नि का ल प त्र :- (दि.19/09/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले.तक्रारदार व तक्रारदाराचे वकील गैरहजर. तक्रारदार व त्यांचे वकिलांना पुकारले असता ते गैरहजर. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची मौजे कुकुडवाडी, ता. राधानगरी येथे शेत जमीन असून गट नं. 25 व खाते नं. 51 आहे. राज्य शासनाने सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. दि. 25/01/2008 रोजी तक्रारदार हे त्यांचे पाहुणे श्री. शंकर महादेव मालप यांचेसोबत एम-80 मोटार सायकल नं. एम.एच. 09-ए-3430 या गाडीवरुन जात असताना हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल नं. एम.एच. 09-एई- 3715 या मोटार सायकलीस जोराची धडक दिल्याने अपघात झाला. व तक्रारदारांच्या उजव्या पायास गंभीर जखम झाली. उपचाराकरिता तक्रारदारांना सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. व अपघाताची नोंद राधानगरी पोलिस स्टेशनला झाली आहे. सदरच्या अपघातात तक्रारदारांच्या उजव्या पायास गंभीर कायमस्वरुपी जखमा झालेने त्यांना कायमस्वरुपी 30 टक्के अपंगत्व आलेले आहे. याबाबत सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला असता दि. 26/03/2009 रोजीच्या पत्राने तक्रारदारांना झालेल्या जखमा त्या तात्पुरत्या स्वरुपाच्या होत्या या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. सबब, विमा क्लेम रक्कम रु. 50,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत शेतकरी अपघाताबाबत प्रस्तावाचे पत्र, शेतकरी अपघात विमा क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, तक्रारदारांचा खाते नं. 51 व 8 अ चा उतारा, गट नं. 25 चा 7/12 चा उतारा, गट नं. 50 चा 7/12 चा उतारा, गट नं. 74 चा 7/12 चा उतारा, तक्रारदार यांचे मतदान ओळखपत्र, तक्रारदार यांचे बँक पासबुक, गु.र.नं. 20/2008 मधील फीर्यादी जबाब, पंचनामा, विमा कंपनीचे पत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांचा क्लेम फॉर्म दाखल केला परंतु तक्रारदारांना झालेल्या जखमा हया तात्पुरत्या असून क्लेम अस्विकृत करुन फाईल बंद केलेली आहे. सदर पॉलिसीअंतर्गत अपघातामुळे अपघातामुळे येणारे नेहमीसाठीचे अपंगत्व 50 टक्के किंवा जास्त कव्हर असलेमुळे तक्रारदारांचा दावा पॉलिसीअंतर्गत कव्हर होत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी व मानसिक त्रासापोटी रक्क्म रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदार हे शेतकरी आहेत. राज्य शासनाने राज्यातील शेतक-यासाठी सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत ही पॉलिसी उतरविलेली होती. तक्रारदारांच्या तक्रारीतील उल्लेख केलेली दि. 25/01/2008 रोजी मोटार सायकलवरुन जात असताना अपघात झालेला आहे. व सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिस स्टेशन येथे केलेली आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी अपंगत्वाचा दाखला दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांना अपंगत्व आलेले आहे या अनुषंगाने इतर कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना तात्पुरत्या स्वरुपाच्या जखमा झालेल्या आहेत. व पॉलिसी अंतर्गत कव्हर होत नाही हा मुद्दा घेऊन क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदारांना अपंगत्व आल्याबाबत त्यांनी कोणताही पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. सामनेवाला विमा कंपनीने क्लेम नाकारला यामध्ये सामनेवाला विमा कंपनीची सेवा त्रुटी दिसत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |