निकाल
दिनांक- 04.10.2013
(द्वारा- श्री विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार अनिल ज्ञानोबा बडे यांनी सदरील तक्रार सामनेवाले यांनी सेवेत कसूर करुन तक्रारदार यांस मानसिक व शारीरिक त्रास दिला म्हणून नुकसान भरपाई मागण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे केज जि.बीड येथील कायमचे रहिवाशी आहेत. तक्रारदार यांनी महिंद्रा स्कॉपिओ एसएलएक्स मॉडलची गाडी नंबर एम.एच-20-एजे-0888 खरेदी केली होती. तक्रारदार यांनी आर्थिक चणचण भासू लागल्यामुळे त्यांनी सदरील गाडीवर कर्ज घेण्याचे ठरवले. सामनेवाले क्र.2 यांचेकडे कर्जाचा प्रस्ताव दाखल केला. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून रु.3,50,000/- चे कर्ज घेतले. सदरील कर्जाची परतफेड 36 महिन्यात करावयाची होती. मासिक हप्ता रु.12,840/- असे ठरविण्यात आले.गाडीचे आरसी बूकमध्ये हायर परचेस म्हणून सामनेवाले क्र.2 यांचे नांवाची नोंद करण्यात आली.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून कर्ज घेतल्यानंतर त्यांचा दरमहा परतफेड तक्रारदार करीत होते. कर्जाचे 1-2 हप्ते थकले. सामनेवाले हे गुंडा मार्फत कर्जाचे हप्ते वसूल करत असल्याने ते तक्रारदाराच्या घरी येऊन रक्कमेची मागणी करु लागले. तक्रारदार यांनी एजन्ट जवळ रु.52,000/- दिले व त्यांचेकडे पावतीची मागणी केली. एजन्टने तक्रारदार यांस सांगितले की, सोलापूर कार्यालयात रक्कम जमा करुन पक्की पावती पाठवून देतो. तक्रारदार यांनी सदरील बाब सामनेवाले क्र.2 यांचे लक्षात आणून दिली. तेव्हा सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांस सांगितले की, रक्कम कार्यालयात जमा झालेली आहे, पावती पाठवून देतो. परंतु सामनेवाले यांनी पावती देण्याचे टाळाटाळ केले व ती रक्कम तक्रारदार यांचे खाती जमा केली नाही. माहे 2012 चा ऑक्टोबर महिन्यात सामनेवाले यांचे 15 ते 20 गुंड दोन गाडया घेऊन आले आणि सकाळी सहा वाजेचे सुमारास रविसागर फायनान्स कडील चावीने गाडी चालू करुन दारावर आवाजा दिला आणि गाडी कंपनीवाले घेऊन चाललो म्हणून सांगितले. तक्रारदार यांनी त्यांस विरोध केला नाही.तक्रारदारांना कंपनीच्या व्यवस्थापकास त्या बाबत विचारणा केली. तेव्हा तक्रारदार यांस सांगण्यात आले की, गाडी घेऊन जाणारे कंपनीचेच आहेत व तक्रारदार यांना सोलापूर येथे येण्यास सांगितले. तक्रारदार यांनी पावतीसह व बिगर पावतीचे मिळून एकूण रु.3,71,960/- सामनेवाले यांचेकडे जमा केलेले आहेत. आरसी बूकामध्ये कर्ज प्रकरण रविसागर फायनान्स बरोबर असताना कर्जाच्या मोबदल्यात रक्कम जमा केल्याची पावती विजय फायनान्स नांवाने देऊन तक्रारदार यांची फसवणूक केली आहे.
तक्रारदार यांचे तक्रारीतील पूढील कथन की, सामनेवाले यांनी विमापरवाना तक्रारदार यांचे ताब्यातून वाहन गुंडा मार्फत नेली. तक्रारदार हे 2-3 दिवसांनी सोलापूर येथे रविसागर फायनान्स यांचे कार्यालयात गेले व चौकशी केली. तक्रारदार यांना सांगण्यात आले की, कागदपत्र हे विजय फायनान्सचे आहेत. तेव्हा त्यांनी तेथे जावे, तक्रारदार हे विज फायनान्स मध्ये गेले व घडलेला प्रकार सांगितला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकिलामार्फत दि.20.11.2012 रोजी नोटीस पाठवून त्यांनी जबरदस्तीने गुंडा मार्फत गाडी ओढून घेऊन गेल्या बाबत कळविले व गाडीचा ताबा परत मागितला. नोटीस सामनेवाला यांना प्राप्त झाली. सामनेवाला यांनी दि.24..12.2012 रोजी नोटीसचे उत्तर दिले. त्यामध्ये चूकीच्या पध्दतीने तक्रारदार यांचेवर आरोप करण्यात आले. तक्रारदार यांनी स्वतः हप्ते न भरल्यामुळे गाडी सामनेवाले यांचे ताब्यात दिली असे खोटे आरोप केले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे ताब्यात असलेली गाडी गुंडा मार्फत ओढून नेऊन ग्राहकाला फसवले व त्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. सामनेवाले यांनी सेवेत कसूर केला आहे. तक्रारदार यांनी पूढील तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 यांचे कार्यालयात गेले असता त्यांनी गाडी विकली आहे व तक्रारदार यांचे सोबतचा करार संपूष्टात आला आहे असे सांगण्यात आले. सबब, तक्रारदार यांनी सदरील तक्रार सामनेवाले यांचे सेवेत कसूर केला व मानसिक त्रास दिला. त्यापोटी आर्थिक नुकसान सोसावे लागले म्हणून दाखल करणे भाग पडले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे कडे एकूण रक्कम रु.8,50,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी सामनेवाले क्र.2 यांना दिलेले लेखी म्हणणे हेच सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्हणणे समजावे अशी पुरशीस दिली.
सामनेवाले क्र.1 यांनी असे कथन केले की, सामनेवाले क्र.1 हे सामनेवाले क्र.2 तर्फे काम बघत आहे. या बाबत तक्रारदार यांना पुर्ण माहीती होती. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 विरुध्द तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही. तक्रारदार हा सामनेवाले क्र.1 यांचा ग्राहक नाही.
सामनेवाले क्र.2 यांनी मंचासमोर हजर होऊन लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले सर्व विधाने स्पष्टपणे नाकारलेले आहेत. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून सदरील गाडीवर हायर परचेस करार करुन कर्ज घेतलले आहेत. दरमहा रककम रु.12,840/- देण्याचा करार झाला आहे.त्या बाबत नोंद आरसी बूकामध्ये झाल्याचे सामनेवाले क्र.2 यांनी मान्य केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे एजंटाकडे कधीही रु.52,000/- दिले नाही असे स्पष्ट कथन केले आहे. तक्रारदार यांनी रु.52,000/- कोणास दिले त्या व्यक्तीच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. तक्रारदार हे सामनेवाल क्र.2 यांचे कार्यालयात कधीही आले नाही अगर पावतीची मागणी केली नाही. तक्रारदार यांचे ताब्यातील गाडी गुंडा मार्फत फायनान्स कंपनीची चावी जोडून गाडी घेऊन गेल्या बाबत तक्रारीतील मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी स्वतः सदर वाहन विजय फायनान्स यांचे ताब्यात दिले आहे. तक्रारदार यांनी वाहनावर घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे स्वतः वाहन कंपनीच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे सदरील वाहन बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे कथन केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत कोणत्या तारखेला वाहन घेऊन गेले या बाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तक्रारदार यांनी कोठेही फौजदारी स्वरुपाची किंवा अन्य कोणतीही कारवाई सामनेवाले यांचे विरुध्द केलेली नाही. सामनेवाले क्र.1 हे सामनेवाले क्र.2 यांचे वतीने काम पाहतात. त्यामुळे तक्रारदाराने भरलेल्या रक्कमेच्या पावत्या सामनेवाले क्र.1 यांनी दिलेल्या आहेत व सामनेवाले क्र.2 यांचेकडे रक्कम जमा केलेल्या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहन विकले नाही.
सामनेवाले क्र.2 यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार व सामनेवाले यांचे मध्ये झालेला हायर परचेस करार हा सोलापूर येथे झाला आहे. करारात स्पष्टपणे व जर काही वाद उत्पन्न झाला तर सोलापूर कोर्टास अधिकारक्षेत्र असल्याचे नमूद केले आहे. सबब सदरील मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी केलेली मागणी खोटी व लबाडीची आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही सेवा देण्यास त्रूटी ठेवलेली नाही अगर तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास दिलेला नाही. सदरील तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गाडीचे आरसी बूक, पैसे भरल्याच्या पावत्या, इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत. सामनेवाले यांनी पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र, जनरल कुलमुखत्यारपत्र, हायर परचेस करार, तक्रारदाराच्या नोटीसला दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. तक्रारदार यांचे वकील श्री.वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री.पाळंदे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांचे ताब्यातील गाडी सामनेवाले यांनी
बळजबरीने ओढून नेली आहे ही बाब तक्रारदार सिध्द
करतात काय ? नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवलेली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केले आहे काय ? नाही.
3. सदरील मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार आहे काय ? नाही.
4. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून कर्ज रु.3,50,000/- घेतलेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेले वाहनाचे हायर परचेस अँग्रीमेंट करुन दिलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील कर्ज 36 हप्त्यामध्ये परतफेड करावयाचे होते. मासिक हप्ता रु.12,840/- असा होता. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावत्या व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र यांची पाहणी केली असता तक्रारदार यांनी काही कर्जाचे हप्ते थकल्याचे निष्पन्न होते. तक्रारदार यांचे कथन की, सामनेवाले यांनी 15 ते 20 गुंड पाठवून ऑक्टोबर 2012 महिन्यात तक्रारदार यांचे घरासमोरुन गाडी चालू करुन घेऊन गेले. तक्रारदार यांनी त्यांस विरोध केला नाही. जर तक्रारदार यांचे ताब्यातील वाहन सामनेवाले यांनी पाठवलेल्या काही व्यक्तीनी बळजबरीने नेले असते तर तक्रारदार हा स्वस्त बसला नसता. तक्रारदार यांनी सदरील कृती बाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली नाही किंवा तसे सामनेवाले यांना लेखी कळविले नाही. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये झालेला हायर परचेस अँग्रीमेंटच्या शर्ती व अटीचा विचार केला असता तक्रारदार यांनी कर्जाचा हप्ता चुकवल्यास सामनेवाले यांनी वाहनाचा ताबा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सामनेवाले यांचे कथन की,तक्रारदार यांचे बरेच हप्ते थकल्यामुळे त्यांने स्वतः वाहन सामनेवाले यांचे ताब्यात दिले. तसेच सदरील वाहन आजही सामनेवाले यांचे ताब्यात आहे.सामनेवाला यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, जर तक्रारदार यांनी सर्व थकलेले हप्ते व त्यावरील व्याज भरल्यास, सामनेवाले वाहन तक्रारदार याचे ताब्यात देण्यास तयार आहेत.पण त्यांस तक्रारदार तयार नाहीत. दाखल केलेल्या पुराव्याचे अवलोकन केले असता या मंचाचे मत असे पडते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे ताब्यातील वाहन बळजबरीने ओढून नेले ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाही.
तक्रारदार यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, सामनेवाले यांनी वाहन अनाधिकृतरित्या ओढून नेल्यामुळे तक्रारदार यांना शारीरिक व मानलसिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवलेली आहे.
तक्रारदार व सामनेवाले क्र.2 यांचेमध्ये सदरील वाहनावर कर्ज देते वेळेस हायर परचेस अँग्रीमेंट झालेला आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचे वाहनाचे कर्जाचे हप्ते थकीत सामनेवाले यांनी वाहन ताब्यात घेण्याचा अधिकार सदरील करारात दिलेला आहे. तक्रारदार यांनी कर्जाचे हप्ते थकलेले आहे ही बाब मान्य केलेली आहे. साहजिकच सामनेवाला यांना ते वाहन कराराचे शर्ती व अटीनुसार आपले ताब्यात घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. सदरील वाहन हे तक्रारदार यांचे ताब्यातून बळजबरीने ओढून नेले आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही.तसेच तक्रारदार यांनी कर्जाचे नियमित हप्ते भरलेले नाहीत. कराराच्या अटीचे अनुषंगाने सामनेवाला यांनी केलेली कृती ही सेवेत त्रूटी आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे या मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
सामनेवाला यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार मंचास नाही. त्या प्रित्यर्थ त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्रावर मंचाचे लक्षत वेधले. सामनेवाले यांचे वकिलाचे मते कर्जाचा संपूर्ण व्यवहार हा सोलापूर येथे झाला. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये हायर परचेस अँग्रीमेंट करण्यात आला व त्या करारामध्ये जर कर्जासंबंधी काही वाद उपलब्ध झाल्यास ते फक्त सोलापूर न्यायालयातच त्या संबंधी वाद दाखल करता येईल असे नमूद केलेले आहे. हायर परचेस अँग्रीमेंट चा कलम 24 मध्ये त्यासंबंधी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये कर्जाचा व्यवहार सोलापूर याठिकाणी झालेला आहे. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीस कारण न्यायमंचाचे अधिकार क्षेत्रात येते ही बाब ही सिध्द केलेली नाही. तक्रारदार केवळ बीड जिल्हयात राहतो त्या कारणास्तव या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार प्राप्त होतो असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांना दाव्यास कारण कोठे घडले ही बाबही शाबीत केलेली नाही. सामनेवाले हे सोलापूर येथे राहतात व तक्रारदार व सामनेवाले यांचेत झालेला कराराचे अनुषंगाने सोलापूर येथील न्यायालयातच वाद दाखल करता येतात. सबब तक्रारीस दाखल करण्याचे कारणे या मंचाचे अधिकार क्षेत्रात घडलेले नाही. त्यामुळे सदर मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असे मंचाचे मत आहे.
वर नमूद केलेल्या कारणमिंमासा वरुन तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
सबब, मंच मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक