निकालपत्र
निकाल दिनांक २०/११/२०१९
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन कले आहे की, तक्रारदार व त्याचे कुटुंबियांचा शेती हा एकमेव वडिलोपार्जित व्यवसाय आहे. सामनेवाले क्र.१ ही प्लॅस्टीक उत्पादक कंपनी असुन सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचे महाराष्ट्र राज्याकरिताचे शाखा कार्यालय आहे तर सामनेवाले क्र.३ हे अहमदनगर शहरातील व्यापारी/ सेवापुरवठादार आहेत. सामनेवाले क्र.३ हे सामनेवाले क्र.१ व २ यांनी विक्री केलेल्या उत्पादनासंदर्भात शेतक-यांच्या तक्रारी आल्यास त्यांचे निवारण करणेकामी व त्यांना सेवा देणेकामी सामनेवाले क्र.१ व २ यांनी सामनेवाले क्र.३ यांची नेमणुक केली. सामनेवाले कंपनीने उत्पादित केलेल्या कागदाची तब्बल पाच वर्षाची लेखी गॅरंटी दिली. तसेच सामनेवाले यांना शेततळे तयार करण्याच्या कामाचा दांडगा अनुभव असल्याचे सांगितले व डाळिंब व इतर पिकांसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर सोय होण्यासाठी शेततळे करण्याचा सल्ला दिला. तक्रारदार यास शेततळ्याचे संपुर्ण काम त्यांचे लोकांमार्फत करण्याची तयारी दर्शविली. तक्रारदाराने शेतजमिनीमध्ये सुमारे ४० आर क्षेत्रामध्ये शेततळ्याची खोदाई, मातीचे अस्तरीकरण, तारेचे कुंपन यासाठी रक्कम रूपये ४,६९,७५०/-, ५०० मायक्रॉन जाडीचा २९५० चौ. मीटर क्षेत्रफळाचे शेततळ्यासाठीच्या प्लॅस्टीकच्या कागदाची किंमत रक्कम रूपये २,२७,१५०/- आणि कागद अंथरून व चिकटून देणे याची किंमत रक्कम रूपये ५३,१००/- अशी एकुण सर्व कामाची एकंदर रक्कम रूपये ७,५०,०००/- इतकी ठरली. त्यानुसार तक्रारदाराने सामनेवाले यांना त्याचे दरम्यान ठरलेली कामाची किंमत वेळोवेळी रोख स्वरूपात अदा केली. सदरील रक्कम मिळाल्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांनी केवळ शेततळ्यासाठीच्या प्लॅस्टिकचा कागद याची किंमत रक्कम रूपये २,२७,१५०/- आणि कागद अंथरून व चिकटुन देणे याची किंमत रक्कम रूपये ५३,१००/- अशी एकुण रक्कम रूपये २,८०,२५०/- ची बिले दिली. तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यास शेततळ्याच्या कागदाची पाच वर्षे इतक्या कालावधीसाठीची लेखी हमी/ गॅरंटी दिलेली आहे. सामनेवालेंच्या सुचनेनुसार शेततळ्याचे काम ऑक्टोबर, २०१४ चे महिन्यात पुर्ण केल्यानंतर तक्रारदारास दिलेल्या सुचनेनुसार तक्रारदाराने सदरील शेततळ्यामध्ये पाणी भरले. सदरी शेततळे पाण्याने भरल्यानंतर, त्यातील पाण्याचा वापर न करता तळ्यातील पाण्याची पातळी आपोआप ४ ते ६ फुटाने कमी झाल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. त्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांच्या कर्मचा-यांनी कागद दुरूस्त करून दिला. परंतु पुन्हा पाण्याची गळती होत असल्याने सामनेवाले यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सामनेवाले क्र.३ यांना पाठविले. सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदाराचे शेततळ्यामध्ये कागदाची दुरूस्ती करून देखील पाण्याची गळती थांबली नाही, त्यावेळी तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ यांचेशी संपर्क साधुन शेततळ्याचा कागद बदलुन देण्याची मागणी केली. त्यावर सामनेवाले क्र.१ व २ यांनी वेगवेगळी कारण सांगुन तक्रारदारास शेततळ्याचा कागद बदलवुन देण्यास टाळाटाळ केली. याबाबत कृषी विभागाला कळविले असता त्यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांना कळवुन देखील सामनेवाले यांनी कागद बलवुन दिला नाही. अशा रितीने तक्रारदाराचे पिकांचे सुमारे ११,००,०००/-, शेततळे तयार करण्याचा खर्च रक्कम रूपये ४,६९,७५०/-, प्लॅस्टिक कागदाची किंमत रक्कम रूपये २,२७,१५०/- आणि कागद अंथरून व चिकटुन देणे याची किंमत रक्कम रूपये ५३,१००/- असे एकुण रक्कम रूपये १८,५०,०००/- चे नुकसान झाले आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी ५०० मायक्रॉन जाडीचा २९५० चौ.मीटर क्षेत्रफळाचा नविन शेततळ्याचा कागद तक्रारदारास विना मोबदला द्यावा, तक्रारदारास प्लॅस्टीक कागदाची किंमत रक्कम रूपये २,२७,१५०/-, सदरील कागदप अंथरून व चिकटुन देण्यासाठी अदा केलेली किंमत रूपये ५३,१००/- अशी एकुण रक्कम रूपये २,८०,२५०/- सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडुन मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये १,००,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडुन मिळावे, पिकाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये ११,००,०००/- मिळावे, शेततळ्याची, खोदाई, मातीचे अस्तरीकरण, तारेचे कुंपन यासाठी रक्कम रूपये ४,६९,७५०/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रूपये २५,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडुन मिळावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्यत आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ प्रकरणात हजर झाले व सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांचे म्हणणे निशाणी १६ वर असे दिले की, सचिन नामदेव गोटे हे सामनेवाले क्र.१ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.१ कंपनीकडुन प्लॅस्टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शेत तळ्यामध्ये बसवुन देण्याचा व्यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेत तळ्यात जर बारीक दगड असल्यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्यावतीने तसेच डिलर याच्यावतीने शेतकरी यांना तश्याच प्रकारची सुचना देण्यात येतात. इतक्यात नव्हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्याने व शेतामध्ये बारीक दगड असल्याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्यात उत्पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्लॅस्टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्ये झाले असले तरी त्यात कोणताही उत्पादीत दोष नाही. सामनेवाले क्र.१ यांनी या कंपनीचे उत्पादीत केलेला कागद हा आय.एस.ओ. प्रमाणीत असुन उच्च दर्जाचा आहे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार-पाच वर्ष सतत दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीमुळे तक्रारदार यांनी कागद टाकलेल्या शेत तलावात पाणी न भरल्याने उन्हाळ्यामुळे तसेच शेततलाव कोरडा असल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचा वापर होऊन त्यामुळे तक्रारदार याचे शेत तलावातील कागदाचे नुकसान होऊ शकते. सदरची बाब ही नैसर्गिक असल्याने त्यास सामनेवाला यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही. सदरचा कागद बसवतांना कागद बसविण्याचा खर्च हा संपुर्णपणे डिलरला दिलेला असतो. त्यामुळे तो सामनेवाला यांच्याकडुन वसुल करण्याचा कोणताही अधिकार तक्रारदार यांना नाही. शेतात अनेक दिवस पाणीसाठा नसल्याने नैसर्गिक कारणाने सदर कागद खराब झाला असल्याचे सामनेवाले यांच्याविरूध्द खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीत शेतकरी यांनी सदर शेत तलावासाठी लागणारे कागदाची शासनाकडुन मिळणारी संपुर्ण सवलत मिळल्यानंतर सदरची खोटी बनावट तक्रार सामनेवाले यांच्याविरूध्द दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले क्र.२ या कंपनीमार्फत महाराष्ट्राबाहेर राज्यात शेततलावासाठी सदर कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.१ व २ यांनी केली आहे.
४. सामनेवाले क्र.३ यांनी नि.क्र.१८ वर त्यांची कैफियत सादर केलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत सामनेवाले क्र.३ यांच्याविरूध्द लावलेले आरोप खरे नसुन सामनेवालेंना मान्य व कबुल नाही. सामनेवाले क्र.३ ने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांचेमार्फत शेततळ्याचे कागदाची उत्पादनाची प्रक्रिया पार पाडतांना सदरील उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सामनेवाले क्र.३ यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे सहभाग नसतो व नाही. सामनेवाले क्र.३ यांनी कोणताही मोबदला स्विकारून तक्रारदार अथवा सामनेवाले क्र.१ व २ यांना कोणतीही सेवा पुरविलेली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.१ व २ आणि सामनेवाले क्र.३ यांचे दरम्यान कोणताही ग्राहक व विक्रेता अथवा ग्राहक व सेवा पुरवठादार असा कोणताही कायदेशीर नातेसंबंध कधीही प्रस्थापित झालेला नाही. शेततळ्याचा कागद अंथरूण चिकटविण्याचा खर्च संबंधात संपुर्ण रक्कम ही तक्रारदार याने सामनेवाले क्र.१ व २ यांना अदा केलेली आहे. त्यामुळे सदर तक्रारदाराच्या कोणतीही मागणीस अथवा तक्रारीस सामनेवाले क्र.३ हे जबाबदार नाहीत. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.३ यांनी केली आहे.
तक्रारदाराने दाखल तक्रार, शपथपत्र, दस्तऐवज सामनेवाले क्र.१ ते ३ ने दाखल केलेली जबाब व उभयपक्षांची तोंडी युकितवाद मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार क्र.१ ते ३ हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
५. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ ने उत्पादीत केलेले प्लॅस्टीक कागद सामनेवाले क्र.२ मार्फत शेत तलावकरीता घेतले होते, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.६ दस्त क्र.६/१ व ६/२ वर दाखल देयकावरून सिध्द होते. तक्रारदाराने त्याकरीता सामनेवालेकडे रकमांची भरणा केली ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. सबब तक्रारकर्ता हे सामनेवाले क्र.१ ते ३ यांचे ग्राहक आहेत, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ –
६. तक्रारदाराने नि.क्र.६ वर दाखल दस्त क्रमांक ६/१ व ६/२ याची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराला शेत तलावाकरीता प्लॅस्टीकचे कागद विकलेले होते, तसेच ते बसविण्याकरीता ५३,१००/- रक्कम स्विकारली होती. सदर प्लॅस्टीक कागद सामनेवाले क्र.३ कडुन तक्रारदाराकडे लावण्यात आलेला होता. सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांच्या कैफीयतीत हे मान्य केलेले आहे की, सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो. शेततलावात अनेक दिवस पाणीसाठा नसल्याने नैसर्गीक कारणाने सदरचा कागद खराब झाला असल्यास त्यास सामनेवाले हे मुळीच जबाबदार नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी प्लॅस्टीक कागद बसविण्याकरीता रक्कम स्विकारली म्हणुन त्यांची ही जबाबदारी ठरते की, सदर प्लॅस्टीक कागद बसविणेवेळी योग्य काळजी घ्यावी. सामनेवाले क्र.१ व २ यांची ही जबाबदारी आहे की, सदर प्लॅस्टीक कागद शेत तळ्यात योग्य पध्दतीने बसविणत यावे व त्याच्या जोड ठिकाणी प्लॅस्टीक कागदाचे कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे. तक्रारदाराला सामनेवाले क्र.१ व २ यांनी पुरविलेला प्लॅस्टीक कागद ५०० मायकॉनचा होता किंवा नाही तसेच सदर प्लॅस्टीक कागद निम्न दर्जाचा होता ही बाब तक्रारदाराने तज्ञ विशेषज्ञानाच्या अहवालाअभावी सिध्द करू शकले नाही. तसेच तक्रारदाराचे शेत तलावावर पशुपक्षी किंवा जंगली जनावरेमुळे सदर प्लॅस्टीक कागद खराब झाला किंवा दगडांमुळे झाला ही बाबही सामनेवाले क्र.१ व २ यांनी तज्ञ विशेषज्ञानाच अहवलाअभावी सिध्द करू शकले नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो, ही बाब कैफीयतीत मान्य केलेली असुन सदर प्लॅस्टीक कागद खराब झाला होता, ही बाब सिध्द झाली आहे. सामनेवाले क्र.२ व ३ यांनी सदर प्लॅस्टीक कागद बसविण्याकरीता रक्कम स्विकारली होती व सामनेवाले क्र.२ व ३ ने ती योग्यप्रमाणे शेत तलावामध्ये बसविलेले नव्हते व त्यानंतर त्याची दुरूस्ती किंवा त्याची पडताळणी करीता सामनेवाले क्र.१ ते ३ यांना तक्रार प्राप्त होऊनसुध्दा दुर्लक्ष केले, ही बाब सामनेवाले क्र.१ ते ३ यांची तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
७. सामनेवालेने दाखल केलेल्या न्यायनिवाड्याची प्रत, त्यातील असलेले तथ्य सदर प्रकरणात लागु पडत नाही. तक्रारदाराने शेत तलावात पाणी गळुन गेले असल्याने त्याचे पिकाचे नुकसान रूपये ११,००,०००/- इतके झाले याबाबत तक्रारदाराने कोणताही दस्तऐवज पुरावा प्रकरणात सादर केललेा नाही, ही बाब ग्राह्य धरून तसेच मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरुन खालीलप्रामणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ ला प्लॅस्टीक कागद बसविणेकरीता दिलेली रक्कम रूपये ५३,१००/- सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराला परत करावी. ३. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/-, तसेच तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी व्यक्तिगत व संयुक्तरितीने द्यावे. ४. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाच्या आत करावी. ५. तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी. ६. आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. |