भात महसुल अधिकारी यांनी दिनांक ०३-०३-२०१६ रोजी समक्ष जमिनीवर येऊन झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे केले आहे. इतकेच नव्हे तर तक्रारदार यांनी वादळ व गारपीट यामुळे तक्रारदार यांचे संत्रा बागेचे झालेल्या नुकसानीबाबत सामनेवाले विमा कंपनीस दिनांक ०३-०४-२०१६ रोजी फॅक्स नंबर ०२४१/२३२८५११ वर फॅक्स केला आहे. अशाप्रकारे सदरील झालेल्या नुकसानीची सामनेवाले विमा कंपनी कल्पना दिलेली आहे. सामनेवाले यांना तक्रारदाराचे फळबागेचे नुकसान झाले बाबत कळवुनही त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजुर करून अद्याप पावेतो हवामानावर आधारीत फळ पिक विम्याची रक्कम मंजुर करून पाठविलेली नाही. वादळी पावसामुळे तक्रारदाराचे बागेचे एकुण रक्कम रूपये ५,००,०००/- चे नुकसान झाले आहे. त्या संदर्भात महसुल अधिकारी यांनी सविस्तर पंचनामे केलेले आहेत. सदर नुकसान भरपाई मिळणेबाबत सामनेवाले यांना वकिलामार्फत दिनांक ०९-०८-२०१६ रोजी नोटीस पाठविली होती. सदर नोटी प्राप्त होऊनही सामनेवाले यांनी क्लेमची रक्कम अदा न करता दिनांक २६-०८-२०१६ रोजी पत्र देऊन संत्रा पिकाची रक्कम देता येत नाही असे खोटेनाटे पत्र देऊन नुकसान भरपाई रक्कम देण्याचेकामी टाळाटाळ केली. अशाप्रकारे सामनेवालेने तक्रारदाराची फसवणुक करून अनफेर ट्रेड प्रॅक्टीस करून तक्रारदार यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सदर तक्रार मे. मंचात दाखल करावी लागली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ६ वर दस्तएवेज यादीसोबत एकुण १२ कागदपत्र दाखल केले आहेत. त्यामध्ये सामनेवाले यांना पोस्टाने पाठविलेल्या नोटीसी पावती, सामनेवाले यांना नोटीस मिळाल्याची पोहोच पावती, सामनेवाले यांनी पाठविलेल्या नोटीसचे पाकीट, तक्रारदाराने पाठविलेल्या नोटीसची छायांकीत प्रत, सामनेवाले यांचे नोटीस उत्तर, बॅंकेला दिलेला पिकाचे नुकसान झाल्याबाबतचा अर्ज, बॅंकेत भरलेल्या विमा हप्त्याची पावती, तलाठी यांनी तहसिलदार यांना पाठविलेले पत्र, ग्रामसेवक व तलाठी यांनी केलेले पंचनामे, शेती विभागाला पाठविलेले पत्र, सामनेवाले यांना केलेला फॅक्स, बॅंके भरलेला विम्याचा फॉर्म दाखल आहे. तसेच निशाणी १४ वर तक्रारदाराचे रिजॉईंडर शपथपत्र दाखल आहे. निशाणी १६ फोटोंच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
४. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना मे. मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. त्यानुसार सामनेवाले हजर होऊन त्यांनी कैफीयत निशाणी १२ वर दाखल केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रादाराला तक्रादार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नसुन सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे तत्वात बसत नाही व सदरी तक्रारीतील मजकुर नाकबुल आहे, असे नमुद केले आहे. पुढे त्यांनी असे कथन केले आहे की, महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय क्रमांक विमायो१०१५/प्रक्र१७९(१)/१४एदिनांक३डिसेंबर२०१५ मध्ये संत्री पिकाचे इन्शुरन्स बाबत Exhibit ‘B’ मध्ये पुढीलप्रमाणे परिच्छेदमध्ये नमुद आहे.
‘ राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रम अंतर्गत हवामानावर आधारित विमा योजना २०१५-१६ मध्ये द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, केळी, आंबा व काजू या फळपिकांकरीता लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना सन २०१५-१६ मध्ये सहपत्र-१ मध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यातील तालुक्यातील निवडलेल्या महसूल मंडळात सहपत्र-२ मध्ये नमूद केल्यानुसार लागू करण्यात येईल. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी सहपत्र-१ मध्ये नमूद केल्यानुसार महसूल मंडल पातळीवर नोंदणीकृत त्रयस्थ संस्थेमार्फत संदर्भ हवामान केंद्र स्थापन करेल व तेथे नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि सहपत्र-२ मध्ये नमूद केलेली प्रमाणे यांची सांगड घालून शेतक-यांना विमा कंपनीमार्फत परस्पर नुकसान भरपाई देय होईल. तसेच Operating paragraph from State Govt. resolution for WBCIS Ambia Bahar 2015-16 यामध्ये पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना दिलेली आहे.
विमा संरक्षित रकमेची परिगणना -
वरील संदर्भ क्रमांक १ मधील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुनांमधील मुद्दा क्रमाक १० मधील (१०.२) नुसार एखाद्या फळपिकाचा विमा दर विमा कंपनीने निर्धारित दरापेक्षा जास्त दर्शविलेला असेल तर वाढीव विमा दराच्या प्रमाणात विमा संरक्षित रक्कम कमी होईल. उदा:- (विमा संरक्षित रकमेची परिगणना) द्राक्ष पिकाचे १२ टक्के प्रमाणे निर्धारित (कॅप लेवले) व विमा संरक्षित रक्कम रूपये १,५०,०००/- प्रमाणे आहे आणि विमा कंपनीने सदर निर्धारित दरापेक्षा जास्त विमा दर (१६ टक्के) नमूद केलेला असेल तर वाढवलेल्या विमा दराच्या प्रमाणात विमा संरक्षित रक्कम कमी होईल व हवामान धोक्याची (सहपत्र २ नुसार) नुकसान भरपाईची रक्कम त्या प्रमाणात कमी होईल. निर्धारित विमा दर/ विमा कंपनीने सादर केलेला दर = १२/१६=०.७५ गुणक येईल. १२ टक्के प्रमाणे निर्धारित संरक्षित रक्कम १,५०,००० x गुणक (०.७५) = १,१२,५००/- संरक्षित रक्कम येईल. तसेच मा.राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांनी रिव्हीजन पिटीशन क्रमांक २२९३-२३९४/ २००८ मध्ये पारीत केलेल्या आदेशामध्ये पुढीलप्रमाणे नमुद केले आहे.
‘ ... in the aforementioned circumstances, orders passed by the District Forum and State Commission are set aside, and are directed to pass order on merits, especiaaly, after carefully going through the terms and conditions of the Scheme of National Agriculture Insurance scheme and Guidelines issued in that regard. They should first appreciate and understand the terms and conditions carefully as well as the ‘clarification’ given on each point by Ministry of Agriculture on ‘ Frequently Asked Questions’ and then go on to pass orders on merits after affording an opporutinity to all parties to argue the case on merits in terms of scheme in question’.
तक्रारदाराने तक्रारीत केलेली मागणी ही अतिशय जास्त जात आहे. सामनेवाले हे पिक विमा योजनेचे नियमानुसार तक्रारदारास नुकसान भरपाई देणेस जबाबदार ठरत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
सामनेवालेने खुलाश्याचे पुष्ट्यर्थ नि.१३ वर शपथपत्र दाखल केले आहे. त्यासोबत भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शक सुचनांचे प्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केले आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र पाहता तसेच सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र व दाखल कागदपत्र पाहता तसेच उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकला असता मंचासमोर न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार हे सामनेवालेकडुन नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
६. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी सन २०१५-२०१६ या वर्षासाठी सामनेवालेकडे हवामानावर आधारीत पिक विमा योजनेमध्ये तक्रारदार यांचे मिळकतीमध्ये असणारे संत्रा पिकाचा विमा सामनेवाले विमा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. अहमदनगर शाखा – भिंगार ता.जि. अहमदनगर या बॅंकेत दिनांक १४-१२-२०१५ रोजी रक्कम रूपये ६,९१६/- इतकी जमा करून सामनेवालेकडे संत्रा फळबागेचा विमा उतरविलेला होता. याबाबत विमा हप्ता भरलेची पावती व पॉलिसीची प्रत तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे. तसेच याबाबत उभयपक्षात वाद नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवालेचा कंपनीचा ग्राहक आहे, हे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (२ व ३) : तक्रारदार यांनी सन २०१५-२०१६ या वर्षासाठी सामनेवालेकडे हवामानावर आधारीत पिक विमा योजनेमध्ये तक्रारदार यांचे मिळकतीमध्ये असणारे संत्रा पिकाचा विमा सामनेवाले विमा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. अहमदनगर शाखा – भिंगार ता.जि. अहमदनगर या बॅंकेत दिनांक १४-१२-२०१५ रोजी रक्कम रूपये ६,९१६/- इतकी जमा करून सामनेवालेकडे संत्रा फळबागेचा विमा उतरविलेला होता. दिनांक ०१-०३-२०१६ रोजी वादळी पाऊस तसेच गारपिट होऊन त्या गारपिट व वादळामध्ये तक्रारदार यांच्या संत्रा बागेस आलेल्या संपुर्ण फळाची तसेच झाडांचे प्रचंड असे नुकसान झाले होते. त्या संदर्भात महसुल अधिकारी यांनी दिनांक ०३-०३-२०१६ रोजी समक्ष जमिनीवर येऊन झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे केले होत व संत्रा बागेचे झालेल्या नुकसानीबाबत सामनेवाले विमा कंपनीस दिनांक ०३-०४-२०१६ रोजी फॅक्स नंबर ०२४१/२३२८५११ वर फॅक्स केला आहे. सामनेवाले यांना तक्रारदाराचे फळबागेचे नुकसान झाले बाबत कळवुनही त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजुर करून अद्याप पावेतो हवामानावर आधारीत फळ पिक विम्याची रक्कम मंजुर करून पाठविलेली नाही. सामनेवाले यांनी त्यांचे बचावामध्ये असे नमुद केले की, तक्रारदाराने तक्रारीत केलेली मागणी ही अतिशय जास्त जात आहे. सामनेवाले हे पिक विमा योजनेचे नियमानुसार तक्रारदारास नुकसान भरपाई देणेस जबाबदार ठरत नाही.
वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचे संत्रा बागेचे दिनांक ०१-०३-२०१६ रोजी वादळी पाऊस तसेच गारपिट होऊन त्या गारपिट व वादळामध्ये संत्रा बागेस आलेल्या संपुर्ण फळाची तसेच झाडांचे प्रचंड असे नुकसान झाले होते व सदर बाब सामनेवाले यांना कळविली होती. त्या संदर्भात महसुल अधिकारी यांनी दिनांक ०३-०३-२०१६ रोजी समक्ष जमिनीवर येऊन झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे केले आहे. तसेच सामनेवाले यांनी त्यांचे बचावामध्ये Operating paragraphfrom State Govt. resolution for WBCIS Ambia Bahar 2015-16 यामधील मार्गदर्शक सुचनेचा उल्लेख केला आहे. सदर मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे
विमा संरक्षित रकमेची परिगणना -
वरील संदर्भ क्रमांक १ मधील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुनांमधील मुद्दा क्रमाक १० मधील (१०.२) नुसार एखाद्या फळपिकाचा विमा दर विमा कंपनीने निर्धारित दरापेक्षा जास्त दर्शविलेला असेल तर वाढीव विमा दराच्या प्रमाणात विमा संरक्षित रक्कम कमी होईल. उदा:- (विमा संरक्षित रकमेची परिगणना) द्राक्ष पिकाचे १२ टक्के प्रमाणे निर्धारित (कॅप लेवले) व विमा संरक्षित रक्कम रूपये १,५०,०००/- प्रमाणे आहे आणि विमा कंपनीने सदर निर्धारित दरापेक्षा जास्त विमा दर (१६ टक्के) नमूद केलेला असेल तर वाढवलेल्या विमा दराच्या प्रमाणात विमा संरक्षित रक्कम कमी होईल व हवामान धोक्याची (सहपत्र २ नुसार) नुकसान भरपाईची रक्कम त्या प्रमाणात कमी होईल. निर्धारित विमा दर/ विमा कंपनीने सादर केलेला दर = १२/१६=०.७५ गुणक येईल. १२ टक्के प्रमाणे निर्धारित संरक्षित रक्कम १,५०,००० x गुणक (०.७५) = १,१२,५००/- संरक्षित रक्कम येईल.
सामनेवाले यांनी मा.राष्ट्रीय आयोग, न्यु दिल्ली यांचा Revision Petition No.1654 of 2016 Agriculture Insurance Company of India Ltd. Vs. Badri Singh Bhisht and Anr. हा न्यायनिवाडा दाखल केला. तो सदर तक्रारीस लागु होत नाही.
यावरून तक्रारदार हे सामनेवालेकडुन वादळी पाऊस तसेच गारपिट होऊन संत्रा बागेस झालेल्या नुकसानीची माहीती सामनेवाले यांना मिळूनही त्यांनी तक्रारदाराचा नुकसान भरपाई दिली नाही, म्हणुन सदर बाब तक्रारदारप्रती सामनेवालेची सेवेमध्ये त्रुटी आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार यांनी मागीतलेली नुकसान भरपाईची रक्कम रूपये ५,००,०००/- बाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. म्हणुन नुकसान भरपाई देता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणुन विमा संरक्षीत रक्कम रूपये १,१५,२७५/- सामनेवालेकडुन मिळणेस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणुन मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
८ मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवालेने यांनी तक्रारदारास विमा संरक्षित रकमेपोटी १,१५,२७५/- (अक्षरी एक लाख पंधरा हजार दोनशे पंचाहत्तर मात्र) रूपये व त्यावर दिनांक २६-०८-२०१६ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. १० टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवालेने तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |