(घोषित दि. 23.11.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरु केलेली असुन सदर योजने अंतर्गत शासनाने औरंगाबाद महसुल विभागातील शेतक-यांचा विमा गैरअर्जदार क्रमांक 2 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे उतरविलेला असुन सदर विमा पॉलीसीच्या कालावधीमध्ये त्याची पत्नी कोकीळाबाई हीचे साप चावल्याने दिनांक 30.05.2010 रोजी निधन झाले. त्याची पत्नी शेतकरी होती आणि तिच्या नावाचा फेरफार दिनांक 28.05.2010 रोजी मंजूर झालेला होता. त्याच्या पत्नीचे पॉलीसी कालावधीमध्येच निधन झाल्यामुळे शेतकरी अपघात विमा पॉलीसीनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता. परंतू गैरअर्जदार विमा कंपनीने त्याच्या पत्नीचे नाव 7/12 मध्ये पॉलीसी सुरु झाल्यानंतर नमूद केल्याचे दर्शवून त्याचा विमा दावा फेटाळला. विमा दावा फेटाळण्याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने दिलेले कारण चुकीचे आहे. म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा रक्कम रुपये 1,00,000/- व्याजासह देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा त्यांना दिनांक 06.09.2010 रोजी प्राप्त झाला होता तो त्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला आणि सदर इन्शुरन्स कंपनीने तो विमा दावा फेटाळला. त्याबाबत त्यांचा काहीही संबंध नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 ने केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, शेतकरी अपघात विमा पॉलीसी संदर्भातील करार शासनासोबत झालेला आहे. परंतू तक्रारदाराने शासनाला या प्रकरणात पक्षकार केलेले नाही. म्हणून ही तक्रार आवश्यक पक्षकारा अभावी अयोग्य असल्यामुळे फेटाळावी. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, शेतकरी अपघात विमा पॉलीसी नुसार ज्या शेतक-यांचे नाव पॉलीसी सुरु झाली त्या दिवशी 7/12 मध्ये नमूद केलेले आहे, फक्त त्यांनाच पॉलीसीचे सरक्षण लागू आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे नांव पॉलीसी सुरु झाल्यानंतर 7/12 मध्ये नमूद केलेले आहे. म्हणून तिला पॉलीसीचे संरक्षण नव्हते. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आलेला असुन सदर निर्णय योग्य आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या सेवेत
त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.पी.एम.परिहार आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड. देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
शेतकरी अपघात विमा पॉलीसी बाबत महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीसोबत केलेला करार नि.13/2 मधील अट क्रमांक 8 (II) नुसार सदर पॉलीसीचे संरक्षण पॉलीसी सुरु झाली त्यादिवशी ज्या शेतक-याचे नांव 7/12 मध्ये आहे त्यांनाच लागू होते. शेतकरी अपघात विमा पॉलीसी दिनांक 15.08.2009 रोजी सुरु झाली होती. त्यामुळे ज्या शेतक-यांचे नाव दिनांक 15.08.2009 रोजी 7/12 मध्ये होते. त्यांनाच सदर पॉलीसीचे संरक्षण लागू होते. तक्रारदाराची पत्नी कोकीळाबाई हिचे नाव 7/12 मध्ये दिनांक 30.05.2010 रोजी नमूद करण्यात आले. म्हणजेच शेतकरी अपघात विमा पॉलीसी सुरु झाली त्यावेळी तिचे नाव 7/12 मध्ये नव्हते. त्यामुळे शेतकरी अपघात विमा पॉलीसीचे संरक्षण तिला लागू नव्हते. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने मयत कोकीळाबाई हिचे नांव 7/12 मध्ये पॉलीसी जारी केल्यानंतर टाकण्यात आल्याचे कारण देवून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला. विमा कंपनीचा सदर निर्णय पॉलीसीच्या अटी व शर्ती नुसार योग्यच आहे आणि विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही, असे आमचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.