(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता हे शेतकरी असून त्यांची शेतजमीन गट नं.629 आणि 384 करजगांव ता.नेवासा जि.अहमदनगर येथे आहे. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केले आहे की, महाराष्ट्र शासनाने शेतक-यासाठी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलीसी शेतक-यांच्या नावे काढली आहे. सदर पॉलीसीचे अंतर्गत शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्याची नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनी देईल. सदर पॉलीसीचा कालावधी हा दिनांक 01.12.2015 ते 30.11.2016 पर्यंत आहे. सदर पॉलीसीचा शेतक-यांना लाभ मिळण्याकरीता शासनाने शेतक-याकरीता काढलेली आहे. सदर पॉलीसाचे एकुण नुकसान 2,00,000/- रुपये पॉलीसीमध्ये दर्शविण्यात आलेले आहे. आणि अपघात झाल्यावर म्हणजे दोन पाय, दोन डोळे किंवा 1 पाय, 1 डोळा गेल्यावर 2,00,000/- आणि 1 डोळा व 1 पाय, 1 हात गेल्यावर 1,00,000/- अशी नुकसान भरपाई मिळणार आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक 26.04.2016 रोजी सध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मोटार सायकलवर पाठीमागे बसून बेलापूर ते कोल्हारकडे जात असतांना त्यांना मागे धडक बसली असल्याने त्यांचा अपघात झाला व त्यात त्यांचे उजव्या डोळयाला दिसून राहिले नाही. व शरीरावर ब-याच जखमा झालेल्या आहे. मोटार सायकल चालविणाराची यात चुक होती म्हणून त्याचे विरुध्द भारतीय दंड संहिता 279 च्या अंतर्गत एफ.आय.आर नं.आय-107/2016 असा गुन्हा रजि.नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारकर्ताला सदर विम्याचे संदर्भात माहिती मिळाली असल्याने त्यांनी योग्य दस्तावेज जमा करुन त्यांचे विमा दावा शेतकी अधिकारी नोडल ऑफिसर यांना सादर केला. सामनेवालातर्फे कोणतेही योग्य कारण नसतांना व 40 टक्के अपंगत्व आहे असे दर्शवून तक्रारकर्ताचा विमा दावा नाकारला आहे. म्हणून तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवालाकडून तक्रारकर्ताला अपघाती विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्याचा आदेश सामनेवाला यांना व्हावा. तक्रारकर्ताला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आली. सदरहू नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. व निशाणी क्र.13 वर लेखी उत्तर दाखल केले. सामनेवाला यांनी लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला यांचेविरुध्द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला यांना नाकबूल आहेत. सामनेवालाने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने शासनाकडून पुरविण्यात आलेल्या विमा पॉलीसी यात 3 पक्षकाराचे करार आहेत. सदर पॉलीसीमध्ये सामनवालाचे शर्त व अटी तक्रारकर्तास लागू पडतात. दिनांक 08.02.2017 रोजी तक्रारकर्ताला विमा दावा पडताळणी करताना असे दिसून आले की, तक्रारकर्ताने सिव्हील सर्जन कडून 100 टक्के अंपगत्वाचे सर्टीफिकेट लावलेले नव्हते. म्हणून पॉलीसीच्या शर्त व अटी नुसार तक्रारकर्ताचा विमा दावा नाकारला आहे व सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति कोणतीही न्युनत्तम सेवा दर्शविलेली नाही. म्हणून सदर दावा विनाकारण कोर्ट फी वाचविण्याकरीता तक्रारकर्ताने सदर तक्रार खोटया स्वरुपाची दाखल केलेली आहे. सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति कोणतीही न्युनत्तम सेवा दर्शविलेली नाही व खोटया स्वरुपाची तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्तावेज, शपथपत्र पुरावा, सामनेवालानी दाखल केलेली कैफियत/जबाब, दस्तावेज, उभय पक्षकारांनी दाखल केलेला युक्तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारकर्ता हा सामनेवालाचा “ग्राहक” आहे काय.? | ... होय. |
2. | सामनेवाला यांनी तक्रारकर्ताप्रति न्युनत्तम सेवा दर्शविलेली आहे काय. ? | ... होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
6. मुद्दा क्र.1 – तक्रारकर्ता हे शेतकरी असून महाराष्ट्र शासनाने शेतक-यासाठी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा या योजनेअंतर्गत सामनेवालाकडून शेतक-यांकरीता दिनांक 01.12.2015 ते 30.11.2016 या कालावधीकरीता विमा पॉलीसी काढली होती ही बाब उभय पक्षकार यांना मान्य असून तक्रारकर्ता हा शेतकरी असून आणि तो विमा पॉलीसीचा लाभार्थी असून तक्रारकर्ता हा सामेनवालाचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.2 –सामनेवालाने निशाणी 16 आणि निशाणी 17 वर पॉलीसीचे अटी व शर्त दाखल केले असून तसेच पॉलीसीची प्रत दाखल केलेली आहे. सदर पॉलीसीचे शर्त व अटी तसेच पॉलीसीमध्ये नमुद विशेष अटीची पडताळणी करताना असे दिसून आले की, 1 पाय किंवा 1 डोळा गेल्यावर पॉलीसीधारकास / शेतक-यांस 50 टक्के पॉलीसीचा लाभ मिळतो. सदर पॉलीसीत एकुण लाभ 2,00,000/- रुपयाची आहे. जर 1 डोळा गेल्यावर त्याला 1,00,000/- रुपये अपघाताची नुकसान भरपाई मिळू शकते असे नमुद आहे. सदर तक्रारीत तक्रारकर्ताला निशाणी 6 वर दाखल केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे रुबी हॉल क्लिनीक यांनी दिलेले आहे त्या प्रमाणपत्रात असे दिसून येते की, तक्रारकर्ताचा उजव्या डोळा अपघातामध्ये गेला आहे. सामनेवालाने दाखल केलेल्या पॉलीसीच्या शर्त व अटीनुसार कोणताही 1 डोळा गेल्यावर पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- सामनेवालाने शेतक-याला देणे अनिवार्य आहे. परंतू सामनेवालाने तक्रारकर्ताला 100 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मागवून त्या कारणाने नाकारले आहे. तक्रारकर्ताने सामनेवालाकडे अपंगत्वाचे संदर्भात प्रमाणपत्र देऊनसुध्दा सामनेवालाने 100 टक्के असलेले प्रमाणपत्राची मागणी करुन त्यांचा विमा दावा नाकारला ही बाब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति न्युनत्तम सेवा दर्शविते व सिध्द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
8. मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ताने दाखल केलेल्या विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (रक्कम रु.एक लाख फक्त) द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह दिनांक 08.02.2017 पासून रक्कम अदाईकीपर्यंत तक्रारकर्ताला द्यावे.
3. सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त ) तक्रारकर्ताला द्यावे.
4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.