निकालपत्र
निकाल दिनांक – १२/०२/२०२०
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ती ही मयत गेणु अहिलाजी वडीतके यांची पत्नी आहे. मयत गेणु अहिलाजी वडीतके हे शेतकरी होते व महाराष्ट्र शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेअंतर्गत शेतक-यांचा विमा उतरविला होता. तक्रारदाराचे मयत पती दिनांक २४-०६-२०१७ रोजी संध्याकाळी ७ वाजता सायकलवर जात असतांना पडल्याने त्यांना प्रवरा हॉस्पीटल, लोनी येथे नेल्यावर त्यांना मृत घोषीत करण्यात आले होते. त्या अनुशंगाने पोलीसांना तक्रार करण्यात आली होती व पंचनामा देखील करण्यात आला. तसेच मयताचा नियमाप्रमाणे मरणोत्तर पोस्ट मार्टम करण्यात आले होते. तक्रारीमध्ये पुढे असे कथन केलेले आहे की, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत मयताचा विमा उतरविण्यात आलेल्या पॉलिसी संदर्भात तक्रारदाराने सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी नोडल ऑफीसरकडे त्याचा विमा दावा सादर केला. दिनांक १६-११-२०१७ रोजी सामनेवालेतर्फे तक्रारदाराचा विमा दावा नाकारणेबाबत पत्र मिळाले. सामनेवाले कंपनी यांनी कोणतेही योग्य कारण नसतांना तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. तक्रारदाराने विमा दावा मिळणेकरीता सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवाले कंपनीने तक्रारदाराला तिचे मयत पती यांचेकरीता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत काढलेल्या विमा पॉलिसीचे दाव्याची रक्कम व्याजासह द्यावी, तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्याचा आदेश व्हावा.
४. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाले प्रकरणात हजर झाले व निशाणी १४ वर कैफीयत दाखल केली. सामनेवालेने कैफीयतीत असे कथन केले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले कंपनी यांचेविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबूल आहे. मयत यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने ते पडले व प्रवरा हॉस्पीटलमध्ये भरती केलेनंतर असे आढळुन आले की, त्यांचा मृत्यु अपघातामुळे झालेला नाही. वरील नमुद विमा पॉलिसी ही शेतक-यांचे अपघाताविषयी होती व पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे पॉलिसी धारकाचा किंवा शेतक-याचा मृत्यू किंवा अपंगत्व अपघातामुळे आले असल्यास त्यांना विमा दावा सामनेवाले कंपनीकडे दाखल करता येतो. परंतु जर अपघात नसेल तर सदर पॉलिसीचे अंतर्गत विमा दावा देता येत नाही. मयत याला Coronary artery disease आला होता त्यामुळे त्याचा मृत्यु झाला आहे. सदर मृत्यू प्राकृतीक होता व कोणत्याही प्रकारे अपघात नव्हता, म्हणुन तक्रारदाराचा विमा दावा नाकारून सामनेवाले कंपनीने कोणतेही प्रकारे तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दिली नाही. सदर तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज सामनेवालेने दाखल केलेला जबाब, दस्तऐवज पाहता व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवालेने तक्रारदाराला न्युनतम सेवा दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदाराचे मयत पती हे शेतकरी होते व त्यांचे नाव मयत गेणु अहिलाजी वडीतके आहे व शेतक-यांकरीता महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा घेतला होता व त्यामध्ये सामनेवाले कंपनीकडुन शेतक-यांचा विमा दावा उतरविण्यात आला होता, ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. सदरील विमा दाव्याचे अंतर्गत तक्रारकर्ती ही लाभार्थी होती यात कोणताही वाद नसल्याने तक्रारकर्ती ही सामनेवालेची ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ -
७. सामनेवाले यांनी पोस्ट मार्टमचे अहवालावरून असा अर्थ काढला की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यु Coronary artery disease मुळे झाला होता. तक्रारदाराचे पती यांना धमण्यांचा रोग होता व मृत्यु अपघातामुळे झालेला नाही. Coronary artery disease याचा अर्थ काढतांना मंचाचे असे लक्षात आले की, Coronary artery याचा अर्थ ह्दय विकाराचा झटका आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयात ह्दय विकाराचा झटका हा अपघात आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु हा ह्दयविकार याचेमुळे झाला आहे, असे सिध्द झाल्यावर सदर ह्दयविकार हा अपघात आहे. सबब सामनेवालेने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारून सेवेत त्रुटी दिली आहे, असे सिध्द होत आहे. म्हणुन मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले विमा कंपनीने तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु झाल्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीला रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर द.सा.द.शे. ९ टक्के व्याजासह दिनांक १८-१२-२०१७ पासुन रक्कम देईपर्यंत विमा दावा तक्रारकर्तीला द्यावा. |
३. तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |