(घोषित दि. 25.07.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदारांनी सदोष बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने दिनांक 06.06.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 शिवशंकर कृषी सेवा केंद्र यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 नामधारी सिड्स प्रा.लि. यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे खरेदी केले होते. त्याने सदर बियाणाची लागवड दिनांक 07.06.2010 रोजी केली. लागवड करण्यापुर्वी त्याने जमिनीची योग्य मशागत केली होती आणि लागवडीच्यावेळी आवश्यक खत दिले होते. लागवडी नंतर त्याच्या शेतातील टरबुजाच्या बियाणाची उगवण झाल्यानंतर त्याने योग्य मशागत केल्यानंतर पिकाची वाढ झाली. परंतू त्याच्या शेतातील टरबुजाच्या वेलीस फळ धारणेच्यावेळी योग्य फळ धारणा झाली नाही व जवळपास 95 % फळ धारणा दिसुन आली नाही. म्हणून त्याने दिनांक 13.08.2010 रोजी जिल्हास्तरीय समिती जिल्हा परिषद जालना यांच्याकडे बियाण्याबाबत तक्रार केली. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हास्तरीय चौकशी समितीने दिनांक 18.08.2010 रोजी त्याच्या शेतातील टरबुजाच्या बियाण्याची पाहणी करुन पंचनामा केला आणि समितीने त्याच्या शेतातील टरबुजाच्या वेलीस 95 % फळ धारणा झाली नसल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद केले. यावरुन गैरअर्जदार यांनी विक्री केलेले टरबुजाचे बियाणे निकृष्ट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. म्हणून त्याने गैरअर्जदाराकडे रुपये 5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. परंतू गैरअर्जदारांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदारांकडून टरबुजाच्या नुकसानी बद्दल रुपये 5,00,000/- व्याजासह द्यावेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी लेखी निवेदन दाखल केले. गैरअर्जदारांनी हे मान्य केले आहे की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे खरेदी केले होते. गैरअर्जदारांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्यांना बियाणाची लागवड केल्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही आणि त्याने लागवडीनंतर कोणतीही तक्रार केली नाही. तक्रारदाराने जिल्हास्तरीय समितीकडे दिलेल्या तक्रारीवरुन करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये बियाण्यात दोष असल्याबाबत काहीही नमूद केलेले नसून गैरअर्जदार क्रमांक 2 यांना पंचनाम्याच्यावेळी बोलाविण्यात आले नाही. तक्रारदाराने बियाणाची लागवड व्यवस्थित केलेली दिसत नाही आणि लागवडीनंतर ज्याप्रमाणे काळजी घ्यावयास पाहिजे त्याप्रमाणे काळजी घेतलेली नाही. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेले बियाणे उत्कृष्ट असुन त्यामध्ये कोणताही दोष नाही आणि तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केलेली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार क्रमांक 1 नामधारी सिड्स यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे सदोष असल्याचे तक्रारदार सिध्द् करु शकतो काय ? नाही 2.तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही 3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 – युक्तीवादाच्या वेळी दोन्ही पक्षकार गैरहजर. गैरअर्जदार क्रमांक 1 नामधारी सिड्स यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे तक्रारदाराने खरेदी केले होते. याबाबत वाद नाही. तक्रारदाराने खरेदी केलेले टरबुजाचे बियाणे सदोष होते असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द् करण्यासाठी तक्रारदाराने जिल्हास्तरीय समितीने केलेला पंचनामा कृषी अधिकारी अंबड यांनी केलेला पंचनामा, आणि जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल अनुक्रमे नि.4/3 नि.4/5 व नि.4/7 दाखल केला आहे. जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल आणि दोन पंचनामे पाहता जिल्हास्तरीय समितीने कोठेही गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे सदोष असल्याचे म्हटलेले नाही. तक्रारदाराच्या शेतात पेरलेल्या टरबुजाच्या बियाण्याची उगवण चांगली झालेली होती. परंतू टरबुजाच्या वेलींना फळ धारणा झालेली नव्हती असे निरीक्षण जिल्हास्तरीय समितीने नोंदविलेले आहे. टरबुजांच्या वेलींना फळ धारणा कशामुळे झाली नाही, या विषयीची कारणमिमांसा जिल्हास्तरीय समितीने त्यांचा अहवाल किंवा पंचनाम्यामध्ये केलेली नाही. जिल्हास्तरीय चौकशी समितीने पंचनामा किंवा अहवालामध्ये तक्रारदाराच्या शेतात पेरलेले टरबुजाचे बियाणे सदोष असल्यामुळे टरबुजाच्या वेलींना फळ धारणा झाली नाही, असे नमूद केलेले नाही. त्यामुळे केवळ फळ धारणा झाली नाही या कारणांवरुन बियाणे सदोष असल्याचा निष्कर्ष निघू शकत नाही. तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यावरुन गैरअर्जदार क्रमांक 1 नामधारी सिड्स प्रा.लि. यांनी उत्पादीत केलेले टरबुजाचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |