(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :17/11/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.17.02.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्त्याकडे एच.आर.38/ई-2955 या क्रमांकाचे ‘मार्शल क्रेन’ हे वाहन होते, सदर वाहन गैरअर्जदारांकडे विमा क्र.व्हीसी 0008731300100 अंतर्गत दि.28.11.2008 ते 27.11.2009 या कालावधीकरीता रु.20,00,000/- करीता विमाकृत होते. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदारांनी गैरहेतुने दि.29.11.2008 रोजीचे पत्रान्वये वाहनाचा उपयोग फक्त ‘इरिगेशन साईट, नागभीड’ येथेच करावा. गैरअर्जदारांचे एजंट श्री. शेख परवेझ यांनी तक्रारकर्त्याला बोलावुन चर्चा केली व त्यांनी दि.14.12.2008 ला दि.29.11.2008 चे पत्रावर वर्षातुन दोनदा सदरचे वाहन एका ठिकाणावरुन दुस-या ठिकाणी हलविता येईल. मात्र त्यासंबंधीची माहिती गैरअर्जदारांना लिखीत स्वरुपात वाहन हलविण्यापूर्वी देणे गरजेचे राहील. तक्रारकर्त्याला सदर वाहन नागभीड येथे न्यावयाचे होते म्हणून दि.10.12.2008 रोजी गैरअर्जदारांना लेखी कळविले आणि दि.11.12.2008 रोजी वाहन नागपूर येथून नागभीडसाठी रवाना केले असता उमरेड पोलिस स्टेशनचे सिमेमध्ये अपघात झाला व आग लागून वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले. तक्रारकर्त्याने वाहनाच्या नुकसानीबाबत गैरअर्जदारांकडे दावा दाखल करुन विम्याचे रकमेची मागणी केली, परंतु ती गैरअर्जदारांनी नाकारली म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तक्रारकर्त्याने विम्याची रक्कम रु.20,00,000/- मिळावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावे, तसेच तक्रारीचा व नोटीसचा खर्च मिळून रु.12,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. तक्रारकर्त्याने प्रस्तुत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 19 दस्तावेजांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता त्यांनी मंचात हजर होऊन आपले उत्तर दाखल केले ते खालिल प्रमाणे...
गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याने स्वतःच घोषीत करुन वाहन हे नागभीड येथेच चालविल्या जाईल असे कळविले आणि त्याप्रमाणे त्यास पॉलिसी देण्यांत आली होती. सदर पॉलिसी विशिष्ट भागात वाहनाचे वापरासंबंधाने व त्याच भागात नुकसान झाल्यास नुकसानी संबंधीची होती, त्यामुळे तक्रारकर्त्याची मागणी गैरकायदेशिर आहे. गैरअर्जदारांनी दुसरा आक्षेप घेतला आहे की, जे वाहन जळून नष्ट झाल्याचे दाखविण्यांत येत आहे ते आणि विमाकृत वाहन हे वेगवेगळे असुन तक्रारकर्ता भलत्याच वाहनाचे विम्याची मागणी करीत आहे.
5. सदर तक्रार मंचासमक्ष दि.02.11.2011 रोजी युक्तिवादाकरीता आली असता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मंचाने ऐकला. तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदारांनी दि.29.11.2008 रोजी जे पत्र दिले होते, त्या पत्राचे अवलोकन केले असता त्यामध्ये खालिल प्रमाणे मजकूर आहे...
“Kindly note that our above mentioned insurance cover is valid at above site only. Any losses/ Damages OR Third Party Liability outside the above site is not covered”.
त्यामधे तक्रारकर्त्याचे दि.28.11.2008 रोजीचे पत्राचा उल्लेख आहे, जे तक्रारकर्त्याने स्वतः करुन दिलेले घोषणापत्र असुन त्यातील मजकूर खालिल प्रमाणे आहे...
“It is hereby understood and agreed that the insurer shall not be liable in respect of the above vehicle insured while the vehicle is being used elsewhere than in the above mentioned insured’s premises, except where the vehicle is specifically required for a mission to fight a fire”.
वरील मजकूराचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता त्यामध्ये सदर वाहनाचा उपयोग अन्यत्र ठिकाणी केल्यास गैरअर्जदारांची जबाबदारी राहणार नाही आणि जेथे उपयोग करावयाचा आहे ते स्थान म्हणजे “Errigation at Nagbhid site Umred Road, Maharashtra”, असे नमुद केलेले आहे. आता तक्रारकर्ता गैरअर्जदारांचे कथीत एजंटच्या पत्राचे कबुलीचा हवाला देत आहे, तो दस्तावेज तक्रारकर्त्याने दस्तावेज क्र.4 म्हणून दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे सदरचे पत्र श्री. शेख परवेझ या व्यक्तिने दिले आहे, परंतु मुळ पॉलिसी विपरीत पत्र असा कथीत एजंट देऊ शकतो काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मंचाचे असे मत आहे की, असा अधिकार संबंधीत एजंटला असुच शकत नाही. तसेच गैरअर्जदारांनी सदरचा दस्तावेज पूर्णपणे नाकारलेला आहे. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने दि.10.12.2008 रोजी गैरअर्जदारास सुचना दिली आणि विमाकृत वाहन दि.11.12.2008 रोजी ट्रेलरवर चढवून नागपूर येथून नागभीड करता रवाना केले. मंचाच्या मते असा अधिकार तक्रारकर्त्याला नाही आणि गैरअर्जदारांनी त्याला दिलेली पॉलिसी स्वयंस्पष्ट आहे आणि पॉलिसीच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही मंजूर होण्यास पात्र नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.