तक्रारदार स्वतः हजर
विरुध्द पक्ष गैरहजर
एकतर्फा आदेश
द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
तक्रारदाराचे संक्षिप्त कथन असे की, त्याने विरुध्द पक्षा क्र. 1 निर्मित भ्रमणध्वनी संच विरुध्द पक्ष क्र. 2 कडून दि. 04/01/2011 रोजी रु. 5,000/- रकमेस विकत घेतला. विकत घेण्याचे तारखेपासूनच सदर संच नादुरुस्त असल्याचे त्याचे निदर्शनास आले. विरुध्द पक्षाने संचाची बॅटरी बदलून दिली. तसेच एकदा दुरुस्ती करुन दिली. मात्र त्यानंतरही वादग्रस्त संच काम करीत नसल्याने विरुध्द पक्षासोबत संपर्क साधण्यात आला. विरुध्द पक्षाने दुरुस्तीसाठी संच आपल्या ताब्यात घेतला व दुरुस्तीसाठी दिल्लीला पाठविण्यात येईल असे सांगितले. मात्र अद्यापही विरुध्द पक्षाने संच परत केला नाही. त्यामुळे प्रार्थनेत नमूद केलेनुसार खरेदीची रक्कम परत करण्यात यावी तसेच मंचाने नुकसान भरपाई मंजूर करावी असे त्याचे म्हणणे आहे.
तक्रारीचे समर्थनार्थ निशाणी 2 अन्वये स्वतंत्र प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 3(1) ते 3(5) अन्वये कागदपत्र दाखल करण्यात आले. यात प्रामुख्याने भ्रमणध्वनी संच घेतल्याचे बिल दि. 4/1/2011, विरुध्द पक्षाचे हमीपत्र, सर्व्हीस जॉबशिट दि. 17/4/2011 व विरुध्द पक्षाला पाठविलेले पत्र यांच्या प्रतींचा समावेश आहे.
निशाणी 4 अन्वये विरुध्द पक्षाला नोटीस जारी केली व जबाब दाखल करण्याचा निर्देश दिला. नोटीस पोचपावती निशाणी 5 अभिलेखात उपलब्ध आहे. सदर प्रकरणी लेखी जबाबासाठी दि. 7/9/2011, 4/10/2011, 21/11/2011 याप्रमाणे तारखा झाल्या. नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने जबाब दाखल न केल्याने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3(ब) अन्वये सदर प्रकरणाची आज रोजी एकतर्फा सुनावणी करण्यात आली. मंचासमोर स्वतः हजर असलेल्या तक्रारदाराचे म्हणणे ऐकण्यात आले तसेच त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. त्याआधारे खालील मुदद्यांचा विचार करण्यात आलाः
मुद्देः
1. वादग्रस्त भ्रमणध्वनी संचामध्ये उत्पादनातील दोष आहे काय? ---- होय
2. तक्रारदार विरुध्द पक्षाकडून भ्रमणध्वनी संचाची खरेदी रक्कम तसेच नुकसान
भरपाई व न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहे काय? --- होय
स्पष्टिकरणः
मुद्दा क्र. 1 व 2 संदर्भातः
तक्रारीसोबत दाखल केलेल्या दि. 4/1/2011 रोजीच्या पावतीच्याआधारे असे स्पष्ट होते की, तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 2 या दुकानातून विरुध्द पक्ष 1 यांनी उत्पादित केलेला भ्रमणध्वनी संच रु. 5,000/- रकमेस विकत घेतला. विकत घेतल्यापासून त्यात दोष आढळल्याने त्याने त्वरीत विरुध्द पक्षाशी संपर्क साधला व संचाची बॅटरी गरम होणे, चार तास चार्जिंग करुनही बॅटरी रिचार्ज न होणे व कोणत्याहीप्रकारे भ्रमणध्वनी संच काम न करणे या तक्रारी त्याने विरुध्द पक्ष 1 व 2 चे निदर्शनास आणल्या. विरुध्द पक्ष 2 ने एकवेळा हा संच दुरुस्त करुन दिला. मात्र त्यानंतरदेखील त्याने त्याच प्रकारचा दोष आढळल्याने दि. 17/4/2011 रोजी त्याने विरुध्द पक्षाकडे आपला संच जमा केला. सर्व्हीस जॉबशिट तक्रारीसोबत जोडण्यात आलेला आहे. त्यात भ्रमणध्वनी संच विरुध्द पक्ष 2 ला मिळाल्याचा उल्लेख आढळतो. रिपेअरिंगसाठी तसेच बदलण्यासाठी संच दिल्लीला पाठवावा लागला असेही त्याला सांगण्यात आले. मात्र अद्यापपावेतो वारंवार संपर्क साधूनही विरुध्द पक्षाने त्याला दुरुस्ती करुन भ्रमणध्वनी संच परत केला नाही. उपरोक्त विवेचनाचेआधारे मंच या निष्कर्षाप्रत आला की, वादग्रस्त भ्रमणध्वनी संच हा उत्पादनातील दोष असल्याने दुरुस्त होण्यासारखा नाही व त्यामुळेच विरुध्द पक्षाने दुरुस्त करुन परत केलेला नाही. सबब ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(फ) अन्वये विरुध्द पक्ष उत्पादनातील दोष भ्रमणध्वनी संच तक्रारदारास विकण्यास जबाबदार आहे.
मंचाचेमते तक्रारदार हा भ्रमणध्वनी संचाची खरेदी रक्कम रु. 5,000/- विरुध्द पक्षाकडून परत मिळणेस पात्र आहेत. तसेच त्याला विरुध्द पक्षाने तक्रारीची दखल न घेतल्याने मंचाकडे धाव घ्यावी लागली. ज्या उद्देशाने त्याने भ्रमणध्वनी संच विकत घेतला तो उद्देश पूर्ण न होता केवळ मनस्ताप सहन करणे भाग पडले. सबब तक्रारदार विरुध्द पक्षाकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व न्यायिक खर्च रु. 1,000/- मिळणेस पात्र आहे.
सबब अंतीम आदेश पारीत करएण्यात येतोः
आ दे श
1. तक्रार क्र. 293/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने आदेश तारखेचे 45 दिवसांचे आंत तक्रारदारास भ्रमणध्वनी संच खरेदी करण्याची रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) तसेच नुकसान भरपाई रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) व न्यायिक खर्च रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) असे एकूण रु. 7,000/- (अक्षरी रुपये सात हजार) दयावेत.
3. विहीत मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने न केल्यास तक्रारदार सदर रक्कम आदेश तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 18% दराने व्याज विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल करणेस पात्र राहिल.
दिनांकः 08/12/2012. (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे