::: आदेश :::
( पारीत दिनांक : २७/०3/२०१४ )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ नुसार, दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ते हे मौजे त-हाळा ता. मंगरुळपीर, जि. वाशीम येथील रहिवाशी असुन शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तक्रारकर्ते यांची जमीन चांगली व ऊत्त्मदर्जाची आहे. तसेच तक्रारकर्ते यांच्या गावचा परिसर सुर्यफुलाच्या शेतीकरिता चांगलाच प्रसिध्द आहे. तक्रारकर्ते यांनी सन २०१०-२०११ मध्ये सुर्यफुल पेरणीकरिता झुआरीसिडस लिमीटेड, बंगलोर कंपनीचे एन.एस.एच. १६० सुर्यफुल बियाण्यांची निवड केली आणि त्याप्रमाणे मौजे शेलुबाजार येथील विरुध्द पक्ष क्र. २ ते ५ या कृषी सेवा केंद्रातून सुर्यफुल बियाण्यांची खरेदी केली, त्याचे विवरण तक्रारीत नमुद केले आहे. तसेच त्यासंबंधीचे बील तक्रारीसोबत जोडले आहे. बिलाची रक्कम नगदी अदा केलेली आहे. सदरलागवड तक्रारकर्ते यांनी दिनांक २०/०१/२०११ ते ०५/०२/२०११ या कालावधीत केली. परंतु सुर्यफुल वाणाची उगवण १५ ते २० दिवसानंतर देखील झाली नाही, व जी झाली तीअत्यंत अल्प प्रमाणात झाली म्हणून तशी तक्रार तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली, त्यानुसार त्यांनी शेताची पाहणी केली व सदरहू पाहणीतलॉट नंबर ४१७४३०८, ४१०७४३१००, २४३३९, ४७०७४३२०, ४१०७४०७५ व ९३२५ झुआरी सिडस ऊत्पादीत सुर्यफुल वाणाची लागवड केलेल्या मौजे त-हाळा येथील कास्तकारांच्यासुर्यफुल बियाण्याच्या ऊगवणशक्तीमध्ये दोष आहे, असा अहवाल दिला. तसेच त्यांनी शेताचे पंचनामे देखील केले. अहवाल प्रत जोडली आहे. सदर प्रकारामुळे सर्व तक्रारकर्तेयांचा खर्च वाया गेला व विरुध्द पक्ष यांनी फसवणूक केली म्हणून प्रत्येक तक्रारकर्त्यास तपशिलात दिल्याप्रमाणे नुकसान भरपाई विरुध्द पक्षाकडून वैयक्तीक व संयुक्तरित्यादेण्यात यावी तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च प्रत्येकी रुपये ५,०००/- देण्यांत यावा, अशी विनंती केली आहे.
सदर तक्रार, शपथेवर दाखल केली असून, त्यासोबत, एकंदर ४३ दस्तऐवज, पुरावे म्हणून जोडलेले आहेत.
२) विरुध्द पक्ष क्र. १, २ ते ५ यांचे लेखी बचावाचे निवेदन -
सदरहू तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंचाने सर्व विरुध्द पक्ष यांना नोटीस जारी केल्या. त्यानुसार क्र. विरुध्द पक्ष १ व २ ते ५ यांनी त्यांच्या बचावाचे कथनाव्दारे तक्रारीतील सर्व कथन फेटाळत, पुढे असे नमुद केले आहे की, झुआरी सिड्स लि. कंपनी ही उत्कृष्ट बियाणे निर्माण करणारी कंपनी आहे. म्हणून या कंपनीचे बियाण्याला बाजारात जास्त मागणी असते. कोणतेही बियाणे लागवडी नंतर उत्पादन येण्याकरिता बरेचसे घटक कारणीभुत असतात, त्यात पेरणीचा कालावधी, योग्य प्रमाणात पाऊस, जमिनीत असलेली ओल, जमिनीचा कस, योग्य रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर व शेतीचा दर्जा या सर्व गोष्टी जुळून आल्यास उत्तम पिक येते. त्यामुळे बियाणे हा एकमेव घटक जबाबदार धरता येणार नाही.
विरुध्द पक्ष क्र. २ ते ५ हे बियाणे विक्रेता असुन त्यांनी तक्रारदारांची स्वत:ची मागणी व आवडीनुसार त्यांच्या पसंतीचे सुर्यफुल बियाणे एन.एस.एच. १६० या जातीचे विकले आहे. विरुध्द पक्ष क्र. २ ते ५ यांनी खरेदीदारांनी मागणी केलेल्या कंपनीचे बियाणे विकलेले आहे, त्यामुळे त्यांचा दोष नाही. विरुध्द पक्ष क्र. २ ते ५ हे वादातील बियाण्याचे निर्माता नाहीत. कंपनीकडून आलेले बियाणे हे सिलबंद पाकीटात होते. विक्रेता कोणत्याही विकलेल्या बियाण्यांच्या उगवणी बद्दल हमी देत नसतो. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. २ ते ५ हे जबाबदार नाहीत. तक्रारकर्ता क्रमांक १ ते ८ यांनी मिळून एकत्रीतरित्या ही तक्रार दाखल केली, ती मंचासमोर चालू शकत नाही. तसेच तक्रारीमध्ये तक्रारदार क्रमांक १ ते ८ यांच्यापैकी कोणी व केंव्हा लागवड केली, याबाबत स्पष्ट उल्लेख तक्रारीत नाही. तक्रारकर्ते यांनी बियाणे खरेदीबाबत दिलेले विवरण चुकीचे आहे. तसेच बियाणे लागवड करण्याकरिता खते व किटकनाशके यांच्या वापराचा दिलेला खर्च हा चुकीचा आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांच्या नुकसानीस विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ५ जबाबदार नाहीत. बियाणे कायदा १९६६ प्रमाणे व अधिनियम २३ (अ) प्रमाणे शेतक-यांच्या तक्रारप्राप्ती नंतर कृषी अधिकारी यांनी बियाण्याचा नमुना घेवुन तो प्रयोगशाळेत पाठवुन तज्ञ अहवाल मागविला पाहिजे. तो या प्रकरणात मागविला नाही तसेच ग्राहक संरक्षण कायदा १९८६, कलम १३ (१) (क) प्रमाणे सुध्दा तक्रारकर्ते यांनी बियाण्याच्या दोषाबाबत तज्ञ अहवाल वि. मंचासमक्ष दाखल केलेला नाही. महाराष्ट्र शासनाने बियाण्याबाबत तक्रार प्राप्तीनंतर त्याची शहानिशा करुन, अहवाल तयार करण्याकरिता जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत केली आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध ७ तज्ञ लोकांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. समितीतील ७ ही सदस्यांनी शेतातील पिकाची पाहणी करुन मौका तपासणी अहवाल तयार करणे अत्यावश्यक आहे. सदर प्रकरणात असे घडलेले नाही कारण तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला दिनांक २४/०२/२०११ रोजीचा जिल्हा निवारण समितीचा अहवाल हा एक सदस्यीय अहवाल आहे. त्यावर समितीतील ७ ही तज्ञ सदस्यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे हा अहवाल विचारात घेता येणार नाही. या अहवालामध्ये कोणत्या गट नंबर मधील शेताची व किती एकराची पाहणी केली व कोणत्या शेतक-यांच्या शेताची पाहणी केली, त्यांची नांवे नमुद नाहीत. या अहवालात बियाण्यामध्ये दोष कशाचा आहे, याबद्दल नमुद नाही. केलेला पंचनामा हा बियाण्याच्या दोषाबद्दल स्तब्ध आहे. त्यामध्ये बियाण्याचा दर्जा व गुणवत्तेबाबत तसेच भेसळीबाबत काहीही नमुद नाही, त्यामुळे तक्रार खारीज करावी.
सदर लेखी जबाबासोबत एकंदर ५ व्यक्तींचे प्रतिज्ञालेख दाखल करण्यांत आले आहेत.
३) विरुध्द पक्ष क्रमांक ६ यांना या तक्रारीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी मंचासमोर तक्रारकर्ते यांनी जो अहवाल दाखल केला, तोच अहवाल निशाणी-१८ प्रमाणे दाखल करुन, त्यामध्ये तळटीप अशी दिलेली आहे की, दिनांक १७/०२/२०११ रोजी झुआरी सिडस लिमीटेड, बंगलोर ऊत्पादित सुर्यफुलाचा लॉट नंबर ४१०७४३०८ व दिनांक १९/०२/२०११ रोजी लॉट नंबर ४१०७४३४७ चा बियाणे नमुने बालाजी कृषी सेवा केंद्र शेलुबाजार ता. मंगरुळपीर येथुन घेण्यात आले होते त्याबाबत तपासणी अहवाल बिज परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथुन प्राप्त झाले असुन पास आलेले आहेत.
विरुध्द पक्ष क्रमांक ६ यांनी यासोबत तक्रारकर्त्यांचा अर्ज, पंचनामे व वरील २ लॉटचे बियाणे परीक्षण अहवाल दाखल केले आहेत.
४) ::: का र णे व नि ष्क र्ष :::
सर्व तक्रारकर्ते यांची एकत्रीत तक्रार, विरुध्द पक्ष क्र. १, २ ते ५ यांचा लेखी जवाब, उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्रमांक ६ यांनी दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता (दिनकर महादेव आगळे) यांचा पुरावा, त्यासोबत दाखल केलेले इतर व्यक्तींचे प्रतिज्ञालेख, इतर प्रकरणात दाखल असलेली कागदपत्रे ही यातक्रारकर्ते यांच्या प्रकरणात पहावी अशी तक्रारकर्त्यांची पुरसिस, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्र. १ ते ५ यांचा लेखी युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले न्याय-निवाडे, तसेच विरुध्द पक्ष क्र. ६ यांनी दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्त्याने दाखल केलेला न्याय-निवाडा, यांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणासहीत नमुद केले आहेत.
ही तक्रार एकंदर ८ तक्रारकर्ते यांनी एकत्रीत दाखल केलेली आहे. तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या शेतामध्ये सन २०१०-२०११ मध्ये ऊन्हाळी सुर्यफुलाची पेरणी करण्याकरिता विरुध्द पक्ष क्र. १ निर्मीत एन.एस.एच. १६० सुर्यफुल या जातीचे वाणाची खरेदी विरुध्द पक्ष क्र. २ ते ५ कडून केली व सदर बियाण्याची लागवड दिनांक २०/०१/२०११ ते ५/०२/२०११ या कालावधीत केली. पेरणी केल्यानंतर या बियाण्यांची ऊगवण अल्प प्रमाणात झाली, म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारअर्ज केला. जिल्हा तक्रार निवारण समितीने दिनांक २४/०२/२०११ रोजी श्री. दिनकर आगळे व इतर ३८ कास्तकार रा. त-हाळा, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम यांच्या शेताला क्षेत्रीय भेट देवून त्याचा अहवाल तयार केला व त्यानुसार झुआरी सिडस लिमीटेड कंपनी ऊत्पादीत सुर्यफुल या वाणाचा लॉट नंबर ४१७४३०८, ४१०७४१००, २४३३९, ४७०७४३२०, ४१०७४०७५, ९३२५ या बियाण्याचे ऊगवणशक्ती मध्ये दोष आहे, असा अहवाल दिला. म्हणून त्या अहवालावर अवलंबून सर्व तक्रारदारांना तक्रारीत नमुद केलेली नुकसान भरपाई मिळावी.
परंतु या तक्रारीची नोटीस जेंव्हा विरुध्द पक्ष क्र. ६ अध्यक्ष, जिल्हा तक्रार निवारण समिती तथा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परीषद, वाशिम यांना मिळाली तेंव्हा त्यांनी हा अहवाल निशाणी-१८ प्रमाणे दाखल करुन, तळटीपेमध्ये असे लिहीलेले आहे की, ‘‘ दिनांक १७/०२/२०११ रोजी झुआरी सिडस लिमीटेड, बंगलोर ऊत्पादित सुर्यफुलाचा लॉट नंबर ४१०७४३०८ व दिनांक १९/०२/२०११ रोजी लॉट नंबर ४१०७४३४७ चा बियाणे नमुने बालाजी कृषी सेवा केंद्र शेलुबाजार ता. मंगरुळपीर येथुन घेण्यात आले होते त्याबाबत तपासणी अहवाल बिज परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथुन प्राप्त झाले असुन पास “ आलेले आहेत ’’. म्हणजेच आता कृषी विकास अधिकारी, जिल्हा परीषद, वाशिम यांना झुआरी सिडस लिमीटेड कंपनी, बंगलोर ऊत्पादीत सुर्यफुल बियाण्याचा लॉट नंबर ४१०७४३०८ व ४१०७४३४७ बाबत बीज परीक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथुन पास हा शेरा मिळालेला आहे, असे म्हटले आहे व तसे या दोन लॉटचे बियाणे परिक्षण अहवाल रेकॉर्डवर दाखल केले आहेत. त्यामुळे वरील दोन बियाणे वापरलेले तक्रारकर्ते जसे की, तक्रारकर्ता क्रमांक ४,६ व ८ यांच्या तक्रारीबाबत विचार करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. कारण विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला न्याय-निवाडा,
I (2007) CPJ 266 (NC)
MAHARASHTRA HYBRID SEEDS CO. LTD. –Vs.- GOWRI PEDDANNA & ORS.
“ Consumer Protection Act, 1986 – Section 2 (1) (g) – Seeds- Supply of defective seeds alleged – Failure to prove – On the Contrary, testing laboratory report from an independent agency supports case of petitioner OP that seed was of 99.6 % purity- No deficiency in service proved – OP not liable. ”
यानुसार वि. राष्ट्रीय आयोग यांनीही असेच सुचविलेले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. ६ यांच्या अहवालापेक्षा, वरील लॉटचे बिज परिक्षण प्रयोगशाळा अहवालावर मंचाची भिस्त आहे.
तक्रारकर्ते यांच्या बाबतीत रेकॉर्डवर दाखल असलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसते की, तक्रारकर्ता क्रमांक १ यांच्या ७/१२ या दस्तात सोया या पिकाचा पेरा गाव नमुना बारा मध्ये दिसतो, त्यात सुर्यफुल हे पीक दिसत नाही. त्यांचे जेवढे क्षेत्र लागवडीखाली आहे त्यात सोया हेच पीक दिसून येते. त्यामुळे त्यांनी सुर्यफुलाचा पेरा कोणत्या क्षेत्रात केला ? हे स्पष्ट होत नाही. तक्रारकर्ते क्रमांक २ यांनी जो ७/१२ दस्त रेकॉर्डवर दाखल केला त्यात त्यांचे नांव नमुना सात अथवा नमुना बारा मध्ये कुठेही नाही.तसेच त्यात सुर्यफुलाचा पेरा दिसत नाही व ज्या व्यक्तीच्या नांवे ७/१२ दस्त आहे त्यांनी ही जमिन रमेश पांडूरंग गावंडे यांना बटाईने दिली, असे या तक्रारकर्त्याचे कथन आहे म्हणजे कागदपत्रे भिन्न आहेत. तक्रारकर्ता क्रमांक ३ यांच्या नांवाने पण ७/१२ दस्तात शेतजमीन नाही व सुर्यफुल पेरा नाही. जेवढे क्षेत्र दाखविले त्यात सोया, तूर,ज्वारी इ. पीक पेरा दिसतो. तक्रारकर्ते गजानन आगळे यांच्या नांवाने असलेल्या ७/१२ दस्तात देखील सुर्यफुल पेरा दिसत नाही. तक्रारकर्ता क्रमांक ४ रावसाहेब आगळे यांच्या नांवाने ७/१२ दस्तात शेती नाही व सुर्यफुल पेरा नाही. तक्रारकर्ता क्रमांक ५ – अंबादास पागृत यांच्या नांवे ७/१२ दस्तात शेतजमीन नाही, वहिती करणारे गोकर्ण सुखदेव दिसतात परंतु त्यात सुर्यफुल पेरा दिसत नाही, व जेवढे क्षेत्र दाखविले त्यात इतर पिके असल्यामुळे कोणत्या क्षेत्रात सुर्यफुल पेरले ? हे स्पष्ट होत नाही.तक्रारकर्ता क्रमांक ६ यांच्या ७/१२ दस्तात सुर्यफुल पेरा लिहलेला नाही, जेवढे क्षेत्र लागवडीखाली आहे त्यात इतर पिके पेरलेली दिसतात. तक्रारकर्ता क्रमांक ७ यांच्या नांवे जे शेत तक्रारीत दाखविले त्याच्या ७/१२ दस्तात जमीन करणा-याचे नांव वेगळे आहे व त्यात सुर्यफुल पेरा दिसत नाही, तक्रारकर्ता क्रमांक ८ – विलास श्रिकृष्ण हे ७/१२ दस्तात जितकी शेती करतात त्या क्षेत्रात इतर पिकपेरा दिसतो. त्यामुळे सुर्यफुल पेरा दिसतही नाही व त्यासाठी कोणते क्षेत्र ऊरतही नाही. शेतीबद्दल ७/१२ दस्त हा अधिकृत दस्त मानल्या जातो, म्हणून मंचाने सगळया तक्रारकर्त्यांचे ७/१२ दस्त काळजीपूर्वक पाहिले आहेत. काही बटाईपत्र रेकॉर्डवर तक्रारकर्ते यांनी लावलेले आहेत परंतु ते रजिष्टर्ड डॉक्युमेंट नाहीत, त्यामुळे ते विचारात घेतले नाहीत. बियाण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करुन अहवाल तयार करण्याकरिता, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत केली आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रातील ७ तज्ञ लोकांची, तज्ञ म्हणून नियुक्ती असते व समितीतील ७ ही सदस्यांनी शेतातील पिकाची पाहणी करुन मोका तपासणी अहवाल तयार करणे आवश्यक आहे, असे विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला न्याय-निवाडा.
III (2006) CPJ 269
KHAMGAON TALUKA BAGAYATDAR SHETKARI AND FALE
( FRUITS ) VIKRI SAHAKARI SANSTHA KHAMGAON - Vs. – BABU KUTTI DANIEL
यात पॅरा नंबर ६ मध्ये वि. राज्य आयोग यांनी म्हटले आहे. तसेच पुढे असे नमुद केले आहे , . . .
Consumer Protection Act, 1986 – Section 2 (1) (g) – Agriculture – Seeds
- Defective – Germination shown to extent of 20 % - No reason disclosed for poor germination – Panchnama silent on quality of seeds – No evidence regarding sub-standard or adulterated quality of seeds – Failure of germination may be due to agroclimatic factors – No deficiency in service proved – Forum wrongly allowed complaint.
हा निवाडा या प्रकरणात लागु पडतो असे मंचाचे मत आहे. कारण या प्रकरणात सर्व तक्रारकर्ते मिळून दाखल केलेला दिनांक २४/०२/२०११ रोजीचा जिल्हा तक्रार निवारण समितीचा अहवाल हा एक सदस्यीय अहवाल आहे, त्यावर समितीतील इतर तज्ञ सदस्यांच्या सहया नाहीत. त्यामुळे वरील निवाडयानुसार तो अहवाल कायदेशीर नाही व म्हणूनही तो विचारात घेता येणार नाही. समितीने तयार केलेल्या पंचनाम्यात बियाण्यातील दोष आहे, असे नमुद नाही तसेच अहवालामध्ये कोणत्या गट नंबर मधील शेताची व किती एकराची पाहणी केली व कोणत्या शेतक-यांच्या शेताची पाहणी केली, त्यांचे नांव अहवालात नमुद नाही. त्यामुळे तो अहवाल कोणत्या तक्रारदाराबद्दल वापरावा हे कळत नाही. कृषी विकास अधिकारी, जिल्हा परीषद, वाशिम यांनी प्रकरणात तक्रारकर्त्यांचा अर्ज, पंचनामा जे दाखल केले, त्यामध्ये पेरणीची तारीख जी दाखविलेली आहे, त्यानंतर पुढील महिन्यातच तलाठी यांनी 7/12 दस्त जारी केलेले दिसतात मग त्यात तलाठी यांनी सुर्यफुलाचा पेरा न दाखविण्याचे कारण काय ? हे तक्रारीतून कुठेही स्पष्ट झालेले नाही. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, संदीप आगळे व सुभाष सुंटवाल यांना विरुध्द पक्षाचे सुर्यफुल बियाणे पेरल्यानंतर त्यांना चांगले पिक आले. त्यांचा 7/12 हा दस्त पाहिला तर, त्यात सुर्यफुल हा पेरा स्पष्ट लिहीलेला आहे. परंतु या सर्व तक्रारदारांच्या 7/12 दस्तात सुर्यफुल पेरा लिहीलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्ते यांचे हे कथन स्विकारता येणार नाही. या सर्व विश्लेषणावरुन विरुध्द पक्ष यांच्या बियाण्यामध्ये दोष होता, ही बाब सिध्द झालेली नाही. कारण ही बाब सिध्द करण्याकरिता मंचासमक्ष काय दस्तऐवज दाखल केलेले आहेत, हे पाहणे गरजेचे आहे व तक्रारकर्ते यांनी दिनांक २४/०२/२०११ रोजीचा जिल्हा तक्रार निवारण समितीचा अहवाल हा एकच दस्त दाखल केला आहे, व त्याही अहवालात वरीलप्रमाणे त्रुटी आहेत तसेच कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांनी दोन लॉटचे बियाणे जप्त करुन प्रयोगशाळा, नागपूर येथे बीज परीक्षणाकरिता पाठवून उगवणशक्ती बद्दल तज्ञ अहवाल मागीतला होता व त्या अहवालानुसार बियाणे पास झालेले आहे, असे नमुद आहे. त्यामुळे बियाण्यामध्ये उगवणशक्ती चांगली होती, असे दिसून येते. तसेच विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले न्याय-निवाडे, जसे की, .
१) २००३ (३) सि.पी.जे. ६२८, बेजो शितल सिडस प्रा.लि. – विरुध्द – शिवाजी घोले. या निवाडयामध्ये मा. राज्य आयोग, मुंबई यांनी
स्पष्ट केले की, “ बियाणे सदोषाबद्दल तज्ञ अहवाल नसेल तर नुकसान भरपाई मागणार यास सर्व पुराव्यानिशी सर्व बाबी सिध्द
कराव्या लागतात. जर तक्रारदाराने पुराव्यानिशी सर्व बाबी सिध्द
केल्या नसतील तर तक्रार खारीज करावी. ”
२) २००५ (२) सि.पी.जे. १३, ( सर्वोच्च न्यायालय )
हरियाणा सिडस डेव्हलपमेंट कार्पो. – विरुध्द – साधु व इतर. या निवाडयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देशीत केले आहे की, “ जर बियाण्यामध्ये दोष नसेल व तज्ञ अहवालामध्ये सुध्दा बियाण्याच्या दोषाबद्दल काही कारण नमुद नसेल तर तक्रार खारीज करण्यात यावी ”.
३) २००४ (२) सि.पी.जे. ६३, ( राष्ट्रीय आयोग )
एजीसन सिडस (इंडीया लि.) – विरुध्द – एन. नागेंद्र रेडडी. या निवाडयामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे की, “ जर
बियाणे विकत घेतले नसेल किंवा अधिकार पत्र रेकॉर्डवर नसेल तर
त्यास तक्रारकर्ता म्हणून तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही ”.
हे न्याय-निवाडे, हातातील या प्रकरणास तंतोतंत लागू पडतात, याउलट तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा या प्रकरणात लागू होत नाही, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी स्वतःची केस कागदोपत्री पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही.
सबब या प्रकरणात पुढीलप्रमाणे, अंतिम आदेश, पारीत करण्यात येत आहे.
:::अं ति म आ दे श :::
१) तक्रारकर्ते यांची तक्रार क्र. ४४/२०११ खारीज करण्यात येते.
२) न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
३) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य दयावी.
(श्रीमती भारती केतकर ) (श्री. कैलास वानखडे) (सौ. एस.एम.उंटवाले)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम