निकाल
दिनांक- 14.01.2015
(द्वारा- श्री.रविंद्र राठोडकर, सदस्य)
तक्रारदार महेश पांडूरंग तिपाले यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे, तक्रारदार हा पारगाव येथील रहिवाशी असून सेंट्रीगचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितो. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 यांच्या कंपनीचे टाटा व्हिस्टा एल.एस. हे वाहन सामनेवाला क्र.3 यांचेकडून काही आर्थिक सहाय्य घेऊन दि.11.11.2011 रोजी खरेदी केले असून त्यांचा आर.टी.ओ.पासींग नं.एम.एच.23/वाय-4445 असा आहे. सदरील वाहनाची वॉरंटी दिड वर्षापर्यंत किंवा पंच्याहत्तर हजार किलोमीटर पर्यंत दिली आहे. त्यानुसार सदोष पार्ट सदरील वाहनात आढळून आल्यास तो बदलून दिला जाईल असे सामनेवाला यांनी सांगितले. तक्रारदार हा सेंट्रींगचे कामानिमित्त एका साईटवरुन दुस-या साईटवर जाण्यासाठी सदरील वाहनाच वापर करीत होता.त्यावेळेस सदरील वाहनात असे दिसून आले की, चालू रनींगमध्ये स्पीड आपोआप कमी होते म्हणून तक्रारदाराने दि.12.11.2011 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे सदरील गाडी दुरुस्तीसाठी दिली असता त्याने ती दुरुस्त करुन दिली त्यापोटी रु.997/- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराकडून घेतले. त्यानंतर पुन्हा 8 ते 10 वेळेस तशाच प्रकारचा बिघाड सदरील वाहनात निर्माण झाला म्हणून तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्याकडे सदरील वाहन दुरुस्तीसाठी लावून सुध्दा ते दुरुस्त झाले नाही. त्यापोटी तक्रारदाराने आतापर्यंत एकूण रु. 19,925/- सामनेवाला क्र.1 यांना दिले. परंतू आज देखील गाडीचा तोच बिघाड दुरुस्त झाला नाही. त्यामुळे तक्रारदारास त्या कालावधीत दुस-या गाडीच्या भाडयापोटी रु.60,000/- खर्च आला. तसेच सदरील कालावधीमध्ये तक्रारदाराचे बरेचसे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तक्रारदाराने वकीलामार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठवून सदरील नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू सामनेवाला यांनी सदरील नुकसान भरपाई दिली नाही आणि वॉरंटी नुसार सदरील बिघाड दुरुस्त करुन दिलेला नाही.म्हणून तक्रारदाराने सामनेवाला विरुध्द तक्रार दाखल करुन अशी मागणी केली की, आर्थिक नुकसान रु.4,39,225/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- नुकसान भरपाई सामनेवाला यांनी द्यावी आणि वॉरंटी नुसार तक्रारदारास गाडींचे इंजिन बदलून द्यावे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर होऊन निशाणी 12 नुसार लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारीतील बराचसा मजकूर सत्य व खरा असून तो मान्य केला आहे. तसेच पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराने ज्या ज्या वेळेस सदरील वाहन दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे आणले असता त्या त्या वेळेस तक्रारदारास सदरील वाहन दुरुस्त करुन दिले. त्याच बरोबर तक्रारदाराने सदरील वाहनासाठी चैनीच्या/शो च्या पार्टस खरेदी केले आहे आणि त्याची बिले देण्यात आलेली आहेत. म्हणजेच सामनेवाला क्र.1 हा फक्त सदरील वाहनाचा वितरक आहे. म्हणून त्यांनी सदरील वाहनात वेळोवेळी दुरुस्ती करुन दिली परंतू सदरील वाहनाची वॉरंटी देण्याचा किंवा सदोष पार्टस बदलून देण्याचा निर्णय हा सामनेवाला क्र.2 यांचा आहे. म्हणून सदरील वाहनाचे इंजिन बदलून देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची नाही. म्हणून सामनेवाला क्र.1 यांनी द्यावयाच्या सेवेत कसलीही त्रुटी ठेवली नाही या कारणास्तव सामनेवाला क्र.1 यांच्या विरुध्द सदरील तक्रार खारीज करुन तक्रारदाराने विनाकारण त्रास दिल्याबददल रु.50,000/- नुकसान भरपाई तक्रारदाराने द्यावी असा आदेश करावा.
सामनेवाला क्र.2 यांचे नाव सदरील प्रकरणातून काढून टाकावे म्हणून तक्रारदाराने दि.03.02.2014 रोजी या मंचासमोर पुरशिस निशाणी 21 नुसार दाखल केली असून या मंचाने दि.19.03.2014 च्या आदेशानुसार सामनेवाला क्र.2 यांचे नाव सदरील प्रकरणातून वगळलेले आहे.
सामनेवाला क्र.3 हे मंचासमोर हजर होऊन निशाणी 9 नुसार लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाला क्र.3 ही कंपनी कायदा 1956 अन्वये नोंदणी झालेली वित्तीय संस्था असून आवश्यकतेनुसार वित्त पुरवठा करण्याचे काम करते. म्हणजेच सामनेवाला क्र.3 हे वाहन संबंधित कर्ज पुरवठा करण्याचे काम करतात. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज दिले आहे. त्यावेळेस सामनेवाला क्र.3 व तक्रारदार यांच्यामध्ये करार झालेला होता. त्या करारानुसार तक्रारदाराने घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळच्यावेळी परतफेड करणे बंधनकारक आहे. तसेच कर्जाच्या अनुषगाने काही वाद उपस्थित झाल्यास तो वाद त्यांच्या मुंबई येथील लवादाकउे दाखल करावा असे सुचित केले आहे. त्याच बरोबर वाहनाला काही झाले असल्यास म्हणजेच चोरी, जळाणे, नुकसान होणे या कारणासाठी कर्जाचे हप्ते थांबविता येत नाही. सदरील वाहनातील दोष हा उत्पादीकीय दोष आहे म्हणून सामनेवाला क्र.3 हा त्या दोषाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरिल्या जबाबदार नाही. कारण त्याची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 व 2 यांची आहे. म्हणून तक्रारदाराने विनाकारण चुकीच्या पध्दतीने सामनेवाला क्र.3 यांना या तक्रारीत पार्टी केले आहे जी बेकायदेशिर आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार सामनेवाला क्र.3 यांच्या विरुध्द खर्चासह नामंजूर व्हावी.
तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र आणि सामनेवाला यांचे लेखी म्हणणे आणि त्यांनी दाखल केलेले कागदपत्र आणि त्यांचे लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता, न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली काय? नाही.
2) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे
नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे विधीज्ञ श्री.एस.आर.कुंभार यांनी या मंचाचे लक्ष तक्रारदाराची तक्रार निशाणी क्र.1, कागदपत्रे निशाणी क्र.4 आणि पुराव्याचे शपथपत्र निशाणी 22 याकडे वेधले. तक्रारदाराचे विधिज्ञांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने दि.11.11.2011 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 म्हणजेच टाटा कंपनीची टाटा व्हिस्टा एल.एस. वाहन रक्कम रु.5,22,504/- मध्ये खरेदी केले त्यावेळेस तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 यांचेकडून रु.2,30,000/- आर्थिक सहाय्य घेऊन उर्वरीत रक्कम रु.2,92,000/- नगदी भरले. सदरील गाडीचा नं.एम.एच.23/वाय-4445 असा आहे. त्यावेळेस कंपनीने दिड वर्षाची वॉरंटी म्हणजेच पंच्याहत्तर किलोमीटर पर्यंतची वॉरंटी दिली, त्यानुसार सदरील गाडीचा कोणताही पार्ट सदोष आढळून आल्यास तो बदलून दिला जाईल असे सामनेवाला यांनी सांगितले.
तक्रारदार हा व्यवसायाने सेंट्रींगचे काम करतो त्यामुळे सदर गाडीचा वापर तो एका साईटवरुन दुस-या साईटवर जाण्यासाठी करतो. सदरील गाडी वापरत असताना गाडी चालू रनिंगमध्ये स्पीड आपोआप कमी होते म्हणून तक्रारदाराने ही बाब सामनेवाला क्र.1 यांचे निदर्शनास आणून देऊन दि.12.11.2011 रोजी शोरुम मध्ये जमा करुन सामनेवाला क्र.1 यांचेकडून दुरुस्त करुन घेतली त्यापोटी रु.997/- दिले. त्यानंतर तशाच प्रकारचा बिघाड सदरील गाडीमध्ये 8 ते 10 वेळेस निर्माण झाला परंतू सामनेवाला क्र.1 यांनी मोबदला घेऊन बिघाड दुरुस्त झाला म्हणून सदरील वाहन आलेल्या दिवशी तक्रारदारास परत केले. म्हणजेच अ.क्र.दि.02.12.2011, 23.12.2011, 11.01.2012, 30.01.2012, 13.02.2012, 20.03.2012, 21.03.2012, 30.04.2012 आणि 07.05.2012 तसाच बिघाड निर्माण झाला असून त्यापोटी आतापर्यंत एकूण रक्कम रु.19,225/- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना दिले परंतू सदरील दोष आजही दुरुस्त झालेले नाही. पुढे असा युक्तीवाद केला की, सदरील कालावधीमध्ये तक्रारदाराने दुसरी भाडयाची गाडी वापरली असून त्यासाठी रु.60,000/- खर्च झाला. तसेच आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रास तक्रारदारास सहन करावा लागला. आजपर्यंत तक्रारदाराचे आर्थिक नुकसान रु.4,39,225/- झाले असून मानसिक व शारिरिक नुकसान रु.50,000/- असे एकूण रु.4,89,225/- झाले आहे. म्हणजेच सदरील वाहन वेळोवेळी दुरुस्तीला सामनेवाला क्र.1 यांच्याकडे टाकले असता त्याने आजपर्यंत सदरील बिघाड कायमस्वरुपी दुरुस्ती करुन दिला नाही. म्हणून तक्रारदाराने दि.31.05.2012 रोजी त्यांचे विधिज्ञामार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठवून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली. तसेच गाडीचे इंजिन बदलून द्यावे अशी विनंती केली. तरी सुध्दा सामनेवाला यांनी सदरील गाडीतील दोष दुरुस्त करुन दिले नाही. म्हणजेच समानेवाला यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून तक्रारदाराने अशी विनंती केली की, नुकसान भरपाई म्हणून रु.4,89,225/- आणि वॉरंटी नुसार गाडीचे इंजिन बदलून द्यावे असे आदेश द्यावेत आणि सदरील गाडी बंद काळात फायनान्स वरील कर्जाचे व्याज माफ करण्यात यावे अशी विनंती केली.
सामनेवाला क्र.1 यांचे विधिज्ञ बाळासाहेब वाघमारे यांनी या मंचाचे लक्ष त्यांचे लेखी म्हणणे निशाणी 12, लेखी युक्तीवाद निशाणी 18 यावर वेधले. सामनेवाला क्र.1 यांचे विधिज्ञांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराची तक्रार ही खोटेनाटे कारणे दाखवून मा.न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या दृष्टीने केली आहे. पुढे असा युक्तीवाद केला की, गाडी खरेदी करतेवेळेस त्या अनुषंगाने असणारी वॉरंटी, वाहनाची किंमत, विमा इत्यादी गोष्टी हया उत्पादक कंपनी पुरवत असते. सामनेवाला क्र.1 हा उत्पादक कंपनीचे वितरक आहे. ते उत्पादक कंपनीकडून आलेले वाहन वितरणाचे काम करतो. परंतू सदरील वाहनाच्या अनुषंगाने असणारे धोरणात्मक निर्णय हे उत्पादक कंपनी घेत असते. म्हणजेच सामनेवाला क्र.1 हा त्या अनुषंगाने केवळ सेवा पुरविण्याचे काम करतो. त्यानुसार ज्या ज्या वेळेस तक्रारदाराने दुरुस्तीसाठी वाहन सामनेवाला क्र.1 यांच्याकडे आणले असता, त्या त्या दिवशी रितसर मोबदला घेऊन तशी दुरुस्ती करुन दिली आहे. त्या संदर्भातील सविस्तर विवरण या मंचासमोर दाखल केले आहे. तक्रारदाराने सदरील वाहनात आपल्या सोयीनुसार चैनीच्या व शो पार्टस खरेदी केलेले आहे. तसेच तक्रारदाराचे वाहन हे सदरील बिघाडामुळे बंद नव्हते. कारण त्या कालावधीमध्ये ते वाहन वापरत असून त्याच परिस्थितीमध्ये ते दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे आणत होते. म्हणजेच सामनेवाला क्र.1 यांनी वेळच्यावेळी सदरील वाहन दुरुस्त करुन दिले आहे. त्याच बरोबर सदरील वाहनातील इंतजिन बदलून देण्याचा अधिकार हा सामनेवाला क्र.1 चा नसून उत्पादकीय कंपनीचा आहे. म्हणून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही याच कारणास्तव सामनेवाला क्र.1 यांच्या विरुध्द सदरील तक्रार नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/-सह तक्रार खारीज करण्यात यावी असा युक्तीवाद केला.
सामनेवाला क्र.3 यांचे लेखी म्हणणे निशाणी 9 चे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सामनेवाला क्र.3 हा कंपनी कायदा 1956 अन्वये नोंदणीकृत आर्थिक संस्था आहे. सामनेवाला क्र.3 हा आवश्यकतेनुसार वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करत असतो. त्याचप्रमाणे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज दिले आहे. कर्ज देत असताना तक्रारदार व सामनेवाला क्र.3 यांच्यामध्ये करार होत असतो. त्या करारानुसार दोन्ही पक्ष हे जबाबदार असतात. तशा प्रकारचा करारनामा या मंचासमोर दाखल केलेला आहे. त्या करारानुसार ज्या वाहनासाठी कर्ज घेतले असेल ते वाहन जळाले असेल किंवा चोरीस गेले असेल किंवा नुकसान झाल्यास इत्यादी कारणामुळे सदरील कर्जाचे हप्ते किंवा त्यावरील व्याज थांबविता येत नाही. तसेच कर्जाच्या अनुषंगाने काही वाद असेल तर तो वाद लवाद आणि तडजोड अधिनियम 1986 नुसार मुंबई येथील लवादाकडे दाखल करणे आवश्यक आहे. सदरील तक्रारीतील सेवा देण्याची व पार्टस बदलून देण्याची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 व 2 म्हणजेच उत्पादक कंपनी यांची आहे. म्हणून त्यांची जबाबदारी सामनेवाला क्र.3 यांचेवर येणार नाही. या कारणास्तव सामनेवाला क्र.3 यांचे विरुध्द सदरील तक्रार खर्चासह नामंजूर करावी.
वरील सर्व बाबींचा विचार केला असता आणि युक्तीवादाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता या मंचास असे दिसून येते की, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.11.11.2011 रोजी टाटा कंपनीची व्हिस्टा एल.एस. हे वाहन सामनेवाला क्र.3 यांचेकडून वित्तीय सहाय्य रु.2,30,000/- घेऊन खरेदी केले असून त्यांचा आर.टी.ओ. पासींग नं.एम.एच.23/वाय-4445 असा आहे. परंतू सद्यपरिस्थितीमध्ये ते वाहन तक्रारदाराच्या मालकीचे असल्याबददलचा कोणताही सबळ पुरावा या मंचासमोर तक्रारदाराने दाखल केला नाही. म्हणजेच दुरुस्ती पावती शिवाय इतर कोणत्याही मालकी हक्काचे कागदपत्र म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र पुस्तिका दाखल केली नाही. या उलट सामनेवाला क्र.1 यांचे कायदेशिर सल्लागार श्री.विशाल भगवानरावा भोयर यांनी या मेचासमोर निशाणी 27 नुसार शपथपत्र दाखल केले त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराने सदरील तक्रार या मंचासमोर प्रलंबित असताना सदरील वाहन श्री.बंडू रामराव भालेकर व राहूल रामराव भालेकर रा.पाली ता.जि.बीड यांना विक्री केले आहे. म्हणजेच सद्यपरिस्थितीमध्ये तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक नाही ही बाब सिध्द होते. तसेच सामनेवाला क्र.1 हा टाटा कंपनीचा वितरक असल्यामुळे ते त्या अनुषंगाने वाहन वितरणाचे व सेवा देण्याचे कार्य करतात. म्हणून तक्रारदाराने सदरील वाहन खरेदी केल्यानंतर ज्या ज्या दिवशी दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे आणले असता ते त्या त्या वेळी दुरुस्त करुन दिले आहे. म्हणजेच काही पार्टस वॉरंटीमध्ये असलेले विनामुल्य बदलून दिले आहेत आणि बाकीच्या दुरुस्तीबददल योग्य ती रक्कम आकारली आहे हे तक्रारदाराने व सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते. म्हणून सामनेवाला क्र.1 यांनी वेळोवेळी तक्रारदारास सेवा दिली आहे. त्याचबरोबर वाहन बंद कालावधीमध्ये तक्रारदाराने भाडयाचे वाहन वापरले म्हणून रु.60,000/- खर्च आला याबददलचा कुठलाही सबळ पुरावा या मंचासमोर दाखल केला नाही. जर सदरील वाहनात उत्पादकीय दोष असता तर तो उत्पादक कंपनीकडून तक्रारदारास मिळवता/मागता आला असता. परंतू तक्रारदाराने दि.03.02.2014 रोजी उत्पादक कंपनीला सदरील प्रकरणातून वगळावे म्हणून निशाणी क्र.21 नुसार पुरशिस दाखल केली असून त्यावर दि.19.03.2014 रोजी मंचाने आदेश देऊन उत्पादक कंपनीला सदरील प्रकरणातून वगळले आहे. सदरील वाहनातील दोषाबाबत तक्रारीत केलेली मागणी सामनेवाला क्र.1 यांच्याविरुध्द मागता येत नाही. तसेच सामनेवाला क्र.3 यांनी सदरील वाहनासाठी तक्रारदारास कर्ज पुरवठा केला आहे. म्हणून करारातील कलम 3 व 9 (जी) नुसार ज्या वाहनासाठी कर्ज दिले आहे त्याला झालेल्या नुकसान भरपाईसाठी, चोरीसाठी, जळणे इत्यादीसाठी सामनेवाला क्र.3 हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जबाबदार नाही. त्या कारणामुळे घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यावर व त्याच्या व्याजावर कसलाही परिणाम होत नाही किंवा ते माफ करता येत नाही. कारण तक्रारदाराने करारनाम्यानुसार कर्जाचे हप्ते व्याजासह भरणे क्रमप्राप्त आहे. वरील सर्व कारणावरुन या मंचास असे निदर्शनास येते की, सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत कसल्याही प्रकारची त्रुटी ठेवली नाही. म्हणून तक्रारदाराने सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब शाबीत केली नाही. त्यामुळे, तक्रारदार हे तक्रारीतील नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.वरील सर्व कारणास्तव तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र आहे.
म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड