निकाल
दिनांक- 11.10.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे प्रोप्रायटर फर्म असून परळी येथे मोंढा विभागामध्ये बि-बियाणे विक्रीचा व्यवसाय करतात. सामनेवाला क्र.1हे महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाचे अधिकृत पार्सल बुकींग सेवा देणारी प्रा.लि. कंपनी आहे.त्यांची मुख्य शाखा धुळे येथे आहे व उपशाखा परळी वै.येथे आहे.
तक्रारदार यांनी जाब देणार क्र.2 यांचेकडे दि.11.08.2010 रोजी पावती क्रमांक 4056031 नुसार सीडस बॉंक्स 3 अंदाजे 40 किलो ज्यात कापूस बी.टी.बियाणे 3 बॉक्स नुसन जेनेटिक्स प्रा.लि. जालना यांना पाठवण्यात आले होते, तक्रारदार यांनी जाब देणार क्र.2 यांचेकडे रितसर रक्कम भरली होती. तक्रारदार यांनी जाब देणार यांच्याकडून पाठवलेले पार्सल कापूस बी.टी.बियाणाची किंमत रु.42,500/- आहे. तक्रारदार यांचे जालना येथील प्रतिनिधी वेळोवेळी सामनेवाला क्र.1 च्या शाखा जालना येथे जाऊन पार्सल विषयी चौकशी केली असता माल आला नाही असे सांगितले व उडवाउडवीची उत्तरे दिली. दि.03.05.2011 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना रितसर पावती दिली. सामनेवाला क्र.1 यांनी चौकशी चालू आहे असे सांगितले. तक्रारदार यांनी वकीलामार्फत दि.15.12.2011 रोजीनोटीस पाठविली व तक्रारदार यांचे झालेले नुकसान देण्यास कळवले. सामनेवाला यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला. सामनेवाला यांनी पार्सल न देऊन सेवेतत्रुटी ठेवलीआहे.सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे पाठविलेले पार्सल परतकरण्यात यावे, अगर त्याचे मुल्य रक्कम रु.42,500/- व नुकसान भरपाई रु.25,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे निशाणी 8 सोबत दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांचे कैफियतीत असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी माल खरेदी केल्याबाबत विस्तृत तपशिल दिलेला नाही, सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या नोटीसीस समर्पक उत्तर पाठविले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना दि.11.08.2010 रोजी नाममात्र फि रु.118/- भरुन जालना येथे पार्सल पाठविले होते ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार यांच्या मालाची किंमत बुकींग करतेवेळेस पावतीवर जाहीर केलेली नव्हती व बुकींग नियमावली नुसार मालाची किंमत प्रती हजार रु.3/-प्रमाणे मुल्य आधारीत अधिभार अदा केलेला नाही. तक्रारदार यांनी खोटी व बनावट माहिती दिली. सामनेवाला यांनी चौकशी करुन तक्रारदार यांना कळवले आहे की, परळी येथून जालना करता बुकींग केलेले पार्सल जालना येथील पार्सल कार्यालयात सुस्थितीत डिलिव्हरी करीता उपलब्ध होते. जालना येथील कर्मचा-यांनी माल डिलिव्हरी घेण्याबाबत वारंवार संपर्क साधला व माल घेऊन जाण्याबाबत कळवले. परंतू मालाची डिलिव्हरी घेतली नाही अगर पार्सल कार्यालयास संपर्क साधला नाही. त्यामुळे सदरील माल कॅरीयर्स अक्ट प्रमाणे पार्सल मध्यवर्ती गोडावूनमध्ये वर्ग करण्यात आले. माल स्विकारणार यांनी 30 दिवसाचे आत माल सोडवून घेणे कायद्याने बंधनकारक होते, तो माल सोडवून घेतला नाही. तक्रारदार हे त्यास स्वतः जबाबदार आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत कसूर ठेवली नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रार रदद करण्यात यावी अशी विनंती केली.
सामनेवाला क्र.2 यांना तक्रारीतून कमी करण्याबाबत तक्रारदाराने अर्ज देऊन कळवले. त्यानुसार निशाणी 11 अर्जावरील आदेशानुसार सामनेवाला क्र.2 यांना तक्रारीतून वगळण्याचा आदेश करण्यात आला.
तक्रारदार व त्यांचे वकील ब-याच तारखांना गैरहजर आहेत. तक्रारदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले नाही. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत झेरॉक्स पावती दाखल केली आहे. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये जो पत्रव्यवहार झाला, त्याची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. सामनेवाला यांनी स्वतःचे शपथपत्र सादर केले आहे. सामनेवाला यांनी सोबत कागदपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांचे वकील श्री.देशमुख यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) सामनेवाला यांनी, तक्रारदार यांचे पाठविलेले पार्सल न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदाराने
सिध्द केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे काय? नाही. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 2 ः- सामनेवाला यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी दिलेले पार्सल जालना येथे सुस्थितीत पाठविण्यात आले. पार्सलची माल घेणा-या व्यक्तीस वेळोवेळी सुचना देऊनही त्यांनी डिलिव्हरी घेतली नाही.तसेच तक्रारदार यांनी तो माल ताब्यात घेणे कामी प्रतिनिधी पाठविला नाही. सबब कोणीही माल घेण्यास न आल्यामुळे सदरील माल विशिष्ट कालावधी नंतर मुख्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला. सामनेवाला यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने मालाचे मुल्य जाहीर केले नव्हते तसेच अधिभार भरला नव्हता. माल गहाळ झाल्याबाबत अगर डिलिव्हरी न मिळण्याबाबत तक्रारदार यांनी कोणतीही तजवीज केली नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या पुराव्या विरुध्द तक्रारदार यांनी शपथपत्र अगर पुरावा दिला नाही.
सर्व कागदपत्राचे अवलोकन केले असता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी परळी येथून जालना येथे पार्सलने माल पाठविला होता, माल घेणार हे माल घेण्यासाठी जालना येथे सामनेवाले यांच्या कार्यालयात गेले नाही, अगर त्याबाबत तजवीज केली नाही. सदरील माल दि.11.08.2010 रोजी पाठविण्यात आला व तदनंतर तक्रारदार यांनी मे2011 मध्ये त्या मालाबाबत चौकशी सुरु केली. वर नमुद केलेला कालावधी पाहता असे आढळून येते की, माल घेणार हे माल जालना येथे पोहचवूनही पार्सल घेण्यासाठी आले नाही, तसेच सामनेवाला यांनी वेळोवेळी कळवूनही ते माल घेण्यास आले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेली बाब सिध्द करण्यासाठी शपथपत्र दिलेले नाही. सबब या मंचाचे मत असे की, तक्रारदार हे मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सामनेवाला यांनी सेवा देण्यास त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष