ग्राहक क्र. 140/2014.
तक्रार दाखल ता. 08/07/2014
निकाल तारीख : 19/03/2016
कालावधी: 01 वर्षे 08 महिने 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) श्री. महेश आप्पाराव पवार,
वय - 26 वर्षे, धंदा- फळ विक्री व वाहन व्यवसाय,
रा.येडशी, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापक,
नोकीया इंडीया सेल्स प्रा.लि.,
प्लॅट क्र.1204,12 वा मजला,
कैलास बिल्डींग, कस्तुरबा गांधी मार्ग,
नवी दिल्ली-110001.
2) व्यवस्थापक, श्रावणी मोबाईल्स,
अधिकृत नोकीया केअर सेंटर,
बस स्टॅड जवळ, सुनिल प्लाजा, उस्मानाबाद.
3) सलिम मोबाईल अॅण्ड वॉच शॉपी,
ताज कॉम्पलेक्स, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एम.डी.पवार.
विरुध्द पक्षकारा क्र.1 विरुध्द तक्रार रद्द.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.जे.देशपांडे.
विरुध्द पक्षकारा क्र.3 विरुध्द तक्रार रद्द.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
तक्रारकर्ता (तक) यांने विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 निर्मीत विप क्र.3 वितरीत मोबाईल फोन घेतला मात्र त्यात दोष निघाला तो केअर सेंटर विप क्र.2 ने दूर करुन दिला नाही व सेवेत त्रुटी केली म्हणून ही तक्रार दिली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढील प्रमाणे आहे.
1. तक हा येडशी येथील रहिवासी असून फळ विक्री व वाहनाचा व्यवसाय करतो. विप क्र.1 निर्मीत विप क्र.3 कडून तक ने नोकिया मोबाईल क्रमांक 501 आयएम नंबर 35729405647667675 दि.4.12.2013 रोजी रु.5000/- ला खरेदी घेतला. विप क्र.3 ने त्याबद्दल पावती क्रमांक 1516 दिलेली आहे. मोबाईल घेतल्यापासून एक महिन्याचे आंतच त्यामध्ये बिघाड होऊन तो पूर्णपणे बंद पडू लागला.
2. तक ने त्याबद्दल विप क्र.3 ला कल्पना दिली. विप क्र.3 ने कस्टमर केअर विप क्र.2 कडून मोबाईल दुरुस्त करुन घेण्याचा सल्ला दिला. दि.18.2.2014 रोजी तक विप क्र.2 कडे मोबाईल दुरुस्त करुन घेण्यासाठी गेला. विप क्र.2 ने मोबाईल एक तासात दुरुस्त करुन देतो असे सांगितले. पंरतु त्यानंतर आणखी दोन तास लागतील असे सांगितले. त्यानंतर मोबाईल उद्या दुरुस्त होईल असे सांगितले. दुस-या दिवशी आणखी दोन दिवस थांबावे लागेल असे सांगितले. तक ने विप क्र.2 कडे मोबाईलची पोहोच मागितली विप क्र.2 ने आरेरावीची भाषा केली व मोबाईल परत घेऊन जा असे ठणकावले. दोन दिवसांने तक विप क्र.2 कडे गेला. विप क्र.2 ने वॉरंटी मध्ये मोबाईल दुरुस्त होणार नाही असे सांगितले.
3. विप क्र.2 ने तक ला सांगितले की, मोबाईलचे स्वीच पूर्णपणे नादुरुस्त आहे. स्विच बदलण्यासाठी रु.650/- खर्च येईल. तक ने वॉरंटी असल्याचे सांगूनही विप क्र.2 ने त्यांचेकडून रु.650/- रोख घेतले. त्याबददल पावती दि.23.2.2014 रोजी दिलेली आहे. दोन दिवसांने विप क्र.2 ने सांगितले की, मोबाईलमध्ये पाणी गेले आहे व तो डेड झाला आहे. तो दुरुस्त होणार नाही. वास्तविक मोबाईल मध्ये पाणी गेलेले नव्हते. विप क्र.2 कडूनच तो हेतूपुरस्सरपणे भिजवला गेला आहे.
4. तक ने विप क्र.2 कडे जमा केलेली रक्कम तसेच मोबाईल हॅडसेट मागितला विप क्र.2 ने हॅडसेट दिला नाही अगर रक्कमही दिली नाही. तक चा व्यवसाय फोनच्या संपर्कातून चालतो त्यांचा बहूतांश ग्राहकाशी संपर्क तुटला आहे व व्यवसायावर परिणाम झालेला आहे. तक ने विप क्र.2 ला नोटीस पाठवली. ती त्यांला दि.21.3.2014 रोजी मिळाली व विप क्र.3 ला दि.19.3.2014 रोजी मिळाली. विप यांनी त्यानंतरही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मोबाईलची रककम रु.5000/- मानसिक त्रासापोटी रु.10000/- व नोटीसचा खर्च रु.5000/- विप कडून मिळावा म्हणून तक ने ही तक्रार दि.8.7.2014 रोजी दाखल केलेली आहे.
5. तक ने तक्रारीसोबत मोबाईल खरेदीची पावती दि.4.12.2013 ची, सर्व्हीस जॉबशिट दि.25.02.2014 चे, नोटीस स्थळप्रत दि.18.3.2014 ची, पोहच पावत्या, इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत.
6. तक ने विप क्र.1 व 3 यांना नोटीस बजावणी कामी योग्य ती पावले उचलली नाहीत. त्यामुळे दि.31.10.2015 चे आदेशाने विप क्र.1 व 3 विरुध्द तक्रार रद्द झालेली आहे.
7. विप क्र.2 ने हजर होऊन दि.13.8.2015 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. तक मोबाईल एक महिन्यात बंद पडल्यानंतर या विप कडे आला हे कबूल नाही. तक या विप कडे दि.18.2.2014 रोजी आला. व त्यांला मोबाईल तासात दुरुस्त होईल हे सांगितले हे कबूल नाही. तक ला विप ने अरेरावीची भाषा वापरली हे कबूल नाही. तक ने दि.18.02.2014 रोजी या विप ला मोबाईल दुरुस्तीसाठी दिला हे कबूल नाही.
8. तक या विप कडे दि.25.02.2014 रोजी आला होता. त्यावेळेस त्यांचा मोबाईल पाण्यात पडलेला असल्यामुळे पूर्णपणे बिघडलेला होता. पाण्यात पडलेल्या मोबाईलची कंपनीने वॉरंटी दिलेली नाही. त्यामुळे विप ने विनामोबदला दुरुस्त करण्याचा प्रश्नच नव्हता. पाण्यात पडलेला असल्यामुळे मोबाईल दुरुस्त होईल याबददल शाश्वती नव्हती व तशी कल्पना तक ला देण्यात आली होती. दि.23.02.2014 रोजी तक ने या विप कडे मोबाईल दुरुस्तीसाठी टाकला त्याच दिवशी जॉबशिट करुन त्यांची पावती तक ला दिलेली आहे. तक ने भांडण करुन ती पावती घेतली हे कबूल नाही. तक ने स्वतः सांगितलेली माहीती जॉबशिट मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये पाण्याने नादुरुस्त असे नमूद करण्यात आलेले आहे.
9. या विप ने तक कडे दुरुस्तीची रक्कम दिलेली नाही. जॉबशिट मध्ये इस्टीमेंट दिलेले असते हॅडसेट परत घेऊन जाताना ती रक्कम देऊन हॅडसेट न्यायचा असतो. मोबाईलचे अभावी तक च्या व्यवसायावर परिणाम झाला हे कबूल नाही. या विप ने तक च्या नोटीशीला उत्तर पाठवले होते. ते स्विकारण्यात आलेले नाही. तक ने चुकीची तक्रार दिली ती रद्द होण्यास पात्र आहे.
9. तक ची तक्रार, त्यांने दिलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी दिलेली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. तक हा विप चा ग्राहक आहे काय ? होय
2. विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? विप क्र.2 पुरते होय.
3. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय विप क्र.2 कडून.
4. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1
10. तक ने विप क्र.1 निर्मीत व विप क्र.3 वितरित मोबाईल हॅडसेट घेतला याबददल वाद नाही. खरेदीची पावती दि.4.12.2013 ची तक ने हजर केलेली आहे. मोबाईल विप क्र.2 कडे दुरुस्तीसाठी टाकला त्यामुळे तक हा विप चा ग्राहक आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र.2 व 3 ः-
11. तक ने म्हटले आहे की, मोबाईल विकत घेतल्यापासून एक महिन्याचे आंत मोबाईल मध्ये बिघाड होऊन तो पुर्णपणे बंद पडू लागला. त्याबददलची कल्पना विक्रेता विप क्र.3 यांला देण्यात आली. त्यांचे सांगणेवरुन अधिकृत केअर सेंटर विप क्र.2 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी दि.18.2.2014 रोजी नेला. म्हणजेच मोबाईल घेतल्यानंतर सुमारे अडीच महिन्याने तो अधिकृत दुरुस्त केंद्रात नेण्यात आला. तेवढया काळामध्ये तक ने मेाबाईलचा कसा वापर केला याबददल काहीही खुलासा दिलेला नाही.
12. तक चे म्हणण्याप्रमाणे विप क्र.2 ने ताबडतोब मोबाईल दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र चालढकल करत गेला. शेवटी दि.23.2.2014 रोजी तक कडून रु.650/- मोबाईल दुरुस्तीसाठी घेतले. मात्र दोन दिवसांने मोबाईल मध्ये पाणी गेल्यामुळे तो दुरुस्त होणार नाही असे सांगितले. त्यानंतर हॅडसेटही परत दिला नाही अगर दुरुस्तीची रककम परत दिली नाही. विप चे म्हणण्याप्रमाणे दुरुस्तीचे इस्टीमेट तक ला देण्यात आले होते. तक ने दुरुस्तीचा खर्च भरलेला नाही.
13. तक ने हजर केलेले आहे ते दि.25.2.2014 चे जॉबशिट आहे. त्यावर तक ची सही दिसून येत आहे. तक ने विप ला दि.23.2.2014 रोजी रु.650/- दिले असे म्हटले आहे. मात्र तशी पावती दिसून येत नाही. विप ने आपल्या म्हणण्यात तक दि.25.2.2014 रोजी आला असे म्हटले आहे. मात्र तक ला दि.23.2.2014 रोजी जॉबशिट दिल्याचे म्हटले आहे. वर म्हटल्याप्रमाणे जॉबशिट वर तारीख दि.25.2.2014 अशी नमूद आहे.
14. जॉबशिट वर मोबाईल डेड आहे पाण्याने नादुरुस्त झालेला आहे ऑन ऑफ स्विचचा प्राब्लेम आहे. त्यांचा खर्च रु.650/- दाखवलेला. तक ची सही त्यामधील अटी समजण्याबददल घेतलेली आहे. खरेदी पावतीवर स्पष्टपणे नमूद आहे की, उष्णता व पाणी यांचेमुळे मोबाईलवर होणा-या नुकसानीस डिलर/कंपनी जबाबदार राहणार नाही. तक चे म्हणणे आहे की, विप क्र.2 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला असताना विप क्र.2 ने मुददाम तो पाण्यात बुडवला असे करण्याचे विप ला काहीच कारण नाही. कारण विप क्र.2 चा व्यवसाय मोबाईल दुरुस्त करणे असा आहे. वॉरंटी असेल तर त्यांचे पैसे त्यांला कंपनीकडून मिळतात. वॉरंटी नसेल तर ग्राहकाकडून पैसे घेऊन तो मोबाईल दुरुस्त केला जातो.
15. हे उघडच आहे की, तक कडूनच मोबाईल पाण्यात पडलेला होता. विप ने त्यांचे इस्टीमेट तक ला दिलेले होते. ग्राहकाला मोबाईल दुरुस्त करुन दिल्यानंतर दुसरी सही त्यावर घेतली जाते. ती सही तक ने केल्याचे दिसत नाही. तसेच रु.650/- मिळाले असे स्पष्टपणे विप क्र.2 कडून लिहून घेऊन त्याबददल त्यांची सही तक ने घेतली नाही. त्यामुळे विप क्र.2 ने तक कडून पैसे उकळले अगर त्यांचा मोबाईल बिघडवला या तक च्या तक्रारीत अर्थ दिसून येत नाही.
16. असे दिसते की, मोबाईलमध्ये पाण्यामूळे बिघाड झालेला आहे असा बिघाड तक मुळे झाला असण्याची शक्यता जास्त आहे. विप क्र.2 ने दूरुस्त करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. मोबाईल मध्ये काय बिघाड झाला व तो दुरुस्त करता येतो काय याबददल तक ने तज्ञाचे मत घेऊन हजर करणे जरुर होते असे कोणताही अर्ज तक ने दिलेला नाही. तज्ञाच्या मताच्या अभावी दुरुस्त होण्यासारखा मोबाईल बिघडला होता हे तक शाबीत करु शकला नाही. मात्र विप क्र.2 ने आहे त्या परिस्थितीत तक ला मोबाईल परत दयायला पाहिजे होता.त्याने तो परत दिल्याचे दिसत नाही. एवढी त्रुटी विप क्र.2 ने केल्याचे आढळून येते. म्हणून आम्ही मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशतः खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.2 ने तक ला मोबाईल आहे त्या परिस्थितीत या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत परत दयावा, न दिल्यास त्याबद्दल रु.3000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्रीमती विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.