निकालपत्र
निकाल दिनांक – ०७/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार ही मौजे कानगोई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मृतक संजय नामदेव जारे यांची पत्नी आहे. तक्रारदार हिचे मृतक पतीचे नावे गट नं.१५०, कानगोई, ता.नेवासा जि. अहमदनगर येथे शेतजमीन आहे. तक्रारदार हिचे पतीचे नावे सामनेवाले यांचेकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता. सदरचा विमेचा कालावधी दिनांक ०१-१२-२०१५ ते ३०-११-०२०१६ असा होता. विमा पॉलिसीची रक्कम रूपये २,००,०००/- अशी होती. विमा पॉलिसीच्या कालावधी चालु असतांना दिनां ३१-०७-२०१६ रोजी संध्याकाळी ७.१५ मिनीटांनी तक्रारदार हिचे पती मोटारसायकल क्रमांक एम.एच.१७-बी.सी.०९७६ या वाहनावरून अहमदनगर ते औरंगाबाद रोडने जात असतांना मुळा कॅनल, घोडेगाव हॉटेल संजय समोर असतांना येणारी पीकअप व्हॅन क्रमांक एम.एच.१७-टी-५८६२ या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये तक्रारदाराचे मयत पती गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना दिपक हॉस्पीटल, अहमदनगर येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिनांक १०-०९-२०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदरहु अपघाताची खबर सोनई पोलीस स्टेशन येथे देण्यात येऊन त्यांनी आय.पी.सी. कलम ३०४ ए, २७९ इतर अन्वये एफ.आय.आर. क्रमांक I-104/2016 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले यांचेकडे विमा दावा नोडल ऑफीसरद्वारे सादर केला. परंतु सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा हा ९० दिवसांचे आत सादर केला नाही, या कारणाने नामंजुर केला. त्यामुळे तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक १० प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत प्रकरणात दाखल केली. सामनेवालेने त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये असे कथन केले की, तक्रारदार हिचे पतीचा अपघात झाला परंतु तिने विमा दावा मुदतीत सादर केला नाही. सदरचा विमा दावा हा ९० दिवसाचे आत सामनेवाले यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा दिनांक ०४-०७-२०१७ रोजी तक्रारदाराला पत्र देऊन नामंजुर केल्याचे कळविले. ज्या दिवशी तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाले यांना प्राप्त झाला त्याच दिवशी त्यांचा विमा दावा नाकारला आहे. यामध्ये सामनेवाले यांची कोणतीही सेवेत त्रुटी नाही. सामनेवालेंनी योग्य कारणास्तव विमा दावा नामंजुर केला आहे त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
३. तक्रारदार हिने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.नितीन काळे यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.व्ही.के. दहातोंडे यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हि मौजे कानगोई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार हिचे पतीचा रोड अपघातात जखमी होऊन मृत्यु झाला आहे व तक्रारदार हिचे मृतक पतीचे नावे गट नं.१५०, कानगोई, ता.नेवासा जि. अहमदनगर येथे शेतजमीन आहे. ही बाब सिध्द करणेसाठी तक्रारदार हिने सातबारा उतारा दाखल केला आहे. यावरून मृतक शेतकरी होते, ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारदार हिचे पतीचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. यावरून स्पष्ट होते की, तक्रारदार ही मृतकाची वारस म्हणून तिने सदर तक्रार दाखल केली आहे व त्या अनुशंगाने तक्रारदार ही सामनेवाले यांची ग्राहक आहे, ही बाब सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिचे मृत पतीचे नावे सामनेवाले यांचेकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता. सदरचा विमेचा कालावधी दिनांक ०१-१२-२०१५ ते ३०-११-०२०१६ असा होता. विमा पॉलिसीच्या कालावधी चालु असतांना दिनां ३१-०७-२०१६ रोजी संध्याकाळी ७.१५ मिनीटांनी तक्रार हिचे पती मोटारसायकल क्रमांक एम.एच.१७-बी.सी.०९७६ या वाहनावरून अहमदनगर ते औरंगाबाद रोडने जात असतांना मुळा कॅनल, घोडेगाव हॉटेल संजय समोर असतांना येणारी पीकअप व्हॅन क्रमांक एम.एच.१७-टी-५८६२ या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये तक्रारदाराचे मयत पती गंभीर जखमी झाले. त्यांना दिपक हॉस्पीटल, अहमदनगर येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिनांक १०-०९-२०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने प्रकरणात पोलीस पेपर्स दाखल केले आहे. तसेच घटनासस्थळ पंचनामा व शवविच्छेदन अहवालाची प्रत दाखल आहे. यावरून स्पष्ट होते की, तक्रारदार हिचे मयत पतीचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. ही बाब सामनेवाले यांनीसुध्दा नाकारलेली नाही. तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रासह विमा दावा सामनेवाले यांचेकडे सादर केला. परंतु सामनेवाले यांनी दिनांक ०४-०७-२०१७ रोजी सदर विमा दावा नामंजुर केला. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये नमुद केले की, तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रासह विमा दावा हा ९० दिवसानंतर सादर केलेला आहे. सदरचा विमा दावा हा दिनांक २८-०२-२०१७ रोजी सादर केला. तक्रारदार यांनी ९० दिवसाचे आत विमा दावा सादर करणे गरजेचे होते. परंतु ९० दिवस संपल्यानंतर तक्रारदाराचा विमा दावा हा सादर केला आहे. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सदरचा विमा दावा सामनेवाले यांनी नाकारला आहे, असे कथन केले. तक्रारदार यांनी सामनेवालेचे या बचावासाठी त्यांच्या लेखी युक्तिवादामध्ये सदरचा विमा दावा तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू झाल्यानंतर ति शॉकमध्ये होती व तिच्यावर मानसिक तणाव आला व त्यावर ति उपचार घेत होती. तसेच त्यानंतर कागदपत्रे मिळविण्यास तिला उशीर झाला. तिला काही कागदपत्रे दिनांक ०२-०३-२०१७ ला प्राप्त झाली व तक्रारदार एकटी असल्यामुळे तिला या बाबी समजत नव्हत्या. सदरचा विमा दावा सादर करण्यास या कारणांमुळे उशीर झाला. परंतु केवळ उशीर झाला, या कारणावरून विमा दावा नाकारणे संयुक्तीक नाही. सामनेवाले यांच्या पॉलिसीच्या अटी शर्ती तक्रारदाराला माहित नव्हत्या. तक्रारदार हिचा पती शेतकरी होता. त्याचा विमा उतरविला होता व त्याचा अपघात झाला ह्या संपुर्ण बाबी कागदपत्रांवरून स्पष्ट होतात. त्यामुळे यामध्ये तक्रारदाराला दोषी धरता येणार नाही. सदरचा विमा दावा केवळ ९० दिवसानंतर सादर केला, या कारणावरून सामनेवाले यांनी नाकारणे संयुक्तीक नाही तसेच तक्रारदार हिने मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठ यांचा पुढील न्यायनिवाडाचा आधार घेतला आहे.
FA No.544/2011 Sumanbai W/o. Haidas Suryananshi
Vs. Manager Reliance General Insurance Co. Ltd.
यामध्ये निर्णीत केले आहे की, तक्रारदाराने नोडल ऑफीसरकडे विमा दावा २ वर्षाचे आत सादर करणे आवश्यक आहे व सदरचा विमा दावा तक्रारदार हिने दोन वर्षाचे आत सादर केला आहे, ही बाब कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सदरचे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव की, ९० दिवसात दाखल केला नाही, हा ग्राह्य धरता येणार नाही. सबब सामनेवाले यांनी विनाकारण तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर केला. अशा प्रकारे विमा दावा नामंजुर करून सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली आहे. तसेच तक्रारदार यांना तिच्या पतीचा मृत्यु व ते शेतकरी होते याबाबतचे कागदपत्र दाखल केले आहे. तक्रारदार हिचे मृतक पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविला होता, ही बाब संपुर्ण कागदपत्रासह सिध्द केली आहे. त्यामुळे तक्रारदार ही सदरचा मिवा दावा मिळणेस पात्र ठरत आहे. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी विमा दावा नाकारला म्हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
६ मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक ०४-०७-२०१७ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४ वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |