निकालपत्र
निकाल दिनांक – ०८/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदार हिने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदार ही मयत महादेव किसन कोल्हे यांची पत्नी असुन मृत्युपूर्वी महादेव किसन कोल्हे हे शेतकरी होते व त्यांच्या नावे मौजे मिरजगांव ता.कर्जत जि. अहमदनगर येथे शेतजमीन मिळकत गट नंबर २७१/२ व गट नंबर २७८/२ मध्ये शेतजमीन होती. तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविला होता. दिनांक ०७-१२-२०१५ रोजी विम्याचे कालावधीमध्ये तक्रारदार हिचे पतीला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचे पतीस उपचारासाठी डॉ. नायडु हॉस्पीटल पुणे महानगरपालिका यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार केले मात्र उपचार चालु असतांना कुत्र्याने चावे घेतल्याने तक्रारदार यांचे पतीस रेबीज झाल्याने त्यातच तक्रारदार यांचे पतीचा दिनांक १०-०१-२०१६ रोजी मृत्यु झाला. तक्रारदार हिचे पतीचा कुत्र्याने चावा घेऊन त्यात गंभीर जखमी होऊन उपचार चालु असतांना त्यात मयत झाले. तक्रारदार हिने कायदेशीर वारस म्हणुन बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग यांचे मार्फत सामनेवाले विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी, म्हणुन संपुर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सामनेवाले यांचेकडे तक्रारदार यांचा विमा दावा दिनांक ३०-०३-२०१६ रोजी सादर केला. दरम्यान सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक २७-१०-२०१६ रोजी पत्र देऊन सदरचा अपघात हा विमा पॉलिसीचे पुर्वीचा आहे, असे कारण देऊन नामंजुर केला आहे. अशा प्रकारे चुकीचे कारणाने तक्रारदार हिचा विमा दावा नाकारला म्हणुन तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करून परिच्छेद क्र.८ प्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारदार हिने तक्रारीसोबत निशाणी क्र.६ दस्तऐवज सोबत कागदपत्रांच्या एकुण १९ छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठवलेले पत्र, क्लेम फॉर्म, प्रतिज्ञापत्र, गाव नमुना ८-अ चा उतारा, तक्रारदाराचे पतीचे नावे असलेला सातबारा उतारा, गाव नमुना ६ चे पत्र, गाव नमुना ६ क चे पत्र, तक्रारदाराने करून दिलेले प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे पतीचे आधारकार्ड, तक्रारदाराचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, जन्म मृत्यु नोंदणी कार्यालय यांचेकडे दिलेले पत्र, सामनेवाले कंपनीने तक्रारदारास क्लेम नाकारलेबाबतचे पत्र, तक्रारदाराचे खाते पुस्तकाची प्रत दाखल आहे.
३. तक्रारदाराची तक्रार दाखल करण्यात येऊन सामनेवाले यांना मंचामार्फत नोटीस काढण्यात आली. सामनेवालेने त्यांची कैफीयत नि.१२ ला दाखल केली आहे. त्यात सामनेवालेने तक्रारदार यांचे पती मयत महादेव किसन कोल्हे हे शेतकरी होते हे नाकारलेले आहे. विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक ०१-१२-२०१५ ते ३०-११-२०१६ होता. सदर विमा दाव्याबाबत सामनेवाले बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग लि. यांना तृतीय पक्ष प्रशासक (T.P.A.) म्हणुन विमा दावा पडताळणीसाठी विमा सल्लागार म्हणुन नियुक्त केले आहे. दिनांक १०-०१-२०१६ रोजी तक्रारदार यांचे पती डॉ. नायडु हॉस्पीटल पुणे येथे उपचार घेत असतांना मयत झालेले नाही. तसेच तक्रारदाराचे मयत पतीचा मृत्यु कुत्र्याने चावल्याने झाला, हा अपघाती मृत्यु नव्हता. तृतीय पक्ष प्रशासक (T.P.A.) यांनी सामनेवालेकडे पाठविलेल्या रिपोर्टनुसार सामनेवाले यांनी विमा दाव्याची पडताळणी केली. त्यानुसार तक्रारदाराचे पती हे कुत्रा चावल्याने मयत झाले, हा अपघाती मृत्यु नसल्यामुळे तसेच सदर अपघात हा विमा पॉलिसी घेण्याचे पुर्वीचा आहे. विमा दाव्याच्या अटी व शर्तीनुसार सदरील विमा दावा नाकारल्याचे सामनेवालेने म्हटले आहे. तसेच कुठल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा योग्य कारणाने नाकारला आहे. सामनेवाले यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही, त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी मंचात केली आहे.
४. तक्रारदार हिने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.एस.बी. मुळे यांनी केलेला युक्तिवाद. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवालेतर्फे वकील श्री.डी.आय. गली यांनी केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती महादेव किसन कोल्हे यांनी सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २ लाख रूपयांचा विमा उतरविला होता. सदर विम्याचा कालावधी ०१-१२-२०१५ ते ३०-११-२०१६ असा होता. विमा उतरविलेची बाब सामनेवालेने त्यांच्या लेखी कैफीयतीत मान्य केले आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिचे पतीचा विमा कालावधीत दिनांक ०७-१२-२०१५ रोजी कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले. त्यांनतर त्यांना उपचारासाठी डॉ. नायडु हॉस्पीटल पुणे येथे दाखल केले असता तक्रारदार हिचे पतीचा उपचारादरम्यान दिनांक १०-०१-२०१६ रोजी मृत्यु झाला आहे. तक्रारदार हिने निशाणी क्र.६ ला तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दाखला जोडलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे कथनला त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये असे उत्तर दिले आहे की, तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू अपघाती नाही. तक्रारदार हिचे पतीचा मृत्यू हा कुत्रा चावला असल्याने झालेला आहे. त्यामुळे तो अपघाती आहे, हे मान्य नाही. तसेच सदर अपघात हा विमा पॉलिसीचे पुर्वीचा आहे. त्यामुळे सामनेवाले विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार योग्य कारणाने विमा दावा नाकारला आहे. या संदर्भात उभयपक्षांचा युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार हिचे पतीचा मृत्यु कुत्रा चावल्याने झालेला असल्याने तो अपघात आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हिचे मयत पतीचा विमा सामनेवाले यांच्याकडे उतरविला होता. त्यामुळे सामनेवाले यांनी सदरची रक्कम देणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी चुकीच्या कारणाने विमा दावा नाकारला आहे, ही बाब सिध्द झाली आहे. अशाप्रकारे चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारणे ही सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याप्रती सेवेत दिलेली त्रुटी आहे. तक्रारदार यांनी विमा दाव्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांच्याकडे आवश्यक क्लेम फॉर्म, सातबारा उतारा, मृत्यु प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे पतीचा मृत्यु अपघाती होता व सदर विमा पॉलिसी ही शेतकरी अपघात विमा पॉलिसी म्हणुन उतरविली होती.
७. सामनेवालेने तक्रारदार हिचे पतीचा कुत्रा चावल्याने मुत्यु झाला हा अपघात नाही, तसेच सामनेवालेने दिनांक २७-१०-२०१६ रोजी विमा दावा नाकारला आहे. त्यात तक्रारदार हिचे पती महादेव किसन कोल्हे यांचे दिनांक १०-०१-२०१६ रोजी निधन झाले. परंतु सदर अपघात हा विमा पॉलिसीच्या पुर्वीचा आहे या कारणाने क्लेम मंजुर करता येत नाही, म्हणुन विमा दावा नाकारल्याचे पत्रात नमुद आहे. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा देता येणार नाही, असे कथन केले. तक्रारदार हिचे पतीचा मृत्यु हा अपघाती आहे, असे मंचाचे मत आहे. सदरचे तक्रारीतील तक्रारदाराचे कथन, कागदपत्र व त्यांनी केलेला युक्तिवाद यावरून सदर तक्रार तक्रारदार हिने सिध्द केली आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येत नाही. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर हाकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
८. तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारला म्हणुन सदरील मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे व मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
६ मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक २७-१०-२०१६ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४ वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |