निकालपत्र
निकाल दिनांक – १५/०२/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार ही मौजे नारायण गव्हाण तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मयत भाऊसाहेब लक्ष्मण नवले यांची पत्नी असुन मृत्युपूर्वी भाऊसाहेब लक्ष्मण नवले हे शेतकरी होते व त्यांच्या नावे गट क्रमांक ८९, १०१ व इतर अशी शेतजमिन मिळकती नारायण गव्हाण तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे होती. तक्रारदार हिच्या मयत पतीचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. सदरचा विमा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता.
२. दिनांक ०३-०१-२०१७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास ते जातेगावजवळ नगर पुणे हायवेवर पायी जात असतांना त्यांना अनोळखी वाहनाने धडक दिली. सदर अपघातात तक्रारदार हिचे पती जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांचा ग्रामीण रूग्णालय शिरूर येथे पोस्ट मार्टम करण्यात आला व अनोळखी वाहन चालकाविरूध्द सुपा पोलीस स्टेशन येथे आय.पी.सी. कलम ३०४ए, २७९ व इतर अन्वये एफ.आय.आर. नंबर आय-०६/२०१७ नोंदविण्यात आली. त्याप्रमाणे पोलीसांनी प्रकरणाची तपासणी करून घटनास्थळ पंचनामा व इन्क्वेस्ट पंचनामा केला. तक्रारदार हिचे पती शेतकरी असल्यामुळे तिने संपुर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी तथा नोडल ऑफीसर यांचे मार्फत सामनेवाले यांच्याकडे विमा दावा दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी दिनांक २७-०५-२०१७ रोजीच्या पत्राने असे कळविले की, तक्रारदार हिचे पतीचा मृत्यु हा ह्दयविकाराने झाला, त्यामुळे विमा दावा देता येणार नाही, म्हणुन नामंजुर केला. अशाप्रकारे चुकीचे कारणाने तक्रारदार हिचा विमा दावा सामनेवाले यांनी नाकारला म्हणुन तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक १० प्रमाणे मागणी केली आहे.
३. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी १२ सोबत प्रकरणात दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा उतरविला होता, ही बाब मान्य केली आहे. मात्र सदरचा विमा दावा हा सामनेवाले यांनी तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्यू हा ह्दयविकाराने झाला आहे त्यामुळे नामंजुर केला यामध्ये सामनेवाले विमा कंपनीने कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही. सामनेवाले यांनी कोणत्याही अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा योग्य कारणाने नाकारलेला आहे त्यामध्ये सामनेवाले यांनी कोणतीही त्रुटी केली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी सामनेवाले यांनी मंचाला विनंती केली.
४. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.नितीन काळे यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, त्यांचे वकील सौ. गिरीजा गांधी यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती भाऊसाहेब लक्ष्मण नवले यांचा सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा रक्कम रूपये २,००,०००/- उतरविला होता. सदरचा विमा कालावधी दिनांक ०१-१२-२०१६ ते ३०-११-२०१७ असा होता. विमा उतरविल्याची बाब सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये मान्य केली आहे व यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, ही बाब सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिचे पतीचा विमा उतरविल्यानंतर विमा कालावधीमध्ये दिनांक ०३-०१-२०१७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास ते जातेगावजवळ नगर पुणे हायवेवर पायी जात असतांना त्यांना अनोळखी वाहनाने धडक दिली. सदर अपघातात तक्रारदार हिचे पती जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. ही बाब स्पष्ट करणेसाठी तक्रारदार यांनी प्रकरणात शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे व मृत्यू प्रमाणपत्र दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या या कथनाला त्याच्या लेखी कैफीयतीमध्ये असे बचाव घेतला की, तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्यू हा अपघाती नसुन तो नैसर्गिक आहे. तक्रारदार हिचे मयत पतीचा मृत्यु हा ह्दयविकाराने झाल्याने करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार सदरचा विमा दाव्याची रक्कम तक्रारदार हिला देता येणार नाही म्हणुन विमा दावा नाकारला. मंचाने प्रकरणात दाखल असलेला शवविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले. त्यावर मृत्यूचे कारण ह्दयविकाराचा झटका असे नमुद आहे. ह्दयविकाराचे झटक्याने मृत्यू झाला असला तरी तो अपघात आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हिच्या मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्याकडे उतरविला होता. त्यामुळे सामनेवाले यांनी सदरची रक्कम देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारला आहे, ही बाब सिध्द झाली आहे. अशा प्रकारे चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारणे, ही सामनेवाले यांनी सेवेत दिलेली त्रुटी आहे. तक्रारदार यांनी विम दाव्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांच्याकडे आवश्यक सर्व दस्तऐवज क्लेम फॉर्म, सातबारा उतारा, आठ अ चा खाते उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, पंचनामा, दाखल केलेले आहे. यावरून तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू अपघाती होता व सदरील विमा पॉलीसी ही शेतकरी अपघात विमा पॉलीसी म्हणुन उतरविली होती. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झाला नाही, सदरचा नैसर्गिक मृत्यु झाला आहे. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा देता येणार नाही, असे कथन केले. परंतु ह्दयविकार हा सुध्दा अपघाती मृत्यु आहे, असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ब-याच न्यायनिर्णयात नमुद केले आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु हा ह्दयविकार याचेमुळे झाला आहे. सदरचे तक्रारीतील तक्रारदाराचे कथन व कागदपत्र, पुरावा यावरून सदरची तक्रार तक्रारदार हिने सिध्द केली आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येत नाही. तसेच सामनेवाले यांनी सन २००३ चा मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा दाखल केला. मात्र सन २००३ नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने बरेच न्यायनिवाडे पारीत केले व त्यामध्ये ह्दयविकाराने मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे, असे निर्णीत केले आहे. त्यामुळे सदरचा सामनेवाले यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा सदरच्या तक्रारीत उपयोगाचा नाही. सबब मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीच्या कारणाने विमा दावा नाकारला म्हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
७ मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक २७-०५-२०१७ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |