निकाल
दिनांक- 02.08.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार सौ.विजया धर्माधिकारी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हया परळी येथे टी.पी.एस. मध्ये नौकरी करीत आहेत. तक्रारदार हया थर्मल पॉवरच्या शक्तीकुंज वसाहतीमध्ये त्यांचे पती व मुलाबाळासह राहत आहेत. दि.9..3.2008 रोजी सकाळी 8 वाजहता तक्रारदार यांचे घरातील इंडेन कंपनीच्या सिलेंडरच्या गॅसची गळती झाली व आग लागली. त्या अपघातामध्ये तक्रारदार स्वतः त्यांचे पती पदमाकर,तक्रारदाराची बहीन मंगला,पुजा, चि.रोहित, चि ओम हे कूटूंबातील सर्वजण गंभिररित्या भाजले तसेच घरातील सर्व संसारउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, सिलेंडरचा वॉल खराब असल्यामुळे सदरची गळती झाली व अपघात झाला. सामनेवाले क्र.2 हे गॅस सिेलेंडरचे वितरक आहेत. सामनेवाले क्र.1 हे गॅस सिलेंडरचे उत्पादक आहेत. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे निष्काळजीपणामुळे सिलेंडरची खराब टाकी तक्रारदार यांचे घरात देण्यात आली. त्यामुळे सदरील अपघात झाला.
तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार व त्यांचे कूटूंबिय यांना जखमी अवस्थेत परळी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अंबाजोगाई येथील दवाखान्यात शरीक करण्यात आले. तक्रारदार यांनी खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतले. तक्रारदार व त्यांचे कूटूंबियानी एमजीएम हॉस्पीटल औरंगाबाद येथे दवाखान्यातही उपचार घेतले. सदरील घटनेची फिर्याद परळी पोलिस स्टेशनला तक्रारदाराचे नातेवाईकांनी दि.9.3.2008 रोजी दिली. पोलिसांनी गून्हा रजिस्ट्रर नंबर 5/08 अपघात गुन्हा नोंदविला. तक्रारदार यांचा मुलगा राजेश यांनी तक्रारदार यांचे वतीने दि.26.3.2008 रोजी सदरचे गॅस वितरक यांना नुकसान भरपाई देणे बाबत कार्यवाही करण्यात यावी म्हणून अर्ज दिला. तक्रारदार यांचे मुलाने दि.1.1.9.2008,15.11.2008, 18,11,2008 रोजी सामनेवाले क्र.1 यांना मेल करुन नुकसान भरपाईविषयी विचारणा केली. दि.15.12.2008 रोजी सामनेवाले यांचे फिल्ड ऑफिसर यांनी घटनास्थळाला भेट दिली. दि.22.1.2009 रोजी सामनेवाले क्र.2 तर्फे नुकसान भरपाई साठी ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी लि. कडे आवेदन देण्यात आले. सामनेवाले क्र.1 यांनी दि.12.2.2009 रोजी यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. सामनेवाले क्र.3 यांचेकडे अर्ज दिला. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडील पॉलिसी नंबर 02/100/46/07/79/00000142 असा आहे. तसेच ओरिएंटल इन्शुरन्स पॉलिसीचा नंबर 630870 असा आहे.
तक्रारदार यांनी दि.4.3.2009 रोजी सामनेवाले क्र.2 यांचेकडे अर्ज दिला. दि.9.2.2009 रोजी सामनेवाले क्र.3 तर्फे अग्नीहोत्री ए.डी. यांनी सर्व्हे केला व दि.24.3.2009 रोजी वैयक्तीक अपघात विमा क्लेम फॉर्म सर्व कागदपत्रासह सामनेवाले क्र.3 यांना देण्यात आला.
तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असून त्यांना चांगल्या प्रकारे सेवा पुरविणे ही सामनेवाले यांची जबाबदारी आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे निष्काळजीपणामुळे सदरील अपघात होऊन तक्रारदार व त्यांचे कूटूंबियाची हानी झाली आहे. ग्राहकाच्या झालेल्या नुकसानीची हमी घेण्यासाठी सामनेवाले क्र.3 कडे विमा काढलेला ओ. दि.29.4.2009 रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 व 3 यांना मेल करुन नुकसान भरपाई बाबत विचारणा केली. दि.10.5.2009 रोजी सामनेवाले क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी अद्यापही कोणतही प्रकारची नुकसान भरपाई दिली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. परंतु सामनेवाले यांनी त्यांस दाद दिली नाही. तक्रारदार यांचे सदरील अपघातात फार मोठे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांना झालेल्या इजा गंभीर स्वरुपाच्या होत्या. तक्रारदार यांनी उपचारासाठी व वैद्यकीय खर्चासाठी रु.2,50,000/- इतका खर्च आला. तसेच संसार उपयोगी वस्तू अंदाजे रु.50,000/- चे जळून खाक झाले. तक्रारदार यांनी दि.6.5.2010 व 10.11.2010 रोजी सामनेवाले क्र.1 यांना नोटीस देऊन नुकसान भरपाई बाबत कळविले. सामनेवाले यांनी दखल घेतली नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसानीपोटी रक्कम रु.6,60,000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब, त्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द तक्रारदार यांचे सदर अपघातात झालेली नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.6,60,000/- देण्यात यावेत अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.1 विभागीय व्यवस्थापक, इंडियन ऑईल कॉपोरेशन लि. इंडेन एरिया कार्यालय हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.16 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन पूर्णपणे नाकारलेले आहे. सामनेवाले यांचे म्हणणे की, सदरील तक्रारीस मुदतीचा बांध येत आहे. सदरील घटना दि.9.3.2008 रोजी घेतली व सदरील तक्रार दि.26.7.2011 रोजी दाखल केली होती. सबब, तक्रार मुदत बाहय असल्यामुळे त्यांची दखल घेता येणार नाही.
सामनेवाले यांचे कथन की, सदरील गॅस लिकेज घटना ही सिलेंडरच्या दोषयूक्त व्हॉल्व मुळे घडली आहे हे म्हणणे चूकीचे आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, सदरील घटना ही ब-याच कारणामुळे घडू शकते. तक्रारदार यांनी निष्काळजीपणे रेग्यूलेटरचे बटन चालू ठेवल्यास तसेच दूस-या कंपनीचे रेग्यूलेटर सामनेवाले यांचे सिलेंडर यांस बसविल्यास किंवा रेग्यलूटर योग्य प्रकारे न बसविलयास या कारणामुळे होऊ शकते. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, फिल्ड ऑफिसरने चौकशी केली. तक्रारदार यांनी जळालेले सिलेंडर, रेग्यूलेटर हे गॅस एजन्सीकडे हजर केले नाही. सदरील अपघात कसा घडला या बाबत निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदार यांनी मुदतीत सदरील अपघाता बाबत सामनेवाले क्र.1 यांना कळविलेले नाही. सामनेवाले यांचे फिल्ड ऑफिसर श्रीमती कृतिका अरुनन यांनी सामनेवाले क्र.2 गॅस एजन्सी यांना भेट दिली. त्यावेळेस तक्रारदार यांचे पतीने सदरील घटने बाबत कळवले. फिल्ड ऑफिसर यांनी दखल घेऊन सामनेवाले क्र.3 यांचेकडे पत्रव्यवहार सूरु केला. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, श्री.ए.डी.अग्नीहोत्री यांनी अपघातगस्त स्थळाला दि.9.3.2009 रोजी भेट दिली व सर्व्हे केला. तक्रारदार यांनी वैयक्तीक अपघात विमा क्लेम सर्व कागदपत्रासह सामनेवाले क्र.3 यांना दिला ही बाब सामनेवाले यांना माहीती नाही. श्री. अग्नीहोत्री यांनी दिलेला रिपोर्ट हे सामनेवाले क्र.3 चे प्रतिनिधी म्हणून दिलेला आहे. सदरील रिपोर्ट मध्ये एक पत्र हिंदूस्थान ऑईल कार्पोरेशन लि. यांना देण्यात आले आहे त्यामुळे तक्रारदार यांचेकडे दोन गॅस कनेक्शन वेगवेगळे कंपनीचे होते हे सिध्द होते. तक्रारदार यांनी अपघातग्रस्त सिलेंडर हजर केले नाही. त्यामुळे कोणत्या कंपनीचे सिेलेंडरमुळे अपघात झाला हे ठरवता येत नाही. तक्रारदार यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार याचे घरात हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. या कंपनीचे दूसरे गॅस सिलेंडर कनेक्शन आहे. त्यांचा ग्राहक क्र.602592 असा आहे. तो गॅस वैद्यनाथ गॅस एजन्सी यांचा आहे. सदरील गॅस हा पदमाकर धर्माधिकारी जे तक्रारदार यांचे पती आहेत यांचे नांवे आहे. तसेच पोलिस तपासामध्ये घरात दोन वेगवेगळे कंपनीचे गॅस सिलेंडर असल्या बाबत स्पष्ट नमूद केलेले आहे. तसेच पोलिस पंचनाम्यामध्ये इंडेन कंपनीचे दोन सिलेंडर सुस्थितीत आहे असे लिहीलेले आहे. तक्रारदार यांचे ग्राहक कार्ड यामध्ये तक्रारदार यांनी फक्त एकच सिलेंडर मंजूर केलेले आहे. तक्रारदार यांचे घरामध्ये दोन सिलेंडर आढळून आले. त्यामुळे तक्रारदार हे बेकायदेशीकृती करीत असल्या बाबत निष्पन्न होते. सामनेवाले क्र.1 यांने पूढे असे कथन केले आहे की, त्यांनी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा दिलेली आहे. तसेच सिलेंडर पुरवताना योग्य ती काळजी व दक्षत घेतली आहे. सदरील अपघात हा सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे घडला नाही. तक्रारदार हे सरकारी नौकर असल्यामुळे त्यांना सरकारी खर्चाने वैद्यकीय सेवा उपलब्ध होते. त्यांनी वैद्यकीय खर्च केल्याची प्रतिपूर्ती त्यांचे खात्याकडून होते. सदरील अपघात हा तक्रारदार यांचे निष्काळजीपणामुळे झाल्यामुळे सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी ताबडतोब योग्य ती कार्यवाही केली नाही तसेच फोटो हजर केले नाही. जर काही नुकसान भरपाई दयावयाची असल्यास ती सामनेवाले क्र.3 यांनी दयावयाची आहे. तक्रारदार यांनी पॉलिसीतील शर्ती व अटीचे पालन करावयास पाहिजे. सामनेवाले क्र.3 यांचेकडे पॉलिसी अस्त्तित्वात होती. तक्रारदार यांचे बेकायदेशीर कृतीमूळे सदरील अपघात झालेला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी नि.9 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र 2 यांचे कथन की, तक्रारदार हे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्र.1451 असा आहे. ग्राहकाला सिलेंडर देते वेळेस ते ग्राहका समक्ष तपासून दिले जाते. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र 2 यांचेकडून शेवटचे सिलेंडर हे दि.18.2.2008 रोजी घेतले आहे. सदरील सिलेंडर हे पूर्णपणे तपासून देण्यात आलेले आहे.सदरील घटना ही दि.9.3.2008 रोजी घडली आहे. सिलेंडर ग्राहकास दिल्यानंतर 20 दिवसानंतर सदरील घटना घडली आहे. सदरील कालावधीत तक्रारदार यांनी गॅस गळती बाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. ग्राहक भांडाराचे संचालक मंडळ व आय.ओ.सी. चे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली व अवलोकन केले असता सामनेवाले क्र 2 यांचे मार्फत देण्यात आलेल्या सिलेंडरला कोणतीही क्षती झाली नव्हती. सामनेवाले क्र 2 यांनी दिलेल्या सिलेंडर मुळे अपघात झाला नाही तशी पोलिस पंचनाम्यात सूध्दा नोंद नाही. तसेच पोलिस पंचनाम्यामध्ये फ्रिज क्षतीग्रस्त झाले ही बाब संशय निर्माण करणारी आहे. सामनेवाले क्र 2 यांनी तक्रारदार यांना सदोष सिलेंडर दिले नव्हते. तक्रारदार यांनी कंपनीकडे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही त्यांस सामनेवाले क्र 2 हे जबाबदार नाहीत. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र 3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.18 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र 3 यांनी सदरील गॅस गळती व त्यापासून तक्रारदार यांचे झालेले नुकसान या बाबत अनभिज्ञता दर्शवली आहे. सामनेवाले क्र 3 यांचे कथन की, तक्रारदार यांनी अद्यापपावेतो फॉरमँट अ व ब सामनेवाले क्र 3 यांना दिलेला नाही. सदरील कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे सामनेवाले क्र 3 हे अपघात कसा झाला या बाबत चौकशी करुन शकले नाहीत. सामनेवाले क्र 3 यांनी कोणत्या कारणामुळे घटना झाली ही बाब माहीती नाही. तक्रारदार यांनी एक वर्षानंतर सामनेवाले क्र 3 यांना घटना घडल्या बाबत कळवले आहे. तक्रारदार यांनी कोणतेही वैद्यकीय बिल हजर केले नाही. तक्रारदार हे स्वतः निष्काळजी आहेत. तक्रारदार यांनी पावत्या व सिलेंडर हजर केलेले नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र 3 यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाले क्र 3 हे नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत.
सामनेवाले क्र 4 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.33 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र 4 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचेकडून त्यांना सदरील घटने बाबत कधीही कळविण्यात आले नाही. सदरील घटनेची माहीती सामनेवाले क्र 4 यांनी या मंचाची नोटीस मिळाल्यानंतर झाली. सामनेवाले क्र 4 यांनी
पूढे असे कथन केले आहे की, सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तसेच तक्रारदार यांनी सदरील घटने बाबत सामनेवाले क्र 4 यांना कळविले नाही. सामनेवाले क्र 4 यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार व सामनेवाले क्र 4 यांचेमध्ये कोणताही करार झालेला नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र 4 यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाले क्र 4 विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण् घडलेले नाही. तक्रार ही मुदतबाहय आहे. तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये पोलिस स्टेशनला दिलेला प्रथम खबरची झेरॉक्स प्रत, घटनास्थळ पंचनामा, गॅस वितरक यांनी दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांचेकडून प्राप्त झालेले पत्र, तक्रारदार यांनी यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनीला पाठविलेले पत्र, अर्ज, सामनेवाले क्र 4 यांची विमा पॉलिसी, विमा कंपनी व तक्रारदार यांचेमध्ये झालेला पत्रव्यवहार, तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.24 वर दाखल केले आहे. तक्र्रारदार यांनी पदमाकर धर्माधिकारी यांचे शपथपत्र नि.25 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.26 सोबत दवाखान्याचे बिल, पोलिस पेपरच्या झेरॉक्स प्रत इत्यादी दस्त हजर केले आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी श्री.कृष्णाडू मूखर्जी यांचे शपथपत्र नि.17 वर हजर केले आहे. सामनेवाले क्र 2 यांनी एस. पी. यांचे शपथपत्र नि.10 वर हजर केले आहे. सामनेवाले क्र 4 यांनी डी.आर. यांचे शपथपत्र नि.14 वर हजर केले आहे. सामनेवाले क्र 4 यांनी नि.15 सोबत दस्त हजर केले आहे. त्यावर ओरिएंटल इन्शूरन्स कंपनीची पॉलिसी हजर केली आहे. तक्रारदार यांनी लेखी यूक्तीवाद नि.31 अन्वये दाखल केली आहे. सदरील लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले.
तक्रारदार यांचे वकील श्री.पांडव यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र 2 यांचे वकील श्री. जगताप यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र 1 चे वकील श्री. होलकर यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र 4 चे वकील श्री. ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णया साठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी दोषयूक्त टाकी पुरवल्यामुळे गॅस लिंक होऊन
सदरील घटना घडली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांस दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली
आहे ही बाब शाबीत केली आहे काय ? नाही.
3. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केले आहे की, दि.9.3.2008 रोजी सकाळी 8 वाजेचे सुमारास इंडेन कंपनीचे सिलेंडर मधील गॅस गळती झाली. तक्रारदार व त्यांचें कूटूंबिय हे गंभीररित्या भारले व जखमी झाले. इंडेन कंपनीचे सिेलेंडरचा वॉल खराब असल्यामुळे सदरची गळती झाली व अपघात झाला. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे निष्काळजीपणामुळे सिलेंडरची खराब टाकी तक्रारदार यांना दिली. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना चांगल्या प्रकारचे सिलेंडर देऊन सेवा पुरविण्यामध्ये कसूर केला. ग्राहकांच्या जोखमेसाठी सामनेवाले क्र. 3 कडे विमा काढला आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपूरावा करुन नुकसान भरपाई दिली नाही. सामनेवाले क्र. 1,2 व 3 हे वैयक्तीक व सयूंक्तीकरित्या नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री. होलकर यांनी असा यूक्तीवाद केला की, सदरील अपघात हा तक्रारदार यांचे निष्काळजीपणामुळे झालेला आहे. तक्रारदार यांनी रेग्यूलेटर दूस-या कंपनीच्या सिलेंडरला जोडणी केली ते योग्य प्रकारे लावले नाही. तसेच तक्रारदार यांनी ज्या सिलेंडर मधून गॅस गळती झाली ते सिलेंडर व रेग्यूलेटर गॅस एजन्सी कडे जमा केले नाही. सदरील गॅस सिलेंडर व रेग्यूलेटर जमा न केल्यामुळे तसेच फारमॅट अ व ब न दिल्यामुळे चौकशी करुन रिपोर्ट देता आला नाही. सामनेवाले क्र. 1 यांचे प्रतिनिधी श्री. अग्नीहोत्री यांनी घटनास्थळाला भेट दिली. तक्रारदार यांनी वैयक्तीक अपघात विमा दावा व संबंधीत कागदपत्र दिले नाही. तक्रारदार यांचेकडे चौकशी केली असता तक्रारदार यांनी दोन वेगवेगळया कंपनीच्या गॅस जोडणी घेतली आहे. ज्या सिलेंडर मूळे अपघात झाला ते सिलेंडर हजर केले नाही. त्यामुळे खरोखरच गॅस सिलेंडर हे सदोष होते ही बाब तक्रारदार शाबीत करु शकले नाहीत.
सामनेवाले क्र. 2 यांनी असे कथन केले आहे की, ग्राहकाला सिलेंडर दिले जाते त्यावेळी ते पूर्ण तपासून दिले जाते. तक्रारदार यांना दि.18.2.2008 ला पूर्ण तपासणी करुन देण्यात आलेले आहे. दि.18.2.2008 ते दि.9.3.2008 या कालावधीत तक्रारदार यांनी गँस गळती बाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. सदरील घटने मध्ये सिलेंडरची कोणतीच क्षती झालेली नाही.फ्रिज हे क्षतीग्रस्त झालेले दाखवले आहे. सदरील घटना ही सदोष गॅस टाकीमुळे झाली आहे हे सिध्द झालेले नाही.
सामनेवाले क्र. 3 यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी फारमॅट अ व ब हजर केले नाही. सदरील घटना ही दि.9.3.2008 रोजी घडली, तदनंतर एक वर्षाने तक्रारदार यांनी सदरील घटने बाबत सामनेवाले क्र. 3 यांना कळवले. सामनेवाले क्र. 3 यांनी सदरील घटना खरोबरच सिलेंडर मधील गँस गळतीमूळे झाली आहे किंवा काय हे तपासण्याची संधी मिळाली नाही. तसेच क्षतीग्रस्त सिलेंडर व रेग्यूलेटर तक्रारदार यांनी तपासणीसाठी दिले नाही. सदरील घटना तक्रारदार यांचे निष्काळजीपणामुळे घडली.
सामनेवाले क्र. 4 यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी कोण्ताही दस्त हजर केला नाही. सामनेवाले क्र. 4 यांचे सदरील घटनेशी कोणताही संबंध नाही. सामनेवाले क्र. 4 यांनी दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली नाही.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्त यांचे अवलोकन केले. सदरील घटनेची खबर दि.9.3..2008 रोजी प्रभाकर दत्तुपंत सेलमोहकर या व्यक्तीने परळी पोलिस स्टेशनला दिल्याचे निदर्शनास येते. त्यावर पदमाकर धर्माधिकारी यांचे घरी गॅस लिंक होऊन त्यांचे घरातील लोक भाजले आहे व त्यांना दवाखान्रूात भरती केले आहे असे नमूद केले. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केलेला आहे. पंचनाम्याचे अवलोकन केले असता, खोलीच्या समोर मोकळया जागेत इंडेन कंपनीचे दोन गॅस सिलेंडर ठेवलेले आढळून आले. सदरील गॅस सिलेंडर हे सूरक्षीतरित्या घराचे बाहेर ठेवलेले आहेत. तसेच पंचनाम्यामध्ये फ्रिज हे पूर्णपणे जळून खाक झालेले दिसत आहे. तसेच गृहउपयोगी वस्तू हया जळून खाक झाल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही एक जप्त केलेले नाही. दोन्ही गॅस सिलेंडरची पाहणी केल असता दोन्ही सिलेंडर हे पूर्णपणे मोकळे झालेले दिसत आहेत. त्यांचे जवळील भाग जळालेले दिसत आहेत. सिलेंडर मध्ये गॅस आढळून आला नाही.
संपूर्ण पोलिस तपासाचे कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदरील गॅस सिलेंडर हे बाहेर मोकळया जागेत ठेवलेले होते. सदरील गॅस सिलेंडर हे कोणी, कशा परिस्थितीत बाहेर आणले यांचा बोध होत नाही. तसेच कोणत्या सिलेंडरला रेग्यूलेटर बसवलेले होते ते रेग्यूलेटर कोणी व कसे काढले यास बाबतही पूरावा उपलब्ध नाही. तक्रारदार यांनी क्षतीग्रस्त सिलेंडर व रेग्यूलेटर कंपनीकडे तपासणीसाठी पाठविले नाही. तक्रारदार यांनी क्षतीग्रस्त सिलंडर हे 20 दिवस अगोदर वापरण्यास सूरु केले होते. जर सिलेंडरच्या गॅस निघण्याच्या पिनमध्ये दोष असता तर तो ताबडतोब निदर्शनास आला असता तसेच तक्रारदार यांनी रेग्यूलेटर कधी व कोणाकडून जोडून घेतले या बाबतही नमूद केलेले नाही. एका कंपनीचे रेग्यूलेटर दूस-या कंपनीच्या सिलेंडरला जोडल्यास व ते व्यवस्थीत न बसल्यास गॅस गळती होण्याची शक्यता असते. तक्रारदार यांनी कोणत्या कंपनीचे रेग्यूलेटर कोणत्या सिलेंडरला लावलेले होते या बाबत पुरावा दिला नाही तसेच तक्रारदार यांनी गॅस पूस्तक ही या मंचासमोर हजर केलेले नाही. तसेच रेग्यूलेटर व सिलेंडर हे ही हजर केले नाही. केवळ गॅस सिलेंडर मधून गॅसची गळती झाली त्या कारणास्तव सिलेंडर मध्ये दोष आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. सिलेंडर मधून गॅस बाहेर येण्यासाठी रेग्यूलेटर बसवलेले असते. रेग्यूलेटरचा वापर योग्य प्रकारे न केल्यास अगर रेग्यूलेटर व्यवस्थित न बसवल्यास गॅसच्या टाकीतून गॅस लिंक होण्याची शक्यता असते. तसेच गॅसचा वापर संपल्यानंतर रेग्यूलेटरचे बटन बंद करुन ठेवणे गरजेचे असते. ते जर चालू राहिले व शेगडीचे बटन यांचेमधून गॅस बाहेर आला तर विद्यूत स्पॉर्कीग मूळे व इतर कारणामूळे आग लागण्याची शक्यता असते. जर गॅस सिलेंडर मध्ये दोष असता तर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी हानी झाली असती. सदरील प्रकरणामध्ये गॅस सिलेंडरला कोणतेही नुकसान झालेले नाही. तसेच रेग्यूलेटरलाही नुकसान झालेले नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी जी गॅसची टाकी तक्रारदार यांना दिली आहे त्यामध्ये दोष होता हे ही म्हणणे उचित होणार नाही.
सदरील अपघात घडल्यानंतर तक्रारदार यांनी ताबडतोब वितरक व गॅस कंपनीकडे तक्रार नोंदविणे गरजेचे होते. तसेच गॅस सिलेंडर रेग्यूलेटर यांचे सक्षम अधिका-या मार्फत तपासणी होऊन त्यांचा रिपोर्ट प्राप्त करणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना आावश्यक ते दस्त दिले नाही. तसेच घटना ही उशिराने कळविली त्यामुळे कंपनीच्या सक्षम अधिका-यांना घटनास्थळावर जाऊन खरोखरच गॅस सिलेंडर मध्ये दोष होता काय यांची पाहणी करता आली नाही. तसेच तक्रारदार यांनी फॉरमॅट अ व ब व संबंधीत आावश्यक ते दस्त सामनेवाले यांचेकडे हजर केले नाही. या ग्राहक मंचापूढे जो मुददा आहे तो म्हणजे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवी आहे काय ? हा आहे. त्यासाठी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष गॅस टाकी देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे काय ही बाब शाबीत करणे गरजेचे आहे. या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी ते शाबीत केलेले नाही. तक्रारदार यांचे घरगुती सामान यांचे नुकसान झाले आहे तसेच तक्रारदार व इतर कूटूंबिय यांना इजा झाली आहे असे जरी गृहीत धरले तरी जो पर्यत तक्रारदार, सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब शाबीत करीत नाही तोपर्यत तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होत नाही. सबब, या मंचाचे मत की, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड