निकाल
दिनांक- 20.02.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार जालिंदर रामभाऊ वारे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांनी त्यांचे कूटूंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी अँपे रिक्षा क्र.एम.एच. 23/सी-7717 विकत घेतला. सदरील रिक्षा विकत घेते वेळेस सामनेवाले यांचेकडे विमा उतरविलेला आहे.विम्याचा कालावधी दि.30.04.2008 ते 29.04.2009 असा आहे. दि.25.04.2009 रोजी बीड तेलगांव रोडने अँपे रिक्षा जात होती. सदरील रिक्षा पांगर बावडी जवळ आली असता समोरुन टेम्पो नंबर.एम सी बी 8836 भरधाव वेगाने आला. सदरील टेम्पोने अँपे रिक्षास जोरदार धडक दिली. सदरील अपघातामध्ये रिक्षाचे फार मोठे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील रिक्षा दूरुस्त करण्यासाठी रु.60,000/- ते रु.70,000/- खर्च केला.अपघातात बाबत बीड ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये खबर देण्यात आली. पोलिसांनी टेम्पो ड्रायव्हर यांचे विरुध्द गून्हा नंबर 39/09 अन्वये गुन्हा दाखल केला. अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी अपघाताची सुचना सामनेवाले यांना दिली. सामनेवाले यांनी सर्व्हेअर पाठवून अपघातग्रस्त वाहनाचे फोटो काढले व सदरील वाहन दूरुस्त करण्यास तक्रारदार यांना परवानगी दिली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे सांगणेवरुन वाहन दूरुस्त केले.तक्रारदार यांना दूरुस्तीसाठी रु.64,000/- खर्च केला. तक्रारदार यांनी सदरील नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाले यांचेकडे प्रस्ताव पाठविला. सामनेवाले यांनी प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.9.2.2012 रोजी क्लेम मिळणे संबंधी नोटीस दिली. सामनेवाले यांनी दि.15.2.2012 रोजी तक्रारदार यांना कळविले की, त्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्या बाबत लवकरच कारवाई केली जाईल. सामनेवाले यांनी तदनंतर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून तक्रारदार यांना पून्हा जून 2012 मध्ये नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी दि.30.7.2012 रोजी तक्रारदार यांना कळविले की, त्यांनी औरंगाबाद येथे जाऊन चौकशी करावी. तक्रारदार यांनी वारंवार चौकशी करुनही सामनेवाले यांनी क्लेम देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. दि.5.3.2013 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे संपर्क साधला असता तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे असे कळविले. सामनेवाले यांनी नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांना रिक्षा दूरुस्तीसाठी झालेला खर्च रु.64,000/- तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.26,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- असे एकूण रक्कम रु.1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले विमा कंपनी हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी नि.6 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले सर्व आरोप स्पष्टपणे नाकारलेले आहेत. सामनेवाले यानी तक्रारदार यांचे वाहन हे सामनेवाले विमा कंपनीकडे विमा उतरविलेला आहे ही बाब मान्य केली आहे. तसेच सदरील वाहनाचा अपघात झाला ही बाब मान्य केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहनाचे अपघातात काय नुकसान झाले याबददल माहीती नाही. सामनेवाले यांनी अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअर पाठविले होते व त्यांनी सर्व्हे करुन फोटो काढलेले आहे ही बाब स्पष्टपणे नाकारलेली आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी कोणत्या तारखेला विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला ही बाब नमूद केलेली नाही. तसेच तक्रारदार यांचे वाहनास अपघातामध्ये काय नुकसान झाले या बाबतही सविस्तर कळविले नाही. तसेच सामनेवाले यांचेकडे क्लेम अगर कोणतेही दस्ताऐवज तक्रारदार यांनी दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी अपघाताची खबर सामनेवाले यांना दिलेली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम दाखल केलेला नसल्यामुळे तो क्लेम नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सबब सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदार यांनी नि.7 सोबत सामनेवाले यांना दि.9.2.2012 रोजी दिलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. तसेच सामनेवाले यांचे दोन पत्र, घटनास्थळ पंचनामा, गून्हयाची प्रथम खबर, पॉलिसीची झेरॉक्स कॉपी व अपघातग्रस्त वाहनाच्या दूरुस्ती खर्चाची पावत्या हजर केल्या आहेत. तक्रारदार यांची स्वतःचे शपथपत्र नि.8 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि.7 अन्वये दाखल केले आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री.कूंभार यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री.वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची नुकसान भरपाई
नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे ही बाब तक्रारदार
शाबीत करतात काय ? नाही.
2. तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळण्यास तक्रारदार
पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.कूंभार यांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रावर वेधले व यूक्तीवाद केला की, अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी अपघाता बाबत सामनेवाले यांना माहीती दिली होती. सामनेवाले यांनी सर्व्हेअर नियूक्ती करुन अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली व तक्रारदार यांना सदरील वाहन दूरुस्त करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्त केले, दूरुस्तीसाठी तक्रारदार यांनी रु.64,000/- खर्च आला. सदरील वाहन हे सामनेवाले यांचेकडे विमा उतरविला असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची आहे. सामनेवाले यांनी नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाले यांचे वकील श्री. वाघमारे यांनी असा युक्तीवाद केला की, सदरील वाहनाचा सामनेवाले यांचेकडे विमा उतरविलेला आहे ही बाब मान्य आहे. सदरील वाहनाचा अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांची खबर सामनेवाले यांना देणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदार यांचे अपघाताची खबर कधीही दिली नाही अगर नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम दाखल केलेला नाही. तक्रारदार यांना त्यांनी ज्या दोन नोटीसा दिलेल्या आहेत. त्यामध्ये अपघाता बाबत सविस्तर विवेचन केलेले नाही.तसेच सामनेवाले यांचेकडे कधी तक्रार दिली या बाबतही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तक्रारदार यांनी सदरील अपघाता बाबत सामनेवाले यांना कधीही कळविले नाही अगर क्लेम दाखल केला नाही.त्यामुळे सामनेवाले यांनी क्लेम नाकारुन अगर न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तसेच तक्रारदार यांनी या मंचापूढे त्यांनी सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल केला होता या बाबत कोणताही दस्त हजर केला नाही. तसेच सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली व फोटो काढला या बाबत कोणताही दस्त हजर केलेला नाही. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवली नाही.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेला पुरावा व दस्त यांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार यांचे वकिलांनी वर नमूद केलेला यूक्तीवाद व सामनेवाले यांचा यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार हे अँपे रिक्षा नंबर एम.एच.-23/सी-7717 चे मालक आहेत. सदरील रिक्षाचा विमा सामनेवाले यांचेकडे दि.30.4.2008 ते 29.4.2009 या कालावधीसाठी उतरविलेला आहे.पोलिस पेपरचे अवलोकन केले असता दि.25.4.2009 रोजी बीड तेलगांव रोडने अँपे रिक्षा जात होती. सदरील रिक्षा पांगर बावडी जवळ आली असता समोरुन टेम्पो नंबर.एम सी बी 8836 भरधाव वेगाने आला. सदरील टेम्पोने अँपे रिक्षास जोरदार धडक दिली. सदरील अपघातामध्ये रिक्षाचे नुकसान झाले. पोलिस पंचनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे रिक्षाचे नुकसान रु.5,000/- चे झाले असे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दूरुस्ती पावत्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्त करुन एकूण रु.64,000/- खर्च केल्याचे दिसत आहे. तसेच तक्रारदार यांनी दि.9.2.2012 रोजी नोटीस पाठविली असे कथन केले आहे, त्यांची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे.सदरील नोटीसचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदार यांचे नोटीसमध्ये सामनेवाले याचेकडे अपघाताची खबर कोणत्या दिनांकाला देण्यात आली व क्लेम कोणत्या दिनांकाला दाखल केला या बाबत स्पष्ट लिहीलेले नाही. तसेच जून 2012 मध्ये पाठविलेल्या नोटीसची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे.सदरील झेरॉक्स प्रतीचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदार यांची सही नाही अगर तक्रारदार यांचे वकीलाची सही नाही. सदरील नोटीस सामनेवाले यांना प्राप्त झाल्याबाबत पोहच पावती दाखल केलेली नाही. तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष त्यांनी दाखल केलेले दोन दस्तावर वेधले व असे कथन केले की, तक्रारदार यांनी पाठविलेल्या नोटीसा सामनेवाले यांना मिळालेल्या आहेत. सदरील दि.15.2.2012 रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी दिलेली नोटीस ही औरंगाबाद शाखेला प्राप्त झाली ती नोटीस त्यांनी पूढील कार्यवाहीसाठी विभागीय व्यवस्थापक नागपूर यांचेकडे पूढील पूर्ततेसाठी पाठविली आहे. तसेच दि.30.7.2012 रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी पाठविलेली नोटीस पूढील कार्यवाहीसाठी नागपूर कार्यालयाकडे पाठविण्या बाबत पत्र. दोन्ही पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी पाठविलेली नोटीस पूढील कार्यवाहीसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठविल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदरील तक्रारीमध्ये त्यांनी कोणत्या दिनांकाला क्लेम दाखल केला व कागदपत्राची पुर्तता केल्या बाबत कूठलाही उल्लेख नाही. केवळ तक्रारदार यांचे वाहनाचा अपघात झाला व अपघातामध्ये वाहनाचे नुकसान व दूरुस्तीसाठी तक्रारदार यांना खर्च करावा लागला या कारणास्तव सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.. तक्रारदार यांनी वाहनाचा अपघात झाल्या बाबत त्यांची खबर सामनेवाले यांना देणे गरजेचे आहे. तसेच सामनेवाले यांचे परवानगी घेऊन सदरील वाहन दूरुस्त करणे व त्यासाठी झालेल्या खर्चाच्या पावत्या व क्लेम सामनेवाले यांचेकडे सादर करणे गरजेचे होते. तक्रारदार यांचे म्हणणे की, त्यांनी सामनेवाले यांचेकडे क्लेम सादर केला आहे परंतु त्या बाबत कोणताही दस्त हजर केलेला नाही अगर तो क्लेम कोणत्या दिनांकाला दाखल केला त्यासंबंधी कोणतेही कागदपत्र जोडले या बाबतही पुरावा सादर केला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल केला असल्यास तक्रारदार हे मंचापूढे अर्ज देऊन सामनेवाले यांचेकडून सदरील दस्त मागवू शकले असते परंतु तक्रारदार यांनी तसा कोणताही अर्ज दिलेला नाही.
संपूर्ण दस्ताचे अवलोकन केले असता व पुराव्याचे अवलोकन केले असता या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी त्यांचे वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांची खबर सामनेवाले यांना दिलेली नाही अगर योग्य त्या मुदतीत सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करणे अगर नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर तक्रारदार निष्काळजी असेल व त्यांनी क्लेम दाखल केला नाही तर सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले याचेकडे कोणताही क्लेम दाखल न केल्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक