निकालपत्र
निकाल दिनांक – २४/०२/२०२०
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदार व तिचे पती यांनी स्वतःचे वापरासाठी पती रोहिदास मोहन काळे यांचे नावे हुंदाई कंपनीची सॅन्ट्रो कार नंबर एमएच-१६-एजे-३६८२ ही विकत घेतली होती. तक्रारदार यांचे पती सदर कारची मालक होते व आहे. तक्रारदार यांचे पती यांनी त्यांचे कारचा विमा सामनेवालेकडे उतरविला आहे. सदरील विमा पॉलिसीचा क्रमांक १६३३०१/३१/ २०१४/३७५३ काढली होती. सदर विमा पॉलिसीच्या कालावधी १९-१२-२०१३ ते १८-१२-२०१४ पर्यंत होता. दिनांक १६-११-२०१४ रोजी तक्रारदाराचे पती कारने सिध्दटेक ते दौंड रोडने जात असतांना भिमा नदीचे पुलावर अपघात होऊन सदरील गाडी पुलावरून खाली कोसळली व त्यात अपघात होऊन तक्रारदार यांचे पती यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते मयत झाले. तसेच सदरील कारचे अपघातामध्ये पुर्णपणे नुकसान झाले. सदरील अपघातानंतर पोलीसांनी समक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा केला व गुन्हा रजिस्टर नंबर I २६३/२०१४ नुसार कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविलेला आहे. या अपघातात तक्रारदार यांनी तक्रारदार यांचे पतीचे नावावरील सॅन्ट्रो कारला अपघात होऊन त्या गाडीचे पुर्णपणे नुकसान झाल्याचे सामनेवाले विमा कंपनीस कळविले. त्याप्रमाणे सामनेवाले विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी सदरील वाहन अधिकृत शोरूमला घेऊन जा व त्यांचेकडुन एस्टिमेंट करून क्लेम सादर करा, असे सांगिले. त्यानुसार तक्रारदार हिने सदर वाहन अश्मित मोटार प्रा.लि. बोल्हेगांव फाटा, नागापुर ता.जि. अहमदनगर यांच्याकडे क्रेनने घेऊन आली. सदरील शोरूममध्ये गाडीची पाहणी करून त्यांनी एकुण खर्च रक्कम रूपये ४,५२,८७३/- इतका खर्च अपेक्षीत असल्याचे कोटेशन तक्रारदाराला दिले. त्यानुसार तक्रारदार हिने सामनेवाले यांच्याकडे वाहनाचे क्लेमबाबत सर्व कागदपत्रांची पुर्तता करून गाडीची दुरूस्तीसाठी रक्कम रूपये ४,५२,८७३/- खर्च येत असुन सदरील क्लेम मंजुर करून रक्कम अदा करण्यात यावी, याबाबत सामनेवालेंना कळविले. सामनेवाले यांनी खोटे व बनावट कारण नमुद करून सदरचा क्लेम नामंजुर केल्याबाबत दिनांक १६-०९-२०१५ रोजी तक्रारदार हिस कळविले. सामनेवालेने त्यांचे पत्रात गाडी ट्रान्सफर करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. मात्र गाडीचे पुर्णपणे नुकसान झाल्याने आरटीओ रेकॉर्डला गाडी रिपेअर केल्याशिवाय ट्रान्सफर होऊ शकत नाही. मात्र तक्रारदार हिस क्लेमची रक्कम देणे लागु नये म्हणुन खोटे व बनावट पत्र देऊन तक्रारदार हिचा क्लेम बेकायदेशिररित्या त्यांनी नाकारला आहे. तक्रारदार हिने सामनेवाले यांचेकडुन क्लेमची रक्कम ५,००,०००/- तसेच सदरील रक्कम वसुल होईपावेतो नुकसान द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे नुकसान दाखल व्याज देण्यात यावे. तसेच शारिरीक, मानसिक त्रासाबद्दल रक्कम रूपये ४७,१२७/- देण्यात यावे आणि तक्रार अर्जाचा खर्च सामनेवालेकडुन द्यावा, अशी मागणी तक्रारदार हिने केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दस्तऐवज यादी निशाणी ५ सोबत एकुण १५ कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये फिर्याद दि.१६-११-२०१४, घटनास्थळ पंचनामा दि.१६-११-२०१४, मरणोत्तर पंचनामा दि.१६-११-२०१४, रोहिदास मोहन काळे यांचा पी.एम. रिपोर्ट दि.१६-११-२०१४, मृत्यु प्रमाणपत्र दि.२८-११-२०१४, कंपनीने दिलेले पत्र ३-९-२०१५, इन्शुरन्स पॉलिसीची प्रत, शाखाधिकारी यांना दिलेला अर्ज, दि.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसाठी तक्रारदार यांचा अर्ज, आर.सी. बुक, मयताचे ड्रायव्हींग लायसन्स, जय मल्हार मोटार्स यांनी दिलेले कोटेशन, दि.ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी यांचे पत्र, दि. ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला दिलेला दावा फॉर्म, तक्रारदार यांचे आधार कार्ड दाखल आहे.
४. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना मे. मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले या प्रकरणात हजर झाले. सामनेवाले यांनी निशाणी १० ला लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारीत नमुद सॅन्ट्रो कार नंबर एमएच-१६-एजे-३६८२ या वाहनाचा विमा रोहिदास मोहन काळे यांनी दिनांक १९-१२-२०१३ ते १८-१२-२०१४ या कालावधीसाठी पॉलिसीच्या नियम व अटीनुसार विमा पॉलिसी काढलेली होती. सदर पॉलिसीच्या अटी व शर्ती ह्या दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक आहेत आणि पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदार हिचा विमा दावा नाकारण्यात आला. सामनेवालेने तक्रारदार हिचे नावे पत्र देऊन विमा दाव्याकरीता आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती. आवश्यक कागदपत्र प्राप्त झाल्यास आवश्यक प्रक्रिया विमा दाव्यावर सामनेवालेला करता आली असती. परंतु तक्रारदार हिने कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पुरविली नाही. दिनांक दिनांक १६-११-२०१४ रोजी सदर वाहनाचा विमा धारक मालक अपघातात मयत झाला. सदरील पॉलिसी रोहिदास मोहन काळे यांना सॅन्ट्रो कारसाठी देण्यात आली होती. विमा पॉलिसीच्या अट क्रमांक ९ मध्ये पुढीलप्रमाणे नमुद केलेले आहे.
‘ In the event of the death of the sole insured, this policy will not immediately lapse but will remain valid for a period of three months from the date of the death of insured or until the expirty of this policy (whichever is earlier). During the said period, legal herir(s) of the insured to whom the custody and use of the Motor Vehicle passess may apply to have this policy transferred to the name(s) of the heir(s) or obtain a new insurance policy for the Motor Vehicle.’
सदर अटीप्रमाणे तक्रारदार हिने सदर विमा पॉलिसी ही संबंधीत कालावधीमध्ये ट्रान्सफर केली नाही. सदरील विमा पॉलिसी ही दिनांक १८-१२-२०१४ ला कालबाह्य झाली आणि सदरील वाहनाचा विमाधारक हा दिनांक १६-११-२०१४ रोजी मयत झाला. दिनांक १८-१२-२०१४ पुर्वी सदरचे वाहन हे कायदेशीर वारसाकरीता हस्तांतरीत केले गेलेले नाही. तसेच तक्रारदार हिने सामनेवालेकडे मृत्यु प्रमाणपत्र, नविन नाव असलेले आर.सी. बुक, मुळ पॉलिसीची प्रत सादर केलेली नाही. सामनेवालेने तक्रारदार हिने दाखल केलेला विमा दाव्याची छाननी करून सामनेवालेने पॉलिसीच्या अटी व शर्ती क्रमांक ९ ची तक्रारदार हिस माहिती दिलेली आहे व विमा पॉलिसीच्या या अटीनुसार सदरील विमा दावा नामंजुर केलेला आहे. पॉलिसीच्या अट क्रमांक ९ नुसार कायदेशीर वारसाचे नावे वाहन हस्तांतरीत करणेसाठी तक्रारदार ही अपयशी ठरली आहे. म्हणुन पॉलिसीच्या अट क्रमांक ९ नुसार तक्रारदार हिचा दावा फेटाळण्यात आला. तक्रारदार हिची तक्रार दाखल करण्यास तिला कुठलेही कारण घडलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हिची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केलेली आहे.
सामनेवाले यांनी निशाणी १२ सोबत विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीही दाखल केलेल्या आहेत. सामनेवाले यांनी निशाणी १३ ला लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
५. तक्रारदाराची दाखल तक्रार, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, सामनेवालेने दाखल केलेली कैफीयत/ जबाब, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, सामनेवाले तफे वकील श्री.एन.व्ही. संत यांनी तोंडी युक्तिवाद मंचासमोर केला. वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवालेने तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
६. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे पती रोहिदास मोहन काळे यांनी त्यांचे सॅन्ट्रो कारसाठी गाडीचा विमा सामनेवालेकडे उतरविला होता व त्याचा विमा पॉलिसीचा क्रमांक १६३३०१/३१/ २०१४/३७५३ असा आहे. सदरील बाब उभयपक्षांना मान्य आहे.
दिनांक १६-११-२०१४ रोजी रोजी तक्रारदाराचे पती कारने सिध्दटेक ते दौंड रोडने जात असतांना भिमा नदीचे पुलावर अपघात होऊन सदरील गाडी पुलावरून खाली कोसळली व त्यात अपघात होऊन तक्रारदार यांचे पती यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते मयत झाले. सदर मयत रोहिदास मोहन काळे हे तक्रारदार हिचे पती असल्याने तक्रारदार लाभार्थी (Beneficiary) असल्याने ती सामनेवालेची ग्राहक आहे, मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (२) - तक्रारीत नमुद सॅन्ट्रो कार नंबर एमएच-१६-एजे-३६८२ या वाहनाचा विमा रोहिदास मोहन काळे यांनी दिनांक १९-१२-२०१३ ते १८-१२-२०१४ या कालावधीसाठी पॉलिसीच्या नियम व अटीनुसार विमा पॉलिसी काढलेली होती, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. सदरचा अपघात हा दिनांक १६-११-२०१४ रोजी घडला. महणजेच पॉलिसीच्या कालावधीत घडलेला आहे. अपघाताचे दिवशी पॉलिसी वैध होती. सदर वाहन अपघातविषयी वाहन दुरूस्तीचा खर्च तक्रारदार हिने मागितला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारतांना जे कारण दिले ते अयोग्य आहे. योग्य कारण नसतांनासुध्दा तक्रारदार हिचा विमा दावा नाकारून सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी केली आहे, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.२ चे होकारार्थी देण्यात येत आहे.
८. तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारला म्हणुन सदरील मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे व मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
तक्रारदार हिने तक्रारीत नमुद अपघातग्रस्त वाहनाचे अधिकृत शोरूम मध्ये वाहन दुरूस्तीसाठी नेले असता रक्कम रूपये ४,५२,८७३/- इतके खर्चाचे कोटेशन दिले, असे म्हटले आहे. परंतु त्याचे सत्यतेसाठी शोरूमचे संचालकाचे शपथपत्र दाखल केलेले नाही, सबळ पुरावा दिलेला नाही. त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रक्कम ४७,१२७/- रूपयाची रक्कम विषयी सविस्तर वर्णन दिलेले नाही. त्यामुळे सदरच्या रकमा देता येणार नाही. सामनेवालेचे सर्व्हेअर श्री.डि.जे. धामने यांनी वाहन दुरूस्ती खर्चापोटी रक्कम रूपये २,६५,०००/- देणेयोग्य रक्कम, असे अहवालात नमुद आहे. त्यामुळे सदर तक्रारदार ही रक्कम रूपये २,६५,०००/- व्याजासह मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
९ मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. २. सामनेवाले यांनी तक्रारदारास सर्व्हेअर श्री.डी.जे. धामने यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे रक्कम रूपये २,६५,०००/- (अक्षरी दोन लाख पासष्ट हजार मात्र) व त्यावर दिनांक ०३-०९-२०१५ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. ३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) द्यावा. ४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. ५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. ६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |