निकालपत्र
निकाल दिनांक – २६/०२/२०२१
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार ही मौजे राक्षसवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मयत अशोक शंकर उर्फ पंढरीनाथ कांबळे यांची पत्नी तिचे मयत पतीचे नावे मौजे राक्षसवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर या ठिकाणी गट नंबर १०१,१०९,५२,९१ पैकी या ठिकाणी शेतजमीन मिळकत आहे. तक्रारदार हिचे पतीचा सामनेवाले कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. दिनांक १०-०३-२०१६ रोजी तक्रारदार हिचे पती मोटार सायकल नंबरएमएच-१६-एम-६६ यावरून अमोल सुभाष बाराते यांच्या पाठीमागे बसुन सावकाश जात असतांना ऑल्टो कार मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यात अपघात होऊन तक्रारदार यांचे पती गंभीर जखमी होऊन मयत झाले तसेच अमोल सुभाष बाराते हे देखील सदर अपघातात गंभीर जखमी होऊन मयत झालेले आहे. सदर अपघाताचे संदर्भात कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०१६ अन्वये ऑल्टो वरील चालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांचे पतीचे अपघाती मृत्यू झाल्यानंतर उपजिल्हा रूग्णालय कर्जत, जि. अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर संपुर्ण कागदपत्रांसहीत सामनेवाले यांचे तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा दाखल केला. तसेच सामनेवाले यांनी मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करूनही सामनेवाले यांनी तक्रादाराचा विमा दावा प्रलंबीत ठेवला. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीचा रिपोर्ट दाखल केला आहे. सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा मंजुर न करता प्रलंबीत ठेवला म्हणुन तक्रारदाराला सदर तक्रार या आयोगात दाखल करून परिच्छेद क्रमांक ८ प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी १५ प्रमाणे दाखल केली आहे. त्यामध्ये सामनेवाले यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदार हिने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या काही कागदपत्रांमध्ये ‘शंकर’ आणि काही कागदपत्रांमध्ये ‘पंढरीनाथ’ असे नाव नमुद आहे. याबाबत तक्रारदार यांना संबंधीत कार्यालयाने दिनांक २५-०२-२०१७ रोजी पत्र पाठवुन नावाबाबत शपथपत्र हे कागद सादर करण्यासाठी कळविले होते. त्यानंतर परत तक्रारदार यांना याबाबत सांगितले होते. तरीही तक्रारदार यांनी सदर कागदपत्रांची पुर्तता केली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतेही त्रुटी दिली नाही.
सामनेवाले यांनी कैफीयतीचे पुष्ट्यर्थ निशाणी १६ वर पॉलीसीची व करारनाम्याची प्रत दाखल केली आहे.
३. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.जी.एस. पिसाळ यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, त्यांचे वकील श्री. ए.के. बंग यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती अशोक शंकर उर्फ पंढरीनाथ कांबळे यांचा सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रूपये २,००,०००/- चा विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे, यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, हि बाब स्पष्ट होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२) - तक्रारदार हिचे पती दिनांक १०-०३-२०१६ रोजी तक्रारदार मोटार सायकल नंबरएमएच-१६-एम-६६ यावरून अमोल सुभाष बाराते यांच्या पाठीमागे बसुन सावकाश जात असतांना ऑल्टो कारने मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यात अपघात होऊन तक्रारदार यांचे पती गंभीर जखमी होऊन मयत झाले. सदर अपघाताचे संदर्भात कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०१६ अन्वये ऑल्टो वरील चालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांचे पतीचे अपघाती मृत्यू झाल्यानंतर उपजिल्हा रूग्णालय कर्जत, जि. अहमदनगर येथे शव विच्छेदन करण्यात आले. त्यांनतर संपुर्ण कागदपत्रांसहीत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा दाखल केला. मात्र सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा प्रलंबीत ठेवला.
याबाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, तक्रारदार हिने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या काही कागदपत्रांमध्ये मृतकाचे वडिलांचे नाव ‘शंकर’ आणि काही कागदपत्रांमध्ये ‘पंढरीनाथ’ असे नमुद आहे. याबाबत तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिनांक २५-०२-२०१७ रोजी पत्र पाठवुन नावाबाबत शपथपत्र सादर करण्यास कळविले होते. तरीही तक्रारदार यांनी सदर कागदपत्रांची पुर्तता केली नाही. यासाठी आयोगाने प्रकरणात दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता काही दस्तऐवजांवर मृतकाचे नाव हे श्री.अशोक शंकर ऊर्फ पंढरीनाथ कांबळे असे नमुद आहे. तर काही दस्तऐवजांवर अशोक शंकर कांबळे असे नमुद आहे. परंतु केवळ वडिलांच्या नावामध्ये तफावत आहे, या कारणासाठी विमा दावा नाकारता येणार नाही. कारण विमा तक्रारदार हिच्या मयत पतिचा उतरविला होता व अपघाती मृत्यु झाला, ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट होते. तसेच तक्रारदार हिने विमा दावा सादर करतांना दिलेल्या दस्तऐवजांमध्ये एक दस्त दाखल केला आहे की, ज्यावर तक्रारदार हिच्या मयत पतीचे नाव अशोक शंकर उर्फ पंढरीनाथ कांबळे, असे नमुद आहे व सदरहु दस्त प्रतिज्ञापत्र आहे व ते तहसिलदार यांच्यासमोर केलेले आहे. क्लेम फॉर्म वर सुध्दा सदरहु नाव नमुद आहेत. परंतु सदरच्या प्रकरणात तक्रारदार हिने मयताच्या वडिलांचे नाव शंकर उर्फ पंढरीनाथ होते, हे सिध्द करणारे कागदपत्र किंवा शपथपत्र दाखल करणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही. मात्र युक्तिवादादरम्यान सामनेवाले यांच्या वकिलांनी असे सांगितले की, तक्रारदाराने दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहेत ही बाब स्पष्ट करण्यासाठी शपथपत्र दिले तर क्लेमची रक्कम देण्यास हरकत नाही. त्यामुळे तक्रारदार हिने सामनेवाले यांच्याकडे Indeminity Bond सामनेवाले यांच्या नियमाप्रमाणे भरून द्यावा. भविष्यात काही नावावरून वाद उपस्थित झाला तर सदरची क्लेमची रक्कम तक्रारदार भरून देईल, असे नमुद असणे गरजेचे आहे. त्यामुळे सामनेवाले यांच्याकडे सदरचा Bond करून द्यावा व त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार हिला विमा दाव्याची रक्कम द्यावी, या निष्कर्षाप्रत हा आयोग येत आहे.
तसेच सामनेवाले यांनी विमा दावा तक्रारदार हिच्या मयत पतीच्या वडिलांच्या नावामध्ये तफावत येत असल्यामुळे तक्रारदाराला सामनेवाले यांनी पत्र पाठवुन दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहे, ही बाब स्पष्ट करणा-या कागदपत्रांची मागणी केली. परंतु तक्रारदार हिने सदरचा दस्त सामनेवाले यांना दिला नाही व प्रकरणात सुध्दा दाखल केला नाही. या कारणांमुळे सामनेवाले यांनी विमा दावा प्रलंबीत ठेवला. यामध्ये सामनेवालेची चुक आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. सबब तक्रारदार हिच्या पतीचा अपघाती मृत्यु झाला व त्याचा विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. त्यामुळे तक्रारदार हि विमा दाव्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र ठरते, असे आयोगाचे मत आहे.
सामनेवाले यांनी कागदपत्राची पुर्तता तक्रारदार यांनी केली नाही, त्यामुळे विमा दवा प्रलंबित ठेवला, यासाठी तक्रारदाराला मानसिक त्रास झाला, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी देता येणार नाही. मात्र विमा दाव्याची रक्कम तक्रारदार हि मिळण्यास पात्र ठरते. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना Indeminity Bond नियमाप्रमाणे करून द्यावा. सदरचा Bond सामनेवाले यांना प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसाचे आत सामनेवाले यांनी विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) तक्रारदार हिस द्यावी व ती रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर आदेशाच्या दिनांकापासुन रक्कम प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |